Wednesday, November 11, 2015

शुभ दीपावली २०१५

सकाळी आई उठवायच्या आधी फटाक्यांच्या आवाजांनी जाग येणं आणि त्यात मग आपण आपल्याही एक दोन लवंगी-चक्रीची भर घालून चकली, चिवडा, (बेसन) लाडू खात खात दिवाळी अंक वाचणं. भरपूर दिवस शाळा नसल्याने डोक्याला ताप नाही, ही एक सूक्ष्म आनंदाची भावना घेऊन तुळशीच्या लग्नाची वाट पाहणं. ह्म्म्म मला दिवाळी आवडते, हे एक चित्र. 




आजुबाजुला दिवाळीचं वातावरण नसताना आठवण ठेवून आधीच्या शनि/रविवारी जमेल तेवढा फराळ बनवणं, दिवाळीच्या दिवशी नेमकी मिटिंग लावली बघ बिजनेसने किंवा अर्र यंदा भारतात जाऊन आलो म्हणून सुट्टी नाही घेत येणार असले विचार करत सकाळी लवकर उठून एक दिवा, मुलांना थोडा-फार फराळ आणि नेहमीची लगबग. ऑफिसमध्ये उगीच लक्ष न लागणे, क्वचित डोळे भरून येणे पण तरी विकेंडला अमकी/तमकी पार्टी आहे त्याच्या मेन्युची वगैरे मनात उजळणी करणे, पुन्हा नंतरच्या विकेंडला मराठी मंडळाचा फराळ वगैरे वगैरे कधी कधी आधीच्या दिवाळींपेक्षा जास्त नेवर एंडिंग वाटणारं हेही एक चित्र. पुढे मुलं मोठी झाली की चित्र बदलेल. 



बदलणार नाही ते म्हणजे "ह्म्म्म दिवाळी मला आवडते", ही हे चित्र चितारतानाची भावना. हा सण आपल्या मनात आनंदाची, समाधानाची भावना जागृत करण्यासाठी मदत करतो. थंडीची थोडी मरगळ येणार असते, दिवस लहान होतानाचा अंधार दूर करायची  चेतना देतो. वय, जागा, ज्यांच्याबरोबर आपण साजरं करतोय हे सगळं सगळं बदलत राहणार आहे पण ती भावना आहे तशीच राहील/ राहो हीच प्रार्थना. 
आपल्या ब्लॉगर/फेसबुकवरचे लाइक्स (इकडे २०० आणि तिकडे १०० च्या अतिशय जवळ पोहोचवलं तुम्ही माझिया मनाला), शिवाय अपेक्षेपलीकडे गुगल प्लसवरचं फॉलोइंग, हा लोभ असाच राहुदे आणि ही दीपावली आपलं येणारं वर्ष लक्षवेधी ठरवू दे. अनेक अनेक अनेक शुभेच्छा. शुभ दीपावली. 


Monday, October 12, 2015

रंगा येई ओ

फॉल म्हणजे आपला हेमंत येतो तो निसर्गातल्या रंगाची उधळण घेऊन. आता नाही म्हटलं तरी त्या पानगळीच्या रंगांची सवय झालीय पण तरी एखादी सांज अशी येते की दिवसाचा देव जाता जाता त्या रंगात आपले काही रंग घालतो आणि एक वेगळं चित्र आकाशाच्या नैसर्गिक कॅनव्हासवर काढून जातो. काल एक छोटा वॉक मुलांबरोबर करताना ही उधळण दिसली. सुरुवातीला त्याने थोडा पिवळा वापरून फराटे काढायला सुरुवात केली. 

मध्ये त्याला कॅनव्हासच्या पार उजवीकडे कुणा जाणाऱ्याचे मोठा पंजा का चितारावासा वाटला असेल बरं?

पिवळ्याला विस्तारायचं काम मध्यभागी सुरु होतचं. 

आणि मग आगीची धग दिसावी तसा हा केशरी. माझ्या घरची एक भिंत या रंगात  अ‍ॅक्सेंट केली तेव्हा त्याला फ्लेम कलर म्हणतात हे ठाऊक झालं. 

