Monday, July 2, 2012

इमो इमो


गेले काही दिवस आमच्या मुलांच्या पाळणाघरात पुढच्या वर्षीचं प्लानिंग नावाखाली मेल्स येताहेत. यंदा सगळीकडे अर्थात तीच बोंब आहे इकॉनॉमी,(नसलेलं) बजेट आणि असंच काही.शिवाय इकडच्या भागात एक नवीन सरकारी शाळा उघडताहेत.तिथे प्रिस्कूल सुद्धा आहे. साधारणतः या शाळा किंडरगार्टन पासून असतात पण ही जरा अपवाद दिसतेय.
ज्या आया घरी आहेत त्यांच्यासाठी तो पर्याय अर्थात आमच्या पाळणाघर कम प्रिस्कुलपेक्षा अर्थातच किफ़ायतशीर आहेच.शिवाय मुलं पुन्हा किंडरगार्टनला तिथेच जाणार म्हटल्यावर त्यांच्या आधीपासून तिथे रूळायचा फ़ायदा आहेच.
ही माहिती स्वतः वाचताना मला उगाचच आता इथली मुलं कमी होणार किंवा आमच्यासारखे अत्यंत गरजवंत पालकच इथे मुलांना ठेवणार हे सत्य साधारण समजतंय. याचा परीणाम काय हेही ढळढळीत सत्यच आहे..तिथे पण जॉब कट....:(

कधीतरी मलाही वाटतं की मी माझ्या मोठ्या मुलाला ते सरकारी, थोडं स्वस्त प्रिस्कूल आणि मग घरी एखादी नॅनी असं करावं का? मग उगीच त्या सगळ्या प्रेमळ शिक्षिका डोळ्यासमोर येतात ज्यांनी त्याला गेली दोन वर्षे जीव लावला. त्याला माझी खूप सवय होती आणि तिथे सुरूवातीला पाळणाघरात जायला तो सारखं रडायचा पण त्याचं सगळं रडगाणं, हट्ट सहन करून त्याला माझ्याशिवाय रमायला शिकवलं. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं डिटेल्ड डॉक्युमेंटेशन करून आम्हाला पाठवलं, त्यातलं निवडक काही शाळेतही लावलं. सगळ्यात मुख्य त्याला स्वतःला पुढच्या वर्षी म्हणजे इथलं शैक्षणीक वर्ष जे येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होईल  तेव्हा आपण इथल्याच प्रिस्कूलला जाणार हे माहीत आहे. मग मी तो आधी म्हटलेला विचार डोक्यातून काढून टाकते. एका वर्षासाठी कदाचीत थोडं स्वस्त प्रिस्कूल आणि मुलाचं मानसिक समाधान यात त्याच्या (आणि माझ्याही) मानसिक समाधानाची निवड करते.
शिवाय आमचा छोटाही तिथेच पाळणाघरात जातो. त्याला तर तिथल्या शिक्षिकांनी नऊ महिन्याचं बाळ असताना त्यांच्याकडे सांभाळलाय, त्याच्यासाठी ते आमचे काही शब्द शिकले, त्याच्या आजोबांच्या आवाजातली गाणी पण त्यांना हवी होती म्हणजे त्याला तिथेही घरच्यासारखं वाटेल...खरंच खूप सारे पैसे दिले तरी सुविधा मिळतीलच याची खात्री असते का? ती इथे हमखास आहे त्यामुळे निश्चिंत होऊन आम्ही दोघं आमच्या डेस्कला काम करू शकतो..माझ्याकडेही यंदा अप्रेजलच्या नावाने शंख आहे पण निदान नोकरी आहे..इथे मात्र वारे कधीच उलट्या दिशेने वाहू लागलेत.

कधीकधी वाटतं की आपण खरंच इतकं इमोशनल असायला हवंच का? का असं होतं की आपल्याला कुणाकडूनही काही वाईट बातमी ऐकली की कासावीस व्हायला हवं असतं? आज ही पोस्ट लिहायचं कारण सप्टेंबरची प्लानिंग मेल आली आणि त्यात माझ्या दोन्ही मुलांना सांभाळणार्‍या दोन गुणी शिक्षिकांची नावं नाही आहेत. त्यातल्या एकीचं बाळ आता सहा महिन्याचं होईल आणि ते बाळ झालं तेव्हाच तिच्या नवर्‍याची नोकरी गेली. हे आम्हाला कळल्यामुळे माझ्या तिच्या बाळापेक्षा बरोबर वर्षाने मोठ्या असलेल्या लेकाच्या कपडे/खेळणी यांचं काय करायचं हे आम्ही तेव्हाच ठरवलं....दुसरी तर इथे कित्येक वर्षे आहे म्हणजे तिने स्वतःच कदाचीत हे सोडून दुसरं कुठलं ठिकाण असा गेले दशकभरतरी विचार केला नसेल..

कसं बरं जायचं उद्या तिथे मुलांना सोडायला...इतके दिवस हे कदाचीत फ़क्त त्यांनाच माहित आहे पण आता आम्हालाही हे ऑफ़िशियली कळवलं गेलंय हे त्यांना माहित असणार..कसं बरं सामोरं जायचं??? श्या, काही केल्या बरंच वाटत नाहीये...

निरोप देणं हे मला काय सर्वांनाच नेहमी जड जातं.पण हा निरोप सगळ्यात जास्त जड वाटतो मला.कधीतरी एक सेंड ऑफ़ होईल आणि तेव्हा डोळ्यातलं पाणी बिल्कुल न दाखवता "सी यु समटाइम्स... विश यु लक ऑन युअर नेक्स्ट अ‍ॅडव्हेंचर" असं एलिशिया आणि सेरा या दोघींना म्हणताना दाटून आलेला गळा..मला तर आत्ताच खूप इमो इमो होतंय...:(

तळटीप :- त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे मागे मी टोशाची पोस्ट लिहिली होती त्याबद्दल काही चांगले अपडेट्स आहेत. तिची शस्त्रक्रिया सुरळीत होऊन ती आणखी एक दोन आठवड्यातच पुन्हा पाळणाघरात आपलं काम सुरू करेल...:) 

अपर्णा,
२ जुलै २०१२

Wednesday, June 27, 2012

सोबत


घरून काम करायचे असंख्य तोटे असतात असं मी म्हटलं तर कदाचीत प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन काम करणारा वर्ग दोन्ही भुवया वर करून माझ्याकडे पाहिल...पहिले फ़ायदेच पाहायचे तर एक प्रवास करावा लागत नाही एवढं एकंच दिसतंय मला आणि काम हे काम असतं घरी काय, ऑफ़िसमध्ये काय ते करावंच लागतं, म्हणजे इथे एकमत असेल तर उरले ते बरेचसे तोटे.....

