Sunday, November 17, 2013

ये सचमुच न मिलेगी दोबारा

ओरेगनमधला टिपिकल हिवाळी विकांत म्हणजे बाहेर सूर्य नाही, आदल्या दिवशी रात्री पडून गेलेल्या पावसामुळे आलेली थोडी जास्त थंडी आणि अशात अवेळी झोपलेली मुलं. अशावेळी काही तरी स्वतःचं पाहुया म्हणून पुन्हा एकदा जिंदगी न मिलेगी दोबारा सुरु करतोय. 

प्रथम पहिला तेव्हाही  आवडला होता पण दुसऱ्यांदा पाहताना थोडा जास्त मुरतोय. विशेष करून इम्रान अख्तरने त्याच्या वडिलांच्या कवितांचं त्याच्या आवाजात केलेलं सोनं. हा चित्रपट पाहताना आपण कुणाबरोबर पाहतोय वगैरे असं होत नाही. 

पिघले नीलम सा बेहता ये समा
नीली नीली सी खामोशिया 



घेऊन जातो तो आपल्याला कुठेतरी "बस एक तुम हो यहां" म्हणत असा कुठला तरी क्षण ज्याने जगायला उभारी दिली, असा कुठला तरी खास मित्र/मैत्रीण जिने त्यावेळी आपल्याला सावरलं. तू हे करू शकतेस म्हणून आपल्याला उठायला मदत केली, कुठलाही संबंध नसताना गुरूप्रमाणे पाठीवर दिलेले हात आणि त्या हाताच्या बळाने मग तशी जवळपास स्वतःची लढाई एकटीनेच लढलेले ते आणि आताचेही दिवस. बरोबर म्हणतोय न तो "अपने होने पे मुझको यकीन आ गया  
एक बात है  होटों तक है जो आयी नहीं
बस आंखो से है जानती
तुमसे कभी मुझसे कभी
कुछ लफ्ज है वो मांगती 

तो पाठीवर पडलेला गुरूचा हात कधीतरी मैत्रीमध्ये बदलला कळलं नाही.  त्याला वयाची बंधन नव्हती. तेव्हा कुठेतरी माझ्या कॉलेजमधले मार्क याविषयी चिंता करणाऱ्या मला, "तुझ्याकडे त्या मार्कांपेक्षा खूप चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे भरपूर कष्ट करायची तयारी", हे सांगून मग माझ्याकडे आलेल्या पहिल्या संधीचं कौतुक त्यांच्या नजीकच्या लोकांकडे करून मला दिलेला आशीर्वाद. मग माझा मार्ग दूरचा पण तरी संबंध तेच. माझ्या वाढदिवसाला शुभेच्छांबरोबर माझा आवडीचा black forest त्यांच्या ऑफिसच्या मुलाबरोबर आठवणीने पाठवायचे ते दिवस. खर तर मी त्याला नेहमी "सर" म्हटलं तरी ९९ मध्ये मी त्यांच्या कंपनीमध्ये केलेलं एक प्रोजेक्टच्या वेळचे दिवस सोडले तर आमच्या इतरवेळच्या भेटी म्हणजे निव्वळ मैत्री. ते नाव दिलं नाही दिलं तरी त्यात अंतर आलं नाही.

जब जब दर्द का बादल छाया
जब गम का साया लहराया
जब आंसु पलकों तक आया
जब ये तनहा दिल घबराया
हम ने दिल को ये समझाया
दिल आखिर तू क्यों रोता है

माझ्या प्रत्येक मायदेशवारीत एकदा मी आले आहे हा फोन केला की माझा फोन  नंबर घेऊन जवळ जवळ रोज फोन करून माझी खुशाली घेणारा माझा हा मित्र. यावेळी मी भेटायला गेले तेव्हा नेमकं आणखी एक काम होतं.
"एकटी रिक्षाने कशाला जातेस? आता मुलं गेली की ऑफिस बंद करून मी येतो न तुला सोडायला. फक्त त्र्याऐशी होताहेत आता मला बघ गाडीमध्ये पोटातलं पाणीपण हलणार नाही."
"खरंच? माझे सत्तरीतले बाबापण मला आता थकल्यासारखे वाटतात. राहूदेत तुम्ही मी खरंच जाईन"
"अगं थांब गं. गणेश, आज तू कुलूप लावशील?  मी जरा  हिला स्टेशनला घेऊन जातो."

