Tuesday, April 28, 2009

मैत्रीबद्द्ल थोडे वेगळे काही....

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो, गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं, अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....
सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे, त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....
आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा
अलिकडेच वाचलेला एक स्र्कॅप.. "मैत्री" आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात हमखास येणारं नातं. जेवढं लिहावं तेवढं कमीच. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. पण कुठेतरी नक्कीच भावलेला. मैत्रीचं नातं कायम राहो असंच वाटतं पण असाही क्षण येतो जेव्हा हेही नातं दुरावलं जातं. कधीकधी कळतही नाही की ह्या दुराव्याची सुरुवात केव्हा झाली आणि जेव्हा कळतं तेव्हा फ़ारच उशीर झालेला असतो.
माझ्या कॉलेजमधल्या काही मैत्रीणी जेव्हा मेडिकलला गेल्या तेव्हा साधारण लक्षात आलं की हा एकमेकींना न देता दिलेला निरोपच आहे. त्यावेळी इ-मेल आणि चॅट या भानगडी पण नव्हत्या. अगदी सुरुवातीला एकमेकींना पत्र लिहिली गेली पण मुंबईतल्या मुंबईत ज्या होत्या त्यांच्याशी संपर्क तुटलाच. तरी मुंबईबाहेर शिकणा-या दोन मैत्रीणी पत्ररुपी भेटीने टिकुन राहिल्या...आता आम्ही इ मेलवर अपग्रेडपण झालो. नशीब...
ईंजिनियरींगची काही लोक ओरकुटरुपाने पुन्हा भेटले. पण कॉलेजमधली चार वर्ष जिच्याबरोबर खूप धमाल केली ती हळुहळु कशी लांब गेली हे कळलं तरी चुकवु शकले नाही. आता पुन्हा लग्न-मुल झाल्यावर संपर्क आला पण ती पुर्वीची निखळ मजा येत नाही असं वाटतं....कधीकधी तर काय कस चाललंय च्या पुढे गाडी जात नाही.
याच दरम्यान पक्षीनिरीक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मैत्रीची नवी पालवी फ़ुटली. आता स्वत:मध्येही बरीच मॅच्य़ुरिटी आली होती. ही माझी मैत्रीण माझ्यापेक्षा वयाने मोठी, घरातली एकुलती एक, व्यवसायाने प्राध्यापिका. हा काळ म्हणजे नव्याने बेस्ट फ़्रेन्ड्स बनवण्याचा नव्हता. आम्ही सर्व एकत्र भटकायचो. काहीवेळा बोलता बोलता वाद होत, पण तात्पुरते. जेव्हा भेटणार तेव्हा आणि इतर वेळी फ़ोनवर मनमुराद गप्पा मारणार. वैयक्तिक प्रश्न माहित जरी असले तरी एकमेकांची इच्छा असेल तरच त्याची चर्चा. आयुष्यात वेळेवर जोडीदार न भेटलेली पण त्याबद्द्ल जास्त खंत न करता नेटाने बाकीच्या सर्व गोष्टींचा, छंदांचा मनमुराद आनंद लुटणारी आमची ही मैत्रीण खुपदा आमच्या हेव्याचा विषयही बनली.
नंतर मी देशाबाहेर असल्याने नाही म्हटलं तरी थोडी गॅप आली पण २००५ च्या भारतभेटीत शिवाजी पार्कच्या गर्दीत आम्हाला बरोबर हुड्कुन काढून भेळेची पुडी हातावर ठेऊन "खा..काही होत नाही पोटाला" म्हणून जमवलेली गप्पांची मैफ़ल आवरण्याचं कारण पार्कात व्हायला लागलेला अंधार !!! पुन्हा निघायच्या आधी नेब्युलाबाहेर खात खात निरोपाच्या गप्पा मारताना गलबलुन आलं पण पुन्हा भेटणार याची खात्री.
२००८ च्या फ़ेब्रुवारीत एकदा घरी फ़ोन लागत नव्हता आणि अचानक लक्षात आलं की आपली गुड न्य़ुज अजुन कळवली नाही म्हणुन हिच्याकडे फ़ोन केला. बरं नाही म्हणुन आज जास्त बोलुया नको हे थोडं विचित्र वाटलं पण म्ह्टलं पुढ्च्या महिन्यात पुन्हा फ़ोन करुया.. अजुन एका कॉमन मित्राला पण याविषयी म्हटलं तर त्यानेही काही जास्त लक्ष दिलं नाही. नंतरचे दिवस स्वतःच्या होणा-या बाळाच्या तयारीत फ़ोन राहुनच गेला आणि दुस-या मित्राची इ-मेल आली....our dear friend is no more.......एकदम गळुन गेले...पाठोपाठ बाकीच्या सर्वांनी मला खास करुन खूप विचार न करण्याची ताकीदही दिली....
शेवटच्या स्टेजला कळलेला कॅन्सर दोन महिन्यात तिची सुटका करुन गेला. कसं पचवायचं, तिच्या आईला फ़ोन करायची पण हिम्मत झाली नाही. काही महिन्यापुर्वी मुंबईत गेल्यावर भेटुन आले पण आतुन कुठे तरी धागा तुटल्यासारखा झाला होता. आजपर्यंत अनेकदा मैत्रीच्या पडत्या काळात मनाला सांभाळता आले. नव्या मैत्रीने आयुष्यात स्थान मिळवले पण हा दुरावा कधी न भरुन येणारा आहे. वरचा स्क्रॅप वाचताना मला या दुराव्याचीच तीव्रतेने आठवण होतेय...मागच्या एप्रिलमध्ये कायमसाठी दुरावलेल्या माझ्या मैत्रीणीसाठी हा धागा समर्पित.