मला ज्यांच्याबरोबर काम करते त्यांची तोंडं दिसत नसतात, पर्यायाने एक कलिग म्हणून त्यांची कामाच्या वेळेत मिळणारी सोबत नसते..कधीतरी एकत्र कॉफ़ी पिणे, एखाद्या करंट अफ़ेअर्सवर चर्चा,एकत्र जेवणं किंवा झालंच तर नवे कपडे/दागिने अमक्या तमक्याचं  कौतुक हे सगळं मी माझ्या कामात मागची काही वर्षे अनुभवणं जवळ जवळ विरळाच...यातून येणारा एक वेगळा एकटेपणा असतो..प्रचंड कामात असलं तरी तो तुमच्यासोबत कायम असतो....अशा एकांतात मग सोबतीला येते ती आमच्याकडे महिन्यातून एकदा घरातली सफ़ाई करण्यासाठी येणारी "किरा"...

तिचा आमचा संबंध किंवा माझा नव्हताच खरं तर, तो आला होता ऋषांकच्या वेळेस मी दवाखान्यात असताना. त्याआधी एक नेहमीची येणारी "जिना" आमच्या घरापासूनच्या लांबच्या गावात राहायला गेली त्यामुळे जी काही पाच-सहा महिने ती यायची त्यानंतर आता काही जमायचं नाही हे तिनं आम्हाला सांगायला आणि बाळाचं आगमन साधारण एकत्रच झालं होतं. मग आम्ही पुन्हा एकदा मायाजालावरून एक बाई शोधली. ती यायच्या वेळेस मी म्हटलं तसं घरात नव्हते त्यामुळे आता जी कुणी येणार ती नवर्‍याला चांगलाच चुना लावून जाणार असं मी तरी गृहीत धरुन होते..अर्थात "बेबी ब्लु" या नावाखाली त्या हिवाळ्यात बरंच काही होत होतं त्यापुढे हे फ़्रस्ट्रेशन काहीच नसणार असं मी उगाच स्वतःला सांगत बाळाला घेऊन घरात आले....आणि स्पॉटलेस घर बघून नवर्‍याला लगेच पसंतीची पावती दिली....त्यानेही हुश केलं असणार..पण तरी नंतर लगेच काही मला कुणाला घरात बोलावून सफ़ाई करवून घ्यायला बाकीच्या कामांमुळे जमत नव्हतं...पण त्यानंतर लगेच दोनेक महिन्यांनी आई येणार होती त्यामुळे तिला निदान आल्याआल्या सगळा पसारा नको म्हणून लगोलग किराला पुन्हा बोलावले गेले...

यावेळी ती यायच्या एक दिवस आधी मला नवरा म्हणाला,
"अगं तुला सांगायला विसरलो तिला बोलता येत नाही"
"क्का....य?? मग तू तिला कॉंटॅक्ट कसा केलास?"
"ती मागच्या वेळी फ़ोन नं देऊन गेली आणि मी तिला फ़ोन करेन असं हाताने सांगत होतो. ती एकदम मला थांवबून म्हणाली, "टेक्स्ट टेक्स्ट"....टेक टेक टेक टेक्नॉलॉजी बेब्स..."

ओह, काय हा असा?? सांगायला नको का आधी? पण खरं तर आपल्याला हवं ते काम नीट करते याखेरीज बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काय करायचंय हा त्यांचा शांत अ‍ॅट्यिट्युड मला आवडला...तरी तेव्हा बाळ लहान होतं म्हणून तोही घरात थांबून त्यावेळचं कामसत्र आटपलं..तिने कामाच्या गडबडीतही बेबी छान आहे म्हणून मला हातवारे करून सांगितलं....

त्यानंतर आम्ही घर बदललं. त्यामुळे ते बदलायच्या आधी आणि नंतर असं दोनेक महिने आम्हाला तशी तिची गरज पडली नाही..मग पुन्हा आमची गाडी रूळावर आली..प्रत्येक महिन्याला पसारा करा आणि तिला बोलावून घर साफ़ करून घ्या....

ती पहिल्यांदी आमच्याकडे एका एजन्सीतर्फ़े आली आणि मग तिने त्यांच्यातर्फ़े नको असेल तर काही डिस्काउंट देऊन आमच्याकडे तिच्या सर्विसेसचं (न बोलता) मार्केटिंग केलं...मला काम करायचा तिचा हा गूण अतिशय आवडतो. म्हणजे एकदा मी तिला म्हटलं की प्रत्येक महिन्याला येशील का? प्रत्येकवेळी सगळं करायला नको. एक आड एक गोष्टी करू म्हणजे कधी दोन्ही बाथरूम्स, तर कधी फ़्रीजचं डिप क्लिनिंग आणि असंच काही....मग तिला आमचं तिचे ग्राहक म्हणून पोटेंशियल लक्षात आलं आणि तिने स्वतः आम्हाला महिना झाला की एक रिमांईडर टेक्स्ट करायला सुरूवात केली...आहे की नाही टेक टेक टेक टेक्नॉलॉजी???
या घरात नवीन असताना इथे सफ़ाई करायचं एक रूटीन आम्ही दोघींनी सेट केलंय त्यामुळे आजकाल फ़ारसं सांगावंही लागत नाही.  ती आली की मस्त हसून मला हाय करते आणि पहिले आपला ब्लॅकबेरी पहिले चार्जिंगला लावते. मी मनातल्या मनात उगीच हसते....कारण खरं तर स्मार्ट फ़ोन वापरायला मीही आजकाल सुरूवात केलीय....