आम्ही चालत घरी पोहोचेस्तो कॅनव्हास पूर्ण भरला होता आणि रविवारची हुरुहूर लावणारी आणखी एक संध्याकाळ रंगमय झाली होती. 


कुठेतरी हेच रंग उगवतीचे म्हणूनही खपत असतील. कोण जाणे? 


Friday, October 2, 2015

उपनगरी अवतरला "गिरगाव कट्टा"


श्रावण आला की खादाड मंडळींना उपासाच्या पदार्थांची आठवण होते म्हणजे तशी ती इतर वेळीही होत असतेच पण मग त्यासाठी संकष्टी नाहीतर घरटी गुरुवार वगैरे करणारी आई-आज्जी--मावशी-काकू अशा लोकांवर विसंबा  आणि ते उपासाचे पदार्थ करून आपल्याला खाऊ घालतील याची वाट पहा. त्यातून त्यांनी ते डाएट नामक फंडा (ए कोण रे तो आमच्या वजनाकडे पाहणारा) वगैरे सुरु केला असला की आलीच का कंबख्ती? असो पण श्रावण आला की भलेभले कोलमडतात. अरे वातावरणच असं असतं न महाराजा की हिरवळ दाटे चोहीकडे (हो आली आता क्र. २ ला बालकवींची पण आठवण आली) शिवाय सणासुदीची लयलूट मग आपण नाही उपासाच्या पदार्थाकडे वळणार तर काय ते भय्याकडे पाणीपुरीच्या लायनीत थांबणार? (ओके मान्य गेले ते चांगली पाणीपुरी लावणारे भय्ये वगैरे वगैरे बरं असो) 

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे अशा वेळी उपासाचे पदार्थ खाणे हा आपला म्हणजे मराठी बाणा खाद्यसंस्कृती मंडळाचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि तो आपण आजकाल हा जो  काही बाहेर खाऊया हा फंडा आला आहे त्याला स्मरून बाहेर जाऊन उपासाचे पदार्थ खाऊन साजरा करतो. मग आली का धावपळ? कुणी म्हणे दादरच्या प्रकाशला जा पियुष प्यायल्याशिवाय यायचं नाही बरं का? आणखी कुणाचं काय तर कुणाचं काय. आपण राहणार तिकडे उपनगरात बोरिवलीला. नाही म्हणजे काय हापिस टाईम, झालचं तर मेगाब्लॉक सग्ग सग्ग सांभाळून प्रवास किती करायचा. आणि मग शोध सुरु झाला बोरिवलीतच आणि हा कट्टा आपल्या प्रबोधनकारच्या जवळच मिळाला. 

प्रवेश करताच काही टेबले आणि थोडं आत उजवीकडे एक गल्ला कम छोटं दुकान, तिथे मिठाया,पुरणपोळ्या,चिवडे वगैरे मराठी खाद्यमेव्याची लयलूट आणि घाईतल्या लोकांना पटकन तिथेच काय हवं ते घेऊन बाहेरच्या बाहेर सटकायची सोय, आरामात बसायचं असेल तर वरती वातानुकूलीत कक्षाची सुविधा. 

उपासाच्या दिवशी गेला असाल तर फराळी मिसळ, साबुदाणा वडा वगैरे पदार्थ तुमच्यासाठी तत्परतेने हजर असतील.

 








हे जे मेनुकार्ड आहे ते आम्ही वातानुकूलित कक्षात बसलो होतो तेव्हाचं आहे. नंतर  मैत्रिणीबरोबर खाली बसलो तेव्हा पुन्हा फोटो काढला नाही. 





जेवायला जाणार तर भाकरी सोबत खायचे बरेच प्रकार आहेत. 

 काजूची उसळ आणि वांग्याचं भरीत मागवलं होतं. 



सुरुवात मेथी आणि कोथिंबीर वडी आणि थालीपीठ खाऊन केली. थालीपीठ मला भलतच आवडल्यावर ताईने ते डीप फ्राईड असतं असं सांगून माझा भ्रमनिरास केला पण मी काही त्याची शहानिशा केली नाहीये :) शिवाय हे इतक खाऊन पोट इतकं भरलं की दुधी हलवा वगैरे गोडाचं काही मागवलं नाही. हे सगळे पदार्थही तिथे मिळतात. 


