Thursday, December 31, 2020

सरत्या वर्षाचा लेखाजोखा

 यंदा जुलैपासून ब्लॉगवर माझा पायरव नाही म्हणजे काय झालं तरी काय असा स्वतःच आज विचार करताना सुचलं की कितीही डोळ्यांतून पाणी काढणारे क्षण आले तरी जाताना या वर्षाला हसतमुखाने निरोप द्यावा. 




यावर्षी आठवतं आधीपासून प्लॅन केलेलं आमच्या कुटुंबाचं यलोस्टोन नॅशनल पार्कात जाणं. आजाराने जग व्यापलं होतं पण योग्य काळजी घेऊन जेव्हा काही मोजक्या लोकांनाआता जाऊ दिलं त्यात आम्ही चौघेही होतो. एकजुटीने आणि आजूबाजूच्या पर्यटकांशी मास्क लावून, योग्य अंतर राखून वन्यप्राणी दर्शन करण्यामुळे सहा महिन्याचा शिणवटा पळाला. मन त्या चार दिवसासाठी हलकं झालं. 



त्याचा फायदा ऑनलाईन शाळा सुरु झाल्यावर काम आणि घरचा समतोल साधण्यासाठी नक्कीच झाला. त्यानंतर मोजके लोकल वॉक वगैरे सोडले तर माणसं जाण्याखेरीज काही घडत नव्हतं. घरी कुणाला बोलवणे नको इतके नियम आणि त्यामुळे विशेष करून सण तर घरातच साजरे केले. बरेच वेळा आतील हुंदके दाबून मुलांना आपल्या मनात काय सुरु आहे, याचा सुगावा लागू न देता मागचे पाचेक महिने गेले आणि मग आजाराची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे चक्क हवाईला जायची संधी मिळाली. पॅसिफिक नॉर्थवेस्टमध्ये अजिबात सूर्यदर्शन नाही अशा ऋतूमध्ये जायला मिळाल्याचे आभार मानावे तितके कमीच. 



या दोन ट्रिपांमध्ये माझ्याकडे एकंदरीत बरंच काही संथपणे सुरु होतं. प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरीदेखील नकोशा वाटण्याचं हे वर्ष. अशात कामाची जबाबदारी वाढवून मिळाली आणि त्यात थोडंफार नीट काम करून स्वतःला बरं वाटणं हा अशा बिकट वर्षातला उच्चबिंदू म्हणावा. 



या आठवणींची ही चित्रगंगा. यातली बरीचशी चित्रे अर्थातच माझ्या नवऱ्याने काढली आहेत. त्याला माझ्या फोनमधील चित्रणाची साथ. 



माझ्या ब्लॉगला साथ देणाऱ्या सर्व वाचकांचे या वर्षात इतक्या कमीवेळा लिहूनही साथ देण्याबद्दल मनापासून आभार आणि २०२१ साठी अनेक शुभेच्छा. 

