Tuesday, August 27, 2013

राम आणि शामची गोष्ट

ही गोष्ट आहे दोन मित्रांची. सोयीसाठी आपण त्यांना राम आणि शाम म्हणुया. राम आणि शाम एकत्र कॉलेजमध्ये शिकले. पैकी शाम एका छोट्या गावातून आला होता. त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम असली तरी मुलाखतीसाठी इंग्रजीतून बोलायला सुरवात केली की त्याचे उच्चार, भाषा इत्यादीचा फरक लक्षात येई. त्यामुळे शेवटच्या वर्षात इतर मुलांची प्लेसमेंट झाली तरी याच्या पदरी मात्र निराशा. रामलादेखील कॅम्पस जॉब मिळाला आणि राम-शामची मैत्री तिथेच थिजल्यासारखी राहिली.
रामने सुरुवातीला काही काळ नोकरी करून मग उच्च शिक्षणासाठी परदेश गाठला. तिथे चांगल्या दोन डिग्र्या मिळवून आता हा उत्तम पदावर काम करतोय. परदेशी राहताना जितकं चांगलं राहता येईल, मोठा बंगला, त्याला स्विमिंग पूल, मोठी गाडी, सारखे सारखे इतर देशात कामासाठी प्रवास सगळं काही जोरदार सुरु. शिवाय देशात देखील स्वतःच्या गावी मोठा बंगला आणि तिकडेही नेमाने भेटी वगैरे. 
मागे फेसबुकच्या निमित्ताने त्याच्या batch चे जवळजवळ सर्वच परदेशी गेलेले मित्र भेटले पण शाम कुठे आहे याची  काहीच कल्पना नाही. मग एका भारत दौऱ्यात घराच्या काही कामाने जिल्ह्याच्या एका सरकारी कचेरीमध्ये जायचा योग आला. तिकडे आपला क्रमांक यायच्या आधीचा वेळ काढताना सहज म्हणून तिथली अधिकाऱ्यांची यादी वाचताना त्यातलं सगळ्यात वरचं नाव ओळखीचं वाटलं आणि पुन्हा वाचल्यावर खात्री पटली म्हणून बाहेरच्या शिपायाला या साहेबांना भेटता येईल का म्हणून विचारलं. अर्थात appointment नसल्यामुळे शिपाई नाहीच म्हणाला पण तरी एक प्रयत्न म्हणून आपलं कार्ड देऊन यांना तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप पाठवला. 
ते कार्ड घेऊन शिपाई वर जाताच त्याच क्षणात साहेब स्वतःच खाली आले. गेले कित्येक वर्षे न भेटलेले शाम आणि आपला राम एकमेकांना गळाभरून भेटले. आता तू जायचं नाही. माझ्याच बरोबर राहायचं , मला पण बंगला आहे शामचा आग्रह. कॉलेजमध्ये खर सारेच मध्यमवर्गीय पण रामने बरेचदा शामला मदत केली होती त्या दोघांची तेव्हा खूप छान मैत्री होती आणि आता इतक्या वर्षाने भेटल्यावर साहजिकच ही प्रतिक्रिया असणार.
मग रामला कळलं  की शामने कॅम्पस जॉब मिळाला नाही म्हणून खचून न जाता शासकीय परीक्षा आपल्या गुणांवर आणि काही विषय मराठीमध्ये घेऊन आता उच्चस्थानी नोकरी करून त्याच्यासारख्या लोकांसाठी काम करतोय. आता त्याच्याकडे सरकारी बंगला, दोन गाड्या आणि त्याच्यासाठी सिक्युरिटी वगैरे सर्व काही होतं.
दोन दिवसांनी शामला काही दिवसाच्या दौऱ्यावर जायचं होतं. रामला हे निमंत्रण मोडवेना शिवाय आपल्या देशातली सरकारी कामे कशी  चालतात हेही पाहायला मिळणार होतं. या काही दिवसांत रामने काही गावं, तिथले खेडूत आणि त्यांची परिस्थिती जवळून पहिली. सरकारी मदत तळागाळात पोहोचावी म्हणून शामने स्वतः काही महिन्यापूर्वी पाहणी करून ती मिळेल अशी सोय केली होती. त्याला पाहिल्यावर ही  लोकं अक्षरश: त्याच्या पायावर लोटांगण घालत होते. त्याला मनोमन दुवा देत होती. मोठ्या वयाच्या बायकादेखील, "मुलासारखा तू धावून आलास", वगैरे म्हणत होत्या. आपल्या आयुष्यात प्रथमच असं  काही पाहणारा राम त्यावेळी कॅम्पस जॉब मिळवून उर्वरित आयुष्यात आपण काय कमवलं याचा मनात विचार करत होता. 
 
