Showing posts with label मुंबई. Show all posts
Showing posts with label मुंबई. Show all posts

Saturday, September 30, 2017

चेंगराचेंगरी आणि आपण

माझी मावशी परळला राहायची. तिला जाऊन आताशा महिना झाला. मी यंदा काही अचानक आलेल्या घरगुती कामामुळे मुंबईला गेले तेव्हा ती मुलाकडे पुण्याला होती त्यामुळे आमची भेट फक्त फोनवर झाली. अगं पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्याकडे राहायला घेऊन येईन या माझ्या शब्दांना आता काहीच अर्थ नाही. या मावशीकडे मी असंख्य वेळा गेले आहे. रुपारेलला असताना तर तशी संधीही होती. त्यावेळेस आम्ही वेस्टर्नवाले सोप्पं पडतं म्हणून दादरला गाडी बदलून एल्फिनस्टनच्या या पुलावरून असंख्य वेळा गेलो आहोत. तेव्हाही तो चिंचोळा रस्ता तसा का असावा असा प्रश्न पडायचा. आई बाबा आणि आम्ही मुलं एका ओळीत चालायचो. मग पूल संपला की हुश्श बाबांचा हात पकडता यायचा.मागच्या महिन्यात ताईला मी म्हटलं देखील आता आपलं परळ खऱ्या अर्थाने संपलं.  

यावेळी मैत्रिणीच्या घरी जायच्या निमित्ताने परळला जाणं झालं. तिने मला बांद्रयाला भेटून पुढे टॅक्सीने मी पाहिला नाही म्हणून वरळी सीफेसच्या मोठ्या पुलावरून टॅक्सी नेली. मग गप्पा मारून झाल्या तशी तिच्या गाडीने मला परळच्या पुलापाशी सोडलं आणि गाडी मध्ये उभी करायला जागा नसते म्हणून दुसऱ्या टोकाशी सोडून फारा दिवसांनी मी त्या पुलावरून चालले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो रविवारचा दिवस होता त्यामुळे फार जास्त लोकंही नव्हते.
 
काल जेव्हा पेपरमध्ये ती चेंगराचेंगरीची बातमी वाचली तेव्हा काळीज हललं. काय झालं असेल या विचारानेच कसंतरी वाटलं. या ठिकाणी कधी काळी आपणही होतो या विचाराने आणखी हैराण व्हायला होतं. अशा घटनांच्या जबाबदारी कुणीतरी स्वीकारतं का? आणि समजा स्वीकारली तरी गेलेले लोकं परत येणार आहेत का? गर्दीचं मानसशास्त्र वेगळं असतं. आपल्याला मुळात एक बेसिक पेशन्स लागतो तो आपल्यात आहे का हेही या ठिकाणी तपासून पाहायला हवं. मला माहीत नाही नक्की किती लोकं एकावेळी होते पण शांतपणे एक एक जण फक्त पुढे पुढे जात राहिला असता तर झालेली घटना टळू शकली असती का असा मी आपल्या बाजूने विचार करतेय. इथे कुठेही सरकारने गेली कित्येक वर्षे इथे बदल केले नाहीत वगैरे गोष्टी तूर्तास बाजूला ठेवल्या आहेत.
 
मी एका ठिकाणी कामावर जायचे तो फक्त १७ मैलाचा रस्ता तुडवायला काहीवेळा मी तासभरही घालवला आहे कारण इथेही असा एक लोकल हायवे आहे जिथे ऑफिसच्या वेळात पार्किंग लॉट म्हणावा तशी गाड्यांची गर्दी असते पण या गाड्यांच्या जमावाला सरळ जायची शिस्त असते आणि मुंगीच्या पावलाने आम्ही पुढे सरकत राहतो. तीच गत एखादा खेळ किंवा नाटक वगैरे पाहून झालं की बाहेर पडताना आता माझा नम्बर कसा पहिला लागेल वगैरे न पाहता आहे ती रांग न मोडता शांतपणे लोकं सरळ पुढे जातात. 