#AparnA #FollowMe

Monday, July 27, 2020

Rest in Peace Apolonio

आमच्या ऑपरेशन्स डिपार्टमेंटच्या मुख्य व्यक्तीचं काम किती जड आहे हे जसजसं कोविडने जग व्यापतंय तसं मला जाणवतं. मी नॅन्सीच्या जागी दुरूनही नाही हे चांगलं आहे का?, हा विचार करणं चुकीचं आहे हेही मला कळतंय.
काही आठवड्यापूर्वी कामाची घरून होणारी नाचानाच असह्य होऊन एक दिवस कामावर जायचं ठरवलं त्याच दिवशी आधी सकाळी लॉगिन केल्यावर नॅन्सीची मेल पहिल्यांदी नजरेत आली आणि डोळे पाण्याने भरले. दुसऱ्या एका कक्षात  काम कारणारा पॉलो आपला आधीचा कुठलातरी न बरा होणारा आजार शेवटच्या टोकाला पोचल्यामुळे त्याच्या कॅलिफोर्नियाच्या गावाला निघाला होता. त्याने त्याचा शेवटच इ-पत्र पाठवलं होतं आणि त्याबरोबर आपला पत्ता.
त्याला जाताना आठवण म्हणून, संदेश म्हणून जर कार्ड द्यायचं असेल तर काय करायचं हे नॅन्सीने तिच्या इ-पत्रात लिहिलं होत.  मी खरं तर इथे काम सुरु करून वर्षापेक्षा थोडाच काळ जास्त झाला असेल त्यामुळे मी पॉलोला पाहिलं असेल तरी मला त्याक्षणी तो आठवला नाही. त्यात तो बेसमेंटमध्ये काम करतो आणि फार वर यायचं त्याला कामही नसे हे इतर सहकाऱ्यांनी मला सांगितलं.  पण आपला कुणी सहकारी आजारी आहे, आणि "मी माझ्या देहाची माती माझ्या गावात मिसळावी म्हणून मोठ्या प्रवासाला निघतोय",  हा त्याचा  विचार माझं डोकं खाऊन मलाच काही होऊ नये म्हणून मी एक कार्ड माझ्या बॅगमध्ये घातलं.
त्यादिवशी मर्फीच्या नियमाप्रमाणे मी निघेनिघे पर्यंत असंख्य कामे माझ्याकडे आली आणि ते कार्ड माझ्या बॅगमध्येच राहिलं. ऑफिस संपवून दुसऱ्या सिग्नलला पोचताना काय राहिलं याचा मनात अंदाज घेताना मला अचानक आठवलं की कार्ड तर आपण दिलंच नाही. पुन्हा गाडी वळवायला मार्ग नव्हता कारण घरी पोचले की मीच लावलेली एकची मिटिंग टीमला सांगून निघाले होते पोचते म्हणून. शिवाय मी ज्या रंगाची आहे त्या रंगाने सध्याच्या काळात मलाच काही होऊ नये म्हणून खरं तर मी ऑफिसला यायचं म्हटलं तर "नको गं",  म्हणून काळजी करणारे निदान चारपाच तरी जवळचे सहकारी आहेत. त्यांना चिंता नको म्हणून मी गाडी तशीच दामटली.
त्या प्रसंगांनंतर नॅन्सीने आणखी एका इमेलमध्ये पॉलोच आभाराचं पत्र आणि त्याचा पत्ता कळवला. आता मात्र हे पत्र पाठवू म्हणून मी स्वतःला बजावलं. इथे माझे स्वतःचे काही जुने आजार डोकं वर काढू पाहताहेत आणि मी पॉलोचं पत्र बॅगेत सांभाळून ठेवलंय. मला माहीत आहे त्यालाही मी आठवणार नाही पण त्याच्या पृथ्वीवरून परतीच्या  प्रवासात माझे दोन शब्द त्याची साथ करतील का अशी माझी भाबडी आशा आहे. मी हे पत्र टाकणार आहे फक्त हा दिवस जरा शांत जाऊदे असं मी म्हणतेय. दुसरं मन म्हणतंय इतकी पत्र आली आणि अनोळखी सहकाऱ्यांची तर पॉलो ते सकारात्मक घेईल की जाताना दुःखी होईल.
या कावऱ्याबावऱ्या अवस्थेत मी आहे. मागच्या आठवड्यात आधी मुलांना थोडा वेळ द्यायला एक छोटी आणि मग बरं  नाही  म्हणून आणखी दोन सलग सुट्ट्या टाकून आज मी कामावर आले. असे लागोपाठ सुट्टीचे दिवस आले की साचलेल्या कामाचा धसका घ्यायचं आता कमी झालं आहे. तरीही आजच्या दिवसातली इ -पत्रं पाहताना नॅन्सीने आमच्या पहाटे टाकलेल्या पत्राचा मायना पाहिला आणि लगेच कळलं, पॉलो गेला. त्याच्या आजाराच्या वेदना काल  रात्री कायमच्या संपल्या. त्याने मागे जे आभाराचं पत्र पाठवलं होतं ते या बातमीला जोडलं होतं. नकळत माझे हात जोडले गेले आणि डोळे पाण्याने भरले. माझ्या बॅगमधलं कार्ड आता बॅगमध्येच राहील. 



पॉलो, आज तू गेलास. तुझ्या वेदना आता मिटल्या असतील. तुला कोविड  झाला नव्हता पण तुझी वेळ आली होती आणि तुला ते माहित होतं.  कोविडच्या महामारीने सध्या ज्या तातडीने माणसं जाताहेत त्या सर्वांनाच श्रद्धांजली वाहायची गरज आहे. मी ही पोस्ट फक्त तुझ्यासाठीच लिहीत नाही हे तुला कळेल का? 

त्याच्या पत्राखालच्या सहीवर त्याचं मूळ नाव वाचताना लक्षात आलं, "पॉलो" असा घरगुती अपभ्रंश असलेलं खरं नाव किती सुंदर आहे. 

Rest in Peace Apolonio. 

#AparnA #FollowMe

7/27/2020

Monday, June 1, 2020

Dear Diary: I cannot hear, read, write, cry, and BREATHE

Dear Diary: I cannot hear, read, write, cry, and BREATHE

Am I a diary person? only sometimes. Honestly, I do not want to write diaries. Especially for those disturbed moments when you feel like how can I let go and move on. I do not want to remember the days/months/week when I am thinking what it is that I can do to stop the spread. 