नंतर सुरू होतो आमचा थोडं लिहून, थोडं खुणांच्या भाषेचा संवाद...त्यात बर्‍याच गोष्टी असतात...काही कामाच्या तर काही अशाच....तेव्हा सुचलं म्हणून केलेल्या...सगळं लिहून....
मागच्या वेळी मी केस कापले होते त्यावेळी दरवाजा उघडल्याउघडल्या तिने केस फ़ारच छान आहेत म्हणून  स्वतःच्या केसांकडे बोट दाखवून दोन्ही हाताने छान म्हटलं आणि माझी कळी खुलली..एकदा आमचा दिवस ठरला असताना अचानक तिचा मुलगा आजारी पडल्यामुळे येऊ शकणार नाही असं तिने कळवलं मग मी तिला उलट टपाली जेव्हा जमेल तो दिवस कळव म्हटलं आणि मग आल्यावर पहिले मी तिच्या मुलाची चौकशी केली. तिलाही ते आवडलं...मग आम्ही असंच एकमेकांची मुलं आता अ‍ॅलर्जी सिझन असल्यामुळे कशी आजारी पडताहेत त्याबद्दल बोललो..मग मुलांचे आजार स्वतःलाही होतात याबद्दलही थोडा उहापोह झाला...

यावेळी फ़्रीजवर माझ्या फ़िजिओथेरपीने दिलेल्या व्यायामांचे प्रिंट आउट्स आहेत म्हणून मग तिने माझ्या कंबरदुखीचीही चौकशी केली...

तिला नक्की का बोलता येत नाही हे काही मी तिला विचारणार नाही, पण आता एक दोन अनुभवांमुळे साधारण वाटतंय की तिला ऐकु येत नसावं. तरी तिला इंग्रजी भाषा येते हे मात्र  चांगलं आहे. म्हणजे काही शब्द तोंडाच्या हालचालीनेही तिला कळतात आणि हालचालीनेच बोलता येतात. पण आवाज मात्र नाही. वाईटही वाटतं..कधी कधी तल्लीन होऊन किचन साफ़ करताना आधी डायनिंग एरियामध्ये केलेला व्हॅक्युम तसाच सुरू असतो. माझ्या कामाच्या तंद्रीत मलाही ते लक्षात येत नाही आणि मग इतर वेळी तशा आवाजाची सवय नसल्याने काय वाजतंय म्हणून उठून मी तिला पाहते आणि काहीच न बोलता तो व्हॅक्युम बंद करून टाकते...तिला ते तसंही ऐकु येणार नसतं...काहीवेळा तर माझ्या पायरवाचीही  तिला जाणीव नसते..मग हळूच खांद्यावर हात ठेवून मी तिला काही सांगायचं असेल तर ते लिहूनच सांगते.

तिला ऐकु येत नाही हे जाणवतं, अर्थात तिला काम देणे आणि जमेल ती इतर मदत जसं काही वस्तू वगैरे देणे इतकंच मी करू शकते तेच करते. ती असताना तिला सूचना देऊन जेव्हा मी कामाच्या जागी येऊन बसते, तेव्हा तो वर म्हटलेला एकटेपणाचा कंटाळा, आजकाल पाठदुखीने हैराण असण्याच्या तक्रारी हे सगळं विसरून जाते...देवाने मला सगळे शाबूत अवयव दिल्याने शिक्षण घेऊन मी आज या जागी बसून काम तरी करतेय...कानाने दगा दिल्यामुळे अशा प्रकारे या किराला कदाचीत माझ्यासारखी शिकायची संधी मिळाली नसेल आणि त्यामानाने जास्त शारीरिक कष्टाचं काम करून ती आपला संसार विनातक्रार चालवतेच आहे नं??  

तिचं ते आमच्याशी न बोलता संवाद साधूनही जिव्हाळ्याने काम करणं आणि पैसे दिल्यावर मनसोक्त हसून हनुवटीला हात लावून आभार मानणं हे माझ्यासाठी आज इंस्पिरेशनल असतं...माझ्यासाठी न बोलता मिळालेली एक अनमोल सोबत असते...घरून काम करता करता.....Thanks Kira....:)

Friday, June 15, 2012

वाह! क्या चीज है.....


चीज या खाद्यपदार्थाशी माझी पहिली ओळख जरी "पिझ्झा" या माध्यमाद्वारे झाली असली नं तरी खरं चीज भेटलं ते देश सोडल्यावरच...मजा म्हणजे अगदी सुरूवातीला मला चीज हा प्रकार चवीला आवडला नव्हता...तसं खरं म्हणजे मला मनापासून पिझा आवडत नाही असं म्हटलं तर माझ्यासाठी थोडेफ़ार निषेधाचे फ़लक येतील. पण त्याचं कारण चीज नसून माझ्या शरीराच्या आम्लतेला आमंत्रण देणारा तो लाल सॉस हे आहे...असो हे विषयांतर कम तेल हो हो चीजच्या पोस्टेतलं तेल....प्रोसेस्ड चीजवर कसं थोडं तरंगतं तेवढंच पुरे....:)

तर इकडे चीज म्हणजे नुस्तं चीज खाणं म्हणतेय मी....माझं एक प्रोजेक्ट होतं लॉंग आयलंडला. तिकडे ज्या हॉटेलमध्ये आम्ही सगळे कंसलट्न्ट राहायचो त्यांच्या लॉंजमध्ये संध्याकाळी वरती एका छोटेखानी बारमध्ये चीज आणि क्रॅकर कॉंप्लिमेंटरी असायची. लोकांनी वाईनवर खर्च करावा म्हणून केलेली युक्ती असू शकेल..पण एकतर माझं वाईन आणि तत्सम प्रकाराशी काहीच नातं नसल्याने आणि चीजचंही विशेष आकर्षण नसल्याने मी तिथे नुस्तीच ज्युस घेऊन टवाळक्या करत असे....साध्या भाषेत ज्याला पी एम नसला की "पी एमची मारणे" आणि असला की मूग गिळून त्याच्या "हो ला हो म्हणणे" नावाचा एक सभ्य प्रकार जगातले यच्चयाव्त आय टी कामगार करतात तसे...:)

