Monday, May 31, 2010

फ़ुलोरा....देवबाप्पा देवबाप्पा

अगदी लहानपणापासुन सोबत करणारी गाणी खरं तर कायमच आपल्या लहानग्यांबरोबर असतात पण तरी जसं वय वर्षे दोन हा टप्पा पूर्ण होतो तसं झोपताना गाण्यांच्या ऐवजी गोष्टी किंवा मस्ती जास्त जवळची वाटते. पहिली दोन वर्षे आपल्या खांद्यावर, मांडीवर झोपताना शांत असणारं आपलं बाळ आता मोठं झालं हेच खरं...त्यामुळे फ़ुलोर्‍यातलं हे शेवटचं पुष्प. यानंतर कदाचित एखादं फ़ार जवळचं गाणं या ब्लॉगवर येईलही पण हा पुष्पगुच्छ घट्ट बांधुन ठेवायची वेळ आली आहे..गेले दोन दिवस गोष्टींवर झोपणारं माझं बाळ आता मोठं होतंय; त्यामुळे मागच्या वर्षभर जसं महिनाकाठी एक गाणं आमचं लाडकं असायचं तसं नसेल. त्यामुळे आता इथंच थांबलेलं बरं.
जाता जाता या महिन्यातलं नसलं तरी मोठं होता होता आमचं पिलु 'जय जय बापा' करताना असं काही मागणं मागत असेल का? असं वाटलं म्हणून हेच गाणं निवडलंय....

देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव
खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव

झाडाला येऊ दे आईस्क्रिमचे तुरे
गोळ्यांच्या कळ्या अन चॉकलेटची फ़ुले
बिस्किटांच्या पानाला साखर पन लाव

