Showing posts with label श्रद्धांजली. Show all posts
Showing posts with label श्रद्धांजली. Show all posts

Monday, July 27, 2020

Rest in Peace Apolonio

आमच्या ऑपरेशन्स डिपार्टमेंटच्या मुख्य व्यक्तीचं काम किती जड आहे हे जसजसं कोविडने जग व्यापतंय तसं मला जाणवतं. मी नॅन्सीच्या जागी दुरूनही नाही हे चांगलं आहे का?, हा विचार करणं चुकीचं आहे हेही मला कळतंय.
काही आठवड्यापूर्वी कामाची घरून होणारी नाचानाच असह्य होऊन एक दिवस कामावर जायचं ठरवलं त्याच दिवशी आधी सकाळी लॉगिन केल्यावर नॅन्सीची मेल पहिल्यांदी नजरेत आली आणि डोळे पाण्याने भरले. दुसऱ्या एका कक्षात  काम कारणारा पॉलो आपला आधीचा कुठलातरी न बरा होणारा आजार शेवटच्या टोकाला पोचल्यामुळे त्याच्या कॅलिफोर्नियाच्या गावाला निघाला होता. त्याने त्याचा शेवटच इ-पत्र पाठवलं होतं आणि त्याबरोबर आपला पत्ता.
त्याला जाताना आठवण म्हणून, संदेश म्हणून जर कार्ड द्यायचं असेल तर काय करायचं हे नॅन्सीने तिच्या इ-पत्रात लिहिलं होत.  मी खरं तर इथे काम सुरु करून वर्षापेक्षा थोडाच काळ जास्त झाला असेल त्यामुळे मी पॉलोला पाहिलं असेल तरी मला त्याक्षणी तो आठवला नाही. त्यात तो बेसमेंटमध्ये काम करतो आणि फार वर यायचं त्याला कामही नसे हे इतर सहकाऱ्यांनी मला सांगितलं.  पण आपला कुणी सहकारी आजारी आहे, आणि "मी माझ्या देहाची माती माझ्या गावात मिसळावी म्हणून मोठ्या प्रवासाला निघतोय",  हा त्याचा  विचार माझं डोकं खाऊन मलाच काही होऊ नये म्हणून मी एक कार्ड माझ्या बॅगमध्ये घातलं.
त्यादिवशी मर्फीच्या नियमाप्रमाणे मी निघेनिघे पर्यंत असंख्य कामे माझ्याकडे आली आणि ते कार्ड माझ्या बॅगमध्येच राहिलं. ऑफिस संपवून दुसऱ्या सिग्नलला पोचताना काय राहिलं याचा मनात अंदाज घेताना मला अचानक आठवलं की कार्ड तर आपण दिलंच नाही. पुन्हा गाडी वळवायला मार्ग नव्हता कारण घरी पोचले की मीच लावलेली एकची मिटिंग टीमला सांगून निघाले होते पोचते म्हणून. शिवाय मी ज्या रंगाची आहे त्या रंगाने सध्याच्या काळात मलाच काही होऊ नये म्हणून खरं तर मी ऑफिसला यायचं म्हटलं तर "नको गं",  म्हणून काळजी करणारे निदान चारपाच तरी जवळचे सहकारी आहेत. त्यांना चिंता नको म्हणून मी गाडी तशीच दामटली.
त्या प्रसंगांनंतर नॅन्सीने आणखी एका इमेलमध्ये पॉलोच आभाराचं पत्र आणि त्याचा पत्ता कळवला. आता मात्र हे पत्र पाठवू म्हणून मी स्वतःला बजावलं. इथे माझे स्वतःचे काही जुने आजार डोकं वर काढू पाहताहेत आणि मी पॉलोचं पत्र बॅगेत सांभाळून ठेवलंय. मला माहीत आहे त्यालाही मी आठवणार नाही पण त्याच्या पृथ्वीवरून परतीच्या  प्रवासात माझे दोन शब्द त्याची साथ करतील का अशी माझी भाबडी आशा आहे. मी हे पत्र टाकणार आहे फक्त हा दिवस जरा शांत जाऊदे असं मी म्हणतेय. दुसरं मन म्हणतंय इतकी पत्र आली आणि अनोळखी सहकाऱ्यांची तर पॉलो ते सकारात्मक घेईल की जाताना दुःखी होईल.
या कावऱ्याबावऱ्या अवस्थेत मी आहे. मागच्या आठवड्यात आधी मुलांना थोडा वेळ द्यायला एक छोटी आणि मग बरं  नाही  म्हणून आणखी दोन सलग सुट्ट्या टाकून आज मी कामावर आले. असे लागोपाठ सुट्टीचे दिवस आले की साचलेल्या कामाचा धसका घ्यायचं आता कमी झालं आहे. तरीही आजच्या दिवसातली इ -पत्रं पाहताना नॅन्सीने आमच्या पहाटे टाकलेल्या पत्राचा मायना पाहिला आणि लगेच कळलं, पॉलो गेला. त्याच्या आजाराच्या वेदना काल  रात्री कायमच्या संपल्या. त्याने मागे जे आभाराचं पत्र पाठवलं होतं ते या बातमीला जोडलं होतं. नकळत माझे हात जोडले गेले आणि डोळे पाण्याने भरले. माझ्या बॅगमधलं कार्ड आता बॅगमध्येच राहील. 



पॉलो, आज तू गेलास. तुझ्या वेदना आता मिटल्या असतील. तुला कोविड  झाला नव्हता पण तुझी वेळ आली होती आणि तुला ते माहित होतं.  कोविडच्या महामारीने सध्या ज्या तातडीने माणसं जाताहेत त्या सर्वांनाच श्रद्धांजली वाहायची गरज आहे. मी ही पोस्ट फक्त तुझ्यासाठीच लिहीत नाही हे तुला कळेल का? 

