Showing posts with label ब्लॉगजगत. Show all posts
Showing posts with label ब्लॉगजगत. Show all posts

Monday, April 23, 2012

दोन ओंडक्याची होते जर्सीमध्ये भेट.....


खरं तर अशा प्रकारची पोस्ट या ब्लॉगवर साधारण दोन वर्षांपुर्वीच्या जुलैमध्येच येणार होती...म्हणजे यायला काहीच हरकत नव्हती..पण ओंडका क्रमांक एक किंवा खरं तर ओंडकी उर्फ़ माझिया मनातली "मी" हिने अति डोकं लावून विमानाचं तिकिट काढताना गोंधळ केल्याने काही केल्याने ओंडका क्रमांक दोन उर्फ़ वटवट सत्यवान याला प्रोजेक्टरुपी लाटेने च्यामारीकेच्या दुसर्‍या किनारपट्टीवर वेगळं ठेवलं..
यावेळी मात्र ओंडकीला आधीच पुर्वीच्या चुका न करण्याची अक्कल आल्याने (वाचा...लेसन्स लर्न्डच्या कृपेने...) आधी उल्लेखलेले हे दोन ओंडके मागच्या आठवड्यात एकदाचे जर्सीतल्या एका शांत कुटिरेत भेटले.....शांत कुटीर उर्फ़ सत्यवानाचं घर हा या (अघोषित) मेळाव्याचा मुख्य पंडाल होता हे आता लक्षात आलं असेलंच.....
या दोन परिच्छेदात अशा प्रकारे ही पोस्ट या ठिकाणी खरं तर संपली आहे... पण प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या असंख्य अलिखित नियमाप्रमाणे थोडी फ़ार असंबद्ध बडबड केल्याशिवाय किंवा थोडक्यात त्या आधी म्हटलेल्या शांत कुटिरेचं रुपांतर हास्यकल्लोळ, तू हे कर तरच मी हे करेन या आणि अशा असंख्य कलकलाटाने भरल्याशिवाय ही पोस्ट कशी पूर्ण होणार???
मागे काही दिवसांपूर्वी वटवटच्या फ़ेबुवर (मी फ़ेबुवर नाही आहे हो...फ़ेस आला तोंडाला माझ्या त्यांची प्रायव्हसी सार्वजनिक करण्याची पद्धत पाहून..असो तर..) हां तर त्या वटवटच्या फ़ेबुवर गाजलेल्या एका फ़ोटोमुळे घडलेल्या एका छोट्याशा मेळाव्याचा हा मोठा वृत्तांत....वॉर्न करायचं काम केलंय नंतर पोस्ट संपत नाही वगैरे किंवा पुन्हा एकदा मनातलंच इ.इ. छाप प्रतिक्रियांचं मूल्य शून्य असेल हा (आगाऊ) इशारा...:)
तर झालं असं किंवा खरं तर झालं काहीच नाही माझं एक हापिसचं काम नेमकंच पूर्व किनारपट्टीच्या जवळ निघालं..आणि मी फ़क्त त्याच्यात माझ्यासाठी शनिवारचा एक दिवस मागितला (नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारही मागावा लागला ही वेगळी बाब पण वरिजिनल प्लानमध्ये माझ्याकडे फ़क्त शनिवार होता) सुदैवाने नव्या यॉर्कातलं विमानतळ कामासाठी वापरावं लागत असल्याने मी यावेळी हॉटेलमध्ये न राहता नव्या जर्सीतल्या एका शांत कुटीरेची निवड केली...(म्हंजे काय आहेच माझी साधी राहणी आणि साधेच विचार) आता ह्याच शांत कुटीरमध्ये राहणारा ब्लॉग ओळखीमुळे आता चांगली गट्टी जमलेला हेरंब उर्फ़ वट्टू (आता ओंडका म्हणायचा मोह होतच नाहीये कारण गप्पाची भट्टी चांगलीच जमल्यामुळे आमची गट्टी जमलीय नं...) याने माझं हे असं आगाऊपणे त्याच्या (आता अशांत केलेल्या) कुटीरेमध्ये येणं खिलाडूपणे स्विकारून मध्यरातीला माझ्यासारख्या सभ्य मुलीला नवीन यॉर्कातल्य कुणी त्रास देऊ नये म्हणून खास जातीने हजर राहून माझ्यातला सुजाण ड्रायव्हर जागा केला...(होय कंपनीने भाड्याने दिलेल्या गाडीला ड्राइव्ह करून शांत कुटिरकडे न्यायचं पवित्र कार्य मीच पार पाडलंय आणि यावर दोन शब्द येताहेतच...)
अरे हे काय...नाही नाही काही नाही तर मेळाव्याचं पहिलं पुष्प गुंफ़ायला सगळ्यात महत्वाची मदत केली ती विमानतळातल्या एअर ट्रेनने बंद पडून...त्यामुळे अर्थातच आमच्या आनंदावर विरजण पडायचं काहीच कारण नव्हतं म्हणा..कारण ती भर आम्ही तिथेच उपलब्ध असलेल्या बस सर्व्हिसवर आमचा भार टाकून लगेच भरुन काढली....:) आणि हो तो वर म्हटलेला ऐतिहासिक फ़ेबु फ़ोटोने (इथून पुढे ऐतिहासिक हा शब्द बर्‍याच उल्लेखांमध्ये अध्याहृत असेल हे चा वांच्या ध्यानात आलं असेलच) तर त्यादिवशीच्या फ़ेबुवर तर बॉंबच फ़ुटला..."हे काय नवीन आता?" "हा मेळावा कधी झाला आता?" या आणि इतर प्रश्नांनी वट्टुच्या फ़ेबुला फ़ेस आला.....त्यामुळे अर्थातच ही पोस्ट लिहायची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली...( आणि हेच नाही बर्‍याच जबाबदार्‍या त्याने माझ्यावर टाकल्या....मी त्यातल्या किती कशा पेलल्या ते त्याला हवं तर तो लिहील आणि नाही लिहिलं तर इथे वट्टूची वट वाढवायची संधी मी सोडणार नाही हे तुझ्या ध्यान्यात आलं असेलच नं सत्यवाना...)
तर आता त्याने मला इतकं प्रेमाने आणि मध्यरात्रीही एकही जांभई न देता (आणि हातात फ़ुले-बिले अस्लं काही आणून ते सांभाळायचा त्रास मला न देता) विमानतळावर रिसिव्ह केलं याबदल्यात मीही त्याला माझ्या कामासाठी घेतलेल्या गाडीने (चक्क) नवीन यॉर्कातले रस्ते, एव्हेन्यु न चुकवता, एकही भोंग्याची देवाणघेवाण न करता आणि सगळ्यात मुख्य एन वाय पि डीवाल्यांना न पिडता वाहतुकीचे नियम काटेकोर पाळीत इप्सित स्थळी म्हणजे शांत कुटीरेमध्ये घेऊन गेले...इथे खरं तर तांत्रिक दृष्ट्या कामाचा दिवस सुरु व्हायला काहीच तास शिल्लक राहिल्याने आम्ही विश्राम करून मेळाव्याचा विचार नंतर करायला हवा होता पण काही (किंवा खर तर बर्‍याच बाबतीत) आमचं लाइक माइंड असल्याने विश्रामाचा विचार बाजुला ठेवून आम्ही सरळ चर्चेला सुरूवात केली..चर्चांचे विषय महत्वाचे नव्हते कारण ते सारखेच बदलत होते.
मॅगी बस दो मिनिट....खाने और पकाने के लिए....:)
प्रत्येक छोट्या मोठ्या मेळाव्यांमधला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दीडिखा आय मीन खादाडी यावर मात्र एक छोटा वाद निर्माण झाला...(म्हणजे थोडक्यात नॉर्मल मेळाव्यासारखंच) तर झालं असं सत्यवानाने काय खाणार असा प्रश्न विचारल्यावर जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून नको रे वगैरे करून माझिया मनाला खास सत्यवान स्पेशल मॅगीचे वडे खायची इच्छा झाली आणि त्यात माझी फ़क्त दोन मिन्टात बनलेलं मॅगी देऊन ती धुडकावण्यात आली...अर्थात सुदाम्याचे पोहे खाऊन वाढलेल्या संस्कृतीतले आम्ही दोघं असल्याने हा वाद मॅगी लगेच संपवून (आणि भांडी घासायची जबाबदारी सत्यवानाकडेच देण्यात येऊन) आम्ही पुन्हा एकदा चर्चा सुरू केल्या...आणि पुन्हा तेच आधी म्हटल्याप्रमाणे वातावरणावरून सुरू झालेल्या या चर्चा विविध वळणांनी फ़क्त हास्याचे फ़वारे, लोल्स आणि मंडळींना आवाहन इ.इ. रुपी फ़ोडण्या पडत पुढे सरकत संपायचं नावच घेत नव्हत्या.....
पण अखेरीस घड्याळाचा काटा फ़ारच पुढे गेल्याने आम्ही साधारण तीनेक तासाच्या विश्रामाचा ठराव मंजुर करून पहिले सत्र (अक्षरश: वेळेअभावी) आटोपते घेतले..
आता दोन दिवस माझ्या कामाचे असल्याने त्याविषयावर ब्लॉगवर लिहिण्यात काहीच पॉइंट नाहीये पण झलक म्हणून हा नकाशा पाहिलात तर कामही किती अटीतटीचे झाले हे लक्षात येईल..(इथे मी दोन दिवसांत पाच राज्यांचा दौरा करुन एक नवाच उच्चांक प्रस्थापित केला हे काही सुजलेल्या मनगटाने लिहायचं नाहीये मला पण लिहिताना ते ओघानेच आलं आहे याची पुन्हा एकदा सु.वा. नोंद करतीलच.)
हा माझा छोटासा प्रवास कामाचा आणि गाडी परत देण्यापर्यंतचा...
तर (एकदाचं काम आटोपून) पुन्हा परत येताना आधीचा विमानतळाचा अनुभव लक्षात घेऊन भाड्याची गाडी परत द्यायचं ठिकाण आम्ही बदललं होतं...नशीबाने शांत कुटीरेपासून ते खरं तर तीनच मैलावर होतं. पण पाच राज्य जितकी लवकर कव्हर करता आली त्याच्या ऐवजी या तीन मैलापैकी शेवटचे तीनशे यार्ड कव्हर करताना आली...म्हणजे इतकं विक्रमी वेळेत येऊनही अखेर हेची फ़ळ इ.इ. विचार माझिया मनात येणार तोच वटवट्याने कुणालाही रस्ता न विचारायचा (जगातल्य यच्चयावत पुरूष जमातीचा) नियम मोडीत काढून चक्क रस्त्यातल्या पोलीसाची मदत घेतली...आणि त्याने अर्थातच आम्हाला चुकवले नाही हे इथे नोंदवायला हवं....इथेही मर्फ़ीबाबा आले का असा अभद्र विचार डोक्यातून काढून टाकून मी तर सरळ मनातल्या मनात मेळाव्याचे दुसरे पुष्प गुंफ़ायला सुरूवातही केली..
आणि या पुष्पाचं संपूर्ण श्रेय शांत कुटीरमालक सत्यवानाला जातंय. कारण माझ्या लाडक्या नवीन यॉर्कात एका शुक्रवारच्या संध्याकाळी हे पुष्प गुंफ़ायची कल्पना फ़क्त त्यालाच सुचू शकते...
सत्यवान म्हणे पोळीपेक्षा
फ़मिलिया
 पिझा भारी
हे शहर आधीच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मला माझ्या मुंबईची याद देते त्यामुळे इथे जायला मी तसंही कधीही तयार असतेच इथे तर मेळाव्याचा प्रश्न होता..आता मागे हटणे नाही..तिथल्या (नेहमीच्याच) वार्‍यांना न जुमानता आम्ही आमची पदयात्रा जारी ठेवली...आणि त्याचबरोबर काही मार्मिक गोष्टींवर आपल्या टिपण्ण्या करून माझं मनोरंजन करायची संधी सत्यवानाने सोडली नाही...जास्त गर्दीच्या ठिकाणी मोठ्याने हसायची संधी मी नेहमीच साधून घेते....टाइम्स स्क्वेअरला ती मी पुरेपुर साधली हे आता पुन्हा सांगायला नको.....:)
गार्लिक नॉट्स...यम्म्म
आता प्रश्न होता तो म्हणजे पोटपुजेचा...माझी लाडकी पोळी त्याच्या घरी करून द्यायचा माझा लाडीक हट्ट सत्यवान काही पुरवणार नाही हे माहित होते (खरं तर म्हणूनच मी ती ऑफ़र त्याला प्रत्येक पुष्पाच्या ब्रेकमध्ये दिली होती हे आता मेळावा संपून दुसरा आठवडा उजाडल्याने सांगायला हरकत नाय) तर खायच्या बाबतीतले सगळे हक्क मी आधीच वट्टुला दिले असल्याने त्याने त्याची चांगलीच वट असलेल्या मध्ये मला सगळ्यात ब्येस्ट पिझा म्हणजे फ़मिलिया या जगप्रसिद्ध दुकानात पिझा खायला नेलं..तिथेच गार्लिक नॉट या खाद्यपदार्थाशी त्याने माझा परिचय करुन दिला त्यामुळे नंतर रात्रीच्या सत्रासाठी आम्ही ते आठवणीने बांधून घेतले (आणि खायला आठवणीने विसरलो. म्हंणजे वट्टुने आतापर्यंत ते एकट्यानेच गट्ट्म केले असणार....)
चॉकलेट आइस्क्रिम कोई शक??
तर अशा प्रकारे पिझा खाल्यामुळे आम्हाला गोडाचे वेध लागले त्यामुळे मग नंतर लगेचच आम्ही आमचा मोर्चा "कोल्ड स्टोन"कडे वळवला..हे ठिकाण आमच्या लाइक मांइड्स मधलं आहे हे जाता जाता नोंदायला हरकत नाही.इथे तुम्हाला हवं ते आइस्क्रीम, त्यांतल्या अन्य पदार्थांसोबर थंड दगडावर मिक्स करून दिलं जातं..म्हणून कोल्ड स्टोन (अरेच्च्या हाही एका जळाऊ पोस्टचाच विषय आहे...)
तर त्यानंतर एक कॉफ़ी आणि एक चॉकोलेट फ़्लेव्हरच आइस्क्रिम हातात आल्याने चर्चा थोड्या मंदावल्या पण पटापट आइस्क्रिम संपवून चर्चासत्र आम्ही जारी ठेवले....
साधी राहणी आणि साधं खाणं
आता साधारण दहा वाजत आल्याने एका सभ्य मुलीला शांत कुटीरमध्ये न्यायची जबाबदारी कार्यवाहक या नात्याने सत्यवानाने (पुन्हा एकदा) आनंदाने पार पाडली.
आता मात्र चर्चेमध्ये आणखी एक प्रतिनिधी असावा असे आम्हांस वाटू लागले आणि तोच फ़ेबुचा फ़ोटो पाहून अचंबित झालेल्या खुद्द पोटोबा लेखिकेने दूरध्वनीवरून आपली हजेरी लावली..हा दूर ध्वनी इतका दूरवरून आला होता की त्यामुळे आमची पोटोबाची घरगुती सोय न केल्याने तिलाच आम्ही बोल  लावले....त्यातच माझ्यासाठी तर सत्यवानाला पोळी नाही तर निदान पापड तरी भाजून दे सदृश्य मागण्या मांडण्यात आल्या..अर्थात घेतलेल्या जबाबदार्‍या कशाप्रकारे झटकून टाकायच्या यावरती एक पी एच डी पूर्वीच झाल्याने मी निश्चिंत होते..शिवाय पहिल्या पुष्पाच्या दिवशीच शांत कुटीरचा एक मुआयना केल्यावर पोळीचं पीठ काय मीठही असेल की नाही अशा शंका आल्याने इथे काही आपल्या पाककुशलता सत्यवानाला दाखवून अवलक्षण करायची वेळ येणार नाही याची खात्री मा.म.ला होती...
त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या दिवसाचे पुष्प कशा प्रकारचे गुंफ़ायचे याच्या काही माफ़क चर्चा करून आम्ही दुसरे पुष्प संपवले..खरं तर तोस्तर तांत्रिक दृष्ट्या तिसरा आणि शेवटचा दिवस सुरू झाला होता हे पुन्हा एकदा सु.वां...च्या.....
तिसरा दिवस घाईत जाणार असे सुरूवातीपासूनच वाटत होते कारण पाहुणे मंडळीने किंवा खरं तर मी शांत कुटीरेच्या माझ्या कक्षात कागदपत्र, वायरी इ.ची बरीच गर्दी केली होती..ती आवरणे हे जिकिरीचे काम होते..कारण शांत कुटीरवाले यात काहीच सहकार्य करणार नव्हते..सहकार्य कस्लं खरं तर सकाळी भरपूर मस्का लावून पाव जातीने भाजून देऊन वर खाताना आणखी मस्का मारून मला आग्रहाने खायला लावले...लवकरच ही मस्कापट्टी मी कॉफ़ीची जबाबदारी घ्यावी म्हणून होती हे लक्षात आले.....अर्थात त्यामुळे शाही कॉफ़ी बनवायची संधी मला मिळाली...
बटर लावता लावता