भातुकलीचा संसार

त्या दिवशी ताईकडे मुंबईला फ़ोन केला. अपेक्षेप्रमाणे माझ्या दहा वर्षाच्या भाचीचा उत्साही आवाज. पण आज नेहमीपेक्षा काही वेगळाच टॉपिक आणि सांगताना नेहमीपेक्षा जास्तच घाई. तिला मी माझ्या पेटनेमने हाक मारायला शिकवले आहे. (बाकी साऱ्यांच्या विरोधाला जास्त न जुमानता!) "अपु, आम्ही नं रविवारी भातुकलीचं प्रदर्शन पाहायला गेलो होतो. तिथे अगदी सग्गळ्या वस्तु खेळण्यांच्या होत्या. तिथल्या जात्यावर ना आम्ही दळुन पण पाहिलं. खूSSSSप मज्जा आली. मी जरा जास्त वेळ खेळत होते ना तर प्रदर्शनवाल्यांनी मला विचारलं की झाला का तुमचा स्वयंपाक करुन (इथे स्वतःचं खी..खी) मग त्यांनी सांगितलं आमचा झालाय. तुम्हाला हवाय का? आणि नंतर त्यांनी आम्हाला छोटा लाडु दिला....." यानंतर फ़ोनवर पहिले भाचीशी आणि नंतर बहिणीशी याच विषयावर गप्पा रंगल्या.
लोकसत्ताच्या विवामध्ये "भातुकलीतल्याच्या खेळामधले राजा आणिक राणी" वाचुन खरं तर खूप उत्सुकता निर्माण झाली होती. ज्यांनी हा लेख वाचला नसेल त्य़ानी जरुर वाचावा. फ़ोटोमध्येतरी हे करंदीकर दांम्पत्य आजी आजोबांच्या वयात असावे असे वाटते आणि हे आजी-आजोबा उर्फ़ राजा-राणी मस्तपैकी साधारण १२०० ते १५०० भातुकलींची खेळणी संग्रही ठेऊन आहेत. काय छान!! याच खेळण्यांचं रसिकांसाठी विनामुल्य प्रदर्शन इतक्यात मुंबैत भरवलं गेलं. खरच कौतुक आहे नं इतका मोठा संग्रह स्वखर्चाने करुन लोकांसाठी प्रदर्शन भरवायचे. केवळ आपली संस्कृती काळाच्या ओघात लुप्त होऊ नये म्हणुन.