त्याच्या पत्राखालच्या सहीवर त्याचं मूळ नाव वाचताना लक्षात आलं, "पॉलो" असा घरगुती अपभ्रंश असलेलं खरं नाव किती सुंदर आहे. 

Rest in Peace Apolonio. 

#AparnA #FollowMe

7/27/2020

Saturday, September 30, 2017

चेंगराचेंगरी आणि आपण

माझी मावशी परळला राहायची. तिला जाऊन आताशा महिना झाला. मी यंदा काही अचानक आलेल्या घरगुती कामामुळे मुंबईला गेले तेव्हा ती मुलाकडे पुण्याला होती त्यामुळे आमची भेट फक्त फोनवर झाली. अगं पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्याकडे राहायला घेऊन येईन या माझ्या शब्दांना आता काहीच अर्थ नाही. या मावशीकडे मी असंख्य वेळा गेले आहे. रुपारेलला असताना तर तशी संधीही होती. त्यावेळेस आम्ही वेस्टर्नवाले सोप्पं पडतं म्हणून दादरला गाडी बदलून एल्फिनस्टनच्या या पुलावरून असंख्य वेळा गेलो आहोत. तेव्हाही तो चिंचोळा रस्ता तसा का असावा असा प्रश्न पडायचा. आई बाबा आणि आम्ही मुलं एका ओळीत चालायचो. मग पूल संपला की हुश्श बाबांचा हात पकडता यायचा.मागच्या महिन्यात ताईला मी म्हटलं देखील आता आपलं परळ खऱ्या अर्थाने संपलं.  

यावेळी मैत्रिणीच्या घरी जायच्या निमित्ताने परळला जाणं झालं. तिने मला बांद्रयाला भेटून पुढे टॅक्सीने मी पाहिला नाही म्हणून वरळी सीफेसच्या मोठ्या पुलावरून टॅक्सी नेली. मग गप्पा मारून झाल्या तशी तिच्या गाडीने मला परळच्या पुलापाशी सोडलं आणि गाडी मध्ये उभी करायला जागा नसते म्हणून दुसऱ्या टोकाशी सोडून फारा दिवसांनी मी त्या पुलावरून चालले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो रविवारचा दिवस होता त्यामुळे फार जास्त लोकंही नव्हते.
 
काल जेव्हा पेपरमध्ये ती चेंगराचेंगरीची बातमी वाचली तेव्हा काळीज हललं. काय झालं असेल या विचारानेच कसंतरी वाटलं. या ठिकाणी कधी काळी आपणही होतो या विचाराने आणखी हैराण व्हायला होतं. अशा घटनांच्या जबाबदारी कुणीतरी स्वीकारतं का? आणि समजा स्वीकारली तरी गेलेले लोकं परत येणार आहेत का? गर्दीचं मानसशास्त्र वेगळं असतं. आपल्याला मुळात एक बेसिक पेशन्स लागतो तो आपल्यात आहे का हेही या ठिकाणी तपासून पाहायला हवं. मला माहीत नाही नक्की किती लोकं एकावेळी होते पण शांतपणे एक एक जण फक्त पुढे पुढे जात राहिला असता तर झालेली घटना टळू शकली असती का असा मी आपल्या बाजूने विचार करतेय. इथे कुठेही सरकारने गेली कित्येक वर्षे इथे बदल केले नाहीत वगैरे गोष्टी तूर्तास बाजूला ठेवल्या आहेत.
 
मी एका ठिकाणी कामावर जायचे तो फक्त १७ मैलाचा रस्ता तुडवायला काहीवेळा मी तासभरही घालवला आहे कारण इथेही असा एक लोकल हायवे आहे जिथे ऑफिसच्या वेळात पार्किंग लॉट म्हणावा तशी गाड्यांची गर्दी असते पण या गाड्यांच्या जमावाला सरळ जायची शिस्त असते आणि मुंगीच्या पावलाने आम्ही पुढे सरकत राहतो. तीच गत एखादा खेळ किंवा नाटक वगैरे पाहून झालं की बाहेर पडताना आता माझा नम्बर कसा पहिला लागेल वगैरे न पाहता आहे ती रांग न मोडता शांतपणे लोकं सरळ पुढे जातात. 

मुंबईचा वेग ज्या शहरात मी आहे त्याला नसेल असं मान्य केलं तरी शिकता यायचं असेल तर हा एक गुण मी नक्की माझ्या जवळच्यांना शिकवायचा प्रयत्न करेन. आताच बाईक चालवायला शिकणारी मुलं डावीकडून पटापट बाईक काढतात त्यांचं कौतुक करायच्या ऐवजी त्यांना कान धरून बाजूला करणारं कुणीतरी आपल्याकडे हवं असं मला नेहमी वाटतं. या चेंगराचेंगरीच्या बातमी वाचून आलेली अस्वस्थता ही आहे की मला माझ्या मुक्कामी पोहोचायचं आहे मग मध्ये मार्गात काही अडथळा आला तर  माझी स्वतःची जबाबदारी काय आहे हे आपल्याला कुठे शिकवलं जाणार हे आपल्याला माहीत आहे का? या प्रश्नाचं उत्तर ज्याने त्याने शोधावं इतकंच उटांवरून शेळ्या हाकणारे माझ्यासारखे लोक म्हणू शकतात. 

या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहताना अशा घटना घडू नये म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून इथून पुढे आपण जास्त जबाबदारीने वागावं लागेल हे मात्र जरूर म्हणावसं वाटतं.