Tuesday, November 30, 2010

जिप्सीचा चायनीज मार्ग

आजकाल काय होतं कळत नाही पण बहुधा हा इथल्या थंडी, पाऊस आणि बहुदा जरा जास्तच लवकर आलेल्या बर्फ़ाचा परिणाम असावा असं वाटतं पण सारखं चायनीज खायला हवंय आणि तेही आपलं भारतीय चायनीज असंच..ते इथे तसंही मिळणार नाहीच. अर्थातच आपल्या चवीचं चायनीज खायला मी मुंबईत आले की आवर्जुन कुठे न कुठे जाते. अगदी पहिल्यांदी मी चायनीज खाल्लं होतं ते दादरला चायना गार्डनमध्ये आणि खरं सांगते एकतर त्यांचं सूप पिऊनच माझं पोट भरलं होतं आणि त्यात अमेरिकन चॉप्सी हे प्रकरण मला अजिबात झेपलं नव्हतं...नशीब एक राइस पण मागवला होता. पण तरीही नंतर कधीतरी ती गोडी लागलीच..आणि इतकं झालं तरीही कधीही जिप्सीच्या आत जाऊन चायनीज खाल्लं नव्हतं..मी आणि माझी मैत्रीण नेहमी जिप्सी कॉर्नरमध्येच काहीतरी चटरमटर खाऊन आपल्या बाहेर यायचो.नाहीतर नेब्युलामध्येही जायचो.पण जिप्सीच्या आत कधीच गेलो नाही.


यावेळी मात्र जिप्सीच्या आत जायचा योग होता. एक म्हणजे आम्ही थोडं द्राविडी प्राणायाम करुन आलो होतो...झालं काय की थोडं मुंबईदर्शन करावं म्हणून सिद्धीविनायकापासुन सुरुवात करुन मग वरळी, गेटवे असं फ़िरलो आणि संध्याकाळ झाली तेव्हा मला अचानकपणे दिल्ली दरबार कुठं ते आठवेचना. बरं मे महिना म्हणजे घामाच्या धारा वाहायला लागल्या होत्या..कुणाला विचारायचं नाही हा एक अलिखित नियम करुन बसलेला माझा नवरा सरळ एक कुलकॅब करुन दादरला जाऊया आणि मस्तपैकी खाऊया म्हटल्यामुळे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी फ़क्त कुलकॅबवाला भैय्या आहे हे पाहिल्यावर आधी एसी सुरु आहे नं इतकं विचारुन घेतलं...मजा म्हणजे त्या कुलकॅबने गाडी वळवली आणि दिल्ली दरबारचा बोर्ड मला दिसला..म्हणजे जिसे ढुंढा गली गली प्रकरणासारखंच होतं पण आता काही उतरणं शक्य नव्हतं...

मग आलो ते सरळ जिप्सी आणि आत थंड हवेत बसायचं म्हणून आपसुकच आत गेलो.आमच्या मुलाला तिथे काय तेजी आली होती कळत नाही पण लेकाने आम्हाला वैताग आणण्याचे सगळे प्रकार त्यादिवशी करुन झाले. पण आमचा वेटर मात्र फ़ारच चांगला होता. ज्या टेबलवर आम्ही बसलो होतो योगायोगाने ते आत्ताच निर्वतलेले माझे लाडके चंद्रलेखाचे मोहन वाघ यांच्या आठवणीसाठी होतं. आम्ही आधी सुप मागवायचं ठरवलं पण नेमकं गुरुवार होता आणि मी शाकाहारी होते त्यामुळे त्याने आणि मी वेगवेगळी सुपं डिशेस मागवली. वेटरने आमची गडबड ओळखली बहुधा म्हणून त्याने आम्हाला मुख्य जेवण मागवताना हाफ़ डिश (म्हणजे हाफ़ राइस इ.) पण मागवता येईल हे सुचवलं...आणि एकदम मला मी कुठून आलेय (काय गं अलिबागहून आलीस का? मधलं) असं झालं..म्हणजे याआधी हे इतकं सराइत होतं नं तरी मी आता अगदी विसरुनच गेले होते की असे हाफ़ ऑप्शन्सपण असतात म्हणून.

असो..एकदा ती चायनीज चव तोंडाला लागली की समोर आलेलं खाणं कसं चटाचट संपतं हे काही वेगळं सांगायला नको.आत्ता नुस्ते फ़ोटो पाहिले तरी जीव जातोय मग म्हटलं की एकट्यानेच कशाला हा छळ सहन करा? ब्लॉगवरही टाकुया. त्यादिवशी लक्षात आलं की जिप्सीचं चायनीज छान आहे आणि मुख्य त्यांचं (किंवा त्यादिवशीच्या आमच्या वाढपीचं) अगत्य भारी आहे. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाण्याचे पर्यायही आहेत. माझ्या नवर्‍याने मेन्यु पाहून अर्थातच मी भारतात आल्यावर तरी कुठलेच वार पाळणार नाही असं जाहिर केलं पण मी मात्र गुरुवार पाळला. एकदम केव्हातरी लेकाला डायव्हर्जन थिअरम (हम्म इस बात पे थोडा डिटेल डालना चाहिए पण आज फ़क्त खा खा होतेय सो...फ़िस कभी) म्हणून फ़ोटो काढताना लक्षात आलं त्यावेळी काढलेले फ़ोटो आहेत त्यावरुन आठवतेय की आम्ही काय काय खाल्लं होतं..सुपाचे तर फ़ोटोही दिसत नाहीत.