माझ्या लहानपणी मी खरी भातुकली कधी खेळले नाही आणि ती खेळणी परवडण्यासारखी नव्हती हा एक कळीचा मुद्दा असला तरी प्लास्टिकच्या (स्वस्त) खेळ्ण्याचं आक्रमण नाकारण्यासारखं नव्हतं. त्यामुळे प्लास्टिकच्या ताट-वाट्या, कुकर, गॅस यात खोटा खोटा स्वयंपाकच खुपदा असे. कधी कधी त्यात चणे, शेंगदाणे, कुरमुरे यासारख्या वस्तुही असत. तास-दोन तास कसे जात कळतही नसे. आमच्या लहानपणी तो गाडीवर चिनी मातीच्या वस्तु घेऊन फ़ेरीवाला येई त्याच्याकडे तसाच लहान टी सेट असे. तो मात्र माझ्याकडे नेहमी होता. मला अजुनही आठवतं माझ्या चौथ्या वाढदिवसाला माझ्या एका मावशीने मला स्टीलचा खेळण्याचा छोटा सेट दिला होता. त्यात छोटी दोन ताटे, चार वाट्या आणि एक हंडा असं होतं. मी तो खेळ कध्धीच हरवला नाही. माझी वर उल्लेख केलेली भाची पण त्याने खेळली आहे.

पुर्वी स्वयंपाकघरात असे तसा एक छोटा स्टीलचा रॅक आणि त्यात कपापासुन ताटापर्यंत सर्व स्टीलची व्यवस्थित लावलेली भांडी असा सेट मी सहावी किंवा सातवीत असताना एका दुकानात काचेच्या बाहेरुन पाहिला होता आणि बाहेरूनच त्याची "नव्वद" रुपये किंमत पाहुन बाबांना विचारण्याचा मोह लगेच आवरला होता. माझी छोटी बाहुली पण पाच-सहा रुपयांची असेल. म्हणजे नव्वद ही किंमत आपल्यासाठी मोठी आहे इतकं नक्की कळत होतं. त्यावेळी मी ठरवलं होतं की आपल्या मुलीसाठी नक्की असा रॅक घ्यायचा. यावेळी मुंबई मुक्कामात योगायोगाने माझ्या भाचीने तिची नवी भातुकली म्हणुन जवळजवळ तस्साच खेळ मला दाखवला. ताईने तिला इतक्यातच घेतला होता. फ़क्त रॅक लाकडाचा होता. मग काय आम्ही दोघी आणि माझा सहा महिन्याचा मुलगा एकटेच असताना मस्त खेळलो. माझी जुनी इच्छा पुर्ण होते म्हणून मी खुश आणि लाडक्या अपुबरोबर खराखुरा बाबु खेळायला मिळतो ही डब्बल खुशी आमच्या अदितीला.
खरं तर हा लेख कधीच पोस्ट करायचा होता कारण हे प्रदर्शन एप्रिलच्या मध्यावर झालं होतं पण फ़ोटोसाठी खास थांबले होते. आणि जाता-जाता माझ्यातली लहान मुलगी मध्ये कधीतरी बंड करुन उठते ना तेव्हा अशा काही खरेद्या मी करते त्याबद्द्ल. आम्ही कॅलिफ़ोर्नियाला एका सिनिक ड्राईव्हसाठी चाललो होतो आणि मध्ये लांबवर पसरलेल्या शेतांच्या भागात एक लोकल टाइम पास दुकान होतं तिथं उगाच थांबलो (माझा नवरा अशा दुकानदारांना सपोर्ट म्हणुन असे स्टॉप्स घेतो) त्या दुकानात हट्ट करुन हा टी-सेट घेतला त्याचाही फ़ोटो देतेय. म्हटलं मुलगी झाली तर कामाला येईल (आणि नाही झाली तरीही)