या प्रसंगामुळे मला अर्थातच माझ्या घरी जसं एक काम तू, एक काम मी हे नेहमी सुरू असतं त्याची कमी भासली नाही... आणि हे सत्र अगदी जरा पेन दे नंतर आता मी पेन दिलं होतं तर पुस्तक तू घेऊन ये अशी सारखीच कामाची समप्रमाणात वाटणी करून वट्टूने आपली लाइक माइंड्सची पेटंट्स पक्की करायचं कामही हा मेळाव्यात हिरीरिने केलं...
हीच ती शाही कॉफ़ी
इथे एक महत्वाचा मुद्दा लिहायचा राहूनच गेलाय की मी पहिल्या पुष्पाच्या दिवशी पोहोचले तेव्हा शांत कुटीरमध्ये माझा स्वच्छ कक्ष पाहून मला मी नक्की अपेक्षा केली होती त्या घरात आले होते का या शंकेचं तिसर्‍या पुष्पात ज्या काही घरगुती गप्पा झाल्या त्यात झालं...ते म्हणजे निदान दोन दिवसांची का होईना पण नोटीस देऊन आल्यामुळे सत्यवानाने आपलं साफ़ सफ़ाई कौशल्य पणाला लावून मेळाव्याच्या स्वागत समितीचं काम एकहाती संपवलं होतं...मला पोळी करायची संधी मिळू नये याची सोयही तेव्हाच केली असावी असा त्यावेळी मला दाट संशय आला..
सगळ्यात जास्त रंगलं ते तिसरं सत्र..कारण इतक्या वेळ विस्मरणात गेलेले (अर्थात आम्हा दोघांचेच) ब्लॉग हा विषय यात होता...(विस्मरण या शब्दावर श्लेष आहे हे चा वांच्या.....) .चित्रपट हा सर्वच ब्लॉगर्सचा लाडका विषय त्यामुळे त्यावर एक साधक चर्चा सुरू झाली. पण चित्रपट कलावंत, त्यांची नावे आणि कहाण्या लक्षात ठेवायचं माझं कौशल्य पाहता (आणि या विषयावरच्या रसिक वाचक/ब्लॉगर्सची अनुपस्थिती लक्षात घेता) ही चर्चा बाधक होईल का अशी शंका येऊन त्याऐवजी चित्रपटापट सत्यवानाचं पुनरूज्जिवन करून आठवड्याला अनेक चित्रपट पाहून झाल्यावर निदान एका तरी चित्रपटावर पोस्ट लिहायची असा एक ठराव सर्वानुमते (म्हणजे मत मांडणं आणि ठराव पास करणं दोन्ही करणारी व्यक्ती मीच होते म्हणा) हां तर ठराव सर्वानुमते संमत झाला..
गाणी आणि आठवणीं या विषयावर एक छोटी चर्चा शेवटी मला गावंसं वाटावं लागण्यावर आली आणि मेळावा आटोपणार याचे बिगुल वाजायला लागले...(गाणं ऐकताना पेंगलेल्या सत्यवानाचे डोळे याची साक्ष देतच होते म्हणा)
अखेर बाहेर जेवायच्या बोलीवर शांत कुटीरेचा मी निरोप घेतला...खरं तर मेळाव्याच्या निमित्ताने त्या कुटीरेमध्ये केलेला कलकलाट, खादाडी, गप्पा, .. सोडून पाय निघत नव्हता..पण विमानतळाने आल्यावेळसारखेच सहकार्य केले तर कायमचाच मेळावा होण्याची सत्यवानाला काळजी लागली त्यामुळे वेळेच्या बाबतीत आम्ही कुठलंच कॉम्प्रोमाइज किंवा साध्या भाषेत आय एस टी केलं नाही..त्यामुळे सुसंगत चर्चा, खादाडी, फ़िरणे इ.. होऊ शकले हे सु.वां..च्या.....
परत निघाल्यावर ट्रेनने नवीन जर्सिमधून नवीन यॉर्कात जाणे या विषयावर खरं तर एक वेगळी कंपोस्ट होऊ शकते...(सत्यवान इथल्या इथे तुला निदान चारेक पोस्टींची संधी म्या उदार मनाने देत आहे...वाचतोय्स का??) या प्रवासात मला मी मुंबईच्या मेळाव्याला गेले होते तेव्हा असलेल्या मेगाब्लॉकची आठवण झाली एकंदरीत मेगाब्लॉक आणि मेळावा यांचं नातं जूनं दिसतंय तर..... शेवटी एकदाचे वेळेच्या थोडं फ़ार आधी पोहोचल्यावर मुंबईत रविवारी होणारा मेगाब्लॉक नव्या यॉर्कात शनिवारी दुपारी रंगीत तालीम म्हणून करतात की काय विचार असा एक टिपिकल मुंबैकरीण म्हणून माझ्या मनात डोकावून गेला.
एअरपोर्टची छोटी खादाडी
तर आमची वरात सुस्थितीत विमानतळावर पोहोचल्यावर एक शेवटचा खादाडी प्रयत्न झाला....आणि मग मात्र सेक्युरिटी चेक इनकडे पावलं वळवावीच लागली...
ब्लॉगिंगमुळे जर चार चांगल्या लोकांशी संबंध आले तर दोन जणांच्या मेळाव्यानेही बरंच काही (म्हंजे काय ते आता विचारू नका. पोस्ट प्लान्ड परिच्छेदांच्या कधीच पुढे गेली आहे...) साध्य होतं हे या तीन पुष्पांच्या निमित्ताने लक्षात आलं आहे..फ़क्त घरच्या सर्व मंडळींना पुन्हा लवकर वेठीस धरता येणार नाही याची कल्पना असल्याने पुढचा मेळावा ओरेगावात घ्यायचे योजिले आहे...तरी इच्छुकांनी विमानांची डिल्स पाहायला सुरूवात करावी..तारीख काय कधीही फ़ायनल करता येईल...
जाता जाता माझिया मनात एक जूनीच कविता नव्याने आल्याशिवाय राहवत नाही...
दोन ओंडक्यांची (आपलं ब्लॉगर्सची) होते नव्या जर्सीत भेट
एक डायरेक्ट फ़्लाईट दूर सारे
पुन्हा ओरेगावी (होईल तेव्हा) भेट.....
तळटीप...फ़क्त महत्वाचे काही फ़ोटो तातडीने वरच्या पोस्टमध्ये टाकण्यात आले आहेत...आणखी फ़ोटो सवडीने पिकासावर टाकण्यात येतीलच. इच्छुकांनी करभरणी (वाचा: आपली मौल्यवान प्रतिक्रिया/सूचना इ..) देऊन नावनोंदणी करावी......:) आणि हो ही सक्तीची करभरणी का लागू झाली यासंबंधी काही शंका असल्यास जरा एकदा गुगलबाबांच्या वर्तुळात चक्कर मारून यावे...कसे...:)