पण खरं सांगु का जसं आवडत्या व्यक्तीच्या फ़क्त आठवणीवर जगणं कठीण आहे, तसंच आवडत्या खादाडीच्या फ़क्त आठवणींवर जगणंही खूप कठीण आहे..सध्या प्रत्यक्ष अनुभवतेय. त्यामुळे या चटकदार पोस्टचा शेवट वेगळ्या अर्थाने जीवाला चटका लावतोय...

Thursday, November 25, 2010

तो, ती आणि (त्यांना पाहणारा) तो

शुक्रवारची सकाळ....आठवड्यातील शेवटचा का होईना पण कामाचा दिवस. तो जरा लवकर उठून आवरतोय. शेजघरात ’तो’ आणि ती अद्याप साखरझोपेत आहेत.

तिच्याकडे पाहताना तो सुखावतो. ’अशी शांत झोपलेली शेवटी केव्हा पाहिली होती बरं?? किती घाईचं झालंय आयुष्य?’ सकाळी उठून भराभर आवरुन ’त्या’ला घेऊन पळायचं ते मावळतीला ’त्या’ला घेऊन उगवणार. तिला कधी पाहणार! खरं तर काल ती पण जरा उशीराच झोपली होती. ऑफ़िसचं काही काम करत बसली होती. तेही ’त्या’ला झोपवायचं काम झाल्यावर.

तिचे थोडेसे विस्कटून कपाळावर आलेले केस, शांत झोपलेला चेहरा पाहताना हळुहळु जवळ जाऊन पुर्वी उठवायचो तसं काही करायला हवं.......त्याच्या मनात हा विचार येतो तितक्यात ’तो’ झोपेतच हसतो. नुसतं ओठ विलगुन नाही तर थोडसं खदखदा.

’किती वाजले? बापरे सव्वा आठ! उठवायचं का दोघांना एकदमच? ती तशीही उठेल पण ’त्या’ची झोप मोडायला फ़ार जीवावर येतंय. रात्री झोपतानाचा दंगा....आधी सगळ्या गाड्या,ट्र्क, विमानं यांना स्वतःच्या बिछान्यात झोपवून नंतर स्वारी तिच्या कुशीत दमदाटी केल्यावर झोपलीय. असा शांत, जागा असताना क्वचितच असतो नाही? हम्म........काय करणार आपल्या ऑफ़िसच्या रुटीनला तोही जुंपला गेलाय. किती वाटलं त्याला घट्ट जवळ घेऊन झोपावं तरी शुक्रवारी ते शक्य नाही. उद्या नक्की.."त्या"च्या भाषेत ’उद्या तुत्ती’.........’

इतक्यात तिलाच जाग येते. त्याच्याकडे बघता बघता घड्याळाकडे पाहात ती पुटपुटते. ’उठवलं नाहीस?’ तिचं ऐकलं न ऐकलं करुन नकळत तो म्हणतो ’छान झोपली होतीस’ ती प्रसन्न हसते. या एका वाक्याने तीही भूतकाळात पोहोचते आणि सकाळी त्याने उगाच ’गुड मॉर्निंग’ म्हणण्यापेक्षा जास्त छान वाटतंय अगदी पूर्वीच्या फ़क्त दोघांच्या सकाळींमध्ये पोहोचवणारं असा विचार करते.

’तो आता कसा हसला ऐकलंस?’

’अरे नाही रे..’

दोघांचं लक्ष शांत झोपलेल्या ’त्या’च्याकडे जातं आणि दिवसाच्या रहाटगाडग्याला जुंपण्यासाठी त्याला कुणी उठवायचं अशा प्रश्नार्थक नजरेने ते एकमेकांकडे पाहतात. पण इतका वेळ त्या दोघांना पाहणार्‍या त्याने आजच्यासाठी थोडं जास्त ठरवलं असतं. ’त्या’ला हळुहळु उठवत आज सर्वांसाठी ऑम्लेटचा नाश्ता बनवण्यासाठी तो सज्ज होतो..................तिला फ़क्त उठून, स्वतःचं आवरुन न्याहारीला बसायचं असतं.



तळटीप....अशा बर्‍याच सकाळी, दुपारी, संध्याकाळी मला न मागता मिळतात. त्यासाठी नेहमीच माझं स्टेटस नोकरी करणारी होते असंही नाहीये किंवा उगाच "हे तुझं काम हे माझं" असले वाद मध्ये न येताच ते आपसूक समोर आलंय...या परदेशात मी जास्त काय अपेक्षा करु? याला माझीच नजर लागु नये म्हणून ही तळटीपेची तीट लावतेय. काहीवेळा ’तो’ त्या गाठी वर का बांधतो याची उत्तर मिळायला अवधी द्यावाच लागतो. पण नंतर कळतं की "त्या"ची निवड चुकली नाहीए...

जवळच्या व्यक्तींबद्द्ल लिहिताना मी नेहमीच अडखळते.....पण नेमकं काय सांगायचंय हे फ़क्त ’माझिया मना’ला इतकं हळवं होताना माहितेय....