मुंबईचा वेग ज्या शहरात मी आहे त्याला नसेल असं मान्य केलं तरी शिकता यायचं असेल तर हा एक गुण मी नक्की माझ्या जवळच्यांना शिकवायचा प्रयत्न करेन. आताच बाईक चालवायला शिकणारी मुलं डावीकडून पटापट बाईक काढतात त्यांचं कौतुक करायच्या ऐवजी त्यांना कान धरून बाजूला करणारं कुणीतरी आपल्याकडे हवं असं मला नेहमी वाटतं. या चेंगराचेंगरीच्या बातमी वाचून आलेली अस्वस्थता ही आहे की मला माझ्या मुक्कामी पोहोचायचं आहे मग मध्ये मार्गात काही अडथळा आला तर  माझी स्वतःची जबाबदारी काय आहे हे आपल्याला कुठे शिकवलं जाणार हे आपल्याला माहीत आहे का? या प्रश्नाचं उत्तर ज्याने त्याने शोधावं इतकंच उटांवरून शेळ्या हाकणारे माझ्यासारखे लोक म्हणू शकतात. 

या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहताना अशा घटना घडू नये म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून इथून पुढे आपण जास्त जबाबदारीने वागावं लागेल हे मात्र जरूर म्हणावसं वाटतं. 

Wednesday, May 26, 2010

मुंबईतला ब्लॉगर्स मेळावा....

खरं तर हा विषय तसा आता ब्लॉगविश्वावर जुना पण काही ब्लॉगु-ब्लॉगिनींनी जरा सांगितलं म्हणून किंवा स्वतःलाही लिहायचं होतं पण तेव्हा वेळेत न लिहिता आल्यामुळे उशीरा का होईना...आणि तसंही अजुन मे संपला नाहीये मग काय हरकत आहे?? शिवाय बाकीच्यांचे लेख त्यांचे ते नंतर वाचतील पण माझा अनुभव मी स्वतः नंतर कसा आठवणार (आत्ताच सगळ्ळ सगळ्ळ आठवत नाहीये तर...) या आणि अशा अनेक कारणांमुळे शेवटी मीही माझे दोन पैसे या विषयावर खर्च करायचे ठरवले आहेत (ही या विषयावरची शेवटची पोस्ट असेल अशी आशा..)संदर्भासहित स्पष्टिकरण किंवा कारणे दाखवा नोटीस अशा विषयांवर मी जास्त चांगलं लिहु शकेन हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या धेनात आलं असेलंच पण तरीबी हे फ़क्त नमनाचं वाटीभर तेल होतं याची कृ.नों.घ्या...

तर ९ मे २०१० नेमकं मायदेशात असणं आणि मेळावाही असणं हा जरी समसमा संयोग असला तरी तो तिथल्या तिथे साधण्याची कसरत साधताना मला नक्की काय काय करावं लागलं (in short किती लोकांना टोप्या घालाव्या लागल्या) हे सांगणं नमनानंतर तितकंच आवश्यक आहे...(त्याने इतरांच्या मेळावासंबंधी लेखांपेक्षा वेगळं काही वाचल्याचं समाधानही वाचकांना लाभेल ही आशा). सगळ्यात प्रथम म्हणजे तिथे हक्काच्या रविवारवर हक्क (so called प्रेमळ) दाखवणार्‍या प्रेमळ नातलग,मित्रमैत्रीणींची संख्या त्याच आठवड्यात अचानक वाढल्याचं ध्यानात आलं.आयला म्हणजे तुम्ही इतर दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन मला भेटाच किंवा जेवायला बाहेर/घरी न्याच असा आग्रह नव्हता पण सगळे रविवारसाठी अडून बसल्याने जरा मोठा लोचा झाला होता.कारण मी ब्लॉग लिहिते हे त्यातल्या ९९.९९% लोकांना माहित नाही मग कुठे जायचं हे खरं सांगायचा मार्ग मीच बंद केला होता. पण प्रत्येकाला दुसर्‍या कुणाचं तरी नाव सांगुन आयत्यावेळी सुटका करुन घेतली. मुख्य प्रश्न होता मुलाला इतका वेळ एकट्याला आईकडे सोडायचा पण नशीब की आईला तसं फ़ार काही सांगावं लागलं नाही पण नेमकी तिलाच त्या दिवशी एक काम (तेही दादरलाच) निघालं आणि आता मेगा ब्लॉकमध्ये ही लवकर आली नाही तर काय या टांगणीत मी दुपारभर होते पण नशीबाने ती तीन वाजता परतली आणि मी तडक सुटलेच..उगाच कुणी घरी टपकलं तर मग सुटका कशी करायची याचा विचार केला नव्हता. आणि लवकर निघाले तरी फ़ायदा झाला कारण इतकं करुन मेगा ब्लॉकमुळे बरोबर वेळेवर म्हणजे पावणे पाचला पोहोचले..(मी रोहन आणि महेंद्रकाकांना थोडी लवकर येईन असं सांगितलं होतं...मग पंधरा मिन्ट तर पंधरा मिन्ट लवकरशी मतलब काय??)