Monday, May 30, 2011

जय हो ब्लॉगिंग

आठवणींची गर्दी खूप वाढायला लागली आणि त्या प्रत्यक्षात सांगण्यासारखी माणसं दूर दूर जाऊ लागली तसं या आठवणींची साठवण करण्यासाठी हा ब्लॉग सुरु केला. आपल्याला लिहिता येतं म्हणून नव्हे किंबहुना ते अजुनही लिखाण कॅटेगरीत मोडत नाही पण लिहिलं की मनाला बरं वाटतं..कधीतरी असंच एखादं पान उघडलं की तो दिवस,ती घटना पुन्हा अनुभवली जाते..मग हळुहळु आठवणीतली गाणी, मुलांच्या गप्पा, वाचलेलं पुस्तक, पाहिलेला चित्रपट सारंच ब्लॉगवर येऊ लागलं.आपल्या साध्यासुध्या आयुष्यातही लक्षात ठेवण्यासारखं किती आहे याचा जणू काही साक्षात्कारच झाला.

सुरुवातीला एकटीने सुरु झालेल्या या प्रवासात मग आपसूक सोबती मिळत गेले. काही जणं अगदी प्रत्येक पोस्टवर आवर्जुन प्रतिक्रिया देणारे, नाही लिहिलं तर सगळं ठीक आहे नं म्हणून काळजी करणारे,अगदी प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी असं लिखाण नसलं तरी जमेल तेव्हा कौतुकाचे शब्द घेऊन येणार्‍या देशोदेशीच्या व्यक्ती आणि त्यांचेही तितकेच विविध विषयांवरील मराठी ब्लॉग..

आता आणखी एक सवयही लागली ती म्हणजे इतर ब्लॉग वाचण्याची,जमेल तसं प्रतिक्रिया द्यायची,कामाच्या धबडग्यात नाही जमलं तर घाऊकपणे एक एक ब्लॉग वाचुन ब्लॉगवाचनाचा कोटा पूर्ण करायची. या सर्व ब्लॉग मित्र-मैत्रीणींचा समुह म्हणजे माझ्यासारख्या परदेशात राहणार्‍या व्यक्तीला मायबोलीत व्यक्त होण्यासाठीचा हक्काचा मंचच जणू..

पण हे नातं फ़क्त एकमेकांच्या ब्लॉग ओळखींपुरता मर्यादित न राहता या पलिकडे ब्लॉगविश्वात काही घडावं असं मुंबईत राहणार्‍या माझ्या मित्र-मैत्रीणींनी फ़क्त ठरवलंच नाही तर प्रत्यक्षातही आणलं..योगायोगाने मागच्या मे मध्ये माझाही मुंबई दौरा होता त्यामुळे मुंबईच्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्याला हजेरी लावायचं भाग्य मलाही मिळालं.या मेळाव्यामुळे कित्येक चेहरे आजवर फ़क्त ब्लॉगमुळे माहित होते त्यांच्याशी ओळख झाली. इतरही चर्चा तिथे झाल्या आणि ब्लॉगिंगविषयी जास्त माहिती मिळाली.

कौतुकाची गोष्ट म्हणजे सलग दुसर्‍या वर्षी मुंबईला ब्लॉगर मेळावा भरतोय. येत्या रविवारी ५ जून २०११ रोजी दादर, मुंबई येथे सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात हा मेळावा आयोजित करण्याचे ठरवले आहे.त्या निमित्ताने मराठी ब्लॉगर भेटतील आणि ब्लॉग जगतातल्या समस्या आणि इतर विषयांवर चर्चा होईल. यावर्षी मेळाव्याला जाऊ शकत नसल्याची खंत आहेच पण त्याची कसर मंडळ तत्परतेने अहवाल आणि फ़ोटोंनी भरुन काढील याची खात्री आहेच...

या मेळाव्याला जाणार्‍या सर्व ब्लॉगदोस्तांना मनापासुन शुभेच्छा...जय हो ब्लॉगिंग....

Wednesday, December 8, 2010

एका (फ़ूड) ब्लॉगरची यशोगाथा....

ब्लॉगिंगच्या विश्वात आलं आणि कुठेही दुसरा ब्लॉगर दिसला की का कुणास ठाऊक ’माझिया जातीचा’ मिळाल्यासारखं होतं. ’फ़ूड नेटवर्क’च्या ’नेक्स्ट फ़ूड नेटवर्क स्टार’ मध्ये जेव्हा आरतीच्या नावाखाली फ़ूड ब्लॉगर असं लिहिलेलं दिसलं तेव्हा तिला मी पाठिंबा देणार हे लगेचच लक्षात आलं; म्हणजे एकतर ब्लॉगर आणि त्यातही भारतीय वंशाची म्हणजे दुधात साखर.