झाडाला येऊ दे लाडू अन करंजी
रोज रोज खायला मिळेल मग ताजी
मधुनच येऊ दे बटर अन पाव

आईजवळ करणार नाही मी हट्ट
खाऊन खाऊन होईन मी खूप खूप लठ्ठ
झाडावर असू दे माझेच नाव

Saturday, May 29, 2010

गाणी आणि आठवणी ३ - तेजोमय नादब्रम्ह

ही आठवण खरं म्हणजे एका गाण्याची नाही तर अख्ख्या अल्बमची आहे...तो २००२ चा मार्च...उन्हाची काहिली मुंबईत वाढली होती आणि वर्षभराच्या नोकरीत एकही दिवसाची सुट्टी नाही, पुष्कळसे शनि-रवि ऑफ़िसके नाम,मध्यरात्री ऑफ़िस सोडणं याने कावायला झालं होतं..त्यामुळे कसंबसं P.M. ला पटवुन एका आठवड्याची सुट्टी मिळवली होती..माझा मावसभाऊ (तेव्हा सडाफ़टिंग) बंगळुरला असे त्याच्याकडे आई-बाबांबरोबर जायचं आणि मग उटी-म्हैसुर-कोडाई ची सहल असा साधासुधा बेत होता...
त्याच्याकडे माझ्याच आसपासच्या वयाचे त्याचे रुममेट्स; त्यामुळे आमची गट्टी जमली..त्यातल्या गाता गळा असणार्‍या मित्राने मला उ-म्है-को च्या चार दिवसांसाठी "तेजोमय नादब्रम्ह" दिली..त्याच्या प्लेअरसकट..तो पूर्ण उन्हाळा मी ती कॅसेट जगले.पुन्हा मुंबईला आल्यावर ती लगेच घेतली आणि त्यावर्षी किती जणांना गिफ़्ट म्हणूनही दिली..इतकं काय होतं किंवा आहे त्यात असं कधीच वाटलं नाही..
ऐकल्या क्षणापासुन जवळजवळ प्रत्येक गाणं आवडलं..श्रीधर फ़डकेंच्या संगीताला सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी दिलेली योग्य साथ हेच नाहीये...याचं संगीत, वादकांची कमाल, बासुरी सारंच कसं अप्रतिम आहे...आजही त्यातली गाणी ऐकली की मी कर्नाटक टुरिझमच्या त्या बसमधल्या माझ्या उजवीकडच्या सीटच्या खिडकीत जाते..आम्ही साधारण हनिमुनच्या सिझनला गेलो होतो..त्यामुळे त्या बसमध्ये झाडून सारी हनिमुन कपल्स आणि माझ्या आई-बाबांसारखं एक नागपुरचं वयस्कर जोडपं..मी एकटीच "मुलगी"..खरं तर आमच्या ड्रायव्हर-गाईड सकट माझ्या अशा प्रकारे आई-बाबांबरोबर फ़िरण्याचं इतकं कौतुक होतं की सारी बसच मला "बेटी" म्हणे...मी कुठे परत यायला उशीर केला तरी सवलत असे...तरी थोडी-फ़ार मी एकटीने ती ट्रिप अनुभवली आणि त्यातही मला मजा आली...
कधीही ’तेजोमय’ लावली की माझ्या मनात बस वळणा वळणांनी जातेय आणि मी उलट-सुलट करुन ही गाणी ऐकतेय हेच दृष्य जगते. त्यातलं सगळ्यात लाडकं गाणं अर्थातच "मी राधिका", अगदी इतक्यात एका मैफ़िलीत आरतीजींना ते गाताना ऐकलं आणि पुन्हा उटीला पोहोचले इतकं ते नातं घट्ट आहे.
खरं तर मुंबईच्या टिपिकल कॉर्पोरेट जगाच्या पहिल्या अनुभवाने पिचलेल्या हळव्या मनाला आपल्याला या सर्व भावना आहेत हेही विसरायला झालं होतं याचं भान या राधिकेने मला दिलं...तर "छायेपरी ही नियती" या "दे साद दे हृदया" ने सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करायला लावलं...पण तरी "त्या गंधातुन मोहरली माझी कविता" हे "मी एक तुला फ़ुल दिले" मधलं साधं-सोप्पं वाक्यही त्या संगीताने भारावल्यासारखं वाटतं याचाही अनुभव आला.
बंगलोर,उटी, कोडाइला रस्त्यात कुठेही पाऊस भेटायचा..कुणाच्या आठवणीने आभाळ हळवं होतंय असं उगाच तेव्हा मला वाटायचं...आम्हा मुंबईच्या लोकांना तसंही फ़क्त मान्सुनचीच सवय.....त्या पावसाची हळवी आठवण "कधी रिमझिम आला ऋतु आला" या गाण्याने आता ओरेगावात पडणार्‍या वर्षभराच्या पावसातही होते...आणि त्यावर्षी तर मुंबईत परत आल्यावर पावसाची इतकी वाट पाहिली होती की जूनमध्ये तो आला तेव्हा आपसूक हेच गाणं ओठावर आलं....अजुनही पावसाबद्दलच्या आवडत्या मराठी गाण्यात हे गाणं माझं फ़ार लाडकं आहे...
खरं तर ही कॅसेट म्हणजे का कोण जाणे माझ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होऊन राहिलाय...जणु काही इतर कुठले उन्हाळे आलेच नाहीत..त्यावर्षी एकामागुन एक संकटं, प्रोजेक्टमुळे येणारी आजारपणं आणि बुरखेधारी कॉर्पोरेट जगाचा मला दिसलेला चेहरा या सर्वांची सुरुवात व्हायच्या आधी ही सुंदर गाणी माझ्या मनात घर करुन बसली..ते कठीण दिवस तरुन जायची शक्ती या गाण्यांनी तर मला दिली नसेल ना, असा विचार या वर्षीच्या मुंबईच्या वैशाख वणव्यातही माझ्या मनात आला आणि पुन्हा एकदा मनाने मी कोडाईच्या सरोवरातल्या होडीत बसले आणि "तुला पाहिले मी नदीच्या किनारी" आपोआप कानात गुणगुणायला लागले....

Wednesday, May 26, 2010

मुंबईतला ब्लॉगर्स मेळावा....

