Showing posts with label it happens only in India. Show all posts
Showing posts with label it happens only in India. Show all posts

Tuesday, August 27, 2013

राम आणि शामची गोष्ट

ही गोष्ट आहे दोन मित्रांची. सोयीसाठी आपण त्यांना राम आणि शाम म्हणुया. राम आणि शाम एकत्र कॉलेजमध्ये शिकले. पैकी शाम एका छोट्या गावातून आला होता. त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम असली तरी मुलाखतीसाठी इंग्रजीतून बोलायला सुरवात केली की त्याचे उच्चार, भाषा इत्यादीचा फरक लक्षात येई. त्यामुळे शेवटच्या वर्षात इतर मुलांची प्लेसमेंट झाली तरी याच्या पदरी मात्र निराशा. रामलादेखील कॅम्पस जॉब मिळाला आणि राम-शामची मैत्री तिथेच थिजल्यासारखी राहिली.
रामने सुरुवातीला काही काळ नोकरी करून मग उच्च शिक्षणासाठी परदेश गाठला. तिथे चांगल्या दोन डिग्र्या मिळवून आता हा उत्तम पदावर काम करतोय. परदेशी राहताना जितकं चांगलं राहता येईल, मोठा बंगला, त्याला स्विमिंग पूल, मोठी गाडी, सारखे सारखे इतर देशात कामासाठी प्रवास सगळं काही जोरदार सुरु. शिवाय देशात देखील स्वतःच्या गावी मोठा बंगला आणि तिकडेही नेमाने भेटी वगैरे. 
मागे फेसबुकच्या निमित्ताने त्याच्या batch चे जवळजवळ सर्वच परदेशी गेलेले मित्र भेटले पण शाम कुठे आहे याची  काहीच कल्पना नाही. मग एका भारत दौऱ्यात घराच्या काही कामाने जिल्ह्याच्या एका सरकारी कचेरीमध्ये जायचा योग आला. तिकडे आपला क्रमांक यायच्या आधीचा वेळ काढताना सहज म्हणून तिथली अधिकाऱ्यांची यादी वाचताना त्यातलं सगळ्यात वरचं नाव ओळखीचं वाटलं आणि पुन्हा वाचल्यावर खात्री पटली म्हणून बाहेरच्या शिपायाला या साहेबांना भेटता येईल का म्हणून विचारलं. अर्थात appointment नसल्यामुळे शिपाई नाहीच म्हणाला पण तरी एक प्रयत्न म्हणून आपलं कार्ड देऊन यांना तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप पाठवला. 
ते कार्ड घेऊन शिपाई वर जाताच त्याच क्षणात साहेब स्वतःच खाली आले. गेले कित्येक वर्षे न भेटलेले शाम आणि आपला राम एकमेकांना गळाभरून भेटले. आता तू जायचं नाही. माझ्याच बरोबर राहायचं , मला पण बंगला आहे शामचा आग्रह. कॉलेजमध्ये खर सारेच मध्यमवर्गीय पण रामने बरेचदा शामला मदत केली होती त्या दोघांची तेव्हा खूप छान मैत्री होती आणि आता इतक्या वर्षाने भेटल्यावर साहजिकच ही प्रतिक्रिया असणार.
मग रामला कळलं  की शामने कॅम्पस जॉब मिळाला नाही म्हणून खचून न जाता शासकीय परीक्षा आपल्या गुणांवर आणि काही विषय मराठीमध्ये घेऊन आता उच्चस्थानी नोकरी करून त्याच्यासारख्या लोकांसाठी काम करतोय. आता त्याच्याकडे सरकारी बंगला, दोन गाड्या आणि त्याच्यासाठी सिक्युरिटी वगैरे सर्व काही होतं.
दोन दिवसांनी शामला काही दिवसाच्या दौऱ्यावर जायचं होतं. रामला हे निमंत्रण मोडवेना शिवाय आपल्या देशातली सरकारी कामे कशी  चालतात हेही पाहायला मिळणार होतं. या काही दिवसांत रामने काही गावं, तिथले खेडूत आणि त्यांची परिस्थिती जवळून पहिली. सरकारी मदत तळागाळात पोहोचावी म्हणून शामने स्वतः काही महिन्यापूर्वी पाहणी करून ती मिळेल अशी सोय केली होती. त्याला पाहिल्यावर ही  लोकं अक्षरश: त्याच्या पायावर लोटांगण घालत होते. त्याला मनोमन दुवा देत होती. मोठ्या वयाच्या बायकादेखील, "मुलासारखा तू धावून आलास", वगैरे म्हणत होत्या. आपल्या आयुष्यात प्रथमच असं  काही पाहणारा राम त्यावेळी कॅम्पस जॉब मिळवून उर्वरित आयुष्यात आपण काय कमवलं याचा मनात विचार करत होता. 
 