आज भातुकली प्रदर्शनाच्या निमित्ताने वय वर्ष चार ते आतापर्यंत असा मस्त फ़ेरफ़कटा कसा झाला कळलंच नाही. मला तर वाटतं माझ्यासारखा भातुकलीमध्ये रमणारा मोठा स्त्रीवर्ग आहेत. त्यातल्या काही लकी ज्यांना स्वतःला मुलगी आहे त्या आपल्या मुलींच्या निमित्ताने खेळुनही घेतात. सगळ्यात कौतुक ह्या करंदीकर काका-काकुंच. मलाही आवडेल यांच्याही भातुकलीबरोबर खेळायला. कधी योग येतो पाहायचं. आणि याच निमित्ताने मी अजुनपर्यंत म्हणजे मला एक मुल होईपर्यंत भातुकलीमध्ये रमते हे आता मी मोठ्या अभिमानाने सांगु शकते तर.

तळटिप: ताईकडुन फ़ोटो येईपर्यंत थांबल्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतर ब-याच दिवसांनी हा लेख मायाजालावर टाकत आहे.

Sunday, April 19, 2009

वसुंधरेसाठी की आपल्यासाठी??

आज म्हणजे एप्रिलच्या २२ तारखेला ब-याच देशात वसुंधरा दिवस (earth day) साजरा करतात. सध्या इथे planet green या चॅनलवर बरेच कार्यक्रम दाखवताहेत. त्यांचा एक आवडलेला संदेश म्हणजे प्रत्येक दिवस अर्थ डे असल्यासारखा साजरा करा. खऱ्या अर्थाने तसे करण्याची गरज निर्माण झाली आहे. बदलते ॠतु, वाढते तपमान काही वेगळा विचार निर्माण करतेय का? आपल्या भावी पिढीला आपण कुठली हवा आणि पाणी वारशात देणार आहोत. या विश्वातील एक सर्वसामान्य नागरीक म्हणुन आपण यासाठी काय करु शकतो याचा स्वत:साठी घेतलेला वेध आणि जे या लेखाला भेट देऊ शकतील या सर्वांनी थोडा विचार व कॄती करावी यासाठीचा हा छोटा प्रयत्न.मला माहित आहे की ही post कदाचीत थोडी बोअरिंग होणार आहे पण हे लेक्चर वाचून वीस पैकी दोन-तीन जणांनी तरी काही कृतीत आणले तरी सार्थक झाले.
सर्वात प्रथम कचऱ्यासंबंधी. जिथे सोय आहे तिथे रिसायकलींग करणे आणि ओला कचरा वेगळा टाकणे. पण रिसायकलींगसाठीपण एनर्जी लागते आणि त्या प्रक्रियेत वातावरण दुषित करणारे वायु बाहेर पडतात म्हणुन शक्यतो रियुजचा फ़ंडा बेस्ट. प्लास्टिकचा एकंदरित कमीत कमी वापर करत असाल तर सोन्याहुन पिवळं.
मी यावर्षी आमच्या इथल्या मराठी मंडळात संक्रांतीचं वाण म्हणून मोठ्या ज्युटटाईप धुता येतील आणि साधारण ३० पौंड वजनाचा भार सहन करु शकतील अशा पिशव्या (grocery bags) मेंबर्सना द्यायची सुचना केली आणि सर्वसंमतीने ती आम्ही implement केली. मला वाटत सर्व जरी नाही तरी ५० टक्क्यांनी जरी ही बॅग वापरली तरी दुकानांतुन घेतल्या जाणा-या प्लास्टिकच्या बॅग्स कमी वापरल्या जातील. इथे काही दुकाने स्वत:ची बॅग वापरल्याबद्द्ल ३०-४० सेंट का होईना पण रिबेटही देतात..असो. तर मुद्दा हा की जमेल तेवढे शॉपिंगसाठी स्वत:च्या बॅगा वापरा. मला तर ही ग्रोसरी बॅग रिटर्न गिफ़्ट म्हणुन द्यायला जास्त छान वाटते. बघा तुम्हालाही पटतंय का??