आल्या आल्याच सचिनने बॅच दिला आणि मग एक एक करुन ओळखीच्या मंडळीशी खरा परिचय/गप्पा/खेचाखेची करायला सुरुवात झाली..तसंच एक शुद्धलेखनाच्या नियमासंबंधी छोटेखानी पुस्तकही देण्यात आले (त्यांची संख्या मर्यादित होती त्यामुळे कदाचित उशीरा येणार्‍यांना मिळालं नसेल) पण माझ्यासारख्या ब्लॉगर्सनी संग्रही ठेऊन वापरावं असंच पुस्तक आहे. त्याबद्द्ल विशेष आभार.

सोनाली आणि आर्यनमुळे खरं तर मी आणि शमिकाही पुढे बसलो. त्यातल्या त्यात फ़ायदा म्हणजे ती जागा पंख्याच्या खाली होती. पण तसं वर असल्यामुळे थोडं कमी उकडत होतं (किंवा सवय झाली असणार) मेळाव्याची सुरुवात कांचनच्या भाषणाने झाली..त्यातला मला लक्षात राहिलेला मुद्दा/सुचना म्हणजे ज्यांना दिर्घ बोलायचं आहे त्यांनी शेवटी परिचय करुन द्यावा..अरे काय डोकं चाललंय यार, यांना नक्कीच आणखी काही मेळाव्यांचे अनुभव असणार असा मी विचार करतच होते आणि मग एक एक करुन परिचयांना सुरुवात झाली. सोनालीचा नंबर तसा लवकर होता आणि आर्यनचा सत्कारही होता.सुरुवातीचे काही थोडक्यात असतानाच एकदम मग आपल्या वयाचा गैरवापर करत काही ज्येष्ठांनी लांबण लावायला सुरुवात केली आणि तेही स्वतःचा ब्लॉग सोडून भलत्याच विषयांवर..’तारतम्य’ हा शब्द मराठीत नक्की आहे का याची शंका यावी असं झालं...त्यात मग उगाच आपण पळून गेलो तर? म्हणून घाईघाईत माझ्या ब्लॉगचं नाव इ. सांगुन पटकन परत आले.

तितक्यात नेमकी वडा-कटलेटची फ़ेरी सुरु झाली. त्यामुळे (बहुतेक) लांबण लावणार्‍यांनाही पब्लिकने सहन केलं...(कारण टाळ्यांचा कडकडाट करायला हात तर रिकामी हवेत की नाहीत??) असो...मुख्य मुद्दा हा की हा अल्पोपहार (आणि तो अल्प नव्हता..पुरुन उरुन उरेल पेक्षा जास्त म्हणजे किती? तेवढा...), कार्यालय हा सर्व खर्च कुणा अनामिकाने केला होता ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे...

कटलेट हा मला त्यातला त्यात जास्त न भावणारा प्रकार आणि वड्यापेक्षा तर नाहीच नाही (पक्षी: पहा माझं वडापुराण) आणि वड्याची चव खरंच एकदम हटके होती. मग इतरांचं ऐकता ऐकता कॉफ़ी पानही झालं...कॉफ़ी अशी मसालेदार (म्हणजे तेच ते जायफ़ळ इ. घातली) प्यायची सवय गेलीय त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा कॉफ़ी झाली हे वेगळं सांगायला नकोच...