त्या रात्री शामशी बोलताना तो म्हणाला माझं सगळं कमावलेलं घेऊन टाक आणि तुझी नोकरी मला दे.   शाम शांत होता. तो म्हणाला, हे बघ तू माझ्या बंगल्यावर आला नाहीस कारण तुला वेळ नव्हता पण आला असतास तरी फक्त मीच भेटलो असतो. कारण मी जिथे जिथे काम करतो तिथे एकही पैसा न खाता लोकांना मदत करतो शिवाय बरेच मंत्री-संत्री इत्यादीचं काही तरी वाकडं सुरु असतो ते बाहेर काढतो म्हणून सहा महिन्यापेक्षा जास्त एका जागी कुणी मला ठेवत नाही. लगेच बदली होते. माझी बायको कंटाळली आणि यंदा मुलीचं महत्वाचं वर्ष म्हणून दुसऱ्या शहरात राहते. त्यांच्यासाठी इथे शासकीय इतमामाने वापरायला गाडी आहे पण तीत बसायला कुणी नाही. बर हे जाउदे ही  सगळी मेहनत करायची महिन्याची कमाई बघ. त्याच्याकडचा  फक्त पन्नास हजाराचा पे चेक पाहून बराच वेळ त्या खोलीत कुणीच काही बोललं नाही. शेवटी शामनेच उतारा दिला, "हे बघ राम, तुला जर खरच मदत करायची आहे तर तू एक गाव दत्तक घे आणि तिथे सोई होतील हे मला पाहता येत का त्याचा मी प्रयत्न करेन."
 
राम त्याचा भारतदौरा पूर्ण करून पुन्हा परदेशी आला. पण यावेळी त्याच्या मनात पूर्वीसारखं आपल्याकडे हे नाही ते नाही असं काही नव्हतं, तर आपल्याला आता काय करता येईल याची दिशा त्याच्या मनाला मिळाली होती.
 
हा राम मला कामानिमिताने थोड्या काळासाठी भेटला आणि वर उल्लेखलेलं त्याने मला एकदा बोलताबोलता सांगितलं. या संपूर्ण खऱ्या कथेची नावं मात्र मी जाहीर करू शकत नाही. विशेष करून शामचं. आपल्याला असे अनेक शाम हवे आहेत पण म्हणून शामकडे बघून शिकणाऱ्या रामचं मुल्यही कमी होत नाही हे सांगायचा हा एक छोटा प्रयत्न.

Tuesday, June 5, 2012

चंबळचा धावपटू की बागी????


एक भांबावलेला पत्रकार घाबरत घाबरत एक मुलाखत घ्यायला जातो. त्याच्या समोर असतो चंबळच्या खोर्‍यातला एक डाकू, नव्हे त्याच्या शब्दात, "बागी". आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बोलण्याच्या शैलीत इरफ़ान खानला या बागीच्या रूपात‘ पाहताना आता आपण काय पाहणार आहोत याची उत्कंठा लागून राहते आणि हळूहळू एक वेगळीच सत्यकथा पडद्यावर आकाराला येते.