आजकाल सगळीकडे पेपर टॉवेल, टिश्यु ई कागदी माल तोंड, ओटा पुसायला वापरले जातात. विशेषत: प्रगत देशात तर त्याशिवाय पान हलत नाही. मला माहित आहे ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड पण राव जर रोज तुम्ही टिश्यु वापरत असाल तर दिवसाला एक कमी वापरुन पाहा. हळुह्ळु त्यांची संख्या कमी करु शकाल आणि काय आहे जरी सर्वांनी एक एक पेपर टॉवेल कमी वापरला तरी तो बनवायला जी जंगलतोड होते त्यात लक्षणीय कपात होईल. आहात कुठे?
इंधनाची बचत करणेही खूप गरजेचे आहे. शक्य तिथे स्वत:च्या गाडीऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं मस्ट केलं पाहिजे. शिवाय सौर उर्जा, विंड मिल्स इ.चा वापरही वाढवला पाहिजे,
रेडिओवर इतक्यात ऐकलेला एक संदेश म्हणजे एखादी पॅक्ट वस्तु विकत घेताना कमीत कमी पॅकींग सामान ज्यासाठी वापरलंय अशी वस्तु निवडा. खरंय नाही का. म्हणजे आपण वस्तु चांगली आहे का त्याशी मतलब ठेवावा. त्याचं जॅझी पॅकींग नंतर फ़ेकुनच देणार ना?
अजुन एक अतिशय चांगला मुद्दा म्हणजे ऑफ़िस, घर इ. ठिकाणी अगदी आवश्यक असेल तिथेच प्रिंट माराव्या. खर तर किती कामे, इ-मेल न छापता करायची सवय लावणे पर्यावरणासाठीच नाही तर आपल्याला आवरायच्या आणि आपली व्यक्तिगत माहिती, मेल प्रिंटच्या माध्यमातुन चुकीच्या हातात पडण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी बरा नाही का? माझ्या गाणं शिकवणा-या गुरु मला नोट्स देताना नेहमी पाठकोऱ्या कागदावर देत. किती छान वापर आहे ना हा वापरलेल्या कागदांचा?
झाड लावा हे सांगणारे बरेच भेटतील. मान्सुनमध्ये तर असे झाडे लावणारे आरंभशुर सगळीकडे भेटतील. पण त्यापेक्षा लावलेली झाडे जगवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना मोठी झाडे लावणे, जगवणे शक्य नसेल त्यांनी एका छोट्या कोप-यात तुळस, गुलाब यासारखी कुंडीतली रोपे लावली तर पर्यावरणासाठी खुप मदत होईल. झाडं लावताना खर तर लोकल झाडं लावली गेली पाहिजेत नाहीतर त्याचे दुष्परिणाम निसर्गचक्रावर होतात.
उन्हाळ्यात बरीच फ़ळं खाणं होतं, जसं आंबा (जो आता मी जाम मिस करते) , कलिंगड, चिकू इ...मी भारतात असताना दर उन्हाळ्यात बाल्कनीत एका बाजुला छोट्या ताटात खालेल्या फ़ळांच्या बिया गोळा करुन ठेवे. उन्हात त्या आयत्याच सुकत आणि मग मान्सुन ट्रेकला गेलो की जंगलात थोड्या थोड्या अंतरावर त्या फ़ेकुन द्यायचे. कदाचित त्यातली एखादी बी रुजुन पावसाळा संपेपर्यंत त्याचे रोप वाढेल आणि समजा नाही रुजले तर पक्ष्याला पोटाला आधार म्हणुनतरी तिचा उपयोग होईल.

ब-याच छोट्या छोट्या गोष्टींतुन आपण पृथ्वीची होणारी हानी टाळु शकतो. मी माझ्या परिने काही बाबतींवर थोडा प्रकाश टाकु पाहातेय. माझी ही सागराला दिलेली ओंजळच म्हणा ना. पण अशा छोट्या छोट्या ओंजळी एकत्र आल्या तर होणारा विनाश आपण नक्की टाळु शकतो. आपल्या पुढच्या पिढीच्या हातात फ़क्त वाडवडिलांपासुन कमवुन ठेवलेली संपत्तीच आणि संस्कारच द्यायचे नाहीत तर ते उपभोगण्य़ासाठी चांगले निरोगी वातावरणसुद्धा. मग काय करणार ना सेलेब्रेट everyday as earth day???