फ़क्त आता पुढच्या बाकावर बसण्याची सहनशक्ती संपत आली होती. रोहनने ते व्हिडिओ रेकॉर्डिंग गळ्यात दिल्यामुळे तशी अडले होते (आणि त्यात त्यामुळे माझं दोन सेकंदाचं परिचयसत्र रेकॉर्ड झालं नाही ते अलाहिदा) पण मग संधी साधुन मागच्या बाकांवर आले आणि एकदाचं हुश्श केलं..आता हळुहळु काही नंतर आलेले परिचयाचे लोकही भेटले..चुरापावला शोधायला जास्त कष्ट पडले नाहीत त्याच्या टी-शर्टवरच वडा-पाव लिहिलं होतं. मैथिली पुढे जाऊन बसल्याने तिच्यासाठी पुन्हा दोन मिन्टं पुढे जाऊन आले..नशीब नाहीतर ती नंतर लवकर पळालीसुद्धा. माझ्या आधीच्या कल्पनेप्रमाणे जी ओळखीची मंडळी भेटणार होती तीच भेटली. म्हणजे आनंद पत्रे, सुहास,सागर,देवेंद्र तसंच काही नवीनही परिचय झाले सचिन,आनंद काळे, इ. पण जास्त कल्पना नसताना भेटून दिलखुलास गप्पा मारणारी व्यक्ती म्हणजे राजा शिवाजी डॉट कॉमचे मिलिंद वेर्लेकर. त्यांचा खास परिचय रोहनने करुन मग त्यांचं छोटेखानी भाषण ऐकल्यावर त्यांचं अभिनंदन/.आभारासाठी गेले तर आम्ही एकंदरित ब्लॉगविश्व संबंधी बर्‍याच गप्पा मारल्या आणि नंतर चक्क त्यांनी या ब्लॉगला भेट देऊन कमेन्टही दिलीय.म्हणजे वाटलं होतं तसे काही नवे ब्लॉग परिचय होणं हा एक चांगला भाग म्हणता येईल...काही ब्लॉगर्सनी त्यांच्या ब्लॉगबद्दल थोडक्यात पण रंजक माहिती दिली...महेंद्रकाकांशी कुणी स्पर्धाही करतंय हेही नव्याने कळलं...(आता दुसरं कोण असणार ते....रविंद्र कोष्टी सोडून..पण हे त्यांनी स्वतःच सांगितलंय बरं) आदमी अच्छा होगावाले हरेकृष्णजींशीसुद्धा बोलायला मिळालं..त्याचवेळी महेंद्रकाकांनी आग्रहाने वड्याची आणखी एक प्लेट हातात ठेवली..आता खुद्द पंतप्रधानांना नाही कसं म्हणणार मग त्या वड्याचंही चीज (पोटात घालुन) केलं...:)

सगळे परिचय झाल्यानंतर मग काही तांत्रिक गोष्टींवरही चर्चा झाली ज्यांचा उल्लेख इतरत्र सगळीकडे झालाय..माझं लक्ष होतं त्याकडे पण तोवर घरुन फ़ोनही यायला सुरुवात झाली होती..पण रोहनने आधीच आपण एकत्र जाऊया म्हणून सांगुन ठेवलं होतं मग परत एकदा आईकडे पटवापटवी केली आणि निवांत शमिकाशी गप्पा मारायला सुरुवात केली. एकंदरित वेळ चांगला गेला होता.परत जाताना वाकड्या वाकड्या वाटा करुन रोहनने शेवटी घरापर्यंत सोडणे हा तर अपेक्षेचा परमबिंदु म्हणायला हवा..

सत्तरपेक्षा जास्त ब्लॉगर्सची उपस्थिती आणि फ़क्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक अशी महाराष्ट्रातील अन्य शहरे त्याचप्रमाणे हैदाराबाद सारख्या महाराष्ट्राबाहेरचे ब्लॉगर्स आणि last but not the least अमेरिकेतूनही येणारे प्रतिनिधी आणखी काय हवं संमेलन रंगलं हे सांगायला? शेवटी या मेळाव्याचा मुख्य उद्देश ब्लॉगर्स, वाचक या सर्वांमधला स्नेह वाढवणे हा होता आणि त्यात आपण पुरेपुर यशस्वी झालो आहोत.

Monday, May 24, 2010

देवाच्या घरात....

खरं तर परत आल्यावर काय लिहु? हा प्रश्न नव्हता पण पहिलं काय लिहु हा जास्त मोठा प्रश्न होता..ठरवलं होतं की ब्लॉगमीटबद्दल लिहावं पण ती ब्लॉगविश्ववरची जुनीच बातमी असणार असा विचार केला आणि शिवाय चुकून पहिलंच वटवट्याच्या पोस्टवरची गरमागरम चर्चा वाचुन आता या विषयाचंच हे काय झालं असं काहीसं मनात आलं..त्यामुळे सगळे विचार सोडून मनाला आठवणींच्या चार आठवड्यात सोडून दिलं...