आता या विषयावर पुढे लिहिण्याच्या आधी मला थोडं फ़ूड नेटवर्कबद्द्ल लिहून जरासं (किंवा नेहमीप्रमाणे दोन-तीन घडे) नमनाचं तेल घालणं अत्यावश्यक आहे. खाणं हा आपला अगदी आवडता प्रांत आहे हे नक्की केव्हा लक्षात आलं माहित नाही. पण आठवतं तेव्हापासून आपल्या भारतीय दूरचित्रवाणीवर ’खाना खजाना’ पाहणं हा एक आवडता छंद होता. त्यातली खरं सांगायचं एकही प्रकार मी करुन पाहिला नाही; पण त्यातली नावं लक्षात ठेऊन तसलं काही कुठल्या रेस्टॉरन्टमध्ये दिसलं की मनसोक्त हादडणं हे बरीक केलं. त्यानंतरही दावत का काय नावानं एक खास हैद्राबादी खाण्याचा शो रविवारी असायचा तेही आवडीने पाहिलं. एकंदरित कुणाला खाणं करताना पाहणं हे आवडतं इतपत कळलं. आणि त्याचा फ़ायदा असा की नवं काही खाऊन पाहायचं असेल तर साधारण आपल्याला काय आवडेल हेही लक्षात आले.

त्यानंतर जेव्हा अमेरिकेत आले आणि सुरुवातीला इथलं सोशल सर्कल कमी आणि नोकरीही नव्हती त्याकाळी रिकाम्या डोक्याला काही काम म्हणून इथल्या टी.व्ही.ची चॅनल्स धुंडाळायला सुरुवात केली.सध्याच्या घडीला जरी मला इथल्या कार्यक्रमांचीही थोडी-फ़ार सवय झाली असती तरी तेव्हा काही म्हणता काही आवडायचं नाही. अशातच एकदा फ़ूड-नेटवर्क सुरु केलं. साधारण अर्धा तासाचा एक या क्रमाने सतत सुरु असलेल्या कार्यक्रमांमधली विविधता पाहता या चॅनलला मी कधी ’हुक’ झाले कळलंच नाही. फ़क्त ’कुकिंग शो’ इतपत कार्यक्रम असतील असं जर कुणाला वाटलं असेल तर ते सपशेल चुकीचं आहे. खाणं बनवणं हे अर्थातच अविभाज्य अंग आहे पण खाण्याशी संबंधीत इतर कितीतरी गोष्टी जसं एखाद्या गावची स्पेशालिटी असलेल्या खाण्याची माहिती असलेला कार्यक्रम, ४० डॉलरमध्ये एका शहरात एक दिवसाचं तिन्ही-त्रिकाळ खाणं, एखादी विशिष्ट पाककृती बनवण्यासाठी लागणार्‍या सामुग्रीपासून ते भांड्या-कुंड्यापर्यंतच्या गोष्टींची तांत्रिक माहिती पुरवताना ती पाककृती करणं, अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांचं खाद्यवैशिष्ट्य जपणार एखादा उत्सव वा स्पर्धेची माहिती असे अनेकविध कार्यक्रमांनी भरलेलं हे चॅनल आहे.अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशात खाण्याची विविधता, सणां-वारांनिमित्ते केले जाणारे खाद्यप्रकार हे सर्व पाहता हे असं चॅनल आपल्याकडेच सुरु करावं असं मला सारखं वाटायचं. (मला फ़क्त वाटणार पण संजीव कपुरने त्या दृष्टीने सुरुवात केली आहे असं ऐकतेय..’ढापली बघ माझी आयडिया’ इतकंच म्हणू शकते मी) तर असं हे माझं लाडकं फ़ूड नेटवर्क. मागे म्हटल्याप्रमाणे जसं मायदेशातल्या कार्यक्रमामधलं मी काही स्वतः नाही बनवलं तसंच इथंही फ़क्त बाहेर खाताना काय खावं (किंवा खूपदा काय खाऊ नये) यासाठी इथे पाहिलेले विदेशी खाद्यकृती उपयोगी पडतात शिवाय आपल्या देशी पाककृतींना जेव्हा सगळाच देशी माल मिळत नाही तेव्हा पाट्या टाकायलाही इथे पाहिलेल्या माहितीचा उपयोग होतो.

या पार्श्वभूमीवर जेव्हा ’नेक्स्ट फ़ूडनेटवर्क स्टार’ही स्पर्धा भरवण्यात आली तेव्हा सारखं वाटायचं की यांना कुणीतरी थोडं भारतीय खाणंही खिलवलं पाहिजे. मागच्या की त्याच्या मागच्या सिझनमध्ये एक भारतीय महिला होतीही. पण ती फ़ार काळ टिकू शकेल असं सुरुवातीलाच वाटलं नाही. यावेळी मात्र चुलबुल्या (किंवा अगदी नेटका शब्द बबली) आरतीला पाहिलं आणि तिच्या डोळ्यातली चमक काही वेगळं सांगुन गेली. अगदी पहिल्या भागातच हीचं पाणी वेगळं आहे हे जाणवलं. आणखी भरीस भर म्हणजे तिची ओळख एक फ़ूड ब्लॉगर म्हणून करुन दिल्याने तर तिच्या या उडीचं कौतुकच वाटलं.त्यानंतर प्रत्येक भागात तिलाच सपोर्ट करत राहिलो.

या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय जन्माच्या आणि दुबईत वाढलेल्या आरतीचा ब्लॉग पाहिला आणि ती आपल्यासारखीच एक सर्वसाधारण ब्लॉगर आहे हे लक्षात आलं. तिच्या ब्लॉगवर तिचे यु ट्युबवरचे आरती पार्टी नावाने तिने घरच्या स्वयंपाकघरात बनवलेल्या खाद्यपदार्थांचे व्हिडिओ आहेत आणि बर्‍याच लोकांना त्यामुळे भारतीय पदार्थांची माहिती आवडल्याचं कळतं...शिवाय तिच्या लिहिलेल्या पाककृत्यांनाही तिच्या आईकडच्या किंवा इतर काही छोट्या छोट्या कहाण्या आहेत ज्या ती अतिशय रसभरीत वर्णन करुन मांडते त्यामुळे तिचे पदार्थ, त्यांची नाव, कृती हे सगळं नेहमीसारखं साहित्य आणि कृतींमध्ये अडकलेल्या पाककृतींपेक्षा, वाचताना आणि पाहताना तिच्या जगात आपल्याला घेऊन जातात. माझ्यासारखे प्रेक्षक, सगळेच पदार्थ तयार करणारे नसले तरी अशा कृती लक्षात नक्कीच राहतात आणि कुठेतरी त्यातला काही भाग आपल्या एखाद्या पाककृतीला वेगळा टच द्यायला नक्कीच मदत होते. तिला पदार्थ करताना पाहाणं हाही एक वेगळा अनुभव असतो. तिचं हास्य आणि एकंदरित लाघवी बोलणं तिला पाहत राहायला नक्कीच भाग पाडतं...बाकी नेहमीच्या घरगुती गोष्टी म्हणजे तिच्या कलाकार नवर्‍याची चित्रफ़ीत किंवा एखाद्या ट्रीपचा उल्लेख असं नेहमीचं मॅटरही आहेच..एवढंच नाही तर ही स्पर्धा सुरु झाल्यानंतर घरी केबल नसल्यामुळे सध्या we’ll be watching an episode with a different set of cable-having friends! हे तितक्याच साधेपणाने ती जूनमधल्या एका पोस्टमध्ये लिहून जाते. सध्या तिच्या मेलबॉक्समध्ये १३०० मेल आणि साधारण ५९० कॉमेन्ट्स आहेत आणि सगळ्याच लोकांकडून तिला तुफ़ान कौतुक मिळतंय ही एका ब्लॉगरसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.


दहा आठवडे चालणार्‍या या स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारे स्पर्धकांकडून पाककृती बनवुन घेण्यात येतात.पदार्थांची चव हा मुख्य भाग असला तरी इतर अनेक बाबींवर त्यांचा कस लागतो. आयत्यावेळी देण्यात आलेले मुख्य पदार्थ, एखाद्या थीमप्रमाणे पदार्थ बनवणे म्हणजे जसं बाटलीबंद प्रकार बनवायचा झाल्यास तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्रॅंडसाठी काय बनवाल, मोठ्या पार्टीसाठी दोन स्पर्धकांनी एकत्र खाणं बनवणं किंवा एक दिवस दोघांनी मिळून फ़ूड ट्रक मॅनेज करणं, असं बरचसं काही यावेळी विविध भागात होतं. प्रत्येक भागात निदान एकतरी कॅमेर्‍यासमोर विशिष्ट वेळात एका पदार्थाचं सादरीकरण हेही फ़ार महत्वाचं.कारण शेवटी अंतिम फ़ेरीच्या विजेत्याला फ़ूड नेटवर्कवर स्वतःचा शो मिळणार, तेव्हा त्या व्यक्तीचा कॅमेरासेन्स कसा आहे हे कळणं फ़ार महत्वाचं. शेवटचा भाग म्हणजे अंतिम फ़ेरीला तर एका सेलेब्रिटी शेफ़च्या हाताखाली एक संपुर्ण भागच रेकॉर्ड करणं. हे वाचतानाच थोडं अवघड वाटतं तर प्रत्यक्षात ते सगळं दडपण आणि शेफ़ असणारे इतर स्पर्धक यांच्यावर मात करायची म्हणजे खरंच अंगात खाद्यवेडंच हवं.