गाडीमध्ये अखंड बडबड, माझी, माझ्या नवऱ्याची, मुलांची चौकशी. मला कधी कधी अशी माणसं माझ्या आयुष्यात आली याचा हेवा वाटतो. म्हणजे बघा न एक साधं इंजिनियरिंगचं प्रोजेक्ट करणाऱ्या मुलीला एका मिडसाइज टेलीकॉम कंपनीच्या मालकाने इतकं महत्व का द्यावं?
त्यादिवशीच माझं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं कारण लागणारे सर्व कागद मी धांदरटपणे आणलेच नव्हते. मग पुन्हा ते पूर्ण करायची जबाबदारी घ्यायची  तयारी. का ही इतकी निस्वार्थी माणसं जीव लावतात?  त्यांच्याकडे आधीच इतकं आहे की  ठरवलं तरी मी काही करायची गरज नाही.
"सर नको तुम्ही. हे नाही झालं तरी चालेल. उगाच तुम्हाला माझ्यामुळे उशीर."
या ठिकाणी माझ्या शालेय जीवनातल्या खूप आठवणी आहेत. त्या रस्त्यांची वळणं मला माझ्या बालपणात घेऊन जातात. कस कळलं त्याला? गाडी उलट वळवायचं सोडून चल आज थोडं पुढे जाऊन येऊ म्हणून माझा मूक होकार गृहीत धरून आम्ही रस्त्याने पुढे जातोय. नवे बदल माझ्या लक्षात येतील न येतील म्हणून ते मला दाखवले जातात. मध्ये कुठेतरी त्यांच्या आवडत्या pattice वाल्याकडे खायला घाल, घरच्यांसाठी खाऊ आणि मग पुन्हा परत.
का करावसं वाटलं असेल त्याला हे सगळं? आमच्या त्या लॉंग ड्राइव्हला का मला त्याच्याही आयुष्यातले काही जुने प्रश्न, त्यासाठी त्याने केलेल्या तडजोडी मला सांगणं ?
"तू आजकाल परत गेलीस की तुझ्या मुलांमध्ये इतकी बिझी होतेस की  पूर्वीसारखे आपले फोन होत नाहीत, नाही?"
"तसं नाही वेस्ट कोस्ट म्हणजे जगाच्या मागे आहे त्यामुळे वेळेची सांगड घालायचं तंत्र जुळत नाही."
"ह्म्म. थांब मी स्टेशनजवळ गाडी घेतो."
"नको हा नवा उड्डाणपूल चांगला बांधलाय. मी इथून चालत जाईन. या वळणावरून तुम्हालापण बरं पडेल."
मी परत  आल्यावर आम्ही पुन्हा फेब्रुवारीत बोललो. मध्ये माझ्याकडे लक्ष प्रश्न आले आणि हे निवळलं की  फोन करू म्हणून मध्ये इतके महिने निघून गेले.
देवाघरून माझ्यासाठी खास आलेलं आणखी एक माणूस देव घेऊन गेला. त्याच्या माझ्यातला दुवा मीच होते. मला कोण कळवणार की तो गेला म्हणून?
ये जो गहरे सन्नाटे है
वक़्त ने सबको ही  बाटे है
थोडा गम है सबका किस्सा
थोडी धूप है सब का हिस्सा
आंख तेरी बेकार ही नम  है
हर पल एक नया मौसम है
क्यु तू  ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यु रोता है 
एक स्वप्न म्हणून सुरु केलेल्या त्याच्या कंपनीचं कुलूप वयाच्या त्र्याऐशीव्या वर्षी देखील सकाळी साडेसातला स्वतःच उघडणारा हा माझा मित्र. आता मुलगा बाकीचे सगळे व्यवहार पाहतो पण ही factory हेच माझ सगळं काही आहे, माझे वर्षानुवर्ष साथ देणारे कामगार मला रोज पाहतात आणि त्यांना काही हवं नको असेल तर मीच ते बघू शकतो मुलाला तितका वेळ नसेल म्हणून रोज ऑफिसला येणारा माझा मित्र. या माझ्या मित्राला मी रडलेलं  चालेल का? याचा विचार मी करतेय. म्हणजे आईच्याच शब्दात सांगायचं तर ही  वेळ कुणालाच चुकली नाही, चुकणार नाही हे आपल्याला माहित आहे. वय झाल्यावर तर ते अपरिहार्य आहे. आपण रडत बसलेलं  आपल्या आवडत्या माणसाला आवडेल का याचा पण विचार केला पाहिजे. 