धोपट मानाने जे काही चार आठवड्यात करता येईल ते पुरेपुर करुन घेतलं..(सगळ्यात महत्त्वाचं मुलाला आईकडे भाचरांच्या जीवावर सोडून) आणि तेच ते सर्व कुणी कायम मुंबईकर असल्यावर करेल त्याच कॅटेगरीतलं...पण जास्त न ठरवता एक छानच गोष्ट झाली तिचाच उल्लेख नमनाला व्हायला हवा म्हणून ही छोटुकली पोस्ट...

तर जायचं होतं आमच्या अमेरिकेत ओळख झालेल्या एका मैत्रीणीकडे..ती आत्ताच उसातून परत मायदेशात आली. तिचं नंबर दोनचं लेकरु झालं त्याचवेळी आम्ही आमचं बस्तान ओरेगावात हलवल्याने भेटही झाली नव्हती आणि अगदी खरं कारण म्हणजे ही ब्रांद्र्यात सचिनची शेजारीण हे ओळख झाल्यादिवसापासुन माहित झालं होतं...आधी तिच्या लग्नाच्यावेळी मायदेश भेट नव्हती नाहीतर रिसेप्शनलाच क्रिकेटच्या देवाला पाहायचा योग होता..पण ते नाही तर आमच्यासाठी चला तिला भेटता लगे हातो साहित्य सहवासातील ती प्रसिद्ध इमारत आणि निदान ते दारही पाहु असं असणं साहजिकच होत म्हणा...

शेवटचा आठवडा आला तरी दोघांनाही वेळ मिळत नव्हता..शिवाय जायचं तर आरुषला घेऊनच त्यामुळे मुहुर्त शोधायला होत नव्हता.शेवटी परतीच्या अगदी दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारी काय तो एकदाचा मुहुर्त मिळाला. नवरा आणि मुलगा एका ठिकाणाहुन आणि मी दुसर्‍या असं दुपारी पोहोचायचं ठरलं त्याप्रमाणे आमच्या मैत्रीणीबरोबर ठरवलंही..नशीब की तिलाही आयत्यावेळी आलेलं चालणार होतं. दोन वाजता उषःकालच्या खाली नावाच्या पाटीवर माझ्या मैत्रीणीच्या शेजारी आणि वरच्या मजल्यावर सचिनची आई आणि भाऊ अशी नावं पाहुन पत्ता मैत्रीणीचा शोधतेय हेही विसरले...असो.

लिफ़्टने वर गेले तर त्या मजल्यावर तिन्ही दरवाजे मिळून एकच घंटी पाहुन आमचा मागचा संवाद आठवला आणि माझी सरकारी ट्युबलाईट पेटली. मागेच तिच्या आई-बाबांनी शेजाऱचा फ़्लॅट घेऊन त्यांच्या घराला जोडला हे ती म्हणाली होती. अर्थात त्यावेळी माळ्यावर किती फ़्लॅट्स आणि मग हा घेतला तो कुणाचा असल्या चांभारचौकशा केल्या नव्हता. पण ही घंटा दाबताना साधारण कळलंच.

घरात आल्यावर जरा इतर गप्पा झाल्यावर मग काढलाच विषय तिच्या आईकडे आणि मग सारंच चित्र स्पष्ट झालं. त्यांच्या शेजारी राहणारा आपला क्रिकेटचा देव सचिन आता तिथे राहत नाही; त्यांचा फ़्लॅट जोडून आता हा एकच मोठा फ़्लॅट त्यांनी बनवला आहे. तिथे एक बेडरुम, बाथरुम आणि दुसर्‍या बेडरुममध्ये टि.व्ही. आणि म्युझिक रुम आणि बाकी घर जोडून मोठा दिवाणखाना असं आता या मजल्यावर देशपांड्यांचं एकच कुटुंब आहे.