Wednesday, November 24, 2010

निक्काल

निकाल या शब्दात न दिसणारी हवा किंवा न दिसलेला देव याप्रमाणे न दिसणारा "वाद्ग्रस्त" हा शब्द असलाच पाहिजे का असा प्रश्न का पडतो माहित नाही....पण पडतो किंवा निकाल लागल्यावर वाद होतात हे मात्र नक्की....मग ब्लॉगजगताने तरी अपवाद का मानावा मी म्हणते...

मुळात त्या दिवशी मेल, बझ सुरु करायच्या आतच सगळा खेळ आटोपला होता. म्हणजे सगळ्या चर्चा, अभिनंदनाची आदान प्रदान इ.इ. आवरून लोक झोपायच्या तयारीला लागले होते किंवा पार्ट्या तरी करत होते....आता मी जगाच्या जवळ जवळ शेवटी दिवस उगवणाऱ्या भागात राहणार म्हणजे अजून काय अपेक्षापण नव्हती तरी पण वरवर कोण कोण ओळखीचे आहेत हे पहिल्यावर आयोजकांचे पत्र वाचावे म्हणून जरा ती attachment उघडली आणि त्यातच नाव, त्याचं -हस्व, दीर्घ यांच्या चुका, कुणाच्या ब्लॉगची शेंडी कुणाला हे सगळं पाहून म्हटलं, आहे बाबा, वादाची सुरुवातच इथे आहे......... म्हणजे या वर्षी जिथे मराठीचे खून पडलेत तिथे जास्तीत जास्त पदकं नक्कीच गेली असणार....जास्तीत जास्त शब्दावरून आठवलं, अरे केव्हाची यादी पाहते... चहा गार झाला सकाळचा, मुलाची बाथरूम ट्रीपपण (बाबाच्या कृपेने) झाली तरी संपेचना.....शेवटी एकदाची गोळाबेरीज पहिली तर ६ + ३० = ३६ बापरे....छत्तीसचा आकडा म्हणजे तर यकदम लकी लंबर .....(माझा नाही हे वेगळ सांगायला नको आकडेबहाद्दरांना)

परीक्षकांच्या मते लंबरात आले ब्लॉग पहिले आणि बरेच विचार एकदम आले....म्हणजे, म्हटल जाहिरातीची कला जर इतक्या चांगली जमली तर चकटफू ब्लॉगवर चकटफू वेळ का घालवला असता राव?? मस्त जास्तीचे डॉलर नसते छापले???  जातीचीच राजकारण, शब्दांची वाफ दवडून करायची तर मग ब्लॉग सोडून दुसरं काही केलं असतं की....आणि दोन-तीन महिने पोष्टा टाकायच्या नव्हत्या का?? असले अचाट प्रश्न यकदम पडले....म्हटलं, देवा वाचवलस बाबा या रांगेत माझ्यासारख्याला न टाकून.....

खालची लंबर लाईन पहिली तर माझे बरेच लाडके वरच्या रांगेत जाऊ शकणारे लाडके ब्लॉग पाहून पुन्हा भरून आलं...उत्तेजना म्हणजे एक प्रकारची सांत्वना असा काही एक सूचक अर्थ काल एका बझवर पहिला तेव्हा लगेच उमगलं की खरच सांत्वनेची गरजतर या ब्लॉगना जास्त आहे कारण सातत्याने चांगलं आणि दर्जेदार लिहून जर त्यांचा लंबर ३० जणाच्या शेपटात असेल तर देवा पुन्हा एकदा वाचवलस बघ...

आता हे सगळं प्रकरण म्हणजे कोल्हयाला द्राक्षे आंबट असं बर्याच जणांना वाटेल....पण खर ते तस नाही..... हे एक वैचारिक मंथन आहे या निकालापासून काय घ्यावं यासाठी....कारण निकालामध्ये जसं मेरीट यादी, त्याखालची पास आणि मग नापास अशी लोकं असतात तशीच इथेही आहेत....आपण मुळात ब्लॉग का लिहितो याचा आपल्यासाठी विचार केला तरीही या निकालाने कुणाला काही फरक पडायला नको...कारण यात यादीत असणारे आणि नसणारे दोघही तितकेच confused आहेत..त्यांना आपण इथे का आणि का नाही हा प्रश्न एकाचवेळी पडलाय...(मटका लागलेले काही अपवाद वगळता)

ही एक स्पर्धा आहे ज्याचे नियम आपल्याला ठाऊक नाहीत...निदान दोन निकाल जरी कुणी नीट पहिले तरी हा परीक्षकांच्या मर्जीचा थोडा फार खेळ आहे हेही कळेल....आपण ब्लॉग कधी परीक्षकाला गृहीत धरून लिहिलेला नसतो....निदान परीक्षेच्या पेपरमध्ये तरी आपल्याला नियम, परीक्षक याची थोडीफार कल्पना असते पण हे ब्लॉग प्रकरण थोडं वेगळं आहे....त्यामुळे आता या निकालाने आपण खर तर कुठलाच निष्कर्ष काढायला नको...म्हणजे हिमेश रेशमिया जेव्हा हिट चित्रपट म्हणून त्याच्या कुठल्या चित्रपटाच नाव देतो तेव्हा आपण कधी तो पाहणार असतो का?? तसंच काहीसं....:)