त्या रात्री शामशी बोलताना तो म्हणाला माझं सगळं कमावलेलं घेऊन टाक आणि तुझी नोकरी मला दे.   शाम शांत होता. तो म्हणाला, हे बघ तू माझ्या बंगल्यावर आला नाहीस कारण तुला वेळ नव्हता पण आला असतास तरी फक्त मीच भेटलो असतो. कारण मी जिथे जिथे काम करतो तिथे एकही पैसा न खाता लोकांना मदत करतो शिवाय बरेच मंत्री-संत्री इत्यादीचं काही तरी वाकडं सुरु असतो ते बाहेर काढतो म्हणून सहा महिन्यापेक्षा जास्त एका जागी कुणी मला ठेवत नाही. लगेच बदली होते. माझी बायको कंटाळली आणि यंदा मुलीचं महत्वाचं वर्ष म्हणून दुसऱ्या शहरात राहते. त्यांच्यासाठी इथे शासकीय इतमामाने वापरायला गाडी आहे पण तीत बसायला कुणी नाही. बर हे जाउदे ही  सगळी मेहनत करायची महिन्याची कमाई बघ. त्याच्याकडचा  फक्त पन्नास हजाराचा पे चेक पाहून बराच वेळ त्या खोलीत कुणीच काही बोललं नाही. शेवटी शामनेच उतारा दिला, "हे बघ राम, तुला जर खरच मदत करायची आहे तर तू एक गाव दत्तक घे आणि तिथे सोई होतील हे मला पाहता येत का त्याचा मी प्रयत्न करेन."
 
राम त्याचा भारतदौरा पूर्ण करून पुन्हा परदेशी आला. पण यावेळी त्याच्या मनात पूर्वीसारखं आपल्याकडे हे नाही ते नाही असं काही नव्हतं, तर आपल्याला आता काय करता येईल याची दिशा त्याच्या मनाला मिळाली होती.
 
हा राम मला कामानिमिताने थोड्या काळासाठी भेटला आणि वर उल्लेखलेलं त्याने मला एकदा बोलताबोलता सांगितलं. या संपूर्ण खऱ्या कथेची नावं मात्र मी जाहीर करू शकत नाही. विशेष करून शामचं. आपल्याला असे अनेक शाम हवे आहेत पण म्हणून शामकडे बघून शिकणाऱ्या रामचं मुल्यही कमी होत नाही हे सांगायचा हा एक छोटा प्रयत्न.

Sunday, August 25, 2013

सुन्न

सात महिन्यांपूर्वी जेव्हा निर्भयाची बातमी चर्चेत आली,तेव्हा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया म्हणजे स्वतःच्या अगतिक शरीराची लाज वाटणं. तरी एक वेडी आशा म्हणजे निदान आरोपींना जबरी शिक्षा होईल असं वाटलं होतं पण तसंही झालं नाही. रोज़ "तशा" ताज्या बातम्या येताहेतच. ही मुंबईतली बातमी वाचून पहिल्यांदाच स्वतःच्या भारतीय असण्याची शरम वाटतेय. 
आज इतक्या तत्परतेने आरोपींना पकडल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन करावं तितकंच पुढे अंत बघू पाहणार्या न्याय-व्यवस्थेचं काय करायचं हाही प्रश्न आहेच. शिवाय मधल्यामध्ये इथून पुढे या घटनेशी संबंधीत शिंकलेल्या माशीलाही "ब्रेकिंग न्यूज़" म्हणून लोकांच्या समोर सारखं झळकवत आपापल्या चॅनलच्या तुंबड्या भरणार्यांनाही विसरून चालणार नाही. 
मागच्या महिन्यात कामाच्या जागी भेटलेला एक चेक नागरिक आणि त्याच्याशी झालेला सं(की नुसताच)वाद आठवतोय. 
"So what are you really proud of in current India? Is it because it has a rapist Capitol?"
याचं काही महिन्यांपूर्वीच एका दाक्षिणात्याशी विवाह झाला आहे आणि महाशय दिडेक आठवडा भारतात जाऊन आलेत यांचा ईथे उल्लेख व्हायला हवा.