मी पुन्हा त्या जिंदगी न मिलेगी दोबाराकडे लक्ष देते… प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या वाटेने आलेला एकच विचार असतो 


दिलों  मे  तुम अपनी बेताबीयां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
नजर मे ख्वाबों की बिजलीया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
जो अपनी आंखो में हैरानिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम 





Thursday, November 14, 2013

त्यांचाही बालदिन

माझ्याकडे अगदी मी शाळेत असल्यापासून लहान मुलांचा ओढा जास्त आहे. शेजारची बाळं आमच्या घरी सतरंजीवर टाकून त्यांच्याशी बोबडं बोलत खेळायला मला मजा वाटे. मग मी दहा वर्षांची असताना मला एक मावसबहीण झाली. मी स्वतः  माझ्या घरात शेंडेफळ असल्याने हे हक्काचं लहान भावंड मिळाल्याचा आनंद मी मनसोक्त घेतला. ती मावशी पण तशी जवळच्या गावात राहत असल्याने तेव्हा जास्तीत जास्त शनिवारी दुपारी शाळा सुटली  की चार आण्याचं हाफ तिकीट काढून जायचं आणि रविवारी दुपारी परत निघायचं असा एक पायंडाच पाडला होता. 


मग माझ्या भाचेकंपनी बरोबर ती चार साडेचार वर्षांची असेपर्यंत माझं लग्नही व्ह्यायचं होतं तोवर खूप मजा करून घेतली. आताही ती मला नावाने हाक मारतात म्हणून मावशी आत्यापेक्षा आमचं नातं जास्त जवळचं आहे. माझी मुलं त्यामानाने माझ्या रागाची देखील धनी होतात. म्हणजे आता हे लिहिताना मला असं लक्षात आलं की मला आवडलेल्या, मी खेळलेल्या इतर मुलांवर मी शक्यतो ओरडणे, रागवणे हे प्रकार सहसा केले नाहीत पण दिवसभरात एकदाही मी माझ्या मुलांवर रागावले नाही अस शक्यतो झालं नाही. असो खर मला आजच्या बालदिनी हे सगळं लिहायचंदेखील नव्हतं. 

गेले काही दिवस फिलिपिन्समधल्या टायफूनच्या बातम्या आपण वाचतोय. त्यासंदर्भात आज एक विस्तृत ईपत्र एच आरतर्फे आलं. त्यात तिकडच्या मुलांचा उल्लेख होता. त्यांचे जवळचे नातेवाईक हरवलेत, त्यांच्या शाळादेखील असून नसल्यागत झाल्यात आणि हे सर्व ज्या वयात त्यांना सामोरं जायला लागतंय म्हणजे खर तर नियतीने केलेला अन्यायच म्हणायला हवं. 
अर्थात निसर्गापुढे माणूस खुजाच. पण आजच्या बालदिनाच्या निमित्ताने आपण अशा काही मुलांना त्यांच्या उर्वरित भविष्याची तरतूद म्हणून काय करायला हव यासाठी त्या मेल मध्ये एक साईट होती तिची लिंक आहे  savethechildren.org
तुम्हाला आणखी काही साईट्स माहित असतील तर तर त्या नक्की कळवा. आजच्या बालदिनी आपण जसा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तसाच याही मुलांचा करुया. 

आणि हो बालदिन म्हटलं म्हणजे आपल्या मुलांबरोबरची मजा तर घायलाच हवी. तुम्ही काय केलतं माहित नाही आम्ही आमच्या १४ च्या रात्री तिकडे आमच्या देशातला आमचा क्रिकेटचा देव, याच्या घरात जायला आम्हाला संधी मिळाली, ज्याला मागच्या रणजीमध्ये वानखेडेला पाहायला आम्हाला संधी मिळाली आणि आज तो त्याचा शेवटचा सामना खेळतोय , त्या सामन्यातली त्याची खेळी आमच्या मुलांबरोबर एन्जॉय केली. आमच्या बच्चेकंपनीने त्याचे पन्नास होताना केलेला जल्लोष. या लिटील मास्टरला माझ्या घरचे लिटील मास्टर्सपण खूप मिस करणार. 
बालदिनाच्या शुभेच्छा. 