I had a gone thru a long reader's block for a while since almost 2017 and just earlier this year went over it when I completed "The Alchemist". As I decide to read more and keep it going, I had added Trevor Noah's Autobiography "Born A Crime" on my Libby apps hold and there was a long hold that the app could not give me its estimated arrival. Just around when the Memorial day long weekend was around the corner, I see the book on my shelf and I am in a way happy that I finally have it. I started reading it and I am going through sleepless nights over how life was in South Africa even in late 80s. This kid is almost 10 years younger to me and still he suffered being a person of mixed race. I am upset but I know I will finish the book. I will keep the courage. 

All through April and May its all about the spread of this virus. These days all I can think about is the COVID 19 and any day evening is about starting local news so I am all caught up on what happened during day only in my area, blinding myself from the world, I see this video. I shout out "अरे हा मरेल रे!!! ते तीन पोलीस पाठ का दाखवताहेत?" "Oh shoot this person is going to die!!! Why the other 3 cops showing their back?" I could not read or hear what the reporter is saying, I almost know it all. Few days back I saw similar incidence on news when the guy is hiding behind the car and his life is all wasted cause someone thought he is the bad guy with weapon, and as my mind goes few years back I remember asking one of the consultants working with me from mid-west, is your area safe for you to go out as a person of color? In my mind, I suffocate with all the thoughts and I still feel I cannot cry either. I am angry and anxious. I really really cannot BREATHE.

As I remember I was thinking about the covid news and now I am shattered with someone loosing a life over discrimination, over racism.

Growing up I have seen discriminations of different kinds from where I belong, to a point I felt immune to such questions, now is not the time to rethink about those but yes I do think about a few. I see it sometimes around me even now for being a woman, or sometimes just being brown woman and then woman with little power when she work managing projects working with different color/gender team and I can clearly see in someone’s eyes or body language that they are thinking "oh, she is brown".

When I see the cops murdering someone at their wish, deep in my heart, I feel for what is going to happen. 

I have two boys and they would be considered as brown kids in schools/colleges and eventually to the real world where they belong. I am not sure when should be the right time for me to tell them that as much as I never probably have to explain you what a caste mean, now you are at a place, you should always remember that you are "not WHITE". Am I thinking straight? Well I am not thinking I guess and that's why it is not a good idea to write this diary. 

Its Friday and then the first official arrest happens. What changed between Monday and Friday I do not know. I am not interested in knowing anything around law and order and how it supposed to work when damage is already done. A life is lost over a twenty dollar bill. How do we get it back?

There would be protests everywhere I know but I never expected them to turn it into violence. I would not want looters to go out their destroying the already shattered economy. 

Saturday morning, I am trying to catch up with families in India during weekend, making sure my mom and dad still have the patience and strength to live without my sister visiting them or the maid helping them. Its strange how there is a constant something to deal with and you still feel you really are not doing anything for anybody. 

Here comes Saturday afternoon and I talked to my friend in Seattle and then first time after the Minneapolis issue, I talk to someone about it who is a dynamic white woman herself and saying things which means so much to clarify my own doubts and her own concerns. It’s a woman to woman mature discussion. 

How can this get fixed? We both know we cannot do anything but we should support, silently. We cursed how administrations could not still do a better root cause and help change mindsets and prejudice. Training officials is so essential and how it is still missing almost every such case.

Portland downtown, the Rose city is under curfew. The Protesters are closer to the building I used to work just a year ago. We do not know when can we feel rosy again. But I can certainly say the scar is always going to be there. I am sad and low. Its night time again and I do not have the courage to read remaining of "Born A Crime". I would still have a sleepless night. 

Dear diary, I cannot hear, read, write, cry or BREATHE. I don’t think I can think of any of the troubled soul resting in peace. It’s just insane to start a June with not summer on the mind but sorrow and distress to look forward to. 

-Aparna June 1st 2020.