त्या प्रोजेक्टची सगळीच टीम खायच्या बाबतीत भन्नाट होती..ब्रेकफ़ास्टला सगळीजणं साडे सातला भेटत ते तासभर अड्डा तिथेच...कामाची वेळ अर्थात कधीच चुकवली नाही. एखाद्याची सकाळची मिटिंग लवकर असली की तो त्यादिवशी फ़क्त पळे...त्यां सर्वांनी मला ते छोटे छोटे टुथपिकला लावून ठेवलेले चीजचे तुकडे खायला शिकवले असं म्हणायला हवं आणि मी त्यांना नंतर डीनरला एक भारतीय पद्धतीचं खूप छान रेस्टॉरंट होतं त्यांच्याकडचे बरेच प्रकार खायला शिकवले..हे म्हणजे खाणार्‍याने खात जावे, शिकवणार्‍याने खायला शिकवीत जावे आणि खाता खाता एक दिवस खाद्यप्रकारांची अदलाबदल व्हावी तसं चीज माझ्याही खाद्य आयुष्यात आलं...
त्या प्रोजेक्टमध्ये माझं वाढलेलं वजन हा माझ्यासाठी नंतर एक वेगळाच चर्चेचा विषय होता पण तेवढं एक सोडलं तरी चीज मनात जाऊन बसलं..मग एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा बरंच चीज खाल्लं...आणि तसंही कंट्रोल्ड खाणं जमायला लागलं की हे छोटे छोटे तुकडे खाऊन काहीच जाडं व्हायला होत नाही हेही कळलं...आताही कुठे चीज सॅंपल्स असले की आम्ही दोघं ते आवर्जून खाऊन पाहातो आणि अर्थात एखादं आमच्याही घरात येतंच....
परवा असंच एका डिपार्टमेंटल स्टोअरला असंच एक चीज टेस्टींग होतं, तिथे तीन-चार प्रकारची चीज चाखली पण बाजी मारली ती स्मोक्ड फ़्लेवरने....हे आहे त्यावेळी घेतलेल्या स्मोक्ड गुडा (smoked Gouda) चं फ़ोटोसेशन......
तू "चीज" बडी है मस्त मस्त....

आणि आता फ़ोटो काढताना जरा समोर पहा बरं

Say cheese....:)

छोटे छोटे चीजचे तुकडे आणि सोबतीला क्रॅकर्स आणि ज्युस....यम्मी स्नॅक सगळ्यांसाठीच....



बाकी चीजमध्ये असलेल्या कॅल्शियम इ. चे गूण गाऊन पोस्ट टेक्निकल करण्यापेक्षा मी तर म्हणेन "वाह! क्या चीज है".
Enjoy !!!!



Tuesday, June 12, 2012

इट्स ओके......ऑर मे बी इट्स नॉट.....बट हु केअर्स....


कसं असतं नं लहान असताना आपल्याला एक खास मैत्रीण असते...मग तिला आणखी एक मैत्रीण मिळते...काही वेळा आपण तिघी मैत्रीणी होतो आणि काहीवेळा ती तिसरी आवडली नाही की मग आपल्या "खास"शी भांडण तरी होतं नाहीतर तिला सरळच सांगितलं जातं..."एक तर ती किंवा मी".....आणि हे ती किंवा मी ला किती अर्थ असतो देव जाणे...पण होतं असंही..पुन्हा मैत्री आपला मार्ग क्रमू लागते......हसणं, खेळणं, खिदळणं आणि हो भांडणंही....कट्टी आणि बट्टी...दोघी जणु काही मैत्रीणीच...

आता मोठं झाल्यावर मात्र असं "एक तर ती किंवा मी" असं नाही होत....मुळात आता इथे एकवालीचा संदर्भच नसतो...आता असतो तो सरळ एक ग्रुप किंवा दुसरा ग्रुप...या दोन ग्रुपमध्ये आपली स्वतःची वन ऑन वन मैत्री कुठेतरी चाचपडत राहते....कट्टीही नाही आणि बट्टीही नाही......मधलंच काहीतरी....बोलताना सगळं काही आलबेल असल्यासारखं दाखवलं तरी मुठीतून बरंच काही निसटल्याची जाणीव दोन्हीकडे......

कळपप्रिय प्राण्याला कळप तर हवाच पण तरी त्यात दोन वेगळे कळप असले की मग कुणाला कुठे ठेवायचं याचा एक नवाच गुंता....स्वतः मात्र कुठेतरी एकांत शोधावा असं अशावेळी माझं मला माझ्यासाठी वाटतं....नकोच ते नवे कळप..सगळीकडे नुस्तं हाय हॅलो आणि वर्तमानात बोलून या ओळखींना कुठला भूतकाळ न ठेवता कुठल्या भविष्याचीही चिंता नको असं काहीसं करता यायला हवं नाही?? मुख्य परक्या देशात आणि लौकिक अर्थाने परक्यांबरोबर तरी.....

प्रत्यक्षात हे नेहमी जमणार आहे असंही नाही....तसं करायचंच ठरवलं, तर होतो आपला धोब्याचा कुत्रा..ना इधर का ना उधर का....सगळीकडे दुरून डोंगर साजरे लुक मिळवून त्या ग्रुपमध्ये तेवढ्यापुरता असायची तयारी असेल तर हा स्टॅंड पण काही वाईट नाही...

नाहीतर आधी एका ग्रुपचा घट्ट भाग व्हायचं....काही कारणाने दुसरं आणखी चांगलं (म्हणजे नक्की काय हे मला खरं तर कळत नाहीच) किंवा वेगळं किंवा क्लिक होणारं काही मिळालं की मात्र तिथे बस्तान हलवायचं यापेक्षा हे काय वाईट...

फ़ार विचार केला तर काहीच कळत नाही...म्हणजे एका ग्रुपमधून सरळ दुसर्‍यात जायचं हे बरोबर की साफ़ चूक???एक बरंय की सध्या स्वतःचं आयुष्य स्वतःच्याच कुटुंबाभोवती इतकं फ़िरतयं की घरची चार डोकी सोडली तर कुठल्याच ग्रुप-बिपची तशी गरज नाहीये...