खरं तर दाखवल्याशिवाय कुणाच्या घरातल्या खोल्या उगाच जाऊन पाहायचं माझ्यासारखंच कुणीही टाळेल पण त्यादिवशी बाथरुममध्ये जाताना सचिनच्या बाजुच्या प्रत्येक खोल्यांमध्ये उगाच डोकावुन यावसं वाटलं..याचं ठिकाणी त्याची बालपावलं चालता चालता, हळुहळु शाळेत जाता जाता क्रिकेटच्या मैदानात घट्ट झाली असतील असं वाटुन उगाच भरुन आलं...अरे हे घर पुर्वी कसं असेल याचीही उगाच टोचणी...अर्थात कुणी आपल्या लहानपणीच्या घराचं काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि सगळीकडेच भावुक का व्हायचं??...त्याचा भाऊ अद्यापही वरच्या माळ्यावर राहतो आणि इथेही तो येतो असंही बोलता-बोलता कळलं..गप्पा संपल्या वेळही वाढत होता तसं हळुहळु निघालो..

तिथुन निघताना बाहेरच्या प्रचंड गरमीतही साहित्य सहवासाच्या गेटबाहेर पडेपर्यंत जरा जास्तच गार वाटत होतं. संगमरवरी गाभार्‍यातुन बाहेर पडल्यासारखं.....

Saturday, November 21, 2009

दादर

त्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी असतात की आपण तिथे राहणारे नसतो पण इतकं जिव्हाळ्याचं का वाटाव असं वाटत राहात तसं माझ्या मनात "दादर".

अगदी लहानपणी जेव्हा दिवाळी किंवा कुणा नातेवाइकाच्या लग्नाची खरेदी म्हटलं की हमखास आठवणार ते म्हणजे दादरच. माझी मावशी एलफ़िन्स्टनला राहायची त्यामुळे तसंही तिच्याकडे जायला जलद गाडीतून दादरलाच गाडी बदलायचीही असायची. खरेदीच्या वेळीही सगळं झालं की मग मावशीकडे असंच न सांगता ठरलेलं असायचं. तेव्हाचं दादर म्हणजे सुविधाच्या गल्लीतून सुरु करायचं आणि फ़्रॉक पसंत पडेपर्यंत एकामागुन एक दुकानांच्या पायर्या चढायच्या. त्या भागातले सगळे कायम गर्दीचे रस्ते पालथे घालायचे हा एक वार्षिक कार्यक्रमच होता.तेव्हा वर्षाला साधारण एक नवा फ़्रॉक इतकी चैन होती म्हणून मग तो एकच घरी गेल्यावरही आवडेल असा घ्यायचा त्यामुळे कधी कधी माझी आई कंटाळुन जायची. मग प्लाझाच्या समोर एक गु-हाळ आहे त्याच्याकडे ऊसाचा रस ठरलेला. कपड्यांच्या बाबतीत माझं एक नेहमीचं रडगाणं म्हणजे ९९% वेळा दुकानात घेतलेलं घरी लेऊन पाहिलं की नाक मुरडलंच पाहिजे. केवळ तेवढ्यासाठी मला इथे अमेरिकेतली रिटर्न पॉलिसी प्रकार फ़ार आवडतो. असो..भरकटतेय. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच की दादरचा लळा लागला तो त्या दिवसांत.

मग शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी झाल्यावर रूपारेलला गेल्यामुळे आता दादर जरा जास्त जवळ आलं. कधीतरी मैत्रीणींबरोबर शिवाजी पार्कच्या कट्यावर बसुन गप्पा मारणं आवडायचं.बारावीच्या देसाई क्लासला शहाडे-आठवल्यांच्या गल्लीत जायचं तेव्हाचं दादरला जाणं अजुन थोडं वेगळं. बारावीचं टेंशन पण तरी क्लासच्या ग्रुपबरोबर मंजुच्या वड्याची चव जिभेला लागली ती अजुनपर्यंत मुंबईत गेलं आणि उभा वडा खाल्ला नाही तर देवळात गेलो पण प्रसाद घेतला नाही असं काहीसं वाटतं.