Saturday, April 18, 2009

राहिले ना मी माझी

काही योगायोग कसे असतात की केवळ तो अनुभव म्हणून नोंद ठेवावीशी वाटते. शनिवारची सकाळ आरामात उजाडण्याचे दिवस आता कधीच संपले आहेत. बाळराजे ऊठले की आईचे मन आपसुक कामाला लागते. तशीच काहीशी ही आणखी एक सकाळ. पण खाली फ़ोनचा व्हॉइसमेल नवा संदेश असल्याचं सक्काळ सकाळी सांगु लागला की भारतातुन कुणी फ़ोन करत होता का याच शंका. व्हॉइसमेल ऐकायला सुरुवात केली आणि फ़क्त इकडचा तिकडचा आवाज येतोय. काही मराठी आवाज नक्की येतोय. अगदी अस्पष्ट का होईना पण आईचा आणि मावशीचा काही संवाद चालु असेल असा काहीसा गोंधळातुन जाणवणारा स्वर.

आई सध्या शेगावला गेली आहे. परत मुंबईत यायची तारीख खरं तर मी विसरलेय.पण म्हटलं बघुया तिनेच केला होता का ते? मोबाईलवर लावला फ़ोन. आई इतकी तिच्या राज्यात होती की तिला काहीहि कल्पना नाही आपल्या फ़ोनवरुन असा इंटरनॅशनल कॉलबिल झालाय. आम्ही थोड्याफ़ार नेहमीच्या चौकशा झाल्यावर मी तिथे कसं वाटतय विचारतेय तोच अगदी अचानक आई मला म्हणतेय अगं इथं आल्यापासुन मी बाकी सर्व गोष्टी पुर्ण विसरले आहे. कुणाचा फ़ोन आलाच तर तेवढंच काय ते..सर्वकाही विसरुन जाण्याची आईची अवस्था माझ्यासाठीतरी पहिल्यांदाच. नेहमी मुलं, नातवंड, काही ना काही घरगुती गुंते नेहमीच पाठी लागलेले....खरं सांगते इतकं बरं वाटलं की तिला अजुन डिस्टर्ब करावंसं वाटलच नाही. थोडा वेळ मला इथे तिची ती मानसिकता अनुभवावीशी वाटली..

आणि थोड्या वेळाने नवीन सा रे ग म प पाहण्यासाठी यु ट्युबवर सर्च करताना पुष्कर लेलेचं "लक्ष्मी वल्लभा" चालु झालं...काही वेगळंच वाटत होतं...गाणं संपल्यावर तोही तसंच काही म्हणाला की जसं पंडितजी म्हणालं की "न परि हरवले ते गवसले" ......पुढे थोडा वेळ फ़क्त शांततेचा आवाज ऐकत बसल्यासारखं....


मी स्वत: दोन्ही प्रसंगांमध्ये बघ्याच्या भुमिकेत आहे. पण दोन प्रसंगामधे जे अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य आहे त्यामध्ये राहिले ना मी माझीची जाणिव का सारखी होतेय माहित नाही.........हा दिवस किंवा कदाचित पुढ्चा आठवडा काही विशेष घेऊन येतोय का पाहायचं....

Tuesday, April 7, 2009

आवर्तन

हिवाळा सरतोय याच्या खुणा हळुहळु दिसू लागल्यात. चेरी जातीतील झाडांवरचे कोंब काही सांगु पाहताहेत. ही झाडे लवकरच फ़ुलांनी डवरुन जातील आणि मग फ़ुलांचा सडा खाली पाडून पुन्हा शिशिराची चाहुल लागेपर्यंत हिरवाई मिरवत राहतील. ऋतुंमधील बदल उत्तर गोलार्धात पुण्या-मुंबईपे़क्षा जास्त ठळकपणे जाणवतात म्हणुनही असेल कदाचीत प्रत्येक ऋतुंचे इथे लाडही बरेच होतात. शिवाय आपल्यासारखी सणा-वारांची रांगही नाही लागली पण सेलेब्रेशन तर हवे ना??

