Sunday, November 17, 2013

ये सचमुच न मिलेगी दोबारा

ओरेगनमधला टिपिकल हिवाळी विकांत म्हणजे बाहेर सूर्य नाही, आदल्या दिवशी रात्री पडून गेलेल्या पावसामुळे आलेली थोडी जास्त थंडी आणि अशात अवेळी झोपलेली मुलं. अशावेळी काही तरी स्वतःचं पाहुया म्हणून पुन्हा एकदा जिंदगी न मिलेगी दोबारा सुरु करतोय. 

प्रथम पहिला तेव्हाही  आवडला होता पण दुसऱ्यांदा पाहताना थोडा जास्त मुरतोय. विशेष करून इम्रान अख्तरने त्याच्या वडिलांच्या कवितांचं त्याच्या आवाजात केलेलं सोनं. हा चित्रपट पाहताना आपण कुणाबरोबर पाहतोय वगैरे असं होत नाही. 

पिघले नीलम सा बेहता ये समा
नीली नीली सी खामोशिया 



घेऊन जातो तो आपल्याला कुठेतरी "बस एक तुम हो यहां" म्हणत असा कुठला तरी क्षण ज्याने जगायला उभारी दिली, असा कुठला तरी खास मित्र/मैत्रीण जिने त्यावेळी आपल्याला सावरलं. तू हे करू शकतेस म्हणून आपल्याला उठायला मदत केली, कुठलाही संबंध नसताना गुरूप्रमाणे पाठीवर दिलेले हात आणि त्या हाताच्या बळाने मग तशी जवळपास स्वतःची लढाई एकटीनेच लढलेले ते आणि आताचेही दिवस. बरोबर म्हणतोय न तो "अपने होने पे मुझको यकीन आ गया  
एक बात है  होटों तक है जो आयी नहीं
बस आंखो से है जानती
तुमसे कभी मुझसे कभी
कुछ लफ्ज है वो मांगती 

तो पाठीवर पडलेला गुरूचा हात कधीतरी मैत्रीमध्ये बदलला कळलं नाही.  त्याला वयाची बंधन नव्हती. तेव्हा कुठेतरी माझ्या कॉलेजमधले मार्क याविषयी चिंता करणाऱ्या मला, "तुझ्याकडे त्या मार्कांपेक्षा खूप चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे भरपूर कष्ट करायची तयारी", हे सांगून मग माझ्याकडे आलेल्या पहिल्या संधीचं कौतुक त्यांच्या नजीकच्या लोकांकडे करून मला दिलेला आशीर्वाद. मग माझा मार्ग दूरचा पण तरी संबंध तेच. माझ्या वाढदिवसाला शुभेच्छांबरोबर माझा आवडीचा black forest त्यांच्या ऑफिसच्या मुलाबरोबर आठवणीने पाठवायचे ते दिवस. खर तर मी त्याला नेहमी "सर" म्हटलं तरी ९९ मध्ये मी त्यांच्या कंपनीमध्ये केलेलं एक प्रोजेक्टच्या वेळचे दिवस सोडले तर आमच्या इतरवेळच्या भेटी म्हणजे निव्वळ मैत्री. ते नाव दिलं नाही दिलं तरी त्यात अंतर आलं नाही.

जब जब दर्द का बादल छाया
जब गम का साया लहराया
जब आंसु पलकों तक आया
जब ये तनहा दिल घबराया
हम ने दिल को ये समझाया
दिल आखिर तू क्यों रोता है

माझ्या प्रत्येक मायदेशवारीत एकदा मी आले आहे हा फोन केला की माझा फोन  नंबर घेऊन जवळ जवळ रोज फोन करून माझी खुशाली घेणारा माझा हा मित्र. यावेळी मी भेटायला गेले तेव्हा नेमकं आणखी एक काम होतं.
"एकटी रिक्षाने कशाला जातेस? आता मुलं गेली की ऑफिस बंद करून मी येतो न तुला सोडायला. फक्त त्र्याऐशी होताहेत आता मला बघ गाडीमध्ये पोटातलं पाणीपण हलणार नाही."
"खरंच? माझे सत्तरीतले बाबापण मला आता थकल्यासारखे वाटतात. राहूदेत तुम्ही मी खरंच जाईन"
"अगं थांब गं. गणेश, आज तू कुलूप लावशील?  मी जरा  हिला स्टेशनला घेऊन जातो."