पण तरी त्याहीपेक्षा दादरच्या जास्त जवळ आले ते नंतर मी भगुभईला डिप्लोमा इंजिनियरिंगला गेल्यावर. माझी जिवलग मैत्रीण दुर्गेशा शिवाजी पार्कच्या जवळ म्हणजे संतुरच्या गल्लीत राहायची. आता तिथे इमारत झाली पण तेव्हा त्यांचं तिथे छोटंसं घर होतं. अभ्यासासाठी त्यांच्याकडे राहाणं अगदी नियमाचं झालं आणि दादरची ओढ अजुनच वाढली. तिच्याबरोबर आम्ही आसपासच्या भागात खादाडीचे इतके कार्यक्रम केलेत की त्यावर एक वेगळी पोस्ट होईल. तिची आजीपण जवळ म्हणजे सिंधुदुर्गच्या बाजुच्या इमारतीत राहायची. आजी एकटीच असल्याने आम्ही दोघी खूपदा तिच्याकडेच राहायचो. इंजिनियरिंगच्या अवेळी मिळणार्या सुट्ट्यांमध्येही मी अधुनमधुन त्यांच्या कडे जायचे. मग ठरवुन गेलं की सिटिलाइटच्या त्यांच्या लाडक्या कोळीणीकडून आणलेले सुरमई नाहीतर पापलेट तिची आजी टिपिकल सारस्वत पद्धतीने इतके झकास करायची की त्याच्यावर शिवाजी पार्कच्या पानपट्टीवाल्याकडचं थंड थंड पेटी पान खाणं म्हणजे काय आहे हे कळायला ते सर्व त्याच क्रमाने खायला पाहिजे. सिंधुदुर्गचं किचन त्यांच्या खिडकीतून दिसतं त्यामुळे ताजा बाजार आला असला की आजी आम्हाला आग्रह करून रात्री जेवायला तिथेही पाठवायची. माझ्या घरी माझ्या आईला तसं बाहेर खाणं हा प्रकार फ़ारसा आवडत नाही त्यामुळे त्यांच्या आग्रहाचं मला इतकं कौतुक वाटायचं ना की बास. मग रात्री परतताना शिवाजी पार्कला एखादी चक्कर मारुन आजीसाठी आठवणीने पानात मिळणारी कुल्फ़ी घेऊन जाणं आणि उरलेल्या गप्पा तिघींनी एकत्र मारणं या सर्वांत खरंच खूप आनंद होता. या अशा दिवसांनी मग दादरबद्दल वाटणारं प्रेम जरा जास्तच वाढलं. त्यानंतर मग पुढच्या शिक्षणाची आमची कॉलेजं वेगळी झाली तसा तिचा माझा संपर्क कमी झाला आणि मग आम्ही एकमेकांशी फ़क्त इ-मेल चॅटवर आलो तसं वाटलं की गेलं दादर आता. त्यानंतर तर ती नोकरीसाठी बंगलोरला गेल्यामुळे मग दादरला हक्काचं कोण असा प्रश्नच पडला.


तेवढ्यातच निसर्ग भ्रमणाचा नवा छंद लागला होता त्यातुन ओळख झालेली माझ्यापेक्षा वयाने मोठी असली तरी खूप समजुन घेणारी नवी मैत्रीण संगिता मला मिळाली आणि दादर पुन्हा एकदा आयुष्यात आलं. खरं तर ती टेक्निकली माटुंग्याला राहायची पण दोन रस्ते ओलांडले की शिवाजी पार्क म्हणजे जवळजवळ दादरमध्येच. आणि रूपारेलच्या मागे म्हणजे दादर असं माझं ढोबळ कॅलक्युलेशन आहे त्यात तिचं घर बसतय...मग जेव्हा केव्हा रात्रीची कर्जत लोकल पकडायची असली की माझा मुक्काम पोस्ट संगिताच्या घरी असं ठरलेलं. तेव्हाही रात्री शिवाजी पार्कला चक्कर किंवा नेब्युला नाहीतर जिप्सीमध्ये कधी जाणं हेही. आणि तेव्हा तर मी नोकरीपण करत होते त्यामुळे मग तसं खर्चाचाही प्रश्न नव्हता. त्यानंतर एकदा एका आजारपणानंतर ऑफ़िसचा प्रवास थोडा त्रासदायक होत होता म्हणून एक आठवडा मी त्यांच्याकडून नोकरीही केली होती. आणि तात्पुरतं तिथेच एका ठिकाणी महिनाभर पेइंग गेस्ट म्हणूनही राहिले होते. आता दादरची जरा जास्तच चटक लागली होती असं वाटत होतं.
पण मग त्यानंतर लग्नानंतर मायदेश सोडल्यामुळे पुन्हा दादर टप्प्याबाहेर गेलं पण आठवणीतुन अर्थातच नाही. पहिल्यांदा आले तेव्हा आम्ही जुना चारेक जणांचा ग्रुप पुन्हा शिवाजी पार्कवर भेळ खात गप्पा मारत बसलो. अरे हो तिथल्या कॅंटिनचा वडाही छान आहे हे सांगायचं राहिलं. त्यानंतर अचानक एक दिवस आमच्या एका कॉमन मित्राची इ-मेल आली की एका आजारपणामुळे आमची जिवलग मैत्रीण गेली. ती तिच्याबरोबर माझं दादर घेऊन गेली असं का कोण जाणे मला इथे वाटत होतं. त्यानंतर भारतात गेले तेव्हा तिच्या घरच्यांना भेटायला गेले त्यावेळचं दादर खूप वेगळं, गर्दीतही एकटं का वाटलं माहित नाही. पण आता सर्व पुर्वीसारखं आहे असं नाही. शिवाय मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे शिवाजी पार्काचं मराठीपण खूप कमी झाल्यासारखंही वाटलं. आधी राउंड मारताना येणारे मराठी आवाज आता कमी झाल्यासारखे वाटले.चालायचं दादरला घर घेणं हे जर म्हणायचं असेल तर मला पु.ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे मुंबईकर व्हायला तुम्हाला मुंबईत कुणी दत्तक वगैरे घेतयं का पाहा तसं वाटतं. मग आता तिथले मराठी कमी झालेच असणार.