सगळ्यात पहिला बदल करतात ती दुकाने. साहजिकच आहे म्हणा. इथल्या (सध्या कोसळलेल्या) इकॉनॉमीचा पाया म्हणजे शॉपिंग. मग सुरुवात तिथुनच होते. हिवाळ्यातले पोलो नेक पद्धतीचे कपडे जाऊन दुकानातल्या मॉडेल्सना स्कर्ट, लाइट टॉप्स घातले जातात. सुपरमार्केट मध्ये वेगवेगळी फ़ुलांची रोपे आपला दिमाख दाखवायला लागतात. अंगणातल्या ट्युलिप, डॅफ़ोडिल्सच्या कंदातून हिरवे कोंब बाहेर आले की आठवडाभरात आसपासच्या जवळपास सर्व घराबाहेरची फ़ुलांची आरास पाहत वॉक कसा संपेल कळतही नाही. पक्षी, ससे लॉनवर दिसायला लागतात. इथे कोकीळ नसला तरी बाकीचे पक्षी सांगुन टाकतात वसंत आला, वसंत आला. सगळीकडे वेगळाच उत्साह येतो.
पण हळुहळु सुर्याचे ऊन अंग भाजुन काढतेय की काय असे वाटायला लागते. गो-या कातडीवाल्यांना टॅन करायला तर माझ्यासारख्यांना सनस्क्रीन मस्ट वाला उन्हाळा आला तरी वातावरणातला उत्साह कायम असतो. घराबाहेर किंवा पार्कमध्ये ग्रील करायचे कोण कौतुक. या दिवसात येणारी कणसं अगदी आपल्या मान्सुनची चववाली नसली तरी खायला मजा येते....अधेमधे पारा ४० से. च्या पुढे जातो तेव्हा ऑफ़िस, घर कुठेही असलं तरी एसीची साथ सोडवत नाही. रात्री पावणे नऊ - नऊ पर्यंत उजेडाचे राज्य असते त्यामुळे ऑफ़िसमधुन घरी आल्यावर थोडफ़ार काम आटपुन जवळच्या पार्कात खेळायलाही जाता येते. उन्हाळ्यातले तीन महिने जवळजवळ प्रत्येक विकेन्ड काही ना काही प्लान केले जाते. इथे उन्हाळ्यात आजुबाजुच्या जगाचं भान हरपून मजा करणारी माणसं पाहिली की समरसून आयुष्य जगणे म्हणजे काय ते हेच का असे उगीच वाटते.


मोठे दिवस कधी संपुच नये असं वाटत असतानाच पानांचे रंग हळुहळु बदलायला सुरूवात होते आणि गुलाबी गारवा वातावरणात जाणवायला लागतॊ. झाडांचे रंग इतके सुंदर असतात की नजर हटत नाही. सा-या आसमंतावर हेमंताचे रंग दिसायला लागतात. न्यु ईंग्लंडसारख्या भागात तर पर्वत रांगा आणि घळीत फ़िरताना तर निसर्गात केशरी रंगाच्याच छटा आहेत असा भास होतो.
सा-या सृष्टीला सचैल स्नान घालणारा पाऊस पुन्हा एकदा येतो आणि आपल्याबरोबर रंगाची ही उधळण घेऊन जातो. मागे उरतात शुष्क फ़ांद्या दाखवणारी झाडे. दिवस पुन्हा एकदा लहान होतात आणि हिवाळा आला हे सांगायला ज्योतिष्याची गरज लागत नाही.
कडाक्याची थंडी आणि सावळे दिवस असा थाट असला तरी रात्रभर कोसळून सकाळी सगळीकडे बर्फ़ाची चादर पसरलेला पांढरा शुभ्र दिवस आवडूनही जातो. शाळांना अचानक सुट्टी मिळाल्याने बच्चे कंपनी खुश होऊन स्नो मॅन बनवायला लागतात. उतारावर स्लेज चालवायची मजाही लुटता येते. अजुन तरबेज असाल तर अर्थातच स्किईंग आणि नसाल तर ट्युबिंग आहेच की.पण सतत शुन्याच्या खाली तापमानाचा नाही म्हटलं तरी कंटाळा येतो आणि पुरे झाली थंडी अशी कुरकुर चालु होते.... थंडी पुरती संपली पण नसते आणि ठिकठिकाणी फ़्लॉवर शो चालु होतात...मन कधीच वसंतात जाऊन पोहोचतं...ॠतुचं एक आवर्तन पूर्ण होतं.