पण इकडे-तिकडे मात्र हा अमक्या ग्रुपमधला तमक्यात गेला वगैरे ऐकते आणि उगाच वाटतं, नसेल झेपलं तिला इथलं काहीतरी, नसेल आवडलं या ग्रुपमधल्यांचं काहीतरी आणि मिळाला असेल मधल्या मध्ये दुसरा जास्त क्लिक होणारा ग्रुप आणि हे सगळं समजावून  सांगण्याइतका पेशंसही नसेल उरला...जे काय असेल ते.......बदलला ग्रुप...

आज इतकं भारी का होतंय.....आई ग्ग....माहित नाही...मागे ठेऊन आले होते काही मैत्रीचे कळप आणि त्यातले काही भरकटताहेत...ही बहुदा त्या आठवणींमुळे उडालेली एक खपली....केवळ तेवढ्यासाठी सध्या कुठल्याच कळपाचा भाग नसल्याचं समाधान आणि काय??? 

Is it OK?? Or may be its not.....But who cares??? Isn't that the attitude anyway.....

Tuesday, June 5, 2012

चंबळचा धावपटू की बागी????


एक भांबावलेला पत्रकार घाबरत घाबरत एक मुलाखत घ्यायला जातो. त्याच्या समोर असतो चंबळच्या खोर्‍यातला एक डाकू, नव्हे त्याच्या शब्दात, "बागी". आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बोलण्याच्या शैलीत इरफ़ान खानला या बागीच्या रूपात‘ पाहताना आता आपण काय पाहणार आहोत याची उत्कंठा लागून राहते आणि हळूहळू एक वेगळीच सत्यकथा पडद्यावर आकाराला येते.

ही घटना आहे भारतीय सैन्यातील एका भाबड्या सुभेदाराची. त्याच्या पायातलं विजेचं बळ ओळखून त्याला सैन्यातलं स्पोर्ट्स डिविजन दिलं जातं. त्याला खेळात जायचं असतं कारण तिथे त्याला अनलिमिटेड खायला मिळू शकणार असतं. पण खरं तर त्याच्याइतकं वेगवान धावणारं तिथेही कुणीच नसतं. तरीही सुरूवातीला त्याला तिथल्या गुरूच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ५००० मीटरच्या स्पर्धेऐवजी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घ्यायला लावलं जातं. 

जे मिळालं त्याचंच सोनं करणारा हा शिपाई, राष्ट्रीय स्पर्धेत सतत सात वेळा ती शर्यत जिंकतो. धावण्यातले स्वतःचे वैयक्तिक रेकॉड्सही तो स्वतःच या दरम्यान मोडतो. मात्र १९५८ च्या टोकियोतील आशियाई खेळात त्याला आयत्यावेळी स्पाइकचे बूट दिले जातात आणि त्याची सवय नसल्याने तिथे मात्र त्याला पदक मिळू शकत नाही. पण निराश न होता तो आपला खेळाचा सराव सुरूच ठेवतो. 

दरम्यानच्या काळात सीमेवरच्या प्रत्यक्ष लढाईमध्ये मात्र स्पोर्ट्समध्ये असल्याने त्याला कितीही इच्छा असली तरी सैन्याच्या नियमाप्रमाणे भाग घेऊ दिला जात नाही. त्यानंतर मात्र वय होत आलं तरी आंतरराष्ट्रीय मिलिटरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून तो आपल्या अंगातल्या संतापाची आग विझवतो..देशाचं नाव अशा प्रकारे खेळाच्या लढाईत उंचावतो. 

त्यानंतर थोडं लवकर निवृत्त होताना खरं तर त्याच्या हातात एकीकडे आर्मीमधलं कोचचं पद असतं पण यावेळी मात्र घरच्या जबाबदार्‍यांना तो महत्व देतो; आणि इथेच आपलं सैनिक असणं, देशासाठी जीवतोड धावणं, ते पदक हे सगळं व्यावहारिक जगात काहीच कामाचं नाही, याची हळूहळू प्रचिती यायला सुरूवात होते...सरळ मार्गाने वागून न्याय तर मिळत नाहीच, शिवाय गावगुंडांकडून म्हातार्‍या आईला मारलं जातं त्यामुळे मग चंबळमध्ये आणखी एक बागी तयार होतो आणि त्याची गॅंग. यापुढचं सगळं कथानक वेगळं सांगायला नको. 

शेवट गोड वगैरे व्हायचं भाबडं बॉलिवूडी स्वप्न पाहायची गरज नाहीये कारण ही आहे एक सत्यकथा....आणि हे सगळं ज्याच्या वाट्याला आलं,एक सैनिक म्हणून इमानाने काम करताना, एक गुंड म्हणून मरणं ज्याच्या नशिबी आलं त्याचं नाव आहे "पान सिंग तोमार". 



काही सत्यकथा पाहताना सारखं वाटत राहातं की यातला अन्याय असणार भाग तरी खोटा निघावा..पण ते तसं झालेल नसतं....अशावेळी आपण अंतर्मुख होतो, कुणाच्या आयुष्यात असंही होतं आपल्याला कळतं आणि नकळत आपली मान शरमेने खाली जाते, डोळ्यातून अश्रु ओघळतात...एका वेगवान धावपटूचं त्याच वेगाने एका गुंडात होणारं हे रूपांतर पाहताना असे किती पान सिंग असतील ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या खेळाने त्यांना त्या एका पदकाशिवाय काहीच दिलं नसेल असं सारखं वाटत राहातं....हे सगळं चित्रपटापुरतंच असतं तर किती बरं झालं असतं?? 

देशासाठी सुवर्ण पदक आणूनही ज्याच्या घरादाराचं रक्षण केलं जाऊ शकत नसल्याने एका भाबड्या सैनिकाचं एका गुंडात रुपांतर होताना हतबलतेनं पाहणं इतकंच प्रेक्षक म्हणून आपण करू शकतो.

वरील चित्र मायाजालावरून साभार

Tuesday, May 29, 2012

सल ....


साधारण एप्रिल-मे हे महिने मायदेशातल्या माझ्या भाचरांचा सुट्टीचा काळ म्हणून थोडं सुट्टीसारखं माझ्याही अंगात येतं...यावर्षीही थोडं-फ़ार तसंच....अगदी आत कुठेतरी काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं तरी ते कुणाला दाखवायचं नाही म्हणून ब्लॉगवरच्या पोस्टमध्येही भरलेल्या पेल्यासारखं सगळं चांगल्या आठवणींना साठवतेय...पण तरी काहीतरी राहिलंय....