आपल्या आपल्या ब्लॉगचा एक प्रेक्षकवर्ग असतो, आहे परीक्षक हा फक्त त्या घडीपुरता आपला एक तात्पुरता वाचक असतो...शिवाय तो कुठली पोस्ट वाचेल वाचणार नाही हे एक न उलगडणार कोडं......प्रत्येक ब्लॉगसाठी खरा वाचकवर्ग वेगळा आहे आणि राहील...आणि तो वाढत असतो ही जमेची बाजू गृहीत धरून आपण त्यांच्यासाठी लिहावं.....उगाच ऑस्कर नाही मिळाल म्हणून श्वास हा काही आपला लाडका सिनेमा लगेच नावडता होत नाही आणि जय हो ला बक्षीस मिळाल तरी ए आर, जावेद म्हटलं की मला त्यांची जय हो सोडूनच सगळी गाणी आठवणार....

त्यामुळे हा निकाल असा का लागला ...अमुक ह्या लम्बरावर का आणि तमुक इथे का नाही त्यापेक्षा आपल्या आपल्या ब्लॉगवर चित्ती असावे समाधान या न्यायाने खर तर जास्त नेटाने लिहावे हे जास्त महत्वाचे....ब्लॉगने आपल्याला काय दिलं यात बक्षीस दिलं हे खूप खालच्या क्रमांकावर असलेलंच बर...मागच्या वर्षीच्या उत्तेजन नामावळीतले बरेचसे सुस्कारे सोडलेले ब्लॉग पाहिलं तर हे नक्कीच पटेल....

तरीही ज्यांना बक्षीस मिळालेच आहे त्यांना कुठेही कमी लेखण्याचा हेतू यामागे नाही....पण दहावी बारावीचा निकाल लागला की नंतर एखाद्या पुरवणीत नापासांसाठीसुधा एक सदर येत न तितकीच किंमत या पोस्टला आहे....बारावीवरून आठवलं जेव्हा बारावीला पण आकडे मला लागणारे नव्हते (म्हजे मेडिकलच्या लायनीत जायला...) तेव्हा माझे बाबा दादर स्टेशन वर माझे भरून आलेले डोळे न पुसता म्हणले होते अग अपर्णा आपल्या पिढीत अजून कुणीच डॉक्टर झाल नाहीय आणि तसा प्रयत्न करणारी पण तूच पहिली आहेस तर मग लगेच कस सगळं मनासारखं होईल? त्यासाठी पिढीच अंतर जाव लागेल.....

तसंच आहे हे आपण काही कसलेले लेखकू नाहीत (निदान मी तरी) शिवाय यातलेही सगळेच काल लिहायला सुरुवात केली आणि आज बक्षीस घेतलीत असही नाहीये...तेव्हा आपल्याला पुलाखालून थोडं पाणी वाहून जावं द्व्याव लागेल..प्रत्येकाचे पूल निराळे...बास इतकंच....:)

Saturday, November 20, 2010

काही वेगळ्या पी.एच.डी.

अमेरिकेत आल्यानंतर जसजशी इथे पुर्वी आलेल्या लोकांशी विशेष करुन मराठी लोकांबरोबर ओळखी व्हायला लागल्या तसं लक्षात आलं की ही बरीच लोकं इथे पहिल्यांदी पदव्युत्तर शिक्षणासाठी आले आणि मग नंतर पी.एच.डी करुन त्यांनी आपली शैक्षणिक, पर्यायाने आर्थिक भरभराट केली आहे...खरे (म्हणजे वैद्यकीय शाखेवाले) आणि हे असे भारतीय वंशाचे डॉ. अमेरिकेत इतके आहेत की सरळ नोकरीसाठी येणार्‍या आमच्यासारख्या लोकांबद्द्ल खूपदा त्यांना वेगळं कुतुहल असतं..अर्थात तो काळ निराळा आता निराळं आणि मुख्य तो विषयही नाही लेखाचा..पण सारांश पी.एच.डी हा शब्द जास्तीत जास्त वेळा मी मायदेशापेक्षा इथेच ऐकला...आणि लवकरच आपण वेगळ्या प्रकारे त्याला सामोरं जाऊ हेही लक्षात आलं..