खरं तर हा विषय तसा आता ब्लॉगविश्वावर जुना पण काही ब्लॉगु-ब्लॉगिनींनी जरा सांगितलं म्हणून किंवा स्वतःलाही लिहायचं होतं पण तेव्हा वेळेत न लिहिता आल्यामुळे उशीरा का होईना...आणि तसंही अजुन मे संपला नाहीये मग काय हरकत आहे?? शिवाय बाकीच्यांचे लेख त्यांचे ते नंतर वाचतील पण माझा अनुभव मी स्वतः नंतर कसा आठवणार (आत्ताच सगळ्ळ सगळ्ळ आठवत नाहीये तर...) या आणि अशा अनेक कारणांमुळे शेवटी मीही माझे दोन पैसे या विषयावर खर्च करायचे ठरवले आहेत (ही या विषयावरची शेवटची पोस्ट असेल अशी आशा..)संदर्भासहित स्पष्टिकरण किंवा कारणे दाखवा नोटीस अशा विषयांवर मी जास्त चांगलं लिहु शकेन हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या धेनात आलं असेलंच पण तरीबी हे फ़क्त नमनाचं वाटीभर तेल होतं याची कृ.नों.घ्या...

तर ९ मे २०१० नेमकं मायदेशात असणं आणि मेळावाही असणं हा जरी समसमा संयोग असला तरी तो तिथल्या तिथे साधण्याची कसरत साधताना मला नक्की काय काय करावं लागलं (in short किती लोकांना टोप्या घालाव्या लागल्या) हे सांगणं नमनानंतर तितकंच आवश्यक आहे...(त्याने इतरांच्या मेळावासंबंधी लेखांपेक्षा वेगळं काही वाचल्याचं समाधानही वाचकांना लाभेल ही आशा). सगळ्यात प्रथम म्हणजे तिथे हक्काच्या रविवारवर हक्क (so called प्रेमळ) दाखवणार्‍या प्रेमळ नातलग,मित्रमैत्रीणींची संख्या त्याच आठवड्यात अचानक वाढल्याचं ध्यानात आलं.आयला म्हणजे तुम्ही इतर दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन मला भेटाच किंवा जेवायला बाहेर/घरी न्याच असा आग्रह नव्हता पण सगळे रविवारसाठी अडून बसल्याने जरा मोठा लोचा झाला होता.कारण मी ब्लॉग लिहिते हे त्यातल्या ९९.९९% लोकांना माहित नाही मग कुठे जायचं हे खरं सांगायचा मार्ग मीच बंद केला होता. पण प्रत्येकाला दुसर्‍या कुणाचं तरी नाव सांगुन आयत्यावेळी सुटका करुन घेतली. मुख्य प्रश्न होता मुलाला इतका वेळ एकट्याला आईकडे सोडायचा पण नशीब की आईला तसं फ़ार काही सांगावं लागलं नाही पण नेमकी तिलाच त्या दिवशी एक काम (तेही दादरलाच) निघालं आणि आता मेगा ब्लॉकमध्ये ही लवकर आली नाही तर काय या टांगणीत मी दुपारभर होते पण नशीबाने ती तीन वाजता परतली आणि मी तडक सुटलेच..उगाच कुणी घरी टपकलं तर मग सुटका कशी करायची याचा विचार केला नव्हता. आणि लवकर निघाले तरी फ़ायदा झाला कारण इतकं करुन मेगा ब्लॉकमुळे बरोबर वेळेवर म्हणजे पावणे पाचला पोहोचले..(मी रोहन आणि महेंद्रकाकांना थोडी लवकर येईन असं सांगितलं होतं...मग पंधरा मिन्ट तर पंधरा मिन्ट लवकरशी मतलब काय??)

आल्या आल्याच सचिनने बॅच दिला आणि मग एक एक करुन ओळखीच्या मंडळीशी खरा परिचय/गप्पा/खेचाखेची करायला सुरुवात झाली..तसंच एक शुद्धलेखनाच्या नियमासंबंधी छोटेखानी पुस्तकही देण्यात आले (त्यांची संख्या मर्यादित होती त्यामुळे कदाचित उशीरा येणार्‍यांना मिळालं नसेल) पण माझ्यासारख्या ब्लॉगर्सनी संग्रही ठेऊन वापरावं असंच पुस्तक आहे. त्याबद्द्ल विशेष आभार.

