Thursday, January 31, 2013

पुन्हा पावसालाच.....

रजा घ्यायची ही काही पहिलीच वेळ नाहीं. पण याआधी निदान थोडंफार तरी ब्लॉग प्लनिंग केलेलं आठवतंय. यावेळी मात्र कसला झपाटा आल्यागत मी वागत होते असं आता मागे वळून पाहताना माझं मलाच ़वाटतंय. 

डिसेंबरमध्ये घर बदल आणि मायदेश दौरा यात जेमेतेम चार दिवसांचं अंतर होतं. त्याआधी आणि नंतरची धावपळ, वेगाने झपाटलेल्या मला थोडं थांबायला हवं होतं का? अर्थात काहीवेळा नियती तिचं वेग नियंत्रणही कार्यरत करत असावी बहुतेक.मुंबईतल्या चौथ्या दिवसाच्या अनुभवाने मी स्तब्ध झाले..कुठेतरी आपण थांबायला हवं असं रहेजाच्या आय.सी.यु.च्या बाहेर बसलेल्या मला वाटलं.

याआधी कधीही मी मायदेशात गेले की भेटीगाठींचा भरगच्च कार्यक्रम करत असते.मुंबईच्या आणि थोडं बाहेरच्या माझ्या सगळ्या आप्तेष्ट, मित्रमैत्रीणींना प्रत्यक्ष भेटण्यासाठी मी जमेल तितकं आउट ऑफ द वे टाइपही जुळवणुका त्यात असत. यावेळी त्यातल्या कित्येक भेटी मी फक्त फोनवरून केल्या. अगदी जीवाभावाची दोन दशकांपे़क्षा जास्त जुनी मैत्रीही फोनवरच. जे मी आरामात इथुनही करू शकते.

अर्थात याचा अर्थ इतकंही काही गंभीर करत होते असाही नाही. फक्त वर म्हटल्याप्रमाणे वेग कमी केला आणि थोड्याफार प्रमाणात प्रायरिटीज बदलल्या. 

आता परत आल्यावरचे नेहमीचे सुन्न (की शांत?) दिवस. गेल्या महिन्यातले भले-बुरे अनुभव आठवताना त्यातले काही ब्लॉगवर मांडलेही जातील. कुठलं पहिलं लिहून मोकळं व्हायचं, सुखद की क्लेशदायक? की आहे ते तसंच पर्सनल स्पेस म्हणून कुठल्याशा कप्प्यात ठेऊन द्यायचं याचा विचार करत ही बर्याच दिवसानंतरची पोस्ट अवेळी लिहितेय.

अगदी आत्तापुरता सांगायचं तर सवय तुटलेले इथले थंडीचे दिवस आणि परत आल्यानंतरपासून रोज टिपूस गाळणारं आकाश. जणू काही पुन्हा सगळं पावसालाच सांगायचं..........

Saturday, December 15, 2012

...



लहान मुलांचं आयुष्य म्हणजे जणू एका कळीचंच...ती उमलण्यापर्यंतचा एक सुंदर प्रवास..काही निष्पाप कळ्या मात्र उमलण्याआधीच मुद्दाम खुडल्या गेल्या की बागेला जसं वाईट वाटावं तसं कालपासून झालंय. जी बातमी नुसती ऐकून टीव्हीवर पाहायचा धीर होत नाही त्याबद्दल काय लिहू? ही पोस्ट अकाली खुडल्या गेलेल्या त्या सगळ्या वीस कळ्यांसाठी. ... :(

Tuesday, December 11, 2012

Rest In Peace 832F


येलोस्टोन, प्रत्येक निसर्गप्रेमीला जावंजावंसं वाटणारं जंगल. एकेकाळी तिथला लांडगा नामशेष झाला होता आणि मग पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ यांच्या अथक परिश्रमाने ७० वर्षानंतर म्हणजे ९५ च्या सुमारास कॅनडामधून १४ लांडगे पार्कात सोडले गेले होते. याविषयी डिस्कव्हरीची एक सुंदर डॉक्युमेंटरी सुद्धा पाहण्यासारखी आहे आणि जालावर बर्‍याच ठिकाणी याबद्दल लिहिले गेले आहे. लांडग्याचं "आ...ऊ" पार्कात पुन्हा घुमतंय ही गेले काही वर्षे सर्वच प्राणीप्रेमींसाठी एक चांगली घटना आहे. 

आज हा विषय काढायचं कारण म्हणजे सकाळसकाळी एक बातमी ऐकली ज्याने हे सगळं आठवलं आणि वाईटही वाटलं. ती बातमी म्हणजे या पार्कातला सगळ्यात प्रसिद्ध फ़िमेल लांडगा (याला मराठीत काय शब्द आहे?) एका शिकार्‍याच्या बंदुकीला बळी पडला. ही घटना घडली वायोमिंगमध्ये पण येलोस्टॊनच्या थोडंसं बाहेर. जोवर हे लांडगे पार्कात आहेत तोवर त्यांना अभय आहे पण एकदा पार्काबाहेर माणसांच्या तावडीत सापडला की लांडगाही माणसाचं  भक्ष्य होतो. मग देश कुठलाही असो.

थोडं या प्रसिद्ध लांडग्याबद्द्ल. लमार कॅनयान पॅकची प्रमुख ८३२एफ़ लांडग्यांच्या बिहेवरियल रिसर्चसाठी गळ्याला रेडीओ बांधलेल्या लांडग्यापैकी होती. आपल्या पॅकसाठी शिकार करण्यासाठीची धडाडी आणि पिलांची अतिशय काळजी घेणे हे तिचे मुख्य गूण तिचा अभ्यास करणार्‍यांनी नोंदवून ठेवले आहेत. लांडग्यांना मूळात या पार्कात अशाप्रकारे पुन्हा आणणे आणि मग जी नवी पिढी तयार होतेय त्यांना कॉलर करून त्यांचा अभ्यास करणे हे वाचताना वाटतं तितकं सोप्पं नाहीये. त्यामागे एका मोठ्या टीमचे अथक परीश्रम आहेत. अशा प्रकारे केलेल्या संशोधनातून जी माहिती मिळते त्याने संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी हातभार लागतो.अशा प्रकारच्या हत्येने हे संशोधनाचं कामही पुन्हा नव्याने सुरू करायला लागतो. शिवाय लांडग्यासारखे प्राणी जे या पार्कात पुन्हा आणण्यासाठी इतके प्रयत्न केले गेले आहेत ते अशाप्रकारे गमवल्यावर पुन्हा तेच कार्य करणं हेही तितकं सोप्पं नाही. या वर्षात अशाप्रकारे संशोधनासाठी कॉलर केलेल्या लांडग्यापैकी ८ लांडगे मारले गेले आहेत. हा काही चांगला आकडा नाहीये.

संशोधनाच्या हिट लिस्टवर असणारा एक प्राणी पार्काच्या बाहेर गेल्यामूळे शिकार्‍यांच्या हाती लागणं यासारखं दुर्दैव ते काय? आपण जेव्हाही अशा शिकारी होतात तेव्हा माणसांचा एक बचावात्मक पवित्रा ऐकतो की ते आमच्या जागेवर आलेत. खरं आपण किती अतिक्रमण करून बसलोय याचीही आधी शहानिशा करायला हवी. आणि किती वेळा या प्राण्यांनी माणसांवर प्रथम हल्ला केलेला असतो हेही एक वेगळेच. खरं कारण दडलं असतं ते त्या प्राण्यांना मारून मिळणार्‍या कातडी, दात इ.च्या बदल्यात हाती लागणार्‍या घबाडाचं. ते कधीच उघड होणार नसतं. 

अभयारण्य करून हे प्रश्न खरंच सुटतील का हे एक कोडंच आहे. कारण अभयारण्याच्या सीमा प्राण्यांना शिकवणं कठीणच. त्यातही जर कॉलर असलेला लांडगा, शिकारी डोळेझाक करून खुशाल मारत असेल तर ज्यांना कॉलर नाही त्यांची गचांडी धरायला कितीसा वेळ?


पुन्हा एकदा निसर्ग विरूद्ध माणूस असे वाद रंगतील. ती सगळी चर्चा वाचताना मला आठवतोय मी माझ्या आतावरच्या भ्रमंतीत पाहिलेला एकमेव रुबाबदार जंगली लांडगा आणि आज ही बातमी वाचून आलेल्या आठवणीने अंगावर आलेला शहारा..

जालावरच्या चर्चेतलं लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे "Never kill an animal for doing what it is programmed to do."
May your soul Rest In Peace 832F. 

तळटीप - 

  • यलोस्टॊनमध्ये लांडगा पुन्हा आणण्याबद्दलची रोचक माहिती इथे वाचता येईल. 
  • वरचं लांडग्याचं मोफ़त चित्र साभार.



Wednesday, December 5, 2012

अलाश्काची गमत


हाय..हो मला नं कुणी दिसलं की पहिलं हाय कलायला आव्वतं..पन आज हाय केल्यावर नंतल शगलं शिलियश म्याटल आहे.
आई बोल्ली का तुमाला? ती आनि बाबा आमाला मोथ्या बोतीतून तिथे लांब घेऊन गेले होते अलाश्काला. त्यांना रिलॅक्स का कायतरी व्हायचं होतं आनि फ़िलायचं पन होतं. मला पन बाड इगल बगायचा होता पन तो आई-बाबाला दिशला तेवाच मी कालसीट मदे झोपलो होतो. पन तुमाला माहिते का तिथे खूप सालमन फ़िशी पन होते. तेच बाबाला बगायचे होते.
मग त्यांनी एक कुथलीतली जागा शोधली. खलं त्यांनी नाहीच शोदली कालन त्यांना कुनाला लस्ते विचालायला आव्वत नाई. आईने पाल्क लेंजलला विचालं आनि तिने त्यांना शांगितलं तिथे जा तल हे दोगे लगेच चला तिथे. तली नशीब मी तोपलयंत जागा जालो होतो ते. मग गालीतून उतलल्यावर आई, बाबा, दादा आनि मी माज्या स्तोलरमध्ये अशं निगालो.

बाबाला फ़िशी खूप आवलतात. म्हंजे पालायला पन. आईला आनि आमाला पन आवलतात पन ते खायला आनि आईला तर काहीच पालायला आवलत नाई. खलं म्हंजे मला तो काकाचा डॉगी आवलतो पन आई नुस्ती घाबलते आनि त्यात दादापन म्हनून आमी कदी कदी साशा आंटीकले तिची म्यावी बगायला जातो तल त्याला पन आई घाबलते. खलं तल तो मला ओलखतो. पन जाउदे. आई कुथे मला मासे पालायाला देनाल म्हनून आमी त्या पार्ल्कमदल्या ब्लिजवल उबं लाहून ते क्लॉस कलनाले सालमन बगत बसलो. बाबाने खूप फ़ोतो काडले. आमचे नाई फ़िशीचे. 
मग आई म्हनाली माझा आनि लुषांकचा पन काड नं एक फ़ोतो. त्याने काडला पन त्याला अजून सालमन बगायचे होते आनि आईला वॉक कलायचा होता. दादाला माज्या स्तोललमद्ये बसायचं होतं. मला काय कलायचं होतं ते आता मला आथवत नाई. पन सगल्यांना वेगंवेगं कायतली कलायचं होतं. म्हनून आई बाबाला म्हनाली मी जला तिथे जाऊन बगते बीचवल जाता येतं का? बीच म्हनजे नदीचा बीच...त्याला काय म्हनतात बलं हं किनाला तर तिथे..बाबाने लगेच तिला मला घेऊन जा म्हनून सांगितलं..आई म्हनते तो नेहमी अशी वाटनी कलत असतो. ही दोगं कदी मोथी होनाल काय माहित? 
मग आई आनि मी मस्त निगालो.तिथे खूप हिलवीहिलवी झाली होती आनि थोलं चालल्यावल पायल्या होत्या.तिथेच तो बीचपन दिसत होता. पन मी पलेल म्हनून आई मला म्हनाली  बाबू मी तुजे फ़ोतो काडते मग आपन पलत जाऊ. मी तरी उतलत होतो पन तिला मला हेल्प कलायची नव्हती मग आमी पलत आलो. येताना आमाला एक बुक दिशली. तिते लोकांनी तिते आले म्हनून नाव लिहिलं होतं. 

आईने आमची नावं पन तिथे लिहिली आनि आमी पुले परत त्या ब्लिजवल आलो तर बाबा आनि दादा (आनि हो माजा स्तोलल पन) गायब. आईला वातलं ते पाल्किंग लॉतला असतील म्हनून तिथे गेलो तल तिथे पन कुनीच नाय. आता आई म्हनाली आपन पलत तिथेच ब्र्लिजवर जाऊ. मध्ये लस्त्यात तिने एक दोन आदीपासून लोकं होती त्यांना पन विचाललं  पन कुनीच बाबाला पाहिला नव्हता. आई तली अशी हेल्प घेते बाबाने कुनाआच विचालं नशतं. अशं आम्ही कितीतली वेला ब्लिज आनि पाल्किंग लॉतला गेलो आनि मला आता भूकपन लागायला लागली. सगलं सामान गालीत आनि आईकले चावीपन नाई. 
त्या तिथे कुथलाच फ़ॉलेल्स्ट लेंजल पन नव्हता..आनि आई म्हनाली की सेलफ़ोनला लेंज पन नाई. बापले..मी खलं तर भूक लागली म्हनून पन ललायला लागलो आनि मला  बाबा आनि दादापन पाहिजे होते...मग आई तिथे नवीन लोकं आतमध्ये जात होते त्यांना पन म्हनाली की बाबा दिशला तल पलत पाथवा. तिने कुथेतली जाऊन ती फ़ोनची लेंज आनली (माजी आई इंजिनियल आहे नं.मग तिला लेंज नको का आनता यायला?) तल नेमकं बाबाने फ़ोन उचलला नाई. मग तिने त्याला सांगितलं तू इकलेच ये म्हून. पन किती वेल कोनीच आलं नाई. आता आईपन ललनार होती पन ते काम मीच केलं. 

मग आई म्हनाली आपन परत बीचकले जाऊ. तल त्या लस्त्यावल पन कोनीच दिशलं नाई म्हनून आईने जोलात हाका मालायला सुलुवात केली. मी पन ओलललो "बा.....बा....." "दा......दा..." मग लांबून दादाचा आवाज आला...मग आमी थांबलो तर ते कुथून तली वलून येत होते...आईने मला उचलून घेतलं कालन हाका मालुन मी दमलो होतो नं? आनि मग बाबा आनि दादा पन आमच्याकले आले...खलं म्हंजे बाबा आनि दादा हलवले होते आनि मग त्यांनी आमालाच आमी हलवलो म्हनून सांगितलं...

त्यादिवशी आई बाबाबलोबल अजिबात रागावली नाई. ती फ़क्त म्हनाली चल बोतीवर पलत जाऊया. आनि तो आमचा पहिलाच दिवस होता म्हनून मग त्यानंतल कदीच गाडी लेंट कलुन अलास्काच्या जंगलात फ़िलायचं नाई हे आईने बाबाला शांगितलं आनि बाबा पन हो म्हनाला.मला पन बलं वातलं कालन कालशीतमध्ये शालखं बसन्यापेक्षा बाबाकडे अप्पी बली पलते. 

मला माहिते आईला वातलं जल त्या जंगलात बेअल आला अशता तल? आनि आमी कशं बोलवलं असतं पोलिशाला पन...तिथे अजून थोल्या वेलाने कालोख जाला अशता तल? पन मी आईला शांगितलं मी होतो नं मोथ्याने हाक मालून बोलवायला? आदीच आईने हाक मालायला शांगितली असती तल मग मी आईच्या ब्लॉगवल कशा आलो अशतो? मागच्या वेली दादाने नंबल लावला तेवाच मी थलवलं होतं की मी पन एक गमत शांगायला येनाल आहे..तल ही माजी आनि दादाची गम्मत आहे...अलाश्काची गमत. 

Monday, November 19, 2012

मौनं सर्वथा....


कॉलेजमध्ये असताना एका डायरीत आवडीची वाक्य लिहून ठेवायचे त्यातलं लक्षात राहिलेलं एक म्हणजे "दुःख माणसाला अंतर्मुख करतं. ते समोरच्याचं आपल्याशी असलेलं नातं अधीक दृढ करतं". कॉलेजच्याच आठवणीत रमायचं तर दादरला वजा करणं कठीण. मागेही लिहून झालंय. प्रत्येकवेळी दादरला कुठेही फ़िरायचं, वावरायचं तर एक अनामिक सावली नेहमी आपलं म्हणजे माझ्यासारख्या मराठी माणसाचं संरक्षण करते असं नेहमी वाटायचं. 

गेले काही वर्षे देशाबाहेर असले तरीही दादरची आठवण आली की ती सावली पुन्हा आधार द्यायची. प्रत्येक ट्रिपमध्ये जाणीवपुर्वक शिवाजी पार्कला मारलेली फ़ेरी त्या कधी न भेटलेल्या सावलीचा आधार नेहमीच दाखवायची. ऑनलाइन दादरबद्दल कुठेही काहीही वाचलं की जसं दादरचे रस्ते, गल्ल्या आठवतात तसंच आपसूक आठवतं ते दादरला असलेलं त्या सावलीचं संरक्षण. खरं तर राजकारणात पडायचा शूरपणा न दाखवू शकणार्‍या माझ्या पिढीच्या कुठच्याही मराठी तरूण वा तरूणीला हक्कही नाही आहे त्या सावलीकडे बोट करून दाखवायचा कारण ते नसते तर आम्हाला डोकं वर काढायला निदान मुंबईत तरी संधीच मिळाली नसती. 

त्यावेळी तर माझं कॉलेजही पन्नास टक्के एका विशिष्ट राज्यातल्या लोकांसाठी आरक्षीत; कारण संस्था त्या लोकांची. त्यामुळे काय तुम्ही घाटी असं कुणीही येता जाता आम्हाला सुनावू शकलं असतं पण दादरचा दरारा त्यांचे शब्द गिळून टाकत होता. आम्ही आपल्या परीने ताठ मानेने आमच्याच राज्यात राहत होतो. 

आणि हे सगळं असंच असणार..पुन्हा आपण जाऊ तेव्हाही ती सावली आपल्यासाठी तशीच असणार हे जणू काही गृहीत धरलं असतानाच दिवाळीला शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यादिवशी खरं तर आदल्या दिवशीचा पाऊस पाहताना पुन्हा एकदा अंधारून येताना वाटलं की संपतंय सगळं आणि अचानक सूर्य पुन्हा थोडा वेळ दिसला. पुन्हा बातम्या तपासल्या आणि असं काही नाहीये आणि होईल अजुनही, आधुनिक वैद्यकशास्त्र वगैरे वगैरे आठवलं. आणखी एक दिवस सूर्यही पुन्हा तसाच आला आणि मग ते गृहीत धरणं बरोबर होतं असंच मनातल्या मनात म्हटलं. पण आमच्या शुक्रवारी रात्री उशीराने झोपलो तरी शनिवारी अवेळीच जाग आली..बाहेर खूप अंधारुन आलं होतं. धाय मोकलून आकाश रडत होतं...वर्तमानपत्र न वाचताच ताईला फ़ोन केला आणि तिने म्हटलं "हो अगं ते गेले". 

कधी नव्हे ते बातम्यांच्या चॅनेलचं ऑनलाइन स्ट्रिमिंग पाहायचा प्रयत्न केला आणि माहित नाही का डोकंच बधीर झालं. इतका मोठा आधार गेल्याची भावना सगळ्यांमध्ये असेल असं वाटावं तिथे ओरडून ओरडून काहीतरी बडबड सुरू होती. मला त्या भुंकण्यातलं एक अक्षरही कळण्यासारखं नव्हतं पण कळत इतकंच होतं, की बरेच दिवसांनी लांडग्यांना भक्ष्य मिळालं आहे  आणि तिथेच काही तरसं ओरडताहेत. लांडगे आणि तरसं यांना काय कळणार की शांतपणेही खाता येतं. प्रसंग कुठला आणि तुम्ही कधी भुंकायचं याला काही अर्थच नव्हता. 

कधी कधी वाटतं की ते दूरदर्शनचे दिवस खरंच बरे होते. एकदा दुखवटा आला की खरंच दुःख निदान अंतर्मुख होऊन त्या माणसाचं आपल्याशी असणारं नातं स्पष्ट तरी करता येतं. आणि त्या निमित्ताने होणार्‍या शांततेने खरंच त्या आत्म्याला शांतीपण लाभत असेल. हजारो चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळताहेत ही नक्की आपली प्रगती की वैचारीक अधोगती?

माझं मौन मी माझ्यापाशीच ठेऊन ते स्ट्रिमिंग बंद करून टाकलं. त्यानंतर उरले ते नुसते विचार. दुसर्‍या दिवशी रेकॉर्डेड अंतयात्रा पाहताना माझ्या लाडक्या दादरला इतक्या शोकाकूल अवस्थेत मी कधीच पाहिलं नव्हतं.. ही सोय नसती तर हे अंत्यदर्शन खरंच मला झालं नसतं. आणि ज्या प्रकारे ते आपली मराठीवर अपलोड केलंय त्याने त्यात कुठलाही व्यत्यय येत नव्हता. बहुतेक म्हणून असेल आता निदान दुःखाने अंतर्मुख व्हायची सोय तरी झाली होती.

आधीचा आदला दिवस जे काही जाणवलं नव्हतं ते पद्मजाताईंनी "बहुत जनांचा आधारू" म्हटल्यावर इतकं जाणवलं की डोळ्यातून पाण्याच्या धारा सतत वाहू लागल्या. मी आणि माझा नवरा, दोघं, त्या पूर्ण वेळेत एकदाही एकमेकांशी नजर देऊन बोललो नाही. माझ्याइतकंच तोही रडतोय हे मला त्याचे डोळे न पाहता दिसत होतं. काय असेल हे नातं अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाशी की जे त्यांच्या जाण्यानंतर आम्हाला दादरपासून इतक्या लांब असतानाही जाणवतंय? 

आज पुन्हा एकदा इथे अंधारून आलंय आणि तुफ़ान पाऊस पडतोय.मला नक्की कशाचं वाईट वाटतंय मलाच कळत नाहीये. खरंच दुःख माणसाला अंतर्मुख करतं. ते समोरच्याचं आपल्याशी असलेलं नातं अधीक दृढ करतं.... आणि इथे सांगायचं तर ते नातं लक्षात येईस्तोवर इतका उशीर झालाय की आता काहीच करता येणं शक्य नाही असं उगीच वाटतं. 

ईश्वर त्यांच्या मृतात्म्याला शांती देवो आणि त्यांच्या नजीकच्या व्यक्तींना यातून सावरायचं बळ याउपर माझ्यासारखी एक मराठी व्यक्ती काय मागणं मागणार त्या कर्त्याकरवित्याकडे?

अपर्णा,
१९ नोव्हें.२०१२.

Wednesday, November 14, 2012

गानसंस्कार


आमच्या घरात सकाळी साडे पाचला आई-बाबा उठत आणि साधारण सहाच्या आसपास रेडिओ सुरू होई.सकाळी आठेक वाजेपर्यंत म्हणजे ती राजाभाऊंची श्रुतिका होईपर्यंत मराठी आणि मग हिंदीची बारी.नंतर मग संध्याकाळी पुन्हा ’सांजधारा’ आणि त्यानंतर ’फ़ौजी भाईको की फ़र्माईश’ ते मग रात्रीचं बेला के फ़ूल’ पर्यंत काही न काही वाजत असे...त्यामुळे अगदी लहानपणापासून गाणी कानांवर पडत राहिली.आजही बरीचशी गाणी त्याबद्दलची बाकी माहिती आठवत नसली तरी चाल आणि शब्द अशी आपसूक लक्षात आहेत.....

गाण्यांचं कसं काम करताना ऐकली तरी कामात खंड पडत नाही.आपला हात एक आणि कान एक (आणि मेंदु बहुधा तिसरंच काही) करायला तरबेज होतात.मल्टीटास्कींग म्हणावं का याला? काय म्हणायचं ते असू दे पण बरं बरोबर जमतं, नाही का?? माझं गुणगुणंणं काही वेळा अविरत सुरू असतं...अगदी एखादा कॉन्फ़रंस कॉल म्युट करुन ऐकतानाही एखादी लकेर चुकारपणे येऊन जाते आणि मिटिंगची मरगळ आपसूक जाते...न कळता आम्हा भावंडांवर हा गानसंस्कार करणार्‍या माझ्या आई-बाबांचं मला त्यासाठी खूप कौतुक वाटतं...

मागे एकदा आरुष बराच आजारी होता. त्याच्यासाठी आम्ही दोघं आलटून पालटून सुट्ट्या काढत होतो त्यावेळी त्याला सारखं जवळ घेऊन बसावं लागे. मग बाजुलाच एक प्ले लिस्ट लावून ठेवायचे. तो शांतपणे पहुडला असे आणि मी माझं फ़्रस्टेशन गाण्यामुळे तरी विसरायचा प्रयत्न करायचे. या नादात एक झालं, तो बरा झाल्यावर एके रात्री मला झोपवताना त्या प्ले लिस्टमधल्या काही गाण्यांच्या त्याने फ़र्माईशी केल्या. त्यातलं एक तर चक्क हिंदुस्थानी क्लासिकल, आरतीताईंचं "जा रे जा रे संदेसा"...म्हणजे त्याला न येणार्‍या हिंदी भाषेतलं...मी तर उडालेच..

मग मलाच एक छंद लागला. रोज मी गाडीतून सकाळी मुलांना सोडते त्यावेळात एक गाणं लावायचं आणि आठवडाभर तेच एक गाणं सकाळी वाजवायचं. यात शक्यतो मराठी गाणी मी लावते. कारण मराठी भाषा मुलांना कळते म्हणजे गाण्याचे शब्दही ते ऐकतात. हिंदी गाणी आम्ही फ़िरायला वगैरे जातो तेव्हा असतात त्यावेळी आजकाल मुलं चक्क गोंधळ घालतात म्हणजे कॉलेजमध्ये एखादा विषय पोरांच्या पूर्ण डोक्यावरून जायला लागला की त्यांनी मोठमोठ्याने गप्पाबिप्पा मारायला सुरूवात करावी तसं. इतर वेळी घरी मूड असेल तेव्हा यु ट्युबवरची त्याच्या लहानपणी लावायचो ती बालगीतं पण लावायची म्हणजे अगदीच पुढचं पाठ नको...बालगीतं तर काय असंही मुलं ऐकतात. पण सारखं एखादं गाणं ऐकलं की ते गाणंही त्यांना आवडलं की ते ऐकत राहतात...आणि थोडी शांतही बसतात.अर्थात हे काही औषधाच्या मात्रेसारखं गाण्यांची मात्रा वगैरे नाही पण जोवर लक्षात आहे तोवर आपले शब्द, भाषा आणि अर्थात संगीत परीचयासारखं होऊ शकतं. 

मध्येच मी कामासाठी आठवडाभर बाहेर गेले आणि परत आले तर बाबाच्या राज्यात त्यानी "ढिंग चिका" पण शिकुन ठेवलंय...बाबाने "ढिंग चिका" म्हटलं की "हे हे हे" करतानाचा जोश थोडा वेगळाच. थोडक्यात कानावर पडलेलं लक्षात राहायचं वय आता सुरू झालंय. मग त्यात ते कसंही का असेना....:)

सर्वात जास्त मला आवडलं ते मागे मी जी श्रीधरजींची कार्यशाळा केली त्यातलं एका गाण्यातलं वाक्य आरुषला गुणगुणताना ऐकते तेव्हा...त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की "उन्हात्त पान मनात्त गान" यात त वर जोर आहे..(म्हणून मी ते त ला त जोडून "त्त" लिहिलंय)...आणि छोट्या आरुषचं "उनात्त पान" ऐकताना इतकी गम्मत वाटते की असं ऐकून ऐकून एकेका गाण्याची ओळख करून द्यायचं तंत्र मलाच आवडलंय..

ऋषांकसाठी तर गाण्यांनी मलाच आधार दिलाय कारण तो लहान होता तेव्हा मला एकटीनेच पहिले तीन महिने काढायचे होते. मग मी "रंग बावरा श्रावण"ची सिडी कायम आमच्या बुम बॉक्समध्ये घालून ठेवली होती..त्याच्या झोपायच्या वेळी त्याला पाळण्यात घातलं की मी ती सिडी लावून चक्क स्वयंपाकघरात काम करत बसे..."बाळ उतरे अंगणी"ने सुरू केलेली सिडी साधारण तिसर्‍या गाण्याला माझा बाळ निवांत झोपलेला असे....सीडी संपली की काहीवेळा मी ती पुन्हाही लावे. त्यावेळी ही आरुष कधीकधी मध्येच मोठ्याने "आला किनाला" म्हणत असे. 

मागच्या वर्षी आई-बाबा आल्यावर दिवसा ते दोघा मुलांसाठी गाणी म्हणत आणि काहीवेळा रात्री ऋषांकसाठी एकदा सिडी असं आमचं रूटीन होतं.. त्यानंतर जरा चळवळ्या झाल्यावर त्याने त्या बुम बॉक्सचा डब्बा गुल केला, पण आम्ही ही गाणी आमच्या आय पॅड, आय पॉड वगैरे समस्त ठिकाणी सुखरूप ठेवलीयत..त्यादिवशी एका रिसॉर्टमध्ये साहेब रात्री (की पहाटे) दोनला उठून पुन्हा झोपायलाच तयार नाहीत तेव्हा मी आय पॅडवर तीच गाणी सुरू केली आणि माझा गुणