Wednesday, September 30, 2009

गोष्ट छोटी डोंगराएवढी

सध्या आईचा मुक्काम इथे आहे त्यामुळे फ़ारसा विचार न करता मराठी चित्रपट लावते. जास्तीत जास्त काय तर तेच तेच गावरान विनोद नाही आवडले तर नेट सर्फ़ करणं किंवा दुसरं काही काम करणं हा पर्याय असतो. तसंच वाटलं होतं जेव्हा मकरंद अनासपुरेचं नाव सुरुवातीला पाहिलं पण एका संवेदनाशील विषयावरचा गंभीर चित्रपट आहे हा "गोष्ट मोठी डोंगराएवढी". नाही मी पुर्ण कथा वगैरे नाही सांगणार कारण एकतर मुळात मी जास्त चित्रपट पाहात नाही फ़क्त मायदेशात सध्या नसल्यामुळे पाहाणं होतं. पण असे काही विषय असले की तो चित्रपट आपसुक पाहिला जातो.पण ते कथा सांगणं मला जमत नाही.

तर "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये मुख्य प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्या हा आहे आणि त्या अनुषंगाने चालु असलेल्या इतर काही प्रश्नांनाही वाचा फ़ोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातुन शेतकी शिकुन परत गावात गेलेल्या मकरंद अनासपुरेला साधं शेतात विहिर खणायला कर्ज काढताना येणार्या अडचणी, सरकारी खात्यातल्या भ्रष्टाचार ज्या प्रकारे मांडलय त्याने आतुन काळीज हलतं. आपल्याकडच्या शेतकर्यांचा खरंच कोण वाली असावा असा प्रश्न नक्की पडेल हा चित्रपट पाहताना. गावातला त्याचा जिवलग मित्र दुसरा एक शेतकरी आधी एक बैल विकतो मग नांगराच्या दुसर्या बाजुला स्वतःच उभा राहातो. मकरंद त्याला स्वतःचा बैल देऊन मदतही करतो. पण तरी आभाळालाच ठिगळ पडलंय; मग घरावर जप्ती आणि दुसराही बैल सावकाराच्या दारात आणि तिथेही अपमान, बहिणीच्या इज्जतीवरुन.

"मातीत जगणं, मातीत मरणं, आपुल्या हातानी रचिलं सरणं" हे गाणं खूप काही सांगुन जातं. पण मरणानंतरही पोस्टमार्टेमसाठीसुद्धा लाच??? आणि पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही. कागदावर सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येच्या केसेस एकतर दाखवत नाही आणि दाखवायच्या असतील तर मग पोलिसखात्याला पैसे चारा म्हणजे पोस्टमार्टेम करुन ते पुढंच थोडं बघतील. मरणानंतर असं मग जगतानाचं लाचखाऊपणाचं चक्र गरिबी आणि परिस्थितीमुळे न भेदता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय??

आपण भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या कृषीप्रधान देशातल्या भुमिपुत्राची ही अवस्था बदलण्यासाठी काही चालु आहे का? आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं?? एक नागरीक म्हणुन मी काय करु शकते?? याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का? सरकार सरकार म्हणुन अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच खारीचा वाटा म्हणुनतरी काही ठोस करायला हवय ही भावना आजची रात्र झोप लागु देणार नाही. सध्या आपल्याइथे निवडणुकीचे वारे वाहताहेत त्या पार्श्वभुमीवर नक्कीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला गेला पाहिजे निदान एक सुजाण नागरीक म्हणुन आपण आपलं पवित्र कार्य बजावताना डोळसवृत्तीने निर्णय घेण्यासाठी.
जाता जाता या चित्रपटातील शेतकर्याचं गार्हाणं सारेखं आठवतयं....

"मातीच्या लेकरांचं मातीमधी मनं सारं.....
वारीत चाललो मी आभाळात ध्यान सारं..... "

18 comments:

  1. हा पिच्चर बघायचा बाकी आहे माझा अजून. बरेच ऐकले आहे मी. आता सुट्टी वर गेलो की नक्की बघणार आहे... :) बाकी शेवटला खरे लिहिले आहे. 'एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का?'

    बरेचदा वाटते की 'होय' आणि मग लक्ष्यात येते की 'नाही' ... असेही वाटते की आपण खुप आत्मकेंद्री आहोत. सर्व घडते पण उघड्या डोळ्यानी ते शंढासारखे बघत बसलो आहोत. :(

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर आहे रोहन. शेवटी अशा प्रश्नांसाठी आपण नक्कीच काही करु शकतो पण ते होत नाही आणि मग अशी नष्टचर्य तशीच चालु राहतात.

    ReplyDelete
  3. आज शास्त्रीजींची आठवण काढ्तांना या देशातल्या किसानाची अवस्था खरच वाईट आहे गं!!!आपण काय करू शकतो हा विचार करण्यापेक्षा आपण काय काय करू शकतो हा विचार करु या का ग आपण सगळे मिळून....ब्लॉगविश्वातच अनेक अनिवासी भारतीय आहेत....सगळे नाही पण काही जरी एकत्र आलो तरी निदान एक घर तरी उभे करू शकतो....मत कळवं....
    पोस्ट तुझ्या संवेदनशील मनाचे दर्शन घडवतेय...हा सिनेमा पहायचा आहे तो निळू भाउंसाठी....

    ReplyDelete
  4. तुझं म्हणणं अगदी पटतंय तन्वी. आपण काय काय करु शकतो फ़क्त कसं त्याचा नीट अभ्यास करायला हवा. नाहीतर करायला गेलो एक असं व्हायला नको. आणि त्यासाठी आपण अनिवासीच असलं पाहिजे असंही नाही. मी जर भारतात असते तरी मी काय केलं असतं?? याविषयी हा ब्लॉग वाचणारे एक एक करुन गोळा होणार असतील तर नक्कीच काहीतरी आपण करु शकु. ब्लॉगचं भावविश्व त्याच्या पुढे जाऊन काही करु शकणार असेल तर का नाही??

    ReplyDelete
  5. शेतकऱ्यांच्या आत्महत्या.. विचार करायला लावणारं पोस्ट आहे. काय लिहावं हेच कळत नाही.

    ReplyDelete
  6. महेन्द्रकाका मी खरं सुचवणार होते तुम्ही चित्रपट पाहुन (किंवा असंही) याविषयी लिहा. तुमचा वाचक वर्ग जास्तही आहे. सर्वानुमते काहीतरी आपल्याला करता येईल का हे जर जमलं तर बरं होईल....

    ReplyDelete
  7. हे बघ एक ओमानी रियाल म्हणजे साधारण १२५ रुपये....एक रियाल आम्ही पटकन खर्च करतो पण १००रुपये मात्र जास्त वाटतात....असा काहिसा विचार येउन ’अनिवासी’ म्हटले मी!!! बाकी आपण सगळे भारतीय आहोत...आणि हे प्रश्नही आपले आहेत ....ठरवूया नक्की....महेंद्रजींचा सल्ला नक्कीच मोलाचा आहे...

    ReplyDelete
  8. अगदी बरोबर आहे. पण तुला सांगु का अगं अगदी छोटा पिझ्झा पण शंभरात येतो का पाहा. आपली लोकं आता मॉलमध्ये जाऊन फ़क्त विकेन्डला जेवढे पैसे उडवु शकतात तसं चार-पाच वर्षांपुर्वी नव्हतं शिवाय ती अशी सामाजिक मदतही करतात. म्हणुन मी तसं खरं म्हटलं बाकी किती पैसे कुठे काय किमतीचे आहेत यावर एक मोठी वेगळी पोस्ट होईल...:) तुला कळत असेलच मला काय म्हणायचं ते...पण असो...
    सध्या तरी इथे तू अन मी आहे पण मला नक्की आशा आहे की काहीतरी आपण चालु करु अगदी आत्ता नाही तरी आपल्या कुवतीने आणि वेळेप्रमाणे. तिथलं कुणी असलं की एक खात्रीचा स्त्रोत राहातो ना म्हणुनही. असो...खूपदा मला वाटतं की माझ्यासारखी बहुतेक सारी संवेदनाशील असतात पण त्या संवेदनांचं पुढं काय करायचं हे होत नाही म्हणून मग आपण स्वतःला दोष देतो आणि खरं कार्य होत नाही....

    ReplyDelete
  9. अपर्णा,
    डोंगऱ्या एवःद्या समस्या आहेतच पण करण्या सारखे खूप आहे,तुझ्या शाळेतील होतकरू विद्यार्थ्याची वर्षाची फी,पुस्तके दे,
    महेंद्रजीनी सुचवलेल्या आश्रमाला मदत करू शकतेस,आम्ही अनिरुद्ध बापू परिवारातले अमेरिकेतून मदत अनेक जण पाठवतात तिथे केंद्रावर जाऊन मदत दे.१०८ टक्के योग्य ठिकाणी जाईल,आम्ही यथाशक्ती सेवा,मदत,करतोच.अनिरुद्ध बापू परिवार सुखी समाधानी असतात.तुला हवी तशी,जिथे पाहिजे तिथे मदत कर फक्त योग्य ठिकाणी पोहचणार ह्याची खात्री करून घे.चांगली भावना,योग्य ठिकाणी केलेली मदत हरी चरणी रुजू होते.समाधान देते.
    anuja

    ReplyDelete
  10. धन्यवाद अनुजा...तसं मदतकार्य चालु आहे. मला शेतकर्यांसाठी फ़क्त असं काही कुणी आधीच करतंय का किंवा करता येईल का याचा विचार करत होते..

    ReplyDelete
  11. aprna,
    Hello! where r u? write something,I would like 2 sugest u new subject......EKTA group(usa) 4 new students(from maharashtra),new comers 4study.I hope u like the sub
    (last sunday artical publishd in loksatta)intersting.......try 2 get more information and deliverd us
    waiting 4 ur reply.bye
    anuja

    ReplyDelete
  12. अनुजा मी इथेच आहे. हा महिना थोडा धावपळीचा आहे. लिहायचं आहे पण थोडा निवांतवेळ मिळत नाहीये...मी लोकसत्ता मधला तो लेख बहुधा चाळलाय. अजुन माहिती मिळाली तर नक्की लिहेन. आणि हो इतकं आवर्जुन लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  13. खरं आहे. सतत चालू असणार्‍या या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबद्दल ऐकलं की मन विषण्ण होतं. एक सुजाण नागरिक म्हणून त्यांना मदत करण्याची इच्छा होते, पण आपण केलेली आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत पोचणार नाही ही जवळजवळ खात्रीच असते. ती आर्थिक मदत मधल्यामध्ये कोणाच्यातरी घशात जाते. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना मदत करायची तर सरकारवर दबाव आणणं गरजेचं आहे. प्रसारमाध्यमांनी या बाबतीत खंबीर भूमिका घेणं महत्त्वाचं आहे.

    ReplyDelete
  14. संकेत, कालच्या लोकप्रभामध्ये तळागाळात मदत पोहोचत नाही याबद्दल एक लेख आला आहे वाच...
    http://www.loksatta.com/lokprabha/20101008/dairy.htm
    फार अस्वस्थ व्हायला होत हे सगळ वाचून....मला स्वत:ला जेव्हा काही करता येईल तेव्हा नक्कीच करेन....सध्या ब्लॉगवाटे बाहेर काढणे इतकच जमतंय...

    ReplyDelete
  15. मी समजत होतो की मी तुझा ब्लॉग पूर्ण वाचला आहे. पण ही इतकी महत्वाची आणि अप्रतिम पोस्ट सुटली म्हणजे ब्लॉगपूर्ण वाचलाय या म्हणण्याला काहीच अर्थ नाही खरं तर. असो.

    फार त्रास झाला. भयंकर आहे हा चित्रपट. वाचूनच मला गलबललं.. :(
    कधीपासून बघायचा राहतोय. नक्की बघतो आता.

    ReplyDelete
  16. हेरंब आवर्जून लिहिल्याबद्दल आभारी..
    ही पोस्ट अप्रतिम आहे का माहित नाही पण अपराधी जरूर आहे..आज पुन्हा एकदा वाचतेय आणि तीच भावना जगतेय....कधीतरी काही तरी करता आलं तरच ही जाईल..

    ReplyDelete
  17. पोस्ट लिहून वर्षभर होतंय, पण जखम तितकीच ताजी वाटते.. तू चित्रपट पाहताना जे अनुभवलंस तोच अनुभव मला काल रात्री आला. म्हणजे काहीच बदललं नाहीये.. केवळ एक वर्ष नाही तर वर्षानूवर्ष काहीही बदललेलं नाहीये.. फक्त लोकांची सहनशक्ती वाढली आहे बस.. !!!

    ReplyDelete
  18. आनंद तुझी प्रतिक्रिया वाचून काटा आला..खरच वर्ष झालं रे आणि काही काहीच बदललं नाहीये...:(
    लोकामध्ये आपणही मोडतो याच जुनं दु:ख परत वर आलं......

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.