Wednesday, April 1, 2009

बोला वो तुमी बोला

"ट्रेडर ज्योज" खरी कॅलीफ़ोर्नियातली एक चेन. ताजी फ़ळं, भाज्या आणि त्याच्या organic varieties बरोबर काही वेगळीच फ़्रोजन डेजर्ट्स, मासे इ. इ. विकणारं दुकान. तिथे कॅलीफ़ोर्नियात जरा मोठी दुकानं आहेत यांची पण आमच्या इथे छोटी म्हणजे साधारण चारेक आइल्सवाली...वातावरण एकदम घरगुती आणि कधीकधी निवांत...बरं वाटतं बदल म्हणून...

त्या दिवशी दोनच कॅशियर चालु होते. शॉपिंग कार्टवर शांतपणे बसुन राहण्याची कला आमच्या बाळराजांना जमली नाहीये. त्यामुळे त्यातल्या त्यात कमी गर्दीच्या रांगेत आम्ही उभे. आमच्या आधीच्या माणसाचे चेक आउट करताना हा कॅशियर सारखं काही ना काही बोलत होता आणि समोरच्यालाही बोलतं करायचा प्रयत्न करत होता. मला त्याची खूप गंमत वाटली. मी ऐकत होते आणि एका बाजुला विचारही चालू होते. खरं तर तो जे काही बोलत होता त्याला तसा काही अर्थ नव्हता आणि ते त्यालाही माहित होते. पण तरी त्याला काही सांगायचे होते...

आमचा नंबर आला तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्याने आमच्या बाळाची चौकशी केली आणि त्याच वेळी समोरच्या काउंटरला एक पंक कॅटेगरीमधला आणि एकदम फ़ंकी (याला मराठीत काय बरं म्हणावं?) गॉगल घातलेल्या तरुणाने मागे पाहिले..झालं हे साहेब सुटलेच एकदम "wow!! thats a great pair of glasses..Now have you seen these types before??" अशा प्रकारे तो तिथे असणा-या प्रत्येकाशी एकाच वेळी बोलल्यासारखं चालु झालं. मी त्याला म्हटलं तू एखाद्या रेडिओवर जॉकी म्हणून काम केले पाहिजे..त्यानेही ते खेळकरपणे घेतले आणि म्हणाला माझ्याकडे चेक आउट करणा-या प्रत्येकाशी मी बोलतो. I tell everyone you need to talk....

मी बाहेर पडता पडता माझ्या नवऱ्याला(अर्थातच मराठीत) म्हणाले चला या देशात एकाला तरी संवाद साधण्याचे महत्व कळले. दिसल्या माणसाला नुसतंच हाय हाउ आर यु म्हणण्यापलीकडे हा कॅशियर काही सांगु पाहातोय....किती आपल्या आपल्यात राहतो नाही आपण कधी कधी??

अशीही माणसं भेटावी. ते आपल्या विशेष खोलात जाणार नाहीत पण आपल्याला संपुर्ण एकटंही पडू देणार नाहीत.. आता पुढ्च्या वेळी याच दुकानात मी चेक आउट कांउटरला कोणाला शोधणार कळंलं की नाही???