ही घटना आहे भारतीय सैन्यातील एका भाबड्या सुभेदाराची. त्याच्या पायातलं विजेचं बळ ओळखून त्याला सैन्यातलं स्पोर्ट्स डिविजन दिलं जातं. त्याला खेळात जायचं असतं कारण तिथे त्याला अनलिमिटेड खायला मिळू शकणार असतं. पण खरं तर त्याच्याइतकं वेगवान धावणारं तिथेही कुणीच नसतं. तरीही सुरूवातीला त्याला तिथल्या गुरूच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ५००० मीटरच्या स्पर्धेऐवजी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घ्यायला लावलं जातं. 

जे मिळालं त्याचंच सोनं करणारा हा शिपाई, राष्ट्रीय स्पर्धेत सतत सात वेळा ती शर्यत जिंकतो. धावण्यातले स्वतःचे वैयक्तिक रेकॉड्सही तो स्वतःच या दरम्यान मोडतो. मात्र १९५८ च्या टोकियोतील आशियाई खेळात त्याला आयत्यावेळी स्पाइकचे बूट दिले जातात आणि त्याची सवय नसल्याने तिथे मात्र त्याला पदक मिळू शकत नाही. पण निराश न होता तो आपला खेळाचा सराव सुरूच ठेवतो. 

दरम्यानच्या काळात सीमेवरच्या प्रत्यक्ष लढाईमध्ये मात्र स्पोर्ट्समध्ये असल्याने त्याला कितीही इच्छा असली तरी सैन्याच्या नियमाप्रमाणे भाग घेऊ दिला जात नाही. त्यानंतर मात्र वय होत आलं तरी आंतरराष्ट्रीय मिलिटरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून तो आपल्या अंगातल्या संतापाची आग विझवतो..देशाचं नाव अशा प्रकारे खेळाच्या लढाईत उंचावतो. 

त्यानंतर थोडं लवकर निवृत्त होताना खरं तर त्याच्या हातात एकीकडे आर्मीमधलं कोचचं पद असतं पण यावेळी मात्र घरच्या जबाबदार्‍यांना तो महत्व देतो; आणि इथेच आपलं सैनिक असणं, देशासाठी जीवतोड धावणं, ते पदक हे सगळं व्यावहारिक जगात काहीच कामाचं नाही, याची हळूहळू प्रचिती यायला सुरूवात होते...सरळ मार्गाने वागून न्याय तर मिळत नाहीच, शिवाय गावगुंडांकडून म्हातार्‍या आईला मारलं जातं त्यामुळे मग चंबळमध्ये आणखी एक बागी तयार होतो आणि त्याची गॅंग. यापुढचं सगळं कथानक वेगळं सांगायला नको. 

शेवट गोड वगैरे व्हायचं भाबडं बॉलिवूडी स्वप्न पाहायची गरज नाहीये कारण ही आहे एक सत्यकथा....आणि हे सगळं ज्याच्या वाट्याला आलं,एक सैनिक म्हणून इमानाने काम करताना, एक गुंड म्हणून मरणं ज्याच्या नशिबी आलं त्याचं नाव आहे "पान सिंग तोमार". 



काही सत्यकथा पाहताना सारखं वाटत राहातं की यातला अन्याय असणार भाग तरी खोटा निघावा..पण ते तसं झालेल नसतं....अशावेळी आपण अंतर्मुख होतो, कुणाच्या आयुष्यात असंही होतं आपल्याला कळतं आणि नकळत आपली मान शरमेने खाली जाते, डोळ्यातून अश्रु ओघळतात...एका वेगवान धावपटूचं त्याच वेगाने एका गुंडात होणारं हे रूपांतर पाहताना असे किती पान सिंग असतील ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या खेळाने त्यांना त्या एका पदकाशिवाय काहीच दिलं नसेल असं सारखं वाटत राहातं....हे सगळं चित्रपटापुरतंच असतं तर किती बरं झालं असतं?? 

देशासाठी सुवर्ण पदक आणूनही ज्याच्या घरादाराचं रक्षण केलं जाऊ शकत नसल्याने एका भाबड्या सैनिकाचं एका गुंडात रुपांतर होताना हतबलतेनं पाहणं इतकंच प्रेक्षक म्हणून आपण करू शकतो.

वरील चित्र मायाजालावरून साभार