त्याचा तो rapist Capitol चा उल्लेख झोंबून मी त्याच्याशी "it happens in all countries and may be the media highlights it only when a major case is solved by the cops. India is culturally so different I am not sure about Delhi but in Mumbai in my last visit, I travelled by public transport at night time and reached safely from one part of the town to other" हे आणि असं बरंच काही सांगून बाजू सावरायचा प्रयत्न केला होता.

कदाचीत माझ्या मुंबईबद्दल मला जरा जास्त विश्वास होता. कदाचीत मी बॅलाॅर्ड पिअरला ज्या गर्दुल्ल्यांच्या आजुबाजूनेे जावं लागे तो भाग तरीही "सेफ़ झोन" असावा किंवा त्यावेळी रस्त्यावर चालणारे इतर लोक फारच काळजीवाहू असावेत   किंवा तेव्हा सातला निघायची वेळ आता चार किंवा पाचवर आली असेल किंवा काय?
खरं सांगायचं तर इथून पुढे कुठल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली किंवा नाही तरी हे असं आमच्या मुंबईत दिवसाढवळ्या घडू शकतं हा एकच धक्का मला सुन्न करायला पुरेसा आहे. आज या देशाची नागरिक असण्याची शरम वाटतेय.



Friday, August 16, 2013

पि पि पि

नावात काय आहे हे कुणीतरी म्हणून ठेवलं  आणि आपण पुढे सुरु ठेवलंय. पण कितीतरी प्रसंग असे येतात की  नावात बरचं काही आहे हे आपण आपलं मान्य करतो. 

नावांचे गोंधळ घालायला पश्चिमेच्या कुठच्याही देशात आपण पूर्वेकडच्यानी जायचं. त्यांनी गोंधळ घालायचे आणि मग आपणच ते निस्तरायचे हे आताशा अंगवळणी पडलंय. दुपारच्या जेवणाला कुठे जावं तर ऑर्डर घेणारा "How do you spell your first name" म्हणून अभ्यासाला बसणार, आपण त्याला शुद्धलेखन घालणार आणि तपासायची, आपलं  पिक अपची वेळ आली की त्याने केलेला उच्चाराचा गोंधळ आपला आपण निस्तरून "किती छान बोलतो आमचा बाळ", करून पुन्हा येरे माझ्या मागल्या करायला त्याच दुकानात जाणार.
 
यावर उपाय म्हणून माझ्या एका मैत्रिणीने एका ठिकाणी स्वतःच्या नावाचं आद्याक्षर वापरायचं ठरवलं म्हणजे एक तर शुद्धलेखनाचा वेळ वाचवा आणि पुन्हा याने काय उच्चारलं म्हणून रडायला नको. तर आम्ही दोघी गेलो आणि ऑर्डर झाल्यावर नाव म्हणून P अर्थात पि  लिहायला सांगितलं आणि आम्ही बाजूला झालो. तिकडे लंच टाइमचा नेहमीचा गोंधळ होता त्यात आमच्या गप्पा रंगात. 
 
कधी तरी तिथे पि चा धोशा सुरु झाला पण आमच्या दोघींच्या गावी ते कुठलं? नशिबाने ही एकाक्षरीवाली आमची युनिक केस असावी की काय पण ऑर्डर घेणाऱ्याच्या आम्ही लक्षात होतो (कदाचित रंगामुळे पण असेल) पण बिचारा वाट काढत आला आणि "your order is ready maa'm" म्हणून आवताण देऊन गेला. आता या "पि"ने गप्पपणे जेवण घ्यावं की नाही पण तरी तिने मताची पिंक टाकलीच "Everytime when people mess my name I feel bad about it. This time for change hope you got the taste of home medicine" 
 
आम्ही दुकानातून बाहेर गेल्यावर मला वाटतंय आमच्या (नसलेल्या) नावाची पिपाणी तिथे नक्की वाजवली असणार. 