मी अमेरिकेला जेव्हा आले तेव्हा माझ्या नवर्याला म्हटलं होतं की आपण दोघं इथे खूप मेहनत करू म्हणजे आपल्याला दादरला निदान एक वन बीएचके तरी घेता येईल. आतापर्यंत कधीही कसाही गुणाकार भागाकार केला तरी ते स्वप्न स्वप्नच राहाणार हे आता कळतंय पण तरी दादरची ओढ काही जात नाही. फ़क्त काहीतरी संकेत असल्यासारखं नेमकं दादरच्या आसपास राहणार्या मित्र मैत्रीणी कसे काय भेटतात ठाऊक नाही पण जेव्हा जेव्हा दादर सुटतंय असं वाटतंय तेव्हाच कुणीतरी म्हणतं मी दादरचा/ची आणि मग मन मागे मागे जात पुन्हा दादर स्टेशनवर येऊन थांबतं.

Tuesday, November 3, 2009

दिव्यांची आरास





मोठी माणसं घरात असली की सगळे सण कसे नीट आठवण करुन दिले जातात. आता जी पौर्णिमा गेली ती "त्रिपुरी" यावर्षी आई घरात असल्यामुळे तिने आठवण करुन दिली. मग या दिवशीही एक दिव्यांची माळ घरात लावली. ती लावता लावता मला मागची त्रिपुरी आठवली.
मुंबईत बोरिवली पश्चिमेला मंडपेश्वर भागात ज्या गुंफ़ा आहेत तिथे प्रथमच त्रिपुरी पौर्णिमेला जायचा योग आला आणि प्रत्येक जणांनी केलेली दिव्यांची आरास पाहुन डोळे आणि मन तृप्त झाले. मुंबईजवळच राहुनही कधीच जाणं का झालं नाही माहित नाही आणि आता मायदेश सोडुन काही वर्ष झाल्यानंतर का होईना जाणं झालं हेही नसे थोडके. शक्य असेल तर या दिवशी मुंबईकरांनी (आणि इतरांनीही)  तिथे नक्की जायलाच हवं.
इथे एक छोटी टेकडी आहे, जिच्या आत या गुंफ़ांमधलं महादेवाचं मंदिर आहे. आसपास जो काही परिसर आहे तिथे या दिवशीच्या संध्याकाळी तिथे मोठमोठ्या रांगोळ्या काढुन त्याभोवती दिवे, पणत्या, समया ठेवुन दिव्यांची आरास केली जाते. सगळी जणं आपापले दिवे किंवा काही नुसतं तेल घेऊन मग ते सगळीकडे लावतात. कुठला दिवा विझला की तो मागुन येणारा कधी लावतो कळणारही नाही. काळोख व्हायला लागला तसा तो परिसर या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आणि कानावर तिथे लावलेले शांत सुरातले अभंग. दिवाळीचं हे वेगळं रुप प्रत्येक मुंबईकराने डोळ्यात साठवायलाच हवे आणि या गुंफ़ा जतन करण्यासाठीही पाठिंबा. जास्त लिहिण्यापेक्षा फ़ोटो लावते. पुढच्या वर्षी नक्की जाल..