आरतीला जेव्हा जेव्हा कॅमेर्‍यासमोर पाहिलं तेव्हा तेव्हा का कुणास ठाऊक हिच्यात हे उपजतच आहे असं नेहमी वाटलं. अपवाद फ़क्त एकाच भागाचा जेव्हा तिला एक मिनिटांत त्या पदार्थाबद्द्ल बोलताना खूप गोंधळायला झालं होतं. पण ती कसर तिने त्याच भागातल्या उरलेल्या पाककृती चविष्टपणे करुन मात केली. प्रत्येक भागात एक त्या भागासाठी विजेता असे आणि त्यातही ती बरेचदा सरस ठरली.

तरीही अंतिम भाग हा थोडा रिस्की असतो कारण त्यात आपली खरं तर स्वतःशीच स्पर्धा असते. कारण दुसरा काय करतो, कुठला मुख्य पदार्थ असल्या गोष्टींशी काही घेणं-देणं नसतं. त्यात तुम्ही कुठला पदार्थ निवडता आणि त्यामागची कथा सांगत तो कशा प्रकारे सादर करताना कॅमेर्‍याला कशा प्रकारे सामोरे जाता, वेळेत पदार्थ बनवता तसंच प्रेक्षक जो या पदार्थाची चव पाहणार नाही त्यालाही कशा प्रकारे उत्तेजित करता हे महत्वाचं. आरतीने यात चक्क पिझ्झा बनवला होता आणि तेही त्याला एक भारतीय टच देऊन. एकंदरितच तिच्या पाककृतींची नावं आणि त्यामागची पार्श्वभूमी यामुळे कार्यक्रमात इतकी रंगत येते की तिला ते बोलताना आणि पदार्थ करताना पाहाणं हा एक छान अनुभव असतो. तिच्या या हसतमुख, विनोदी आणि बोलबोलता एखादी जादा माहिती देण्याच्या पद्धतीमुळे शेवटी तीच वरचढ ठरली आणि एका फ़ूड ब्लॉगरने फ़क्त एक स्पर्धाच नाहीतर अमेरिकेच्या फ़ूड नेटवर्कवर आपल्या हक्काची एक जागाही मिळवली.


मला वाटतं ब्लॉगिंग करणार्‍या प्रत्येकानेच कौतुक करावं अशीच ही घटना आहे. ही पोस्ट लिहितानाच आरतीचा ’आरती पार्टी’चा पहिला भाग सुरु आहे आणि प्रथमच फ़ूड नेटवर्कवर आपला अस्सल देशी स्वयंपाकघरी मस्ट असलेला स्टीलचा हळद-मसाल्याचा डब्बा दिसतोय...हे पाहताना मी वाट पाहातेय आपल्या एखाद्या मराठी फ़ूड ब्लॉगरला अशाच प्रकारे स्वतःचा शोची तयारी करताना पाहण्याची.

ता.क. ही पोस्ट दीपज्योतीच्या २०१० अंकासाठी लिहिली होती. ब्लॉगवर पुन्हा प्रकाशीत करतेय.

Wednesday, November 24, 2010

निक्काल

निकाल या शब्दात न दिसणारी हवा किंवा न दिसलेला देव याप्रमाणे न दिसणारा "वाद्ग्रस्त" हा शब्द असलाच पाहिजे का असा प्रश्न का पडतो माहित नाही....पण पडतो किंवा निकाल लागल्यावर वाद होतात हे मात्र नक्की....मग ब्लॉगजगताने तरी अपवाद का मानावा मी म्हणते...

मुळात त्या दिवशी मेल, बझ सुरु करायच्या आतच सगळा खेळ आटोपला होता. म्हणजे सगळ्या चर्चा, अभिनंदनाची आदान प्रदान इ.इ. आवरून लोक झोपायच्या तयारीला लागले होते किंवा पार्ट्या तरी करत होते....आता मी जगाच्या जवळ जवळ शेवटी दिवस उगवणाऱ्या भागात राहणार म्हणजे अजून काय अपेक्षापण नव्हती तरी पण वरवर कोण कोण ओळखीचे आहेत हे पहिल्यावर आयोजकांचे पत्र वाचावे म्हणून जरा ती attachment उघडली आणि त्यातच नाव, त्याचं -हस्व, दीर्घ यांच्या चुका, कुणाच्या ब्लॉगची शेंडी कुणाला हे सगळं पाहून म्हटलं, आहे बाबा, वादाची सुरुवातच इथे आहे......... म्हणजे या वर्षी जिथे मराठीचे खून पडलेत तिथे जास्तीत जास्त पदकं नक्कीच गेली असणार....जास्तीत जास्त शब्दावरून आठवलं, अरे केव्हाची यादी पाहते... चहा गार झाला सकाळचा, मुलाची बाथरूम ट्रीपपण (बाबाच्या कृपेने) झाली तरी संपेचना.....शेवटी एकदाची गोळाबेरीज पहिली तर ६ + ३० = ३६ बापरे....छत्तीसचा आकडा म्हणजे तर यकदम लकी लंबर .....(माझा नाही हे वेगळ सांगायला नको आकडेबहाद्दरांना)

परीक्षकांच्या मते लंबरात आले ब्लॉग पहिले आणि बरेच विचार एकदम आले....म्हणजे, म्हटल जाहिरातीची कला जर इतक्या चांगली जमली तर चकटफू ब्लॉगवर चकटफू वेळ का घालवला असता राव?? मस्त जास्तीचे डॉलर नसते छापले???  जातीचीच राजकारण, शब्दांची वाफ दवडून करायची तर मग ब्लॉग सोडून दुसरं काही केलं असतं की....आणि दोन-तीन महिने पोष्टा टाकायच्या नव्हत्या का?? असले अचाट प्रश्न यकदम पडले....म्हटलं, देवा वाचवलस बाबा या रांगेत माझ्यासारख्याला न टाकून.....

खालची लंबर लाईन पहिली तर माझे बरेच लाडके वरच्या रांगेत जाऊ शकणारे लाडके ब्लॉग पाहून पुन्हा भरून आलं...उत्तेजना म्हणजे एक प्रकारची सांत्वना असा काही एक सूचक अर्थ काल एका बझवर पहिला तेव्हा लगेच उमगलं की खरच सांत्वनेची गरजतर या ब्लॉगना जास्त आहे कारण सातत्याने चांगलं आणि दर्जेदार लिहून जर त्यांचा लंबर ३० जणाच्या शेपटात असेल तर देवा पुन्हा एकदा वाचवलस बघ...

आता हे सगळं प्रकरण म्हणजे कोल्हयाला द्राक्षे आंबट असं बर्याच जणांना वाटेल....पण खर ते तस नाही..... हे एक वैचारिक मंथन आहे या निकालापासून काय घ्यावं यासाठी....कारण निकालामध्ये जसं मेरीट यादी, त्याखालची पास आणि मग नापास अशी लोकं असतात तशीच इथेही आहेत....आपण मुळात ब्लॉग का लिहितो याचा आपल्यासाठी विचार केला तरीही या निकालाने कुणाला काही फरक पडायला नको...कारण यात यादीत असणारे आणि नसणारे दोघही तितकेच confused आहेत..त्यांना आपण इथे का आणि का नाही हा प्रश्न एकाचवेळी पडलाय...(मटका लागलेले काही अपवाद वगळता)

ही एक स्पर्धा आहे ज्याचे नियम आपल्याला ठाऊक नाहीत...निदान दोन निकाल जरी कुणी नीट पहिले तरी हा परीक्षकांच्या मर्जीचा थोडा फार खेळ आहे हेही कळेल....आपण ब्लॉग कधी परीक्षकाला गृहीत धरून लिहिलेला नसतो....निदान परीक्षेच्या पेपरमध्ये तरी आपल्याला नियम, परीक्षक याची थोडीफार कल्पना असते पण हे ब्लॉग प्रकरण थोडं वेगळं आहे....त्यामुळे आता या निकालाने आपण खर तर कुठलाच निष्कर्ष काढायला नको...म्हणजे हिमेश रेशमिया जेव्हा हिट चित्रपट म्हणून त्याच्या कुठल्या चित्रपटाच नाव देतो तेव्हा आपण कधी तो पाहणार असतो का?? तसंच काहीसं....:)

आपल्या आपल्या ब्लॉगचा एक प्रेक्षकवर्ग असतो, आहे परीक्षक हा फक्त त्या घडीपुरता आपला एक तात्पुरता वाचक असतो...शिवाय तो कुठली पोस्ट वाचेल वाचणार नाही हे एक न उलगडणार कोडं......प्रत्येक ब्लॉगसाठी खरा वाचकवर्ग वेगळा आहे आणि राहील...आणि तो वाढत असतो ही जमेची बाजू गृहीत धरून आपण त्यांच्यासाठी लिहावं.....उगाच ऑस्कर नाही मिळाल म्हणून श्वास हा काही आपला लाडका सिनेमा लगेच नावडता होत नाही आणि जय हो ला बक्षीस मिळाल तरी ए आर, जावेद म्हटलं की मला त्यांची जय हो सोडूनच सगळी गाणी आठवणार....

त्यामुळे हा निकाल असा का लागला ...अमुक ह्या लम्बरावर का आणि तमुक इथे का नाही त्यापेक्षा आपल्या आपल्या ब्लॉगवर चित्ती असावे समाधान या न्यायाने खर तर जास्त नेटाने लिहावे हे जास्त महत्वाचे....ब्लॉगने आपल्याला काय दिलं यात बक्षीस दिलं हे खूप खालच्या क्रमांकावर असलेलंच बर...मागच्या वर्षीच्या उत्तेजन नामावळीतले बरेचसे सुस्कारे सोडलेले ब्लॉग पाहिलं तर हे नक्कीच पटेल....