सोनाली आणि आर्यनमुळे खरं तर मी आणि शमिकाही पुढे बसलो. त्यातल्या त्यात फ़ायदा म्हणजे ती जागा पंख्याच्या खाली होती. पण तसं वर असल्यामुळे थोडं कमी उकडत होतं (किंवा सवय झाली असणार) मेळाव्याची सुरुवात कांचनच्या भाषणाने झाली..त्यातला मला लक्षात राहिलेला मुद्दा/सुचना म्हणजे ज्यांना दिर्घ बोलायचं आहे त्यांनी शेवटी परिचय करुन द्यावा..अरे काय डोकं चाललंय यार, यांना नक्कीच आणखी काही मेळाव्यांचे अनुभव असणार असा मी विचार करतच होते आणि मग एक एक करुन परिचयांना सुरुवात झाली. सोनालीचा नंबर तसा लवकर होता आणि आर्यनचा सत्कारही होता.सुरुवातीचे काही थोडक्यात असतानाच एकदम मग आपल्या वयाचा गैरवापर करत काही ज्येष्ठांनी लांबण लावायला सुरुवात केली आणि तेही स्वतःचा ब्लॉग सोडून भलत्याच विषयांवर..’तारतम्य’ हा शब्द मराठीत नक्की आहे का याची शंका यावी असं झालं...त्यात मग उगाच आपण पळून गेलो तर? म्हणून घाईघाईत माझ्या ब्लॉगचं नाव इ. सांगुन पटकन परत आले.

तितक्यात नेमकी वडा-कटलेटची फ़ेरी सुरु झाली. त्यामुळे (बहुतेक) लांबण लावणार्‍यांनाही पब्लिकने सहन केलं...(कारण टाळ्यांचा कडकडाट करायला हात तर रिकामी हवेत की नाहीत??) असो...मुख्य मुद्दा हा की हा अल्पोपहार (आणि तो अल्प नव्हता..पुरुन उरुन उरेल पेक्षा जास्त म्हणजे किती? तेवढा...), कार्यालय हा सर्व खर्च कुणा अनामिकाने केला होता ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे...

कटलेट हा मला त्यातला त्यात जास्त न भावणारा प्रकार आणि वड्यापेक्षा तर नाहीच नाही (पक्षी: पहा माझं वडापुराण) आणि वड्याची चव खरंच एकदम हटके होती. मग इतरांचं ऐकता ऐकता कॉफ़ी पानही झालं...कॉफ़ी अशी मसालेदार (म्हणजे तेच ते जायफ़ळ इ. घातली) प्यायची सवय गेलीय त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा कॉफ़ी झाली हे वेगळं सांगायला नकोच...

फ़क्त आता पुढच्या बाकावर बसण्याची सहनशक्ती संपत आली होती. रोहनने ते व्हिडिओ रेकॉर्डिंग गळ्यात दिल्यामुळे तशी अडले होते (आणि त्यात त्यामुळे माझं दोन सेकंदाचं परिचयसत्र रेकॉर्ड झालं नाही ते अलाहिदा) पण मग संधी साधुन मागच्या बाकांवर आले आणि एकदाचं हुश्श केलं..आता हळुहळु काही नंतर आलेले परिचयाचे लोकही भेटले..चुरापावला शोधायला जास्त कष्ट पडले नाहीत त्याच्या टी-शर्टवरच वडा-पाव लिहिलं होतं. मैथिली पुढे जाऊन बसल्याने तिच्यासाठी पुन्हा दोन मिन्टं पुढे जाऊन आले..नशीब नाहीतर ती नंतर लवकर पळालीसुद्धा. माझ्या आधीच्या कल्पनेप्रमाणे जी ओळखीची मंडळी भेटणार होती तीच भेटली. म्हणजे आनंद पत्रे, सुहास,सागर,देवेंद्र तसंच काही नवीनही परिचय झाले सचिन,आनंद काळे, इ. पण जास्त कल्पना नसताना भेटून दिलखुलास गप्पा मारणारी व्यक्ती म्हणजे राजा शिवाजी डॉट कॉमचे मिलिंद वेर्लेकर. त्यांचा खास परिचय रोहनने करुन मग त्यांचं छोटेखानी भाषण ऐकल्यावर त्यांचं अभिनंदन/.आभारासाठी गेले तर आम्ही एकंदरित ब्लॉगविश्व संबंधी बर्‍याच गप्पा मारल्या आणि नंतर चक्क त्यांनी या ब्लॉगला भेट देऊन कमेन्टही दिलीय.म्हणजे वाटलं होतं तसे काही नवे ब्लॉग परिचय होणं हा एक चांगला भाग म्हणता येईल...काही ब्लॉगर्सनी त्यांच्या ब्लॉगबद्दल थोडक्यात पण रंजक माहिती दिली...महेंद्रकाकांशी कुणी स्पर्धाही करतंय हेही नव्याने कळलं...(आता दुसरं कोण असणार ते....रविंद्र कोष्टी सोडून..पण हे त्यांनी स्वतःच सांगितलंय बरं) आदमी अच्छा होगावाले हरेकृष्णजींशीसुद्धा बोलायला मिळालं..त्याचवेळी महेंद्रकाकांनी आग्रहाने वड्याची आणखी एक प्लेट हातात ठेवली..आता खुद्द पंतप्रधानांना नाही कसं म्हणणार मग त्या वड्याचंही चीज (पोटात घालुन) केलं...:)