म्हणजे काही नाही हो, अभ्यास हा इथे इतका पाचवीला पुजला आहे नं की अगदी एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअरला गेलं तरी जो तो कुठच्याही आयलमध्ये आपल्याला हव्या त्या प्रॉडक्टच्या कप्प्यासमोर दोन्ही हातात प्रत्येकी एक, पार्टनर असेल त्याच्या हातातली दोन आणि मान वाकडी करुन समोरच्या फ़ळीवरची काही अशी बॉक्सेस वाचुन त्याचा आपल्याला हव्या त्या दृष्टीने अभ्यास केल्याशिवाय त्यातलं हवं ते एक बॉक्स आपल्या शॉपिंग कार्टमध्ये टाकुच शकत नाही...म्हणजे साधं सिरियलचं उदा. घेतलं तर त्यात आधी कुठला ब्रॅण्ड, मग होल ग्रेन की फ़ोर्टीफ़ाईड, त्यात प्रथिन जास्त की कार्ब कमीवालं हवं, लो सोडियम, कुठची व्हिटामिन्स, बरं हे सगळं सारखं असेल की मग बदामवाले, नुस्ते की मनुके घातलेले किती ते पर्याय..बरं सिरियलचं जाऊदे पण आपला रोजचा खाण्यातला ब्रेड घ्यायचा तर मायदेशात एक पाववाल्याकडचा आणि दुकानदार तो देईल तो हा अनुभव असणारे आम्ही एक अख्खा रो ब्रेडसाठी म्हटल्यावर कुठला आपल्याला आवडेल त्याचा अभ्यास करणं आलंच (इतकं करुन आजपर्यंत बटाटेवड्याशी लगीन लावावं तो पाव मिळत नाही ही खंत आहेच..असो..उगा खादाडी टॉपिक नको सारखे)...पुन्हा इतक्या तर्‍हा आहेतच तर मग बदल हवा म्हणून त्या आयलला गेलो की तेच आधी सांगितलं तसं हे वाच ते वाच त्यामुळेच म्हटलं तसं अभ्यास काही चुकत नाही...

साधारण दोन-तीन महिने एकच दुकान, बराचसा अभ्यास आणि जे काही ट्राय करु त्याप्रमाणे जर आपण मग आपल्याला हवं ते एका मिनिटांत फ़ळीवरुन काढुन घेऊ शकलो की समजायचं या विषयावरची आपली पी.एच.डी. झाली.या पी.एच.डी.मध्ये अभ्यासण्यासारखे बरेच विषय आय मीन आयल आहेत त्यामुळे हे काम तसं वाचताना वाटतं तितक्या लवकर पुर्ण होत नाही बरं..शिवाय नेमकं तुम्ही शॉर्टलिस्ट केलेलं प्रॉडक्ट आयुष्यातुन आपलं ते फ़ळीवरुन कायमचं उठलं की मग एक मिनी पी.एच.डी. करा आणि नवं काहीतरी शॉर्टलिस्ट करा...त्यामुळे अपग्रेड, आवडी-निवडी, बदल झालंच तर घरात बाळ नामक एक नवा प्राणी आला की मग त्यांचे प्रॉडक्ट या ना त्या कारणाने हे प्रॉड्क्ट पी.एच.डी. प्रोजेक्ट अखंड सुरु राहतं आणि त्याला ग्रॅण्ट वगैरे मिळाली नाही असंही कधी होत नाही.

बाहेर काही मागवायचं असेल अगदी गेलाबाजार कॉफ़ी तरी तेच...सुरुवातीला आधीच अगम्य नावाचे ते अनेक कॉफ़ी पर्याय, त्यातुन त्यातल्या त्यात काही निवडावं की ऑर्डर घेणारी विचारणार छोटी, मध्यम की मोठी, मग दुध कुठल्या प्रकारचं होल, फ़ॅट फ़्री की याच्या मधलं, साखर की शुगर फ़्री, आणखी काही हवं की "Thats all for today??"..तिला म्हणाव घसा सुकला एवढ्यातच, त्यापेक्षा कुठे आहे तुझं कॉफ़ीचं मशिन मीच बनवुन घेईन...पण चालायचं अजुन साताठ वेळा आलं की सराईतासारखं रांगेत उभे राहुन आपण आपला कप घेणारच....कारण काय?? अहो झाली नं पी.एच.डी.करुन या विषयातली सुद्धा...

आणखी एक म्हणजे या देशात आलो की आपण हळूहळू खायचे इथले पर्याय स्विकारलेले असतात आणि मग या ना त्या कारणाने वाढणारं वजन (इथे येऊन वजन कमी झालेलं माझ्या माहितीत तरी कुणी नाही..एखादा फ़ारच काळजीवाहु असेल तर एकवेळ त्याचं वाढणार नाही पण कमी??चान्सेस कमी...) तर हे वजन एकदा का दिसु लागलं की मग काही पाहायला नकोच...आणि त्यात इथल्या खायच्या वस्तुंवर त्यात काय आहे पासुन ते उष्मांक, कार्ब, प्रोटीन, व्हिटॅमिन सगळं इत्थंभूत छापलेलं असतं त्यामुळे नेटवर जायचं आणि आपल्याला कसं खाल्लं पाहिजे हे एकदा पाहिलं की झालं...मी ही पी.एच.डी. दोनदा केली आहे...एकदा माझं वजन बर्‍यापैकी वाढलंय हे मायदेश दौर्‍यात प्रत्येकाने सांगितल्यावर...(काय आहे इथे असल्यावर ते कळतच नाही.कारण इथं big and tall आसपास दिसत असतात म्हणजे आपण तुलनात्मक बारीकच..) मग परत आल्यावर मुख्य म्हणजे व्यायाम (भारतात कधी जिमचं तोंड नाव काही पाहिलं नव्हतं) आणि आहार मग फ़ॅट फ़्री, लो फ़ॅट, लो ग्लायसेमिक इंडेक्स्ड बापरे सगळं एकसो एक.....पण फ़ायदा झाला...वजनही कमी झालं आणि एक पी.एचडी पदरात पडली...पण हाय मुलाच्या वेळी पुन्हा आईने दिलेल्या सकस आहारामुळे अगदी पुर्वीइतकं नाही पण बर्‍यापैकी वजन वाढलंच...पण आधीची पी.एच.डी. होती. त्यामुळे पुन्हा तोच अभ्यास कामी आला. निव्वळ "वजन कमी करणे" या विषयावर पी.एच.डी. केलेल्या कित्येक व्यक्ती मला माहित आहेत...इतका जिव्हाळ्याचा विषय आहे हा.