तरीही ज्यांना बक्षीस मिळालेच आहे त्यांना कुठेही कमी लेखण्याचा हेतू यामागे नाही....पण दहावी बारावीचा निकाल लागला की नंतर एखाद्या पुरवणीत नापासांसाठीसुधा एक सदर येत न तितकीच किंमत या पोस्टला आहे....बारावीवरून आठवलं जेव्हा बारावीला पण आकडे मला लागणारे नव्हते (म्हजे मेडिकलच्या लायनीत जायला...) तेव्हा माझे बाबा दादर स्टेशन वर माझे भरून आलेले डोळे न पुसता म्हणले होते अग अपर्णा आपल्या पिढीत अजून कुणीच डॉक्टर झाल नाहीय आणि तसा प्रयत्न करणारी पण तूच पहिली आहेस तर मग लगेच कस सगळं मनासारखं होईल? त्यासाठी पिढीच अंतर जाव लागेल.....

तसंच आहे हे आपण काही कसलेले लेखकू नाहीत (निदान मी तरी) शिवाय यातलेही सगळेच काल लिहायला सुरुवात केली आणि आज बक्षीस घेतलीत असही नाहीये...तेव्हा आपल्याला पुलाखालून थोडं पाणी वाहून जावं द्व्याव लागेल..प्रत्येकाचे पूल निराळे...बास इतकंच....:)

Wednesday, May 26, 2010

मुंबईतला ब्लॉगर्स मेळावा....

खरं तर हा विषय तसा आता ब्लॉगविश्वावर जुना पण काही ब्लॉगु-ब्लॉगिनींनी जरा सांगितलं म्हणून किंवा स्वतःलाही लिहायचं होतं पण तेव्हा वेळेत न लिहिता आल्यामुळे उशीरा का होईना...आणि तसंही अजुन मे संपला नाहीये मग काय हरकत आहे?? शिवाय बाकीच्यांचे लेख त्यांचे ते नंतर वाचतील पण माझा अनुभव मी स्वतः नंतर कसा आठवणार (आत्ताच सगळ्ळ सगळ्ळ आठवत नाहीये तर...) या आणि अशा अनेक कारणांमुळे शेवटी मीही माझे दोन पैसे या विषयावर खर्च करायचे ठरवले आहेत (ही या विषयावरची शेवटची पोस्ट असेल अशी आशा..)संदर्भासहित स्पष्टिकरण किंवा कारणे दाखवा नोटीस अशा विषयांवर मी जास्त चांगलं लिहु शकेन हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या धेनात आलं असेलंच पण तरीबी हे फ़क्त नमनाचं वाटीभर तेल होतं याची कृ.नों.घ्या...

तर ९ मे २०१० नेमकं मायदेशात असणं आणि मेळावाही असणं हा जरी समसमा संयोग असला तरी तो तिथल्या तिथे साधण्याची कसरत साधताना मला नक्की काय काय करावं लागलं (in short किती लोकांना टोप्या घालाव्या लागल्या) हे सांगणं नमनानंतर तितकंच आवश्यक आहे...(त्याने इतरांच्या मेळावासंबंधी लेखांपेक्षा वेगळं काही वाचल्याचं समाधानही वाचकांना लाभेल ही आशा). सगळ्यात प्रथम म्हणजे तिथे हक्काच्या रविवारवर हक्क (so called प्रेमळ) दाखवणार्‍या प्रेमळ नातलग,मित्रमैत्रीणींची संख्या त्याच आठवड्यात अचानक वाढल्याचं ध्यानात आलं.आयला म्हणजे तुम्ही इतर दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन मला भेटाच किंवा जेवायला बाहेर/घरी न्याच असा आग्रह नव्हता पण सगळे रविवारसाठी अडून बसल्याने जरा मोठा लोचा झाला होता.कारण मी ब्लॉग लिहिते हे त्यातल्या ९९.९९% लोकांना माहित नाही मग कुठे जायचं हे खरं सांगायचा मार्ग मीच बंद केला होता. पण प्रत्येकाला दुसर्‍या कुणाचं तरी नाव सांगुन आयत्यावेळी सुटका करुन घेतली. मुख्य प्रश्न होता मुलाला इतका वेळ एकट्याला आईकडे सोडायचा पण नशीब की आईला तसं फ़ार काही सांगावं लागलं नाही पण नेमकी तिलाच त्या दिवशी एक काम (तेही दादरलाच) निघालं आणि आता मेगा ब्लॉकमध्ये ही लवकर आली नाही तर काय या टांगणीत मी दुपारभर होते पण नशीबाने ती तीन वाजता परतली आणि मी तडक सुटलेच..उगाच कुणी घरी टपकलं तर मग सुटका कशी करायची याचा विचार केला नव्हता. आणि लवकर निघाले तरी फ़ायदा झाला कारण इतकं करुन मेगा ब्लॉकमुळे बरोबर वेळेवर म्हणजे पावणे पाचला पोहोचले..(मी रोहन आणि महेंद्रकाकांना थोडी लवकर येईन असं सांगितलं होतं...मग पंधरा मिन्ट तर पंधरा मिन्ट लवकरशी मतलब काय??)

आल्या आल्याच सचिनने बॅच दिला आणि मग एक एक करुन ओळखीच्या मंडळीशी खरा परिचय/गप्पा/खेचाखेची करायला सुरुवात झाली..तसंच एक शुद्धलेखनाच्या नियमासंबंधी छोटेखानी पुस्तकही देण्यात आले (त्यांची संख्या मर्यादित होती त्यामुळे कदाचित उशीरा येणार्‍यांना मिळालं नसेल) पण माझ्यासारख्या ब्लॉगर्सनी संग्रही ठेऊन वापरावं असंच पुस्तक आहे. त्याबद्द्ल विशेष आभार.

सोनाली आणि आर्यनमुळे खरं तर मी आणि शमिकाही पुढे बसलो. त्यातल्या त्यात फ़ायदा म्हणजे ती जागा पंख्याच्या खाली होती. पण तसं वर असल्यामुळे थोडं कमी उकडत होतं (किंवा सवय झाली असणार) मेळाव्याची सुरुवात कांचनच्या भाषणाने झाली..त्यातला मला लक्षात राहिलेला मुद्दा/सुचना म्हणजे ज्यांना दिर्घ बोलायचं आहे त्यांनी शेवटी परिचय करुन द्यावा..अरे काय डोकं चाललंय यार, यांना नक्कीच आणखी काही मेळाव्यांचे अनुभव असणार असा मी विचार करतच होते आणि मग एक एक करुन परिचयांना सुरुवात झाली. सोनालीचा नंबर तसा लवकर होता आणि आर्यनचा सत्कारही होता.सुरुवातीचे काही थोडक्यात असतानाच एकदम मग आपल्या वयाचा गैरवापर करत काही ज्येष्ठांनी लांबण लावायला सुरुवात केली आणि तेही स्वतःचा ब्लॉग सोडून भलत्याच विषयांवर..’तारतम्य’ हा शब्द मराठीत नक्की आहे का याची शंका यावी असं झालं...त्यात मग उगाच आपण पळून गेलो तर? म्हणून घाईघाईत माझ्या ब्लॉगचं नाव इ. सांगुन पटकन परत आले.

तितक्यात नेमकी वडा-कटलेटची फ़ेरी सुरु झाली. त्यामुळे (बहुतेक) लांबण लावणार्‍यांनाही पब्लिकने सहन केलं...(कारण टाळ्यांचा कडकडाट करायला हात तर रिकामी हवेत की नाहीत??) असो...मुख्य मुद्दा हा की हा अल्पोपहार (आणि तो अल्प नव्हता..पुरुन उरुन उरेल पेक्षा जास्त म्हणजे किती? तेवढा...), कार्यालय हा सर्व खर्च कुणा अनामिकाने केला होता ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे...

कटलेट हा मला त्यातला त्यात जास्त न भावणारा प्रकार आणि वड्यापेक्षा तर नाहीच नाही (पक्षी: पहा माझं वडापुराण) आणि वड्याची चव खरंच एकदम हटके होती. मग इतरांचं ऐकता ऐकता कॉफ़ी पानही झालं...कॉफ़ी अशी मसालेदार (म्हणजे तेच ते जायफ़ळ इ. घातली) प्यायची सवय गेलीय त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा कॉफ़ी झाली हे वेगळं सांगायला नकोच...