Sunday, November 10, 2013

दिवाळी २०१३

एक एक वर्ष येतं जेव्हा प्रत्येक ठिकाणी युद्धभूमीसारखी कामं मागे लागतात. सध्या तरी मी फक्त दिवाळीबद्दल म्हणतेय हो.
या वर्षी माझ्या नव्या घरातली पहिली दिवाळी. खर तर आता पर्यंत निदान सातेक घरं बदलली. मग दिवाळीला ते घर चांगलं कस दिसेल याची तयारी देखील प्रत्येक ठिकाणच्या निदान पहिल्या दिवाळीला तरी  होते. त्यात आमच्या चाळणीत क्रिएटिव्हिटीचे एक दोन खडेही न आल्याने किती काही केलं तरी शेवटी फार उजेड पडणार नाही हे साधारण माहित असतं. यंदा तर आठवडाभर तीन वेळा बिघडलेला कंदील मार्गी लावेस्तो दिवाळीच्या शुक्रवारची मध्यरात्र उलटली. आणि तरी तो संपूर्ण विभाग बेटर हाफच्या ताब्यात आहे.
 
यंदा वर्षभर मित्रमंडळ घरी बोलावता आलं नाही म्हणून दुसरया दिवशी संध्याकाळी डझनभर पोरं, त्यांचे पालक आणि काही नवीन लग्न झालेले असा बराच उरक होता. कामांची यादी वाढत जात होती. तरी या वर्षी दोन्ही घरच्या आई मंडळींनी फराळ वेळेवर पोचावा म्हणून एक आठवडा आधीच पाठवला होता. पण मग त्यातले काही पदार्थ थोडे फार मोडले वगैरे तर ते आपणच खाऊ आणि पाहुण्यासाठी थोडं तरी फराळाचं कराव म्हणून ते मागे होतच.
 
दरवर्षी आणि वर्षातून मध्ये मध्ये मी चिवडा करते त्यामुळे ती कामगिरी आधीच फत्ते करून ठेवली होती. पण यावेळेस सासूबाईंनी येता येता एक मुगडाळीची चकली करायला दाखवून प्रेमाने सोऱ्या दिला होता. त्याच्या आठवण झाली आणि मग चकल्या करायचं ठरवलं.
 
मी आजतागायत माझ्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगात हा प्रयोग खरं तर विविध कारणांनी टाळत होते पण यंदा माहित नाही का पण मुलांना आवडतात आणि आजीच्या चकल्या प्रवासात तुटल्या म्हटल्यावर माझ्यातली आई जर जास्तच जोरात जागी झाली. आणि मग त्या असंख्य टिपा आठवत चकलीची पहिली batch केली. आपल्या चिमुकल्या दातांनी कुडुम कुडुम करत ती मोडून खाणाऱ्या माझ्या पिलांना खाताना पाहून मग  त्यांच्या घरी येणाऱ्या मित्रमंडळीसाठी पण थोड्या करूया असं माझं मीच ठरवलं. आणि मग त्या मंद आचेवर तळणाऱ्या चकल्यानी माझ्या दोन रात्री चकलीमय झाल्या. अर्थात ही कढई पुढच्या gasवर आली म्हटल्यावर असंख्य काम back burner वर गेली हे वेगळं सांगायला नकोच.
 
असो तर अगदी शेवटच्या घटकेपर्यंत घरच्या दिवाळीवर हात फिरवता फिरवता ब्लॉग बिचारा वाट पाहात राहिला. पण असं म्हटलंय न की देवदिवाळी पर्यंत शुभेच्छा दिल्या तरी चालतात म्हणून मी माझ्या सर्व प्रकट अप्रकट ब्लॉगवाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा देते.
आणि आमच्या घराचा थोडा फार फराळ ठेवला आहे तुमचा इतक्यात संपला असेलच तेव्हा हा थोडा फराळ गोड मानून घ्याल अशी आशा.
 
ही दिवाळी आपण सर्वाना सुखसमाधानाची जावो आणि हे नवीन वर्ष आपणासाठी चागंल्या गोष्टी घेऊन येवो हीच कामना.