आजार हाही एक जरा हळवा प्रकार आहे...कुठलाही छोटा-मोठा आजार किंवा आजारसदृष्य परिस्थिती आली की इथले डॉक्टर्स, नर्स तुम्हाला त्याची भरमसाट (आणि काहीवेळा नको इतकी) माहिती देतात. शिवाय नेट आहेच...पहिल्यांदी जेव्हा कोलेस्टेरॉलविषय ऐकलं तेव्हा पुन्हा एकदा नव्या पी.एच.डी.चं दान पदरात पडलं..आधीची वजनाविषयीच्या पुर्व पी.एच.डी.मध्ये सॅच्युरेटेड फ़ॅट्स आणि कंपनीची भर पडली आणि अगदी वारसाहक्काने आलेलं कोलेस्टेरॉल सांभाळायला काय काय केलं पाहिजे याच्या चर्चा घरच्यांशीसुद्धा करायला लागले..म्हणजे अगदी त्यांची डॉक्टर झाले म्हणा न...

त्यानंतरचा सांसारिक आयुष्यातला मोठा टप्पा म्हणजे मुल होणं...ही जरा नेव्हरएंडिग प्रकारातली पी.एच.डी. आहे. पण ते कळतं तरी आपण करत राहतो..एक म्हणजे आता मूल होणार कळलं की मग प्रत्येक महिन्यागणिक त्याची प्रगती याविषयी डॉक्टर, नर्स, इंश्युरन्स कंपनी झालंच तर हजारो प्रॉडक्ट्स आपल्या गळ्यात मारणार्‍या कंपन्या यांच्याकडून इतक्या काही माहितीचा मारा होतो की बास रे बास..आपण कधी त्यात अडकतो आणि ते सर्व वाचुन (थोडक्यात अभ्यास करुन) आपलं दोघांचं मिळून (जमलं तर) एक मत बनवतो आणि तर्क करतो ते कळतंच नाही.साधं व्हिटामीनच्या गोळ्या मग त्यात ते अमुक महिन्यांमधे ओमेगा थ्री घेतलं तर कसं चांगलं, आमच्याच कंपनीची गोळी कशी चांगली, झालंच तर लहान मुलांचं फ़र्निचर, कपडे त्याला लागणारे दुधाच्या फ़ॉर्मुल्याचे असंख्य प्रकार या सर्व माहितीचा भडीमार नऊ महिन्यात आपली या विषयावरची माहिती पी.एच.डीच्या पुढच्या लेव्हला नेऊन सोडते. आणि प्रत्यक्ष मूल घरात आल्यावर तर कहर असतो...आपली डबल डॉक्टरेट त्याच्या वर्षागणीक होत असते..आपणही नकळत आपल्या मागे असणार्‍या आपल्या मित्रमैत्रीणींना कधी सल्ले द्यायला लागतो कळतही नाही.

थोडक्यात सांगायचं तर दरवर्षी काही नं काही तरी नवीन आपल्या मागे येतं..कधी आजार, कधी वजन वाढतं, कधी फ़िरतीची नोकरी, कधी एखादी साप्ताहीक सुटी काही नं काही तरी आखणी करायची असते आणि आपण त्यात्यावेळी नकळत अभ्यास करुन नवनव्या पी.एच.डी. पदरात पाडत असतो...

शांत डोक्याने या घेतलेल्या पी.एच.डी आठवते,तेव्हा वाटतं शाळा-कॉलेजमध्ये असं एखादाच विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास करण्याचा पेशन्स दाखवला असता तर आपणही ते सुरुवातीला खरे पी.एच.डी.धारक म्हटले त्या रांगेत असतो नाही?? पण नकोच ते....आपल्या या हव्या तेव्हा घ्या आणि सोडा प्रकारातल्या पी.एच.डी.च बर्‍या माझ्यासारख्या आरंभशुराला...

Saturday, November 13, 2010

आई, मला गोष्ट सांग ना....