फ़क्त आता पुढच्या बाकावर बसण्याची सहनशक्ती संपत आली होती. रोहनने ते व्हिडिओ रेकॉर्डिंग गळ्यात दिल्यामुळे तशी अडले होते (आणि त्यात त्यामुळे माझं दोन सेकंदाचं परिचयसत्र रेकॉर्ड झालं नाही ते अलाहिदा) पण मग संधी साधुन मागच्या बाकांवर आले आणि एकदाचं हुश्श केलं..आता हळुहळु काही नंतर आलेले परिचयाचे लोकही भेटले..चुरापावला शोधायला जास्त कष्ट पडले नाहीत त्याच्या टी-शर्टवरच वडा-पाव लिहिलं होतं. मैथिली पुढे जाऊन बसल्याने तिच्यासाठी पुन्हा दोन मिन्टं पुढे जाऊन आले..नशीब नाहीतर ती नंतर लवकर पळालीसुद्धा. माझ्या आधीच्या कल्पनेप्रमाणे जी ओळखीची मंडळी भेटणार होती तीच भेटली. म्हणजे आनंद पत्रे, सुहास,सागर,देवेंद्र तसंच काही नवीनही परिचय झाले सचिन,आनंद काळे, इ. पण जास्त कल्पना नसताना भेटून दिलखुलास गप्पा मारणारी व्यक्ती म्हणजे राजा शिवाजी डॉट कॉमचे मिलिंद वेर्लेकर. त्यांचा खास परिचय रोहनने करुन मग त्यांचं छोटेखानी भाषण ऐकल्यावर त्यांचं अभिनंदन/.आभारासाठी गेले तर आम्ही एकंदरित ब्लॉगविश्व संबंधी बर्‍याच गप्पा मारल्या आणि नंतर चक्क त्यांनी या ब्लॉगला भेट देऊन कमेन्टही दिलीय.म्हणजे वाटलं होतं तसे काही नवे ब्लॉग परिचय होणं हा एक चांगला भाग म्हणता येईल...काही ब्लॉगर्सनी त्यांच्या ब्लॉगबद्दल थोडक्यात पण रंजक माहिती दिली...महेंद्रकाकांशी कुणी स्पर्धाही करतंय हेही नव्याने कळलं...(आता दुसरं कोण असणार ते....रविंद्र कोष्टी सोडून..पण हे त्यांनी स्वतःच सांगितलंय बरं) आदमी अच्छा होगावाले हरेकृष्णजींशीसुद्धा बोलायला मिळालं..त्याचवेळी महेंद्रकाकांनी आग्रहाने वड्याची आणखी एक प्लेट हातात ठेवली..आता खुद्द पंतप्रधानांना नाही कसं म्हणणार मग त्या वड्याचंही चीज (पोटात घालुन) केलं...:)

सगळे परिचय झाल्यानंतर मग काही तांत्रिक गोष्टींवरही चर्चा झाली ज्यांचा उल्लेख इतरत्र सगळीकडे झालाय..माझं लक्ष होतं त्याकडे पण तोवर घरुन फ़ोनही यायला सुरुवात झाली होती..पण रोहनने आधीच आपण एकत्र जाऊया म्हणून सांगुन ठेवलं होतं मग परत एकदा आईकडे पटवापटवी केली आणि निवांत शमिकाशी गप्पा मारायला सुरुवात केली. एकंदरित वेळ चांगला गेला होता.परत जाताना वाकड्या वाकड्या वाटा करुन रोहनने शेवटी घरापर्यंत सोडणे हा तर अपेक्षेचा परमबिंदु म्हणायला हवा..

सत्तरपेक्षा जास्त ब्लॉगर्सची उपस्थिती आणि फ़क्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक अशी महाराष्ट्रातील अन्य शहरे त्याचप्रमाणे हैदाराबाद सारख्या महाराष्ट्राबाहेरचे ब्लॉगर्स आणि last but not the least अमेरिकेतूनही येणारे प्रतिनिधी आणखी काय हवं संमेलन रंगलं हे सांगायला? शेवटी या मेळाव्याचा मुख्य उद्देश ब्लॉगर्स, वाचक या सर्वांमधला स्नेह वाढवणे हा होता आणि त्यात आपण पुरेपुर यशस्वी झालो आहोत.

Friday, April 23, 2010

ब्लॉगिंग विश्व आणि मी

शाळेतल्या निबंधासारख्या विषयावर त्यासारखंच रटाळ काही लिहुन पकवायचा अजाबात बेत नाहीये..पण दुसरं काही साधं किंवा वेगळं नाव सुचत नव्हतं म्हणून निबंध तर निबंध असुदे....वाचणारे (हे नमनाचं तेल संपलं की...(आणि तरी आज अगदी पणतीएवढंच आहे)) वाचतीलच...हुश्श..झालं संपली इमानदारी....


ब्लॉग लिहिण्यामागे मुख्य कारण तसंही दिपकचा झाडून सगळ्यांना माहित असलेला ब्लॉग "पु.ल.प्रेम".तेव्हा तर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो पण या ब्लॉगनिमित्ताने त्याची ओळखही झाली..किती कौतुक करावं या ब्लॉगसाठी दिपकचं तितकं कमीच आहे. पण तरी त्यामुळे स्वतः ब्लॉग लिहावा असं (चुकुनही) मनात आलं नाही..कारण मुळात आपण काहीही ब्लॉगवर लिहू शकतो किंवा लिहावं असं काही वाटलंच नाही.उलट ब्लॉग म्हणजे असं पु.ल.देशपांडेंसारख्या नामांकित साहित्यिकांचंच साहित्य वाचण्याचा आणखी एक मार्ग असं काहीसं फ़िट्ट होतं डोक्यात. किंवा त्याच्या पुढे म्हणजे स्वतः कविता नाहीतर कथा लिहिले पण याबाबतीत लिखाण (आणि बर्‍याचदा वाचन) या बाबतीत मी म्हणजे ढब्बु पैसा...(हो थोडी फ़ार कबुली आहे की मी स्वतः कथा/कवितांच्या ब्लॉगवर फ़ार नसते याची नोंद घेतली आहेच पण तरी..इमानदारी आणखी काय??) पण दिपकशी कधीतरी बोलताना तो मागे लागला अगं तुझ्या भटकंतीबद्दल लिही नं...हे बघ म.ब्लॉ.वि. त्यात किती किती लोकं काय काय लिहितात आणि मग एकदम (माझी लेट) ट्युब पेटली आणि तडातड माझी भटकंती आणि दोन पोश्टा यावर जाऊन विझली...ट्युबच ती किती वेळ तग धरणार??

आणि नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या...काम,घर इ.इ....पण २००९ मध्ये पुन्हा एकदा ब्लॉग लिहावा असं वाटायला लागलं...काही काही आठवणी स्वतःभोवतीच रूंजी घालत होत्या त्यांना मांडावं आणि मग माझिया मनाचा जन्म झाला. खरं तर गप्पा मारण्याचेच विषय आणि स्वान्त सुखाय असंच या ब्लॉगचं स्वरुप आणि त्यामागे मागचा विषयाला वाहिलेला ब्लॉग सुरु करून मग ओढग्रस्तीला लावायचा एक स्वानुभव होताच.

सुरुवातीला (बावळटसारखं) मी लिहायचे आणि मग पुढच्या पोस्टचं मनात येईपर्यंत विसरून जायचे...खूपदा ओळखीच्यांच्याच प्रतिक्रिया यायच्या..मजा वाटायची...प्रतिक्रियामधल्या गप्पा-टप्पा...पण नंतर स्वतःलाच लक्षात आलं....(हो पेटली एक दिवस एकदाची) की आपणही जे ओळखीचे झालेले काही ब्लॉग वाचतो ते सोडून नवनवे ब्लॉग वाचण्यातही मजा आहे...कॉमेन्टाकॉमेन्टीतही गम्मत येते...आणि काहीवेळा एखाद्या पोस्टवर आपण जाईपर्यंत जर सगळ्यांनी त्यावर कॉमेन्टून अगदी कीस काढला असेल की मग खट्टूही व्हायला होतं..अरे माझी कॉमेन्ट आता इतक्या उशीरा काय टाकु?? असंही...काहीकाहीवेळा तर इतरांच्या पोस्ट्समुळे आपल्यालाही काही नवनवे विषय सुचतात..(तेवढंच खाद्य आपल्याही ब्लॉगला मिळतं...) या सगळ्या गदारोळात कधी हे सगळे (आता नावांची जंत्री देऊन उगाच ताणत नाही) ब्लॉगर्स आपल्या परिचयाचे झाले कळलंच नाही..अमेरिकेसारख्या परक्या आणि दुरच्या देशात राहूनही मायबोलीत बोलुन आपलंसं करणारी ही मंडळी घरगुतीच झाली...आणि आता वेळ आली आहे या सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची...माझ्या ब्लॉगसाठीचा हा काहीतरी संकेत असावा की नेमका माझा मायदेश दौरा आणि ब्लॉगर्स मीट यांचा संयोग जुळून आलाय...दुधात साखर, एका दगडात दोन पक्षी नाहीतर आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन..आणि....जाऊदे स्कॉलरशीपच्यावेळी पाठ असलेल्या सगळ्या म्हणी एकापाठी एक लिहून उगाच चव घालवत नाही या निबंधाची....

थोडक्यात दोस्तहो जर वरच्या परिच्छेदातलं (एक ते ट्युबलाईट प्रकरण सोडलं तर) बरचंसं आपल्याही बाबतीत घडलं होतं असं वाटत असेल तर ब्लॉगर्स मीट बद्दल मी काही जास्त सांगायला नको...कार्यक्रम पत्रिकेचं विजेट उजवीकडे आहेच...मी ज्यांचे ब्लॉग वाचते आणि माझ्या ब्लॉगचे वाचक असणार्‍या त्याचबरोबर नवे ब्लॉग आणि वाचक माहित करुन घ्यायला (पुण्याच्या हुकलेल्या संधीनंतर) आणखी एक सुसंधी चालुन आलीय...त्यात मोठ्या संख्येने (रोहन माझं आडनाव संखे होतं...ख्ये नाही) सामील होऊया...आता या ब्लॉगवर भेटुया ब्रेक के बाद..तोपर्यंत डोंट टच दॅट ब्राउजर टॅब....आय मीन.....मी येतेच आहे पण माझिया मनावरचं आपलं प्रेम असंच वाढुदेत....

Wednesday, March 31, 2010

ब्लॉगवाचक...