#AparnA #FollowMe #WalkWithUs #BlackLivesMatter #AllLIvesMatter

Wednesday, April 29, 2020

हम हो गए बेजुबान

शाळेतल्या आपल्या वर्गात एक नेहमी पहिला येणारा मुलगा किंवा मुलगी असते जिच्यापुढे कुणीच जाऊ शकणार नाही हे एकामागोमाग इयत्ता त्याच शाळेत काढल्या की माहित होतं. मग आपण त्या व्यक्तीचा नाद सोडतो पण त्याचबरोबर दुसरी निदान एक व्यक्ती अशी असते की जी या स्पर्धेत कुठंच नसते. ती आपलं नेमून दिलेलं काम चोख करत असते आणि त्यात वैविध्य आणता आणता मग शाळा जेव्हा संपायला येते तेव्हा "आदर्श विद्यार्थ्यांचा" पुरस्कार मिळवून जाते. जसजसं आपण एकेक इयत्ता ओलांडत असतो, आपल्याला या व्यक्तीच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे पैलू कळत जातात. नकळत, आपण त्या व्यक्तीला मनात मानाचं स्थान देतो. तिच्याशी स्पर्धा करावी असं आपल्याला वाटतही नाही. काय म्हणतात ते we look forward to this person and fall in love with this personality and its different aspects. मग जेव्हा निरोप समारंभाची वेळ येते तेव्हा आपलं मन कावरं-बावरं होतं. खरं तर ही व्यक्ती आपली कुणी जवळची मित्र-मैत्रीणही नसते पण आता आपले मार्ग वेगळे होणार या विचाराने आपण हळवे होतो.

आज सकाळी उठल्या उठल्याच इरफानच्या बातमीने मन फार हळवं झालं. तसं पाहायला मी चित्रपट जरा लक्ष देऊन पाहायलाच उशिराने सुरुवात केली. त्यात सिनेमे लक्षात राहायची बोंब आहेच. त्यामुळे आताही मी इरफानचा पहिला चित्रपट कुठला पहिला हे मला ताण दिला तरी आठवणार नाही. पण त्याने फरक पडत नाही. मला वाटतं कदाचीत पानसिंग तोमार असेल कारण चित्रपट जसे प्रदर्शीत झालेत त्याच क्रमाने मी पहिले नाहीत. चंबळाच्या खोऱ्यातल्या या बागीने इतकं रडवलं की मी पाहिल्यापाहिल्या ब्लॉगवर लिहिलं. मग पुन्हा "लाईफ ऑफ पाय" मध्ये त्याच्या आवाजाची, निवेदनाची जादू माझ्यासारख्या सिनेमे विसरणारीला लक्षात राहील अशी कळली. मी या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा "लाईफ ऑफ पाय"चं  पुस्तक वाचलं तेव्हा माझ्याही नकळत "पाय पटेल" म्हणजे इरफान आणि त्याचा आवाज हे आपोआप मनात येत होतं. 

"पिकु" हा चित्रपट मी असंख्यवेळा पाहिला. खरं हा चित्रपट बाप-मुलगी यांचं नातं उलगडणारा आणि त्यांच्या प्रवासाची कहाणी सांगणारा आहे. आता ही "स्टे होम ऑर्डर" आली त्या काळातही पाहिला. नेहमी हा चित्रपट पाहताना ते बाप-मुलीचं नातं जास्त लक्षात यायचं पण मागचे काही वर्षे इरफानच्या आजारपणाच्या बातम्यांमुळेअसेल यावेळी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. लक्षात आलं की इरफान इथं आपल्या व्यक्तिरेखेला कुठेही कमी पडू देत नाही. आखाती देशातली नोकरी गमावलेला आणि आता टॅक्सीचा धंदा पुढे नेणारा "राणा", पिकुवर वैतागणारा आणि तरीही तिच्या वडिलांकडे तिची बाजू मांडताना स्पष्ट सुनावणारा "राणा" आपल्याला त्या आदर्श विद्यार्थ्यांची आठवण करून देतो. "तुम्हारे साथ शादी करनी है तो  तुम्हारे नब्बे साल के बेटे को अडॅप्ट करना पडेगा" हे म्हणताना आपल्याला हसवणारा राणा. त्याच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि इतर भूमिकांच्या वरताण काहीतरी करून भावही तो खात नाही. 

त्याच्या भूमिकांमधून तो आपल्याला आपल्यातलाच कुणीतरी वाटावा इतकं आपलेपण त्याच्या अभिनयात जाणवतं. लिहायचं तर त्याच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीचा प्रत्येक चित्रपट आणावा लागेल इतका विविध भूमिकांमधून तो आपल्या मनातलं ते सुरुवातीला म्हटलेलं मानाचं स्थान पटकावत राहिला.

फार कमी अशी व्यक्तिमत्व, त्यातल्या त्यात बॉलिवूड मध्ये आहेत ज्यांच्याबद्दल इतका जिव्हाळा वाटू शकतो. मला त्याच्या "लन्चबॉक्स" चित्रपटाबद्दल रेकमेंडेशन देणारी "ज्युली" माझ्या एका अपॉइन्टमेन्टला त्याचं खास कौतुक करत होती. लाईफ ऑफ पाय च्या वेळी do you know this guy? great actor असं साशा म्हणाली होती. या दोघींबरोबर माझं थिएटर करणारे नट कसे वेगळे असतात याविषयी बोलणंही झालं होतं. माझ्या पुढच्या भेटीत मी त्याचा विषय काढेन तेव्हा त्याही दुःखी होतील. 