मी शाळेत असेपर्यंत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वगैरे परीक्षा आटपली की निकालाची फ़ार वाट पाहायचे...म्हणजे मला कधी निकालाची "तशा" अर्थाने वाट पाहायला लागली नाही किंवा शाळेत चांगल्या मार्कांनीच पास व्हायचे म्हणून भाव मारायलाही निकालाच्या दिवसाची प्रतिक्षा नसायची. तर एकदा निकाल लागला की माझ्या शिक्षक आई-वडीलांना सुट्ट्या लागायच्या आणि मग आम्ही सगळी मावसभावंडं आजोळी जमायचो आणि ते परत यायचो शाळा सुरू व्हायच्या एक-दोन दिवस आधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात...

जशी काही कुटुंबात डेंटिस्ट, गायक, वकिल अशी लोकांची घराणी दिसतात, तसंच काहीसं शिक्षकी पेशा हा माझे आई आणि बाबा दोघांच्या घराण्यात आम्ही भावंडांनी ती प्रथा मोडेपर्यंत होता. माझ्या दोन मावशा, एक काका,माझ्यापेक्षा वयाने जास्त मोठे असणारे तीन आत्येभाऊ, दोन चुलतभाऊ, सहा मामेबहिणी, दोन माम्या शिवाय मामेमावशा आणि मामेमामापण शिक्षक...(हुश..होपफ़ुली मी सगळ्या शिक्षकांना कव्हर केलंय..आणि नसेल तर वर घराणं हा उल्लेख आहेच). तसंच आईच्या आईचं, म्हणजे आज्जीचं माहेर आणि सासर एकाच गावात म्हणजे माझ्या आजोळी. त्यामुळे मे महिन्यात तमाम शहरात राहणार्‍या समस्त मावशा आणि त्यांची मुलं या एकाच गावात मुक्कामाला असत..गाव तरी किती मोठं? हजारेक वस्तीचं पण नसेल..तर आम्ही सर्व तब्बल एक महिना एकत्र हुंदडणे, नदीवर डुंबायला जाणे आणि सुट्टीतले इतर तुंबड्या लावायचे उद्योग करत असू. मे महिना आणि दिवाळी या दोन्ही सुट्ट्यांना माझ्या आठवणीत अमर करायचं श्रेय "मासवण" या पालघर तालुक्यातील  माझ्या आजोळाला जातं.

तर हा "तुंबड्या लावणे" शब्द खरा करायचे बरेच उद्योग आमच्यातल्या मुलांनी केले आहेत आणि आम्ही मुलींनी अर्थातच त्यांना बाहेरून पाठिंबा आणि मग ओरडा झाल्यावर पळ काढणे हे रीतरसपणे केलंय..एकदा मागच्या वाड्याच्या मागे एक शेत होतं तिथे आदिमानवाच्या काळातलं दगडावर दगड आपटून आग कशी लावावी, याच्या प्रात्यक्षिकात सगळा पेंढाच जळायला निघाला होता आणि आधीच पाणीटंचाई असलेल्या त्या गावात सकाळी हजारो खेपा करून नेहमी पाणी भरून जाणार्‍या काकींचे सगळे कष्ट एका क्षणात ते पाणी तिथे ओतण्यात गेले होते. त्यानंतर मध्येमध्ये आम्हीपण छोट्या कळशा घेऊन विहिरीवरून कधीकधी पाणी आणायला सुरूवात केली होती. 

"लेपाळे" या एका झाडाच्या छोटी पपईसारख्या दिसणार्‍या फ़ळांची बी बदामासारखी लागते म्हणून खा खा खाऊन मला कायमचं वर जायची वेळ आली होती. शिवाय नुस्तं ओकार्‍या आणि परसाकडे लागून काय खाल्लं याची दाद आई-बाबांना न लागू द्यायचा उद्योग मी आणि एका मामेबहिणीने केल्यामुळे रात्रीच्या वेळी आजीकडच्या गड्याबरोबर मला पाठुंगळीला नदीपल्याड असणार्‍या सरकारी दवाखान्यात न्यायला लागलं होतं...तिथली नर्स त्यानंतर जितकी वर्षे तिथे होती कधीही मला किंवा आई-बाबांना पाहिलं की त्या घटनेची आठवण करून द्यायची ("लब्बाड कुठली", असं मी तेव्हा मनात म्हणायचे) 

या आणि इतर काही कटू आठवणी सोडल्या तर गावात राहायची धमाल आणि भावंडाबरोबर एकत्र राहिल्यामुळे जुळलेले नातेसंबंध हे जे आजच्या पिढीतल्या प्रत्येकालाच मिळत नाही ते मला सहजी लाभलं होतं. आमच्या वयानुसार मामे आणि मावस भावंडाच्या ज्या जोड्या तेव्हा ठरल्या होत्या त्या अजूनही कायम आहेत. म्हणजे देश बदलला तसं प्रत्यक्ष संबंध कमी झाले पण माझी जोडी असणारी मावसबहिण आणि मी भेटलो, फ़ोन केला की अजूनही तशाच बडबड करत राहतो..अगदी पुर्वीसारखं घसा बसेपर्यंत...हे एक घसा बसायचं आणि काटा लागायचं (तेही जोडीने) आमच्यावेळी खास होतं....मामी सेफ़्टीपिनने काटा काढून द्यायची आणि मग मावशी त्यावर गरम केलेलं एक निवडुंगासारखं झाडाचं खोड की पान असे ते लावता लावता दोघींना एकदमच लेक्चर द्यायची. तसंही हे सगळे शिक्षक असल्याने लेक्चर द्यायची त्यांना आणि आम्हाला ते ऐकायची सवयच होती...:)  