गाडीमध्ये अखंड बडबड, माझी, माझ्या नवऱ्याची, मुलांची चौकशी. मला कधी कधी अशी माणसं माझ्या आयुष्यात आली याचा हेवा वाटतो. म्हणजे बघा न एक साधं इंजिनियरिंगचं प्रोजेक्ट करणाऱ्या मुलीला एका मिडसाइज टेलीकॉम कंपनीच्या मालकाने इतकं महत्व का द्यावं?
त्यादिवशीच माझं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं कारण लागणारे सर्व कागद मी धांदरटपणे आणलेच नव्हते. मग पुन्हा ते पूर्ण करायची जबाबदारी घ्यायची  तयारी. का ही इतकी निस्वार्थी माणसं जीव लावतात?  त्यांच्याकडे आधीच इतकं आहे की  ठरवलं तरी मी काही करायची गरज नाही.
"सर नको तुम्ही. हे नाही झालं तरी चालेल. उगाच तुम्हाला माझ्यामुळे उशीर."
या ठिकाणी माझ्या शालेय जीवनातल्या खूप आठवणी आहेत. त्या रस्त्यांची वळणं मला माझ्या बालपणात घेऊन जातात. कस कळलं त्याला? गाडी उलट वळवायचं सोडून चल आज थोडं पुढे जाऊन येऊ म्हणून माझा मूक होकार गृहीत धरून आम्ही रस्त्याने पुढे जातोय. नवे बदल माझ्या लक्षात येतील न येतील म्हणून ते मला दाखवले जातात. मध्ये कुठेतरी त्यांच्या आवडत्या pattice वाल्याकडे खायला घाल, घरच्यांसाठी खाऊ आणि मग पुन्हा परत.
का करावसं वाटलं असेल त्याला हे सगळं? आमच्या त्या लॉंग ड्राइव्हला का मला त्याच्याही आयुष्यातले काही जुने प्रश्न, त्यासाठी त्याने केलेल्या तडजोडी मला सांगणं ?
"तू आजकाल परत गेलीस की तुझ्या मुलांमध्ये इतकी बिझी होतेस की  पूर्वीसारखे आपले फोन होत नाहीत, नाही?"
"तसं नाही वेस्ट कोस्ट म्हणजे जगाच्या मागे आहे त्यामुळे वेळेची सांगड घालायचं तंत्र जुळत नाही."
"ह्म्म. थांब मी स्टेशनजवळ गाडी घेतो."
"नको हा नवा उड्डाणपूल चांगला बांधलाय. मी इथून चालत जाईन. या वळणावरून तुम्हालापण बरं पडेल."
मी परत  आल्यावर आम्ही पुन्हा फेब्रुवारीत बोललो. मध्ये माझ्याकडे लक्ष प्रश्न आले आणि हे निवळलं की  फोन करू म्हणून मध्ये इतके महिने निघून गेले.
देवाघरून माझ्यासाठी खास आलेलं आणखी एक माणूस देव घेऊन गेला. त्याच्या माझ्यातला दुवा मीच होते. मला कोण कळवणार की तो गेला म्हणून?
ये जो गहरे सन्नाटे है
वक़्त ने सबको ही  बाटे है
थोडा गम है सबका किस्सा
थोडी धूप है सब का हिस्सा
आंख तेरी बेकार ही नम  है
हर पल एक नया मौसम है
क्यु तू  ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यु रोता है 
एक स्वप्न म्हणून सुरु केलेल्या त्याच्या कंपनीचं कुलूप वयाच्या त्र्याऐशीव्या वर्षी देखील सकाळी साडेसातला स्वतःच उघडणारा हा माझा मित्र. आता मुलगा बाकीचे सगळे व्यवहार पाहतो पण ही factory हेच माझ सगळं काही आहे, माझे वर्षानुवर्ष साथ देणारे कामगार मला रोज पाहतात आणि त्यांना काही हवं नको असेल तर मीच ते बघू शकतो मुलाला तितका वेळ नसेल म्हणून रोज ऑफिसला येणारा माझा मित्र. या माझ्या मित्राला मी रडलेलं  चालेल का? याचा विचार मी करतेय. म्हणजे आईच्याच शब्दात सांगायचं तर ही  वेळ कुणालाच चुकली नाही, चुकणार नाही हे आपल्याला माहित आहे. वय झाल्यावर तर ते अपरिहार्य आहे. आपण रडत बसलेलं  आपल्या आवडत्या माणसाला आवडेल का याचा पण विचार केला पाहिजे. 

मी पुन्हा त्या जिंदगी न मिलेगी दोबाराकडे लक्ष देते… प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या वाटेने आलेला एकच विचार असतो 


दिलों  मे  तुम अपनी बेताबीयां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
नजर मे ख्वाबों की बिजलीया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
जो अपनी आंखो में हैरानिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम 





6 comments:

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.