इरफानच्या सर्वच चाहत्यांना तो गेल्याचं दुःख झालं त्याचं मूळ यात आहे की तो सर्वानाच जवळचा, आपल्यातल्याच एक वाटायचा. त्याच्या पिकु चित्रपटातल्या गाण्याच्या भाषेत सांगायचं तर 

इस जीने में कही हम भी थे
थे ज्यादा या जरा कम ही थे 
रुकके भी चल पडे मगर 
रस्ते सब बेजुबान 

लॉकडाऊन मधल्या काळातल्या बेजुबान रस्त्यावरून त्याच्या शेवटच्या प्रवासासाठी जाणारा आपला हा "आदर्श विद्यार्थी" कुणालाही त्याच्यासाठी त्रास न देता लांबच्या प्रवासाला निघून गेला. त्याची तयारी त्याने आधीच केली होती जेव्हा अगदी आता आता आलेल्या "अंग्रेजी मिडीयमच्या प्रोमोचा ऑडिओ त्याने पाठवला होता. 

मागे त्याच्या आजाराबद्दलही त्याने लिहून जणू काही आपल्यासारख्यांची तयारी केली होती. पण खरंच अशी तयारी होते का? मागचा विकेंड मला "अंग्रेजी मिडीयम" पाहायचा होता म्हणून एक हॉटस्टार सोडून सगळीकडे शोधलं. मग शेवटी काल आठवलं; तसा रात्री थोडा पाहू आणि नन्तर थोडा म्हणून त्याला प्रिन्सिपलचा फोन येतो तिथवर पहिला आणि झोपले. मला वाटत, साधारण त्याचवेळी तिकडे मुंबईमध्ये त्याच्यासाठीचे दूत त्याच्या दाराशी उभे होते. हा चित्रपट डोळ्यात पाणी न आणता पाहायचं सामर्थ्य आता तरी माझ्याकडे नाही. 

आज सकाळी जेव्हा पटापट सगळीकडून इरफान खानची बातमी आली तेव्हा मला वर सांगितलेला निरोप समारंभाच्या वेळचा मनात मानाचं स्थान असलेला विद्यार्थी आठवला. त्या इंडस्ट्रीमध्ये वर्गात पहिले येणारे विद्यार्थी गेली तीन दशकं बदलत राहिले; त्यात आपला हा आदर्श विद्यार्थी त्याचं काम चोखपणे करत राहिला आणि आज सकाळी त्याचा निरोप समारंभ झाला. फक्त फरक इतका की आता हा निरोप समारंभ म्हणजे पुन्हा केव्हाही न परत येण्यासाठीचा अलविदा. त्याचे कुटुंबीय आणि जवळचे या सर्वाना या प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो. 

आज हम सचमुच हो गए बेजुबान. Irrfan, we will miss you always. This is just not fair. 


वरचं इरफानला श्रद्धांजली म्हणून काढलेलं चित्र माझी भाची अदिती हिचं  आहे. तिच्या इन्स्टा अकाउंटवर ते आहे.  

#AparnA #FollowMe


Tuesday, April 14, 2020

गाणी आणि आठवणी २३ - एकला चॉलो रे

"कहानी" चित्रपट जेव्हाकेव्हा नेटफ्लिक्सवर आला तेव्हाच पाहिला. सर्वच चित्रपट एका बैठकीत पहिले जात नाहीत.पण हा मात्र अपवाद निघाला. जसजशी ही कहाणी पुढे जाते तस लक्षात येतं की यातली मुख्य भूमिका करणारी विद्या बालन, तिचं भूमिकेतलं नावही विद्याच आहे, ही गरोदर विद्या आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधायला एकटीच पुढे जाते. 

तो पोलीस, सात्यकी, तिला मदत करत असतो पण जेव्हा तिला कळतं की हाही IB च्या दुसऱ्या अधिकाऱ्यांसाठी आपला वापर करतोय, तेव्हा मनाने उध्वस्थ होऊन ती गेस्टहाऊसवर परत येते आणि अमितजींचा धीरगंभीर आवाज आपल्या कानी येतो. 