माझ्या एका मावशीचं सासर आजोळहून थोडं जवळ होतं, पालघरमध्येच मनोरजवळ. ती मावशी असेपर्यंत त्यांच्या घरी जाणं हा एक आमच्या सुट्टीतला खास कार्यक्रम असे. म्हणजे आदल्या दिवसापासून "उद्या बांधणला जायचं" असं बाबा बोलले की एकदम कल्ला व्हायचा. तिची आंबा आणि चिकुची वाडी होती आणि थोडी शेती. मे महिन्यात तिच्या घरी गावठी हापूस आणि चिकू वर माळ्यावर पिकत असायचे. त्या दिवसांत ते आणि घरची मोठी जांभळे, मनोरच्या बाजारात ती विकायला पाठवत आणि अर्थात आम्हाला खायलाही मिळत.माझ्या लहानपणीची खरीखरी भातुकली खेळायला देणारी म्हणून ही मावशी सगळ्या मुलांमध्ये खूप लाडकी होती. या मावशीच्या आंबा आणि चिकुच्या वाडीत तीन दगडांची चुल करून माझ्या मोठ्या बहिणी मावशीने दिलेल्या पीठाची छोटी छोटी घावणं करत. विहिरीजवळ एक मोठं जांभळाचं झाड होतं. विकण्यासाठी रीतसर जाळ्यामध्ये गडी लोकं जांभळं उतरवण्याच्या आधी दगड मारून किंवा पडलेली जांभळं आम्ही लहान बहिणी गोळा करून आणायचो..मुलं पण काहीबाही मदत करत नाहीतर खुशाल विहिरीत पोहायला जात..
माझी जवळजवळ सगळी मावसभावंडं या मावशीच्या वाडीतल्या विहिरीत वरून उड्या मारून आणि कंबरेला सुकडी बांधून पोहायला शिकली. आम्हा मावस आणि मामे बहिणींच्या जोड्या मात्र आजोळी, सूर्या नदीत...बाबा किंवा काकांच्या देखरेखीखाली हात पाय मारायला...सगळ्याच नीट नाही शिकलो. कदाचीत मुली असल्यामुळे नंतर बंधनं येतात..लहानपणीच नदीत शिकून घेतलं तर बरं...नंतर मग नदीवर जायचं ते बहुदा पाय सोडायला किंवा मावशांनी जोर केला की मग सगळी एकत्र डुंबायला. अर्थात गावातली वस्ती इतकी कमी आणि सगळीच नात्यातली असल्याने भिती नव्हती म्हणा पण घरातली मोठी मंडळी आम्हाला कुणी त्रास देणार नाहीत याची खात्री बाळगत असावेत असं वाटतं....

मग नदीवरून परत येताना वाटेत लागलेल्या करवंदांच्या जाळीत जाऊन करवंद खायची...येताना चुलीसाठी वाटेत पडलेल्या काटक्या गोळा करून त्याचं आपल्या वाट्याचं सरपण आणायचं की आजी आणि मामी पण खूश..मग मामीच्या हातच्या तांदळाच्या हातभाकरी चहाबरोबर खाऊन उरलेला दिवस उंडारायला परत मोकळे...मला माझ्या मामीला जात्यावर दळताना आजही आठवतं. त्या गावात मामाच्या घरासमोरच चक्की येईपर्यंत माझ्या मामीने आम्हा सर्व भाचे आणि कुटुंबीयांसाठी लागणारं दळण मावशांसोबत बसून दळलंय हा विचार करताना आता खरं तर मला कससंच होतंय...

तर असं घरगूती आणि कायम पेटती असणार्‍या चुलीत शिजलेलं जेवण खाऊन आम्ही पत्ते, नवा व्यापार, नाव-गाव-फ़ळ-फ़ुल आणि असंख्य खेळ खेळलोय. "डब्बा ऐसपैस" हा एक सगळ्यात आवडता गेम..हो गेम कारण कुणाचा गेम करायचा असेल त्याच्यावर राज्य आलं की मग ते घालवायचंच नाही असं खेळलं की मग कुणीतरी एक जाम रडलं की घरातलं मोठं माणूस, बहुदा ती मामीच असे,  येऊन ओरडून आमचा डब्बाच गुल करून टाकत....:)

रविवार आला की खास गावठी कोंबडीचं जेवण आणि त्याबरोबर भाकरी असा बेत असे. मावशीकडे गेलं की हक्काचा आमरस आणि पुरी. इतर दिवशी मामी आणि मावशा जे काही ठरवून करतील ते..पूर्ण सुट्टीत जमेल तेव्हा या सर्वजणी ठरवून एक दिवस पापड करत. त्यावेळी सगळ्या चिल्लरपार्टीकडे ते पापड वाळत घालणे, त्याची राखण करणे आणि संध्याकाळी ते परत आणून मग घरी न्यायच्या ड्ब्ब्यामध्ये सुकलेल्या पळसाच्या पानात घालून ते ठेवणे यात एक दोन दिवस जात. पापडाच्या लाट्यानी छोटे पापड करायला मला तेव्हा आवडत आणि मग करता करता हळूच कुणाचं लक्ष नसलं की एक लाटी पोटात...सगळीच गम्मत...चिकवड्या इ.ही केल्या जात. पण पापडात जितकी  मी आणि माझ्या मावसबहिणीची जोडी रस घेई इतर गोष्टींमध्ये नाही. फ़क्त मावशीकडे लोणच्यासाठी वाळवलेल्या कैर्‍यांवर आमचा जाम डोळा असे. एकेवर्षी सर्व मावसभावंडांनी मिळून मावशीला ताटातली एकही कैरी मिळू दिली नव्हती आणि त्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून आम्हाला जे लेक्चर दिलं त्याने आम्हाला जरब बसल्यासारखं निदान दाखवावं तरी लागलं..उगाच नंतर त्यांनी तो राग आमरस किंवा आमच्या नदी किंवा बंधार्‍यावर जाण्यावर काढला तर.....मामाच्या वाड्यातल्या चिंचेचे कोवळे कोंब काढून त्याची तिथलाच एखादा दगड पाण्याने धुवून साफ़ सफ़ाई करून केलेल्या चटणीत माझे दोन मावसभाऊ पण आम्हाला साथ देत. 