खरं तर ही पोस्ट २०१३ पासून माझ्या ड्राफ्टमध्ये आहे. तेव्हा पहिल्यांदी आम्ही इथे जेवायला गेलो आणि त्या दौऱ्यादरम्यान जातच राहिलो. पण त्यावेळी काढलेले फोटो कुठे गायब  कळलच नाही. तेव्हा तर गुळपोळीचा सिझन होता म्हणून  चांगल्या डझनभर पोळ्या इकडे घेऊन आलो होतो. पण खादाडीबद्दल लिहिताना एकही पदार्थ समोर येऊ नये ये भी ये भी कोई बात हुई? 

यावेळी देखील बरेचदा गेलो (मध्ये त्यांनी त्यांची जागा पण बदलली) पण पहिल्यावेळ इतके  फोटो काढले नाहीत. वानगी म्हणून काही फोटो आहेत, तेही ब्लॉगोबासाठी. पण यावेळी देखील तीन चारदा गेले.  एकदा आईबाबा आणि मी गेलो तेव्हा थाळी आणि इतर काही पदार्थ मागवले. मसाले भात मला आवडतो म्हणून तो समोर आला तर फोटोचं कुणाला सुचतंय? आपण अन्नदाता सुखी भवं म्हणून पोटोबाला तृप्त करायचे. 

आताच गणपती गावाला गेले आणि नवरात्राची वाट पाहिली जाते. तेव्हा अजून सामिष खायला सुरुवात झाली नसेल तर किंवा त्या नऊ दिवसांत उपासाचे किंवा मराठमोळे शाकाहारी पदार्थ खायचे असतील तर आता गिरगाव पर्यंत किंवा गेलाबाजार दादरपर्यंतही जायची गरज नाही. बोरीवली पश्चिमेला कट्ट्यावर आलात की तुम्हाला मराठी स्वयंपाकघरात गेल्यासारखंच वाटेल.    


Sunday, August 2, 2015

गाणी आणि आठवणी १९- यारों, दोस्ती बडी ही हसीन है

आज पुन्हा एकदा जागतिक मैत्रीदिनाचा रविवार. खरं तर जवळजवळ  संपतच आला आणि आताच्या ऑनलाईन जगात प्रत्यक्ष भेटणारे मित्र -मैत्रीण कमी झाल्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाणही न बोलता. अर्थात यामुळे काही फरक पडत नाही . कारण जे बंध जेव्हा निर्माण व्ह्यायला हवे होते, ते एकदा निर्माण  झाले की मग अंतराने तसा काही फरक पडत नाही. आज खूप दिवसांनी कॉलेजच्या वर्षांमध्ये ऐकलेलं केकेच्या आवाजातलं "यारो, दोस्ती बडी ही हसीन है" लावलंय. 

तेरी हर एक बुराई पे डांटें जो दोस्त 
गम की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त 
नाचें भी वो तेरी खुशी में 
अरे यारो दोस्ती बडी ही हसीन है 
ये न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है?

मला नाही वाटत मैत्री इतक्या सोप्प्या शब्दात कुणी समजावली असती. केकेचा सुरेल आवाज आणि लेज लुईसने गिटारच्या कॉर्ड्सवर डोलायला लावतानाच अंतर्मुख करणारं संगीत. यातला हा वर लिहिलेला मैत्रीचा भाग मला तेव्हा फार भावला होता आणि आज तोच भाग चटका लावून जातो. 

कॉलेजच्या वगैरे काळात अशी मैत्री मोप मिळाली. मैत्रीत खाल्लेला आणि दिलेला ओरडा याचा कधी कुणी हिशोब ठेवला नाही. माझ्या अभ्यासाताल्या पडत्या काळात माझ्यामागे उभ्या राहिलेल्या माझ्या मैत्रिणी आता सगळीकडे विखुरल्यात. या कडव्यात त्या पुन्हा मला एकत्र भेटतात. 

कामाच्या सुरुवातीच्या वर्षात त्रास झाल्यावर मग चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्याचा आनंद स्टेशनवरच उड्या मारून साजरा करणारा माझा मित्र मला या गाण्यामुळे उजवीकडून जाणाऱ्या गाडीसकट तसाच आठवतो. अजूनही आता न दिसणाऱ्या या उड्या आनंदवार्ता कानावर आली की दिसतात. 

फक्त जवळच्या मैत्रीबरोबर जोडले जाणारे अनेक क्षण या गाण्यामुळे डोळ्यासमोर रांग लावतात. तसं पाहायला गेलं तर अर्ध आयुष्य संपल्यात जमा आहे. आजवरच्या प्रवासात जी माणसं मैत्रीमुळे जोडू शकले, ती नसती तर खरच, क्या फिर बोलो ये जिंदगी है??




Monday, July 13, 2015

दिसामाजी काहीतरी ते लिहावे (नेटके)

ठिकाण होतं बीएमएम २०१५ मध्ये आयोजीत केलेली लेखनकार्यशाळा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपादक आणि लेखक मंडळींकडून शिकायला मिळायची, त्यांना ऐकायची संधी होती. ती कशी सोडायची? ही पोस्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं स्वतःलाच लक्षात राहावं म्हणून केलेला प्रपंच. 


"लमाल" हा एक एलए स्थित ग्रुप लिखाणाच्या निमित्ताने एकत्र भेटतो त्याबद्द्ल थोडी माहिती सांगतानाच कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात ग्रंथालीच्या लतिका भानुशाली आणि मॅजेस्टिकचे अतुल कोठावळे यांच्याबरोबर मायबोलीचे अजय गल्लेवाले आणि नंदन होडावडेकर सहभागी झाले होते. 

लतिका भानुशाली यांनी कमीत कमी वेळात प्रकाशन व्यवसाय, एखादं पुस्तक प्रकाशीत करताना केले जाणारे संस्कार आणि त्याचं मार्केटिंग यावर घेतले जाणारे कष्ट यावर प्रकाश टाकला. त्यांच्यामुळे व्यवसायाचं गणित नाही म्हणणार पण प्राथमिक मेहनत आणि ती प्रोसेस याबद्दल आधी माहित नसलेली माहिती मिळाली. म्हणजे कुठलंही लेखन जेव्हा पसंत केलं जातं त्यानंतर त्यावर सुरुवात, मध्य आणि शेवट यातल्या लेखनावर काही संस्कार जसं कुठे कमी लिहिलं असेल तर त्याचा विस्तार आणि याउलट काही ठिकाणी थोडा आटोपशीरपणा आणावा लागतो. इतरही काही संपादकीय संस्कार करून हे लेखन वाचकांपर्यंत पोहोचावं म्हणून साधारण वर्षभर ते पुस्तक गाजवत ठेवायचं काम प्रकाशनसंस्था करते. त्यानंतर त्या त्या पुस्तकाला स्वबळावर उभं राहायचं, तर ते काम त्या लेखकावर आणि त्याच्या सशक्त लेखनावर असतं. आपलं पुस्तक पुढची वीसेक वर्षे लोकांच्या आठवणीत राहील का ही जबाबदारी एक प्रकारे लेखकावर जास्त असल्याने आपलं लिखाण त्या ताकदीचं आहे का? हे त्या त्या लेखकाने तपासून पहावे असा एक मुद्दा जाता जाता त्यांनी मांडला. साधारण त्यांना अनुमोदन देणारे विचार कोठावळे यांचेही होते. 


"मायबोली" ही मराठी साईट् कशी सुरु झाली त्याबद्दल थोडक्यात मजेशीरपणे सांगून अजय यांनी सध्या वेगवेगळ्या मराठी साईट्स, ब्लॉग्स इथे मराठी लेखन वेगवेगळ्या प्रकारे केलं जातयं याबद्दल समाधान व्यक्त केले. इथे एक दोन प्रश्नांच्या उत्तरांच्या चर्चेत कुठेतरी लेखन सशक्त व्हावं किंवा त्याचा दर्जा वगैरेचा उहापोह होतानाच अजय यांनी अतिशय उपयुक्त मुद्दा मांडला,  तो म्हणजे यात कुठे हे असचं लिहिलं गेलं पाहिजे वगैरे झालं तर मग नवनिमिर्ती कशी होणार? थोडक्यात आपल्याला भावतं तेही लिहावं. 