"जोडी तॉर डाक शूनी केउ नाsss अशी एकला चॉलो रे"

जर कुणीच तुझी दखल घेत नसेल तर एकट्याने चालत रहा  

इथून पुढे ही तिची लढाई ती एकटीनेच लढते आणि संपवतेही. लाल-पांढऱ्या साडीतली बिद्या, इतर तशाच साड्या नेसलेल्या बायकांमधून वाट काढत जाणारी, गर्दीतही एकटी असणारी बिद्या बागची. शेवटाला आपल्याला अमिताभच्या धीरगंभीर आवाजात पूर्ण गाणं ऐकायला मिळतं. त्यावेळी जाणवतं की "कहानी"मध्ये गाणीच नाहीत. चित्रपट संपताना आलेल्या या गाण्याचा इफेक्ट वेगळा. समोरून श्रेयनामावली झळकत असते आणि आपण या संपलेल्या युद्धाचा किंवा काही वेळा आपण आपापली युद्ध एकेकट्याने लढून कशी जिंकता/संपवता येईल त्याचे आत्मपरीक्षण करत असतो. 

रवींद्रनाथांनी १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीच्या वेळी लिहिलेलं काव्य २०१२ मध्ये आलेल्या "कहानी"साठी आणि आता कोविडने घातलेल्या धुमाकुळासाठी ही समर्पक आहे. चित्रपटातलं गीत मूळ गीत आहे असं पकडलं तर एकच कडवं हिंदीमध्ये आहे. म्हणजे रूढार्थाने मला तेवढंच नीट कळलं पण संगीताला शब्दांची भाषा नसते. अमितजींचा आवाज हे गाणं आणखी धीरगंभीर करतो. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतो. मला जेव्हा हतबल झाल्यासारखं वाटतं तेव्हा मी हे गाणं ऐकते. 

जब काली घटा छाये, 
ओ रे ओ रे ओ अंधेरा सच को निगल जाए
 जब दुनिया सारी डर के आगे सर अपना झुकाये, 
जब दुनिया सारी डर के आगे सर अपना झुकाये, 
तू शोला बन जा जो जल के जहान को रोशन कर दे


हे जे संकट, आपण सर्वांवर आलं आहे त्यामुळे मी तरी अंतःर्मुख झाले आहे. आता एकट्याने चालताना काही विचार आपसूक येतात. सगळीकडे कोरोनाच्या प्रतापामुळे सगळी लोकं घरात राहू लागली तेव्हा काय करायचं याचा पत्ता बरेच जणांना नसावा. ज्यांची कामं घरून सुरु आहेत त्यांना काम हाच विरंगुळाही झालाय पण ते असो की नसो आपल्याकडे जादा वेळ आहे आणि तो आपण सत्कारणी लावू शकतो ही भावना तितकीशी लक्षात आली नाही. 

रवींद्रनाथ म्हणताहेत "तू शोला बन जा", काय करू शकतो आपण? रक्तदान, आर्थिक दान, शेजारचा कुणी आजारी/वृद्ध असेल तर त्याचं वाणसामान त्याच्या दरवाज्यापाशी आणून पोहोचवणे, आपलं कुणी एकटं राहत असेल त्यांना फोन करून आधार देणे हेही "शोला" बनवायला मदत करतील. अर्थात स्वतःची काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे. आपण काय करताय? 

आजकाल चालताना खरंच कुणी जास्त दिसत नाही त्या वाटेवरचा हा एक फोटो. 



सध्याच्या वातावरणात थोडे फार मन दुःखी/निराश करणारे विचार येणं साहजिक आहे. तेव्हा हे गाणं ऐकून पहा. ते तुम्हाला एकट्याने पुढे चालायची ताकत/विचार नक्की देईल. एकला चॉलो रे, हेच गाणं श्रेयाच्याही आवाजात आहे, नक्की ऎका




#AparnA #Followme



Tuesday, March 24, 2020

एक सो एक किनारे किनारे

मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकजण सध्या "भय इथले संपत नाही" अशा अवस्थेतून जात आहे. वरवरून कितीही रोजची कामं करत असलो तरी "हे" संपणार कधी याचा विचार डोकवून जाणारच. कदाचीत ही फक्त सुरुवात असेल किंवा हे सगळं एका चांगल्या वळणावर संपायला काहीच दिवस उरले असतील. अशावेळी जेव्हा आपण सक्तीने किंवा स्वप्रेरणेने घरी बसलो असू तेव्हा आपले जुने फोटो चाळताना मला आठवलं जेव्हा आम्ही ओरेगावात नवे होतो तेव्हा पहिल्यांदी इकडचा प्रसिद्ध लँडमार्क "कॅनन बीच"ला गेलो होतो. पहिल्यांदीच समुद्रावर भरपूर कपडे, कोट इ. जामानिमा करून जायची वेळ होती. 

मग एकदा सीप्लेनने हेच सौंदर्य पक्ष्याच्या नजरेनेही पाहण्याची संधी मिळाली.