’आई, मला गोष्ट सांग ना’ हे मी माझ्या आईला कधी सांगायला सुरुवात केली माहित नाही. आईला माहित असेल कदाचित तरी एकंदरित वाचनाचा छंद बर्‍याच आधीपासुन आहे हे खरं.पण तरी पुस्तकांचा नाद माझ्या मुलाला थोडा लवकरच लागला असं मला नेहमी वाटतं...म्हणजे गादीच्या कोपर्‍यात पडलेलं पुस्तक मी नावावरुन शोधत असताना त्यानं मला थोडंसं रांगता असण्याच्या काळात आणून दिल्याचं मला आजही आठवतं आणि त्याचं संपुर्ण श्रेय लहान मुलांसाठीच्या पुस्तकांना आणि इथल्या लायब्ररीमध्ये होणार्‍या स्टोरी टाइम या कार्यक्रमाला जातं.
अमेरिकेत मिळणारी लहान मुलांसाठीची पुस्तकं पाहिली तर दणकट पुठ्ठ्याची बांधणी, त्यातली मोठ्ठाली चित्र आणि अर्थातच लहानग्यांना रस वाटेल अशी सोपी भाषा व कथा.सारं कसं जुळून आलंय.लहान मुलंच काय मोठी माणसंही प्रेमात पडतील. निदान मी तरी पडलेय बुवा...मला काय सगळ्याच कथा नवीन...एक वाचायला सुरुवात केली की युवराज दुसरं पुस्तक स्वतःच घेऊन येतात, काही वेळा तर वन्स मोअर पण असतो, काही पुस्तकं तर मुलांना (आणि अर्थातच आईला) पाठ होतात की एखाद्या दिवशी नाही सापडलं तर सरळ साभिनय म्हणूनही दाखवलं जातं...
यावेळच्या मायदेश दौर्‍यात अशा प्रकारची मराठी पुस्तकं शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही बा...मला काही तसं मिळालं नाही...लहान मुलांची पुस्तकं पण मोठ्यांनीच वाचावी असा शब्दांचा टाइप आणि मोजकीच चित्रं...ही पुस्तकं वाचताना मुलं इतक्या पटकन शब्द अर्थासकट शिकतात की त्यांना वेगळं समजवावं लागत नाही. या पार्श्वभूमीवर पाश्च्यात्यांचं नक्कीच कौतुक करावं असं वाटतं..अर्थात त्यांच्या किंमतीही तशाच असतात पण सगळीच काही विकत घ्यावी लागत नाहीत त्यासाठी आमचं चकटफ़ू वाचनालय कामी येतं की.
वानगीदाखल खालची चलतफ़ीत पाहिलीत तर तुमचं माझं मत एकच होऊन जाईल...खरं म्हणजे एकच पुस्तक वाचायचं म्हणून बसले, रेकॉर्डिंग करायचं बाबाच्या मनात आलं तर चिरंजीवांनी दुसरं कधी आणून आम्ही तेही वाचायला लागलो ते कळलंच नाही. ही दोन्ही पुस्तकं त्याची वय वर्षे दोनमधली लाडकी आहेत हे वेगळं सांगायला नको आणि हे पुस्तक वाचतानाचा आमचा दोघांचा संवादही थोडी-फ़ार मजा नक्कीच आणेल...नशीब त्याला ’आई, मला गोष्ट सांग ना’ हे वाक्य अजून म्हणता येत नाही ते नाहीतर नक्कीच माझ्यामागे भूणभूण वाढली असती....



यावेळच्या बालदिनासाठी ब्लॉगवाचक आणि त्यांच्या घरातील छोटे कंपनीसाठी माझिया मनाकडून ही छोटीशी भेट....बालदिन जिंदाबाद....

Saturday, November 6, 2010

मनस्मरणीचे मणी


वर्तमानपत्र किंवा इतर कुठेही गद्य वाचून एखाद्या लेखक/लेखिकेच्या प्रेमात पडणं हे मी नक्की केव्हा सुरु केलं माहित नाही.पण अशाच एका वर्तमानपत्रातल्या सदरातले लेख वाचून फ़ार पुर्वीच मी डॉ. शरदिनी डहाणूकर या लेखिकेच्या प्रेमात पडले. आणि त्यातच कधीतरी आईला तिच्या एका वाढदिवसाला त्यांची काही पुस्तकं भेट म्हणून दिली. अर्थात घरातच असल्याने मीही ती वाचली पण नंतर विसरली गेले हेही खरंच. मागच्यावेळी आई येताना त्यातली एक-दोन माझ्यासाठी घेऊन आली. आधी मला वाटलं की तिने असं का करावं पण त्यातलं ’मनस्मरणीचे मणी’ हे पुस्तक मी आताशा पुन्हा एकदा वाचायला घेतलं आणि खरं तर एक नवी मैत्रीण मला मिळवून दिल्याबद्द्ल मी मनातल्या मनात आईला दुवाच दिला.


डॉ. शरदिनी डहाणूकर काही वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत शिकागोमध्ये राहिल्या आणि मग परत भारतात परत गेल्या. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी पुन्हा बहुधा कॉन्फ़रन्सेसच्या निमित्ताने काही दिवसांसाठी त्यांची अमेरिकावारी झालेली दिसतेय. शिवाय जगात इतरत्रही बर्‍याच ठिकाणी त्यांची एकटीने किंवा एखाद्या ग्रुपबरोबर भ्रमंती झाली आहे. या सर्व प्रवासात त्यांना जाणवलेल्या काही प्रवृत्ती, मानवी मनाचे हिंदोळे, त्यांना उलगडणारी निसर्गाची रुपं या सर्वांचं एकत्रित वर्णन, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, मनाच्या पेटीत असेच जपलेले...सुटे सुटे....एका सुत्रात न ओवलेले तरीही सप्तरंग फ़ाकणारे....

ललित, प्रवास, व्यक्तिचित्रण यापैकी कुठल्याही साच्यात न बसणारं पण तरीही कुठलाही लेख वाचला की लेखिकेच्या जगात घेऊन जाणारं एक छोटेखानी सुंदर पुस्तक.