सगळे परिचय झाल्यानंतर मग काही तांत्रिक गोष्टींवरही चर्चा झाली ज्यांचा उल्लेख इतरत्र सगळीकडे झालाय..माझं लक्ष होतं त्याकडे पण तोवर घरुन फ़ोनही यायला सुरुवात झाली होती..पण रोहनने आधीच आपण एकत्र जाऊया म्हणून सांगुन ठेवलं होतं मग परत एकदा आईकडे पटवापटवी केली आणि निवांत शमिकाशी गप्पा मारायला सुरुवात केली. एकंदरित वेळ चांगला गेला होता.परत जाताना वाकड्या वाकड्या वाटा करुन रोहनने शेवटी घरापर्यंत सोडणे हा तर अपेक्षेचा परमबिंदु म्हणायला हवा..

सत्तरपेक्षा जास्त ब्लॉगर्सची उपस्थिती आणि फ़क्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक अशी महाराष्ट्रातील अन्य शहरे त्याचप्रमाणे हैदाराबाद सारख्या महाराष्ट्राबाहेरचे ब्लॉगर्स आणि last but not the least अमेरिकेतूनही येणारे प्रतिनिधी आणखी काय हवं संमेलन रंगलं हे सांगायला? शेवटी या मेळाव्याचा मुख्य उद्देश ब्लॉगर्स, वाचक या सर्वांमधला स्नेह वाढवणे हा होता आणि त्यात आपण पुरेपुर यशस्वी झालो आहोत.

Monday, May 24, 2010

देवाच्या घरात....

खरं तर परत आल्यावर काय लिहु? हा प्रश्न नव्हता पण पहिलं काय लिहु हा जास्त मोठा प्रश्न होता..ठरवलं होतं की ब्लॉगमीटबद्दल लिहावं पण ती ब्लॉगविश्ववरची जुनीच बातमी असणार असा विचार केला आणि शिवाय चुकून पहिलंच वटवट्याच्या पोस्टवरची गरमागरम चर्चा वाचुन आता या विषयाचंच हे काय झालं असं काहीसं मनात आलं..त्यामुळे सगळे विचार सोडून मनाला आठवणींच्या चार आठवड्यात सोडून दिलं...


धोपट मानाने जे काही चार आठवड्यात करता येईल ते पुरेपुर करुन घेतलं..(सगळ्यात महत्त्वाचं मुलाला आईकडे भाचरांच्या जीवावर सोडून) आणि तेच ते सर्व कुणी कायम मुंबईकर असल्यावर करेल त्याच कॅटेगरीतलं...पण जास्त न ठरवता एक छानच गोष्ट झाली तिचाच उल्लेख नमनाला व्हायला हवा म्हणून ही छोटुकली पोस्ट...