यानंतरचं सत्र होतं ते जितेंद्र जोशी आणि चिन्मय मांडलेकर या दोघांचं "लिहावे नेटके" याबद्दल. सगळ्यात पहिले म्हणजे ही दोघं खूप मोकळं, जितेंद्रच्या शब्दात अघळपघळ बोलले. प्रेक्षकांना गुंतवून ठेवायची कला या दोघांमध्ये आहे आणि शिवाय यांचं वाचन (आणि लिखाणही) चांगलं आहे हे जाणवत होतं. सुरुवातीलाच जितेंद्रने चिन्मयकडे पाहून,"अरे मोठी मोठी प्रकाशक मंडळी समोर बसलीत आणि आपण काय बोलायचं? पुन्हा आपलं काही प्रकाशीत झालं नाहीये. ते होणार असेल तरी होणार नाही" असं म्हणून मोठाच हशा पिकवला. 


लिहिण्यासाठी खूप वाचलं पाहिजे यावर जितेंद्रचं म्हणणं होतं की, "उत्तम प्रतीचं दूध देण्यासाठी गायीला दूध प्यावं लागत नाही तर चाराच खावा लागतो";  त्यावर चिन्मयचं उत्तर होतं, " उत्तम प्रतीचा चारा खाल्ला तरच उत्तम प्रतीचं दूध येईल." लिहिणाऱ्या नवोदित माझ्यासारख्या लोकांचं दडपण दूर करताना जितु म्हणाला "अरे लिहा रे. तुकारामांनी गाथा लिहिली ती नदीतून वर आली आणि आपण अजून वाचतो. आपलं लिखाण कुठे वर यायला लिहितोय आपण? हवं तर शाईने लिहा म्हणजे बुडालं तर विरघळून जाईल."  चिन्मयने लिखाण ही येताजाता करण्यासारखी गोष्ट नसून त्यासाठी एक बैठक लागते आणि एका जागी शांतपणे बसून लिखाण करावं आणि त्याचबरोबर आपलं लिहिलेलं आपल्याला आवडतं का हे सर्वात आधी तपासून घ्यावं हा मोलाचा सल्ला दिला. तर एक कोपरखळ्या मारत हसत हसत समजवणारा आणि दुसरा आपल्याला वास्तवाचं भान देत स्वनुभावातून शिकवणारं असं हे सत्र संपताना बरचं काही शिकायला मिळालं. सगळ्यात महत्वाचं हे की अशा प्रकारचं स्वान्तसुखाय लिखाण सुरु ठेवायचं की नाही याबद्दल गेले वर्षभर एक द्वंद्वं सुरु होतं ते कुठेतरी थांबलं. 

इतका सुंदर कार्यक्रम बीएमएममध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधीत समितीचे आभार. 


Friday, June 19, 2015

निळी निळी परडी

उन्हाळा चांगला लागला, म्हणजे पोरांच्या शाळा बंद झाल्या की मग डोळे दुरच्या प्रवासाची वाट पाहायला लागतात. त्यात  काही ठिकाणं इकडे आल्यापासून नोंदणीत होती पण जाणं झालं नव्हतं. मागच्या वर्षी आई-बाबांची मदत असल्यामुळे ती यादी पुन्हा हातात घेता आली. या यादीवर अग्रभागी होता "क्रेटर लेक". विकीपेडियावर याबद्दल भरपूर माहिती आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगायचं, तर एका उद्ध्वस्त ज्वालामुखीमुळे तयार झालेला १,९४३ हजार फुट खोल तलाव, जो दरवर्षी पाऊस आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याने भरला जातो. 


आम्ही निघालो आणि आजवर ओरेगावात जाताना दिसणारी गर्द हिरवळ इथेही काही सुंदर वळणे घेत, आमच्या सोबतीला होती. 




हळूहळू चढण दृष्टीपथात यायला लागली. 




जेव्हा पहिल्यांदी या निळाईला डोळेभरून पाहिलं, त्याच क्षणी या ठिकाणी यायचं सार्थक झालं. 


हिवाळ्यात एक बाजू बऱ्यापैकी बंद असते. मात्र उन्हाळ्यात गाडीने संपूर्ण प्रदक्षिणा करायची सोय आहे. 