Sunday, August 4, 2013

मैत्री


तो गेला. जवळजवळ वर्ष होईल त्याच्या शेवटच्या ई मेलला. पण त्याच्या शब्दाला जागला, कारण त्यानंतर त्याने कधीच स्वतःहून संपर्क साधला नाही. 


त्याच्या माझ्या मैत्रीची वर्षे मोजायची नाहीत आस  माझं मीच ठरवलं होतं आणि नाहीच मोजली. इतर वर्गमित्रमैत्रिणीबरोबर झाली तशीच आमची मैत्री पण बेस्ट फ्रेंडच्या यादीत फार लवकर आला तो. माझ्या त्या वर्षी कॉलेजमध्ये घडलेल्या काही अप्रिय घटनांमधून मी सावरताना त्याला मैत्रीचा आधार द्यावासा वाटला आणि मला वाटतं तिथेच आमचे मैत्रीचे सूर जुळले. 

सुरांवरून आठवलं, हो  "गाणी" देखील आमच्या मैत्रीचं एक  अविभाज्य अंग होतं. मला गझल ऐकायला शिकवायचं सगळं श्रेय त्याला. म्हणजे मला त्या माहित नव्हत्या असं नाही पण कुठच्या वेळी कुठली गझल आठवावी यासाठी तोच हवा. मग ऐकण्यातली खुमारी वाढते हे अनुभवावं. 

त्या मैत्रीला आमचं  कॉलेज संपलं म्हणून खंड पडण वगैरे झालं नाही. तो अंधेरीचा आणि माझी कामाची जागा अंधेरी, त्यामुळे येताजाता platform वर ओझरत्या भेटी होत. मोबाईल, इ-मेल च सुकाळ व्हायच्या आधीच्या मैत्री अशाच जपल्या. कधीतरी आमचा जुना ग्रुप एकत्र खादाडी करायला जमायचा तेव्हा पुन्हा जुनाच धांगडधिंगा. 

"तू मोठी कधी होणार आहेस का" हा न विचारता विचारलेला प्रश्न मला दुसरं मुल झालं तरी तसाच. 
आताशा अगदी मेल पण कमी झाले होते पण  स्काईपवर वर्षातून एक दोनदा पोटभर बोलणी केली की  खर तर बरच कव्हर व्हायचं. त्यात पुन्हा कुठे गायब होतो वगैरे प्रश्न आलेच नाहीत. 

मग माशी शिंकली कुठे हा विचार मी करतेय तोच त्याच्या काही वैयक्तिक अडचणींचा  पाढा वाचणार एक मोठं पत्र आल. मी हतबल. काही प्रसंग असे येतात जेव्हा आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात. तसाच विचार करून सोडून दिली. त्याने मागितली म्हणूनच इतक्या वर्षांची न मोजलेली पण जीवापाड जपलेली आमची मैत्री सोडून दिली. 

अशी ती सोडता येते का याचा विचार करत हेही वर्ष सरेल. त्याचं ठाम उत्तर मिळणार नाहीच आहे. फक्त पुन्हा अशी गाढ मैत्री नव्याने करायला आवडेल का याच उत्तर मात्र ठाम नाही आहे. हा हट्ट नाही आहे. स्वतःला पुन्हा त्या मैत्रीतून बाहेर पडतानाचा होणारा त्रास पुन्हा होऊ नये इतकचं वाटतंय. 

खर तर मागच्या आठवड्यात वीस वर्षांनी मी माझ्या एका खूप जुन्या मैत्रिणीला भेटले अगदी पहाटे एक वाजेपर्यंत तेही वीकडेला गप्पा मारल्या आणि मैत्रीचा आनंद पुन्हा अनुभवला आणि हा इकडे लिहिलेला अनुभवही मनात आहेच. दोन्ही वेगळ्या व्यक्ती असल्या तरी आजच्या जागतिक मैत्रीदिनी मला मात्र माझीच मैत्रीची ओंजळ अर्धी रिकामी, अर्धी भरलेली वाटतेय. 


जाता जाता या विषयावरच मला आवडणारं एक गाणं.