माझ्यासाठी यात साम्याचे धागे भरपूर आहेत म्हणुनही कदाचित यावेळी मी हे पुस्तक खर्‍या अर्थाने वाचतेय.तिचं आणि माझं अमेरिकेतलं पहिलंवहिलं एअरपोर्ट शिकागोमधलं ओहेर...एकेकाळी जगातलं सर्वात जास्त व्यस्त आणि सध्या अमेरिकेतलं...पुस्तकातली शिकागोची हाडं गोठवणारी थंडी, लेक शोअर ड्राइव्ह (आम्ही दोघंही याला राणीचा नेकलेस म्हणायचो) , सिअर्स टॉवर हे उल्लेख मला माझ्यासाठीचे वाटतात. त्यानंतर मग तिच्या ट्रीप्समधले आणि इतरत्र होणारे नॉर्थ इस्टचे उल्लेख तर आणि जवळीचे. या सर्वात जास्त जवळची वाटते ती तिच्या काही लेखांमधुन भेटणारी मुंबई. तिचं माहेर आणि सासरही दक्षिण मुंबईत. त्या सगळ्या भागाचं पुर्वीपासून असलेलं आकर्षण आजही आहेच.

त्यानंतरचा समान धागा म्हणजे इथे कायमसाठी राहिलेल्या भारतीयांचे मानसिक प्रश्न, कुचंबणा आणि त्यांच्या पुढच्या पिढीची मानसिकता यावर अधून मधून टाकलेला प्रकाश. इथे ओळख झालेल्या अशा मंडळींची आयुष्य थोड्याफ़ार जवळीने आम्हीही पाहतोय त्यामुळे "घरोघरी मातीच्या" हेही पटतं आणि आपण यात अडकायचं का हा विचार करायला लागलेल्या मनाला दिशा मिळते.तिला परदेशात मिळालेल्या मैत्रीणी तर मला इथल्या माझ्या मैत्रीणीच की काय असंच वाटतं...म्हणजे किती गं आपलं सगळं सारखं म्हणण्याइतक्या....

जगातल्या इतर देशांचे उल्लेखही वाचनीय आहेत आणि कुठेही या सर्वांची एकमेकांशी तुलना न करता आठवणीत घेऊन जाण्याची शरदिनीची पद्धत मला खूपच आवडते. तिच्या माझ्या वयातलं अंतर आणि लेखक-वाचक असं नातं न राहता एक एक लेख पुढं जाताना मी तिची मैत्रीणचं होऊन जाते.आता आपल्यात ती नसली नाहीतर तिची पत्रमैत्रीण तरी व्हायचा मी नक्कीच प्रयत्न केला असता.

भाषेचा एक वेगळा लहेजा, अलंकारिकता, उपमा हे सारे दागिने सांभाळतानाही मूळ लेखाला मानाच्या पैठणीचं रुप कसं देता येतं निदान हे पाहायला तरी एकदा वाचायलाच हवं हे पुस्तक.

यातली आवडलेली वाक्यं,घटना,व्यक्तींचे संदर्भ यातलं बरंच काही लिहावसं वाटतं पण त्याऐवजी यातल्या पहिल्याच लेखाचं अभिवाचन "दीपज्योती" या दिवाळी अंकासाठी मी केलंय. मला वाटतं हे एक प्रकरण बाकीच्या लेखांबद्द्ल बरंच काही सांगुन जाईल.देवकाकांनी माझ्याकडून हे अभिवाचन जे मी आधी जालवाणीसाठी केलं होतं पण तिथं ते चाललं नसत म्हणून विसरले होते तरी त्याची आठवण करुन देऊन पुन्हा करवून घेतल्याबद्द्ल त्यांचेही आभार.

Tuesday, November 2, 2010

दिन दिन दिवाळी

अरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला) असतो नुसता. देवळं वगैरे आहेत पण आमच्या फिलीची मजा नाही. अर्थात इथल्या माउंट हूडची मजा काही और आहे हे मात्र खरं. लॉंग ड्राईव्हवर जाताना उजवीकडे हा असा माउंट हूड आणि रेडिओवर 'रिमझिम गिरे सावन'.. वा क्या बात है. सोबत कांद्याची भजी मिळाली की झालीच मग खरीखुरी दिवाळी. असो.




काय म्हणता वाचल्यासारखं वाटतंय?? हो म्हणजे वटवटराव आपलं तोंड बंद ठेवणार नाहीत हे माहित होतं मला, पण इतकं सांगुन सवरुनही शेवटी फ़राळाचं ताट आणि एक छोटासा संदेश विसरलाच म्हणून मग पुन्हा एकदा स्वतःकडे श्रेय लाटून मीही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतेच कशी...आणि त्याने म्हटल्याप्रमाणे नमनाचं तेल वाहायला लागायच्या आतच पळते....:)

यावर्षीचा फ़राळ आईने अगदी मला वेळेवर पोहोचेल असा पाठवला. त्यामुळे मी स्वतः काहीही करणार नाहीये हे सु.वा.सांगणे नको...तसंही सासरहूनही फ़राळ निघालाय आणि तोही पोहोचेलच..
 
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.