मुंबई आणि एकंदरीत कोकण किनारपट्टीच्या सवयीमुळे असेल आम्ही दोघे इथल्याही प्रशांत महासागराच्या प्रेमात पडलो यात काही नवल नाही. 

त्यांनन्तर आम्ही या किनाऱ्याला नेहमी भेटी दिल्या. नकाशात पाहिलं तर ऑरेगन राज्याच्या पश्चिमेला वरती वॉशिंग्टन राज्यापासून खाली कॅलिफोर्नियापर्यंत असा भरपूर लांबलचक म्हणजे जवळजवळ ३६३ मैलाचा समुद्रकिनारा लाभला आहे. याआधी प्रशांत महासागर मी हवाई सफरीत पहिला होता आणि त्याच्या तिथल्या निळ्या/कोबाल्ट रंगाच्या प्रेमात बुडाले होते. आता तर अगदी जवळचा बीच मला फक्त ६० मैल आहे म्हटल्यावर तिथे फेऱ्या होणं साहजिकच होतं. 

आमचा पहिला हिवाळा संपल्यावर मग आम्ही मागच्या दशकभरात कितीवेळा गेलो याची गणती नाही. तसाही अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर हायवे १०१ चं बडं प्रस्थ आहे. 

आमच्या भागातल्या एक सो एक अर्थात १०१ च्या किनाऱ्याकिनाऱ्याने केलेल्या सफारीमधले काही जुने-नवे फोटो.

 हे पाहताना मला लवकरच मी यातल्या एखाद्या जागी नक्की फेरी मारून येईन याची खात्री आहे. 



आपल्यापैकी कुणाला ही सफर योग्यवेळ येताच करता आली तर नक्की करा.  



त्यामुळे bundle up आणि अर्थात एंजॉय. 


ही पोस्ट टाकेपर्यंत पाडवा येतोच आहे तर सर्वाना पाडव्याच्या शुभेच्छा आणि ब्लॉगही त्यानिमित्ताने ११ वर्षांचा होतोय याची आठवण. 

#AparnA #FollowMe

Monday, February 24, 2020

गाणी आणि आठवणी २२ - कोई ये कैसे बतायें

आजकाल जेव्हापासून गाणी ऍपवर उपलब्ध व्हायला लागली तेव्हापासून आपण आपल्याला हवी ती शोधून ऐकायचं सोडलं का? असं काहीवेळा वाटतं. अशावेळी आपण आपल्या त्या आवडीच्या कालखंडात जाऊन कुठलं गाणं स्वतःहून ऐकावं अशी आठवण स्वतःला करून देण्याचा एक दिवस येतो. अशावेळी मी बरीच गाणी ऐकते. त्यातलं माझं अतिशय आवडतं गाणं म्हणजे "अर्थ" चित्रपटात जगजीतने गायलेलं कैफी आझमींचं हे गाणं. 




जगजीतच्या किंवा इतरही मी ऐकलेल्या गझलांपेक्षा ही वेगळी वाटते कारण ही संपूर्ण प्रश्नात्मक गझल आहे. हिची सुरुवात आणि शेवटही प्रश्नार्थक आहे.  

                   कोई ये कैसे बताए के, वो तन्हा क्यूँ है?
                वो जो अपना था वो ही, और किसी का क्यूँ है?
                यही दुनिया है तो फिर, ऐसी ये दुनिया क्यूँ है?
                यही होता है तो आख़िर, यही होता क्यूँ है?

सुरुवातीचे हे चार प्रश्न आपण ऐकतो तेव्हा किंवा खरं तर तुम्ही चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं ऐकत नसाल तर खरं तर आपल्या मनाची तयारीही झालेली नसते की नायकाची किंवा ज्याचे हे प्रश्न तो मांडतोय त्याचा नक्की काय किस्सा आहे. 

पण तरी शब्दशः अर्थ घेतला तरी आपण म्हणू शकतो की गाणं कुठेतरी मनाला भिडतंय. म्हणजे वरवर तनहा म्हणजेएकटा पडलाय हा अर्थ असला तरी ती "तनहाई" प्रेमभंगाचीच असावी असा काही कुठे नियम नाही ना? हा "वो जो अपना" होता तो आणखी कुणाचा होतो म्हणजेही प्रेमभंगच हवा असंही जरुरी नाही. आणि मग जर तुम्हाला हा एकटेपणा कुणीतरी ज्याला तुम्ही जास्त जवळचं मानता तो दुसऱ्या कुणापाठी गेला मग पुढचे दोन सवाल तुम्ही केलेत तर काय चुकीचं आहे? 