आम्ही गेलो तेव्हा थोडा अजून न वितळलेला बर्फ दिसत होता. 



विझार्ड आयलंड, हे एक बेटही आतमध्ये दिसत. खाली जाण्यासाठी एक ट्रेकदेखील आहे आणि आतमध्ये बोटिंगची संधी. 




नैसर्गिकरित्या तयार झालेले काही दगडांचे आकार या निळाईवर उठून दिसतात. 


आमच्या प्रदक्षिणेतला हा थांबा मला मायदेशाची आठवण करून गेला. 




या निळाईची भूल पडताना सांज कशी झाली कळलंच नाही. कदाचित सूर्याचाही इथून पाय निघत नसेल. 




Friday, June 5, 2015

छोटी छोटी (पर्यावरण) की बातें

"आमच्यावेळी" ही टकळी सुरु केली की तुम्हाला काय आठवतं? मला आठवतं वर्षातून दोनच वेळा मिळणारा नवा फ्रॉक, शाळेच्या गणवेषात एक स्कर्ट आणि दोन शर्ट्स, एक पावसाळी तुटेपर्यंत किंवा साईज बदलेपर्यंत वापरली जाणारी चप्पल आणि एक उन्हाळी तिचेही वापरायचे नियम तेच, आदल्या वर्षीच्या उरलेल्या पानातून बनवलेली रफ वही, आधीच्या भावंडाने वापरलेली पुस्तकं, हे आणि असं बरचं काही. हे मी अशासाठी लिहिते कारण ही यादी काही मुलं सोडली तरी बऱ्याच जणांकडे सारखीच असायची. त्यामुळे आम्ही काही गरीब वगैरे ठरत नव्हतो, सारेच मध्यमवर्गीय आणि गरजांची कुवतही मध्यमवर्गीयचं. 

मग आमच्याकडे पैसे यायला लागले, कसे ते  पोस्टचा भाग नव्हे पण आम्ही शिकलो, प्रगत झालो का काय म्हणतात ते. मग आमच्या मुलांकडे वरचा आढावा घ्यायचा तर वरच्या प्रत्येक वस्तूला कितीने गुणायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. यातल्या किती वस्तू त्यांना खरंच गरजेच्या आहेत? त्यांचं सोडा, आपल्यासाठी आपण घेतलेल्या वस्तूंची यादी बनवायला घेतली  आणि त्यातल्या कुठल्या कमी केल्या तर आपलं अडणार नाही हे पाहिलंत तर आपण कुठेतरी आपल्या गरज अवास्तव वाढवतोय का?  हा प्रश्न नक्कीच  पडेल. 

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे तर त्यानिमित्ताने एक चितन करायला बसलं तर हे आठवायचं कारण म्हणजे मुबलक पैसा किंवा हवं ते उपलब्ध आहे म्हणून सगळं आपल्याकडे हवं या मोहापायी आपण नकळत पर्यावरणावर किती ताण देतो याकडे लक्ष द्यायची वेळ फार लांब नाहीये. बरं आजवर याकडे सरकार किंवा कुणी इतर माध्यमांनी काही करावं अशी अपेक्षा आपण बाळगतो आणि ते पूर्ण चुकीचं नसलं तरी आपला खारीचा वाटा आपण उचलणार का? 

वरती ते दैनंदिन जीवनातील उदा. द्यायचं कारण हेच आहे की तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांसाठी पर्यावरण दिन म्हणजे काही फार फॅन्सी प्रकारे साजरा केला पाहिजे असं नाहीये. हळूहळू एक एक गरज नियंत्रित केलीत, तरी बराच भर हलका होईल. आपलं योगदान दुसऱ्याच्या दारचा वृक्ष वाढवून देता येईल, तसच आपल्याला लागणारे काही कागद, काही कपडे कमी विकत घेऊनही दोन पाच झाडं कापायची थांबवीत. कुठे जवळपास चालत जाउन एखादं काम करता यावं म्हणजे तेवढाच पेट्रोलच्या साठ्यातलं आपले थेंब वाचावेत. हे आणि असं बरचं काही. बोले तो, छोटी छोटी बातें और सिर्फ ये ही नही बहुत कुछ और भी| जैसे आप सोचे और हो सके तो किसी और को सिखाये|