तर जायचं होतं आमच्या अमेरिकेत ओळख झालेल्या एका मैत्रीणीकडे..ती आत्ताच उसातून परत मायदेशात आली. तिचं नंबर दोनचं लेकरु झालं त्याचवेळी आम्ही आमचं बस्तान ओरेगावात हलवल्याने भेटही झाली नव्हती आणि अगदी खरं कारण म्हणजे ही ब्रांद्र्यात सचिनची शेजारीण हे ओळख झाल्यादिवसापासुन माहित झालं होतं...आधी तिच्या लग्नाच्यावेळी मायदेश भेट नव्हती नाहीतर रिसेप्शनलाच क्रिकेटच्या देवाला पाहायचा योग होता..पण ते नाही तर आमच्यासाठी चला तिला भेटता लगे हातो साहित्य सहवासातील ती प्रसिद्ध इमारत आणि निदान ते दारही पाहु असं असणं साहजिकच होत म्हणा...

शेवटचा आठवडा आला तरी दोघांनाही वेळ मिळत नव्हता..शिवाय जायचं तर आरुषला घेऊनच त्यामुळे मुहुर्त शोधायला होत नव्हता.शेवटी परतीच्या अगदी दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारी काय तो एकदाचा मुहुर्त मिळाला. नवरा आणि मुलगा एका ठिकाणाहुन आणि मी दुसर्‍या असं दुपारी पोहोचायचं ठरलं त्याप्रमाणे आमच्या मैत्रीणीबरोबर ठरवलंही..नशीब की तिलाही आयत्यावेळी आलेलं चालणार होतं. दोन वाजता उषःकालच्या खाली नावाच्या पाटीवर माझ्या मैत्रीणीच्या शेजारी आणि वरच्या मजल्यावर सचिनची आई आणि भाऊ अशी नावं पाहुन पत्ता मैत्रीणीचा शोधतेय हेही विसरले...असो.

लिफ़्टने वर गेले तर त्या मजल्यावर तिन्ही दरवाजे मिळून एकच घंटी पाहुन आमचा मागचा संवाद आठवला आणि माझी सरकारी ट्युबलाईट पेटली. मागेच तिच्या आई-बाबांनी शेजाऱचा फ़्लॅट घेऊन त्यांच्या घराला जोडला हे ती म्हणाली होती. अर्थात त्यावेळी माळ्यावर किती फ़्लॅट्स आणि मग हा घेतला तो कुणाचा असल्या चांभारचौकशा केल्या नव्हता. पण ही घंटा दाबताना साधारण कळलंच.

घरात आल्यावर जरा इतर गप्पा झाल्यावर मग काढलाच विषय तिच्या आईकडे आणि मग सारंच चित्र स्पष्ट झालं. त्यांच्या शेजारी राहणारा आपला क्रिकेटचा देव सचिन आता तिथे राहत नाही; त्यांचा फ़्लॅट जोडून आता हा एकच मोठा फ़्लॅट त्यांनी बनवला आहे. तिथे एक बेडरुम, बाथरुम आणि दुसर्‍या बेडरुममध्ये टि.व्ही. आणि म्युझिक रुम आणि बाकी घर जोडून मोठा दिवाणखाना असं आता या मजल्यावर देशपांड्यांचं एकच कुटुंब आहे.

खरं तर दाखवल्याशिवाय कुणाच्या घरातल्या खोल्या उगाच जाऊन पाहायचं माझ्यासारखंच कुणीही टाळेल पण त्यादिवशी बाथरुममध्ये जाताना सचिनच्या बाजुच्या प्रत्येक खोल्यांमध्ये उगाच डोकावुन यावसं वाटलं..याचं ठिकाणी त्याची बालपावलं चालता चालता, हळुहळु शाळेत जाता जाता क्रिकेटच्या मैदानात घट्ट झाली असतील असं वाटुन उगाच भरुन आलं...अरे हे घर पुर्वी कसं असेल याचीही उगाच टोचणी...अर्थात कुणी आपल्या लहानपणीच्या घराचं काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि सगळीकडेच भावुक का व्हायचं??...त्याचा भाऊ अद्यापही वरच्या माळ्यावर राहतो आणि इथेही तो येतो असंही बोलता-बोलता कळलं..गप्पा संपल्या वेळही वाढत होता तसं हळुहळु निघालो..

तिथुन निघताना बाहेरच्या प्रचंड गरमीतही साहित्य सहवासाच्या गेटबाहेर पडेपर्यंत जरा जास्तच गार वाटत होतं. संगमरवरी गाभार्‍यातुन बाहेर पडल्यासारखं.....