मला वाटतं कॉलेजजीवनात अगदी मित्र-मैत्रिणीमध्येही असा "मैत्रीभंग" झाला तरी त्या अडनिड्या वयात आपण निदान पहिल्या कडव्याला आपलं म्हणू शकतो. जगजीत हे इतकं मुलायम आवाजात मांडतो की मला वाटतं "प्रेमभंग" असो "मैत्रीभंग" असो की अगदी आई-मुलाची अनबन झालेली असो. त्याच्या त्या मुलायम आवाजातूनही शब्दांची आर्तता कुणालाही एखादा जुळणारा प्रसंग आठवून हळवं व्हायला होणारच. एकदा का त्याच्या पहिल्या चार प्रश्नांशी तुम्ही सहमत झालात की उरलेली गझल आतुरतेने ऐकली जाते. कदाचीत त्याच्या सगळ्या "क्यो"ची उत्तरं मिळतील म्हणूनही आपण कां टवकारतो. 

पण पुढे तो उत्तरात न जात थोडे संदर्भ देऊन त्याचा आणखी एक प्रश्न पुढे ठेवतो. 

                       इक ज़रा हाथ बढ़ा दे तो, पकड़ लें दामन
                    उसके सीने में समा जाए, हमारी धड़कन
                    इतनी क़ुर्बत है तो फिर, फासला इतना क्यूँ है?


इथे मात्र "बात" वेगळी आहे याची झलक मिळते. हा दुरावा वेगळा आहे हेही लक्षात येतं. पण तरीही "फासला" आहेच आणि त्याचं कारण तो समोरच्याला विचारतो आहे हेही पक्क होतं. आपण आपल्या परिस्थितीला आणि तेही ती या नायकाच्या परिस्थितीशी जुळत नसेल तर बाजूला काढून त्याच्या प्रश्नाचं पुढे काय उत्तर मिळतं का म्हणून त्या गिटारच्या तारा आपल्या मनात वाजवत पुढे ऐकतो. 

                          दिल-ए-बरबाद से निकला नहीं, अब तक कोई
                      इक लुटे घर पे दिया करता है, दस्तक कोई
                      आस जो टूट गई फिर से, बंधाता क्यूँ है?

त्याचं उत्तर मिळतंच असं नाही हे इथे स्पष्ट व्हायला सुरुवात होते. खरं तर शायर इथे नक्की काय म्हणू पाहतोय हे आपलं आपण शोधायचं. "लुटे हुए घर पे दस्तक" म्हणजे जो कोणी होता तो गेला आणि आपण ठोठावतोय आणि पुन्हा त्याच गोष्टी/व्यक्तीची आस लावू पाहातोय. आता मी तरी जास्त संदिग्ध होते आणि पुढे हा काय शेवट करेल त्याची वाट पाहते. 

                           तुम मसर्रत का कहो या, इसे ग़म का रिश्ता
                       कहते हैं प्यार का रिश्ता है, जनम का
                       रिश्ता है जनम का जो ये रिश्ता तो, बदलता क्यूँ है?

इथे निदान त्याचं चित्र स्पष्ट होतंय. म्हणजे नातं आनंदामुळे आहे की दुःखामुळे हे समोरच्याने ठरवायचं पण शेवटी ते प्रेमाचं आजन्म टिकणारं नातं का बरं बदललं. हा अंतिम प्रश्न आहे. 
गाणं आपल्याला प्रश्नात ठेऊन फॅट चटकन संपलं अशी भावना येते. 

जर तुम्ही खरंच एखादं नातं गमावल्याच्या काळात हे गाणं ऐकलं तर ते तुम्हाला अंतर्मुख करेल. त्या नात्याची वीण कशी उसवली गेली असावी या प्रश्नाने तुमच्या रात्री जाग्या राहतील आणि त्या तशाही अवस्थेत तुम्हाला साथ करायला फक्त आणि फक्त जगजीतचाच मुलायम आवाज लागेल. मला वाटतं कुठचेच संदर्भ न देताही एखाद्या जेनेरीक औषधाचं काम गाणं करतंय. 

माझा एक मित्र जो मी बऱ्याच वर्षांपूर्वी गमावला आहे, त्याने हे गाणं आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदी ऐकवलं होतं. त्याला एकंदरीत मध्येच गाण्याच्या लकेरी छेडायची सवय होती आणि या गाण्यातला सुरुवातीचा प्रश्न "यहीं होता है तो आखिर, यही होता क्यूँ है?" हे तो गायचा. मला वाटतं आता माझ्या वयातल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या आयुष्यात माणसं गमवायला सुरुवात केली आहेत. कधी ती असून नसल्यासारखी असली तरीही गमावलीच म्हणायची. तर या आमच्या मित्राने आम्हा सर्वांच्या आठवणीत तोच प्रश्न विचारला असेल का? 

#AparnA #FollowMe