ब्लॉग लिहायला घेतला की हळुहळु वाचकसंख्या वाढायला लागते..जितके नेमाने आपण लिहू लागतो तितकेच नित्यनियमाने काही लोक आपल्याला वाचकरूपाने भेटतात..प्रत्येक ब्लॉगसाठी अत्यावश्यक असलेली ही जात आणि स्वतः ब्लॉगरही याच जातीतला. निदान मी तरी...अरे आता आपण ब्लॉग करतो म्हणजे आपणही दुसर्‍या ब्लॉगर्सचं वाचायला हवं नं?? म्हणजे मी फ़क्त लिहिणार आणि तुम्ही वाचा या प्रकाराला आम्ही तरी लेखक म्हणतो आणि त्यांची पुस्तकं आम्ही विकत घेऊन वाचतो...(चकटफ़ू लिहितात ते ब्लॉगर अशी नवी व्याख्या आहे का??कोण रे ते ???)....तर अशाच ब्लॉगवाचन आणि ब्लॉगलेखनातून जाणवलेले काही ब्लॉगवाचकांचे प्रकार..


१. मित्र वाचक....साध्या शब्दात सांगायचं तर हे आपल्याला आधी ओळखत असणारे आणि तुमच्या ब्लॉगवरही येणारे दोस्त लोक. या लोकांचं एक बरं असतं, मैत्री असल्यामुळे ते तुमच्या ब्लॉगचे इमानी वाचक असतात आणि कुणीच काही म्हटलं नाही तर निदान यांचे कौतुकाचे दोन शब्द तरी असतात...काही काही ब्लॉगवर तर मित्रपरिवारांचाच इतका सुकाळ असतो की त्यापुढे मजसारखा पामर वाचक प्रतिक्रिया द्यायलाही कचरतो..उगाच त्यांचं चाललंय त्यात आपण कशाला ढवळाढवळ असंही वाटतं...दृष्ट लागावी असा मित्रपरिवार असणारा ब्लॉग आपलाही असावा असं सुरुवातीला मला वाटायचं पण नंतर आधीच्या मित्रमैत्रीणींना या विश्वात आणण्याचं तसं काही काम नाही हा एक प्लस पॉइंट माझ्यासारख्या ब्लॉगर्सना आहे असं त्याकडे सकारात्मक पाहायला मी शिकले..आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे वाचकांचा यापुढील प्रकार...


२. वाचक मित्र....मित्र वाचक आणि वाचक मित्र टायपायला चुकलेबिकले नाही...तर ते तसंच आहे..वाचक मित्र म्हणजे तुम्ही लिहित जाता, ते वाचत जातात आणि मुख्य म्हणजे प्रतिक्रिया देत जातात. कधी कधी तर प्रतिक्रियांमधुन तुम्ही दोन-तीन पेक्षा जास्तवेळा एकमेकांशी संवाद साधता आणि मग ब्लॉगर आणि वाचक यात एक वेगळी मैत्री निर्माण व्हायला लागते..प्रतिक्रियांमधुन बोलता बोलता कधी तुम्ही चॅट आणि बझ्झवर बोलायला लागता कळत नाही..एकाच देशात असलात तर मग फ़ोनाफ़ोनीपण सुरू होते हे असतात वाचक मित्र...म्हणजे मित्र झाला स्टार सारखं वाचक झाला मित्र...याचे तोट्यापेक्षा फ़ायदे जास्त आहेत....कारण त्यांना तुमच्या लेटेस्ट पोस्ट्स माहित असतात आणि त्यामुळे तुमचा संवाद खर्‍या अर्थाने सुसंवाद व्हायला सुरुवात होते....तोटा म्हणजे कधीतरी हाच सुसंवाद विवादातही रुपांतरीत होऊ शकतो पण तेवढी एक काळजी घेतली तर वाचक मित्रासारखा ब्लॉगरसाठी दुसरा मित्र नसावा....

३. धुमकेतू वाचक....हे वाचक आपल्यापैकी बर्‍याच जणांना अधुन-मधुन भेटत असतील..(म्हणजे धुमकेतुने कितीवेळा भेट द्यावी असं वाटतं??) हां तर एखाद्या दिवशी मेलबॉक्स उघडावी आणि एकाच व्यक्तीने अगदी जुन्या-पुराण्यापासून नव्यापर्यंत चार-पाच पोस्टवर एकदम कॉमेन्टून तुमची सकाळ प्रसन्न करून टाकावी ते हे वाचक...मीही त्यातली आहे कारण काही ब्लॉगावर नित्यनियमानं जाणं होत नाही आणि मग एखादा दिवशी एकदम छप्पर फ़ाडके कॉमेन्टून टाकण्यासारखं वाचायला मिळतं...मग पुन्हा बरेच दिवसांसाठी गायब असे हे वाचक खरं तर सर्वच ब्लॉगर्सना हवेहवेसे वाटत असतील नाही?? निदान मलातरी आवडतं बाबा सक्काळ सक्काळी असा एखादा धुमकेतू आलेला...

४. सडेतोड पण निनावी वाचक...थोडक्यात ऍनोनिमस...ही जात जरा कधीकधी डंखधारी असू शकते..पण निंदकाचे घर असावे शेजारी तसे असाही कानपिचक्या देणारा एखादा वाचक असावा असं वाटतं..पण जोवर त्यांच्या कॉमेन्ट्स आपण इतरांच्या ब्लॉगवर वाचतो तोस्तर...एकदा का हा गडी आपल्या ब्लॉगवर आला की कुठून आली ही पिडा असं वाटतं...तरी एक बरंय जे ब्लॉगर्स कॉमेन्ट्स अप्रुव्ह करुन मगच प्रदर्शित करतात ते निदान यांना लांबुनच घालवून देऊ शकतात पण माझ्यासारखे ब्लॉगर्स कुणी काही लिहिलं तरी ते तसंच ठेवतात...आजकाल ब्लॉगिंगचा प्रसार जास्त झालाय का माहित नाही पण निदान माझ्याकडे तरी निनावी माणसं फ़ार दिसत नाहीत...

५. गडबडीत असणारे वाचक...हे वाचक मला फ़ार आवडतात..एक म्हणजे बर्‍याचदा हे फ़क्त वाचक असतात. म्हणजे यांचा स्वतःचा ब्लॉग नसतो पण तरी यांना बर्‍याच जणांचे ब्लॉग वाचायचे असतात. मग त्यातही तुमची एखादी पोस्ट आवडली किंवा काही पटलं नाही तर अगदी इंग्रजी किंवा मिंग्लिशमध्येतरी ते एखादी ओळ तुमच्यासाठी लिहून जातील....नेहमीच यांच्याकडून हे होत नाही पण कधीतरी ते तुमचे वाचक म्हणून तुमच्या ब्लॉगसाठी इतकं तरी करतील म्हणून म्हणायचं गडबडीत असणारे वाचक...

६. परतफ़ेड वाचक....खरं तर हे वाचक म्हणजे दुसरे ब्लॉगरच असतात..काही वेळा नेमकं आपण म.ब्लॉ.नेटवर जायला आणि यांची एखादी पोस्ट तुम्हाला भुलवायला एकच गाठ पडते. मग तुम्ही अगदी आवर्जुन त्यांना प्रतिक्रिया लिहिता आणि मग त्याद्वारे तुमच्या ब्लॉगवर येऊन हे ब्लॉगरही तुमच्या ब्लॉगवर येऊन एखादी प्रतिक्रिया देतात..सुरुवात निव्वळ परतफ़ेडीने होते पण जर एकमेकांच्या ब्लॉगवरचे विषय नेमकेच एकमेकांना पटले की मग अजून एक, अजून एक करता हे वाचक आणि तुम्ही एकमेकांचे क्र.२ चे वाचकही बनतात..शेवटी मराठी ब्लॉग-विश्व म्हणजे”एकमेका सहाय करू अवघे लिहु ब्लॉगे’ आहेच की...मी नेहमी माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देणार्‍यांचे ब्लॉग किमान एकदा वाचून पाहाते आणि खरं तर त्यामुळे कित्येकवेळा मला असे अनेक छान छान ब्लॉग मिळतात जे मग नंतर कायम वाचले जातात..त्यामुळे ब्लॉगविश्चातली ही आणखी एक महत्वाची जात म्हणायला हरकत नाही..

७. मूक वाचक....सगळ्याच ब्लॉगवर आणि तेही मराठी ब्लॉगवर फ़ार मोठ्या संख्येने आढळणारा वाचकांचा प्रकार म्हणजे मूक वाचक...खरं तर कुठल्याही मराठी ब्लॉगवर जा, जर नियमितपणे लिहीणारा असेल तर ब्लॉग-हिट्स दहा-पंधरा हजार आरामात असतात तरी कित्येक पोस्ट्स कॉमेन्टवाचुन पडलेल्या असतात किंवा त्यावर फ़क्त क्र.१ आणि २ च्या वाचकांच्या प्रतिक्रिया असतात...नाही आवडलं तर तेही लिहावं पण काही तरी बोलावं की नाही असा प्रश्न पाडणारे हे सर्व वाचक...यांच्याशिवायही पान हलत नाही कारण लिहिलेलं कुणी वाचतंय ही भावनातरी यांच्यामुळे मिळते..पण जर हे सगळे जर एक एक करून बोलायला लागले तर मात्र संपुर्ण मराठी ब्लॉगिंग विश्व ढवळून निघेल...

मग राहिलंय का काही लिहायचं??? येऊ द्यात की प्रतिक्रियेत...

तळाच्या वरची टिप....ही पोस्ट वाचुन जर या ब्लॉगवरचे वरच्या सगळ्या प्रकारचे वाचक बोलायला लागले तर भरुन पावलं असं समजेन...


खरी तळटीप....याच पोस्टवरुन प्रेरणा घेऊन कुणी आता ब्लॉगर्सचे प्रकार पोस्ट लिहायला हरकत नाही...मी त्यासाठी महेंद्रकाका आणि हेरंबला टॅगतेय...आणि त्यांनी आणखी कुणाकुणाला शोधून आणि नवे नवे पोस्ट्स टॅग करून ही साखळी थोडी खेचावी अशी विनंती....