मी सातवीत गेले त्या सुट्टीत माझी मावशी त्या वर्षीच्या निकालाच्याच दिवशी गेली. तिच्या त्यावेळी दहावीत गेलेल्या माझ्या मावसभावाने फ़ोडलेला हंबरडा मला मी त्यावेळी इतकी लहान असतानाही आजही आठवतो..त्यानंतर तिच्या तेराव्याला तिच्या सासरच्या गावी गेलो ते आजतागायत मी पुन्हा तिथे गेलेच नाही...न कळता एक गाव असंच संपलं.... :(

त्यानंतरही आजोळी आम्ही जातच राहिलो. प्रत्येक सुट्टीत आपल्या बहिणीची आठवण काढून हळव्या झालेल्या माझी आई, मावशी आणि मामा/काकांना पाहायचो. नंतर दुःखाचे कढ सर्वांसमोर काढायचं कमी झालं. आम्ही भावंडं आमच्या बालसुलभ वयाने एकत्र यायची मजा घेत राहिलो...आज्जी गेल्यावरही मामा-मामींनी तिची कमी कधी जाणवू दिली नाही..मी आणि माझी मावसबहिण एकत्र जायचाही प्रयत्न अगदी नोकरी लागेस्तोवर करायचो....

मे महिन्यांत तिथे पाणी कमी असायचं पण सगळ्या नातेवाईकांचा प्रेमाचा पूर दाटलेला असायचा...आणि गरमीचं काय तेव्हाही गरमच असणार पण गावचा वारा खात हुंदडणारे आम्ही कधी गरमीच्या कुठल्या आजाराने आजारी पडलो नाही..."गावची हवा चांगली असते", असं आई नेहमीच म्हणते. तसंही असेल कदाचित.....

खरं तर मे आणि एकंदरीतच सुट्टीतल्या आठवणींवर लिहावं असं मला ब्लॉग लिहायला घेतला तेव्हापासून वाटत होतं...आणि ठरवून असं नाही पण बरोबर त्या वेळेवर गेले काही वर्षे ते कधीच झालं नाही...आणि आता हा "मे" मी या आठवणींशिवाय राहूच शकत नाहीये...:(

बघता बघता हाही मे संपेल आणि तो संपता संपता मी शाळेत असतानाच्या घालवलेल्या अनेक सुट्टींच्या आठवणींनी मला विषण्ण करून जाईल....म्हणजे नेहमी चांगल्या आठवणी आल्या की कसं प्रसन्न वाटतं पण यावर्षी नाही वाटणार...कारण मावशी गेल्यानंतर या आठवणी ज्या घराशी, कुटूंबाशी निगडीत आहेत तो माझा मामाच नाही.....मला वाटतं गेले दोन महिन्याचा हाच एक सल असावा....:(

Tuesday, May 22, 2012

बर्फ़ाचा गुलाबी बहर...


एक तर म्हणायचं बर्फ़, मग त्याला ल्यायचा गुलाबी रंग आणि सांगायचं काय तर हा बघा बहर....बात कुछ जमीं नहीं??? अहं....तसं काही अजिबात नाही आहे, बरं का! उत्तर अमेरीकेत थंडीमध्ये देवदाराचा अपवाद सोडून पानगळीला आणि मध्येमध्ये येणार्‍या बर्फ़ाला पर्याय नाही तसंच ही थंडी गेलीय आणि तो बर्फ़ आता नसणार आहे याची खात्री हवी असेल तर या गुलाबी बर्फ़ालाही पर्याय नाहीच...
म्हणजे आकाशात गुलाबी ढग दाटून येतात....

हळूहळू सगळीच झाडं हिरवी होणारेत याची खात्री पटवणारा तो बर्फ़ जवळून पाहिला की मन प्रसन्न होतं....अगदी वसंतातल्या धुंद वातावरणासारखं....


या बर्फ़ाची मजा लुटण्यासाठी एक दिवस आम्ही खास या पार्किंग लॉटमध्ये येतो...इथे खेळायला वयाची अट नाही....ते आम्हा चौघांनाही एकत्र धमाल करायला बरंच पडतं....



नजरेत साठवून घ्यावी याची अनोखी रूपं...किती फ़ोटो काढले, किती वेळ इथे थांबलं तरी डोळे थकत नाहीत....


खाली पडलेला हा गुलाबी बर्फ़ इतका सुंदर दिसतो नं की दुसर्‍या दिवशी कचरा उचलणारा इथे येऊच नये अशी सोय निदान काही दिवस तरी करावी असं मलातरी वाटतं....



ता.क. मागच्या पोस्टमध्येही म्हटलंय की यंदा (काही अपवाद वगळता) पोस्ट्स थोड्या उशीराने लिहिल्या जाताहेत....म्हणजे मार्चच्या शेवटी ट्युबिंगला गेलो होतो ते फ़ोटो एप्रिलला, बाबा इथे होते तेव्हापासून ऋषांक बोलतोय ते अगदी काल-परवा, त्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट तब्बल एक वर्ष लेट...

कारण मागच्या वर्षी आईला याच पार्किंग लॉटमध्ये हा बहर पाहायला आणलं होतं तेव्हा काही असेच (म्हणजे माणसं नसलेल्या) या जागेचे फ़ोटो काढले होते..ही जागा ज्या कंपनीच्या आवारात आहे तिथल्या काही संबंधीतांनी ते पाहिले आणि त्यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यातला एक फ़ोटो मागच्या वर्षीपासून त्यांच्या अंतर्गत जालावर (इंट्रानेटवर) कव्हर फ़ोटो म्हणून विराजमान आहे....

स्वतःच स्वतःचे कौतुक करायचे प्रसंग किती असतात आणि तेही मला फ़ोटोग्राफ़ी करण्यापेक्षा (स्वतःचे) फ़ोटो काढून घ्यायला जास्त आवडतात त्यामुळे थोडं स्वतःचं कौतुक करून घेतेच...:)

"तो" फ़ोटो आता त्यांना दिल्यामुळे इथे टाकत नाही....पण जाता जाता एक नक्की लिहावंसं वाटतं की पूर्वी आम्ही पूर्व किनारपट्टीला राहायचो तेव्हा चेरीजातीच्या फ़ुलांचा हा बहर पाहायला खास वॉशिंग्टन डिसीला जायचो. आता इथे या झाडांची आरास जागोजागी इतकी पाहायला मिळते की कुठेच जावं लागत नाही. दैनंदिन कामासाठीच्या फ़िरण्यात फ़ोर सिझन्सचे सगळे रंग मनसोक्त पाहता येतात.....

Welcome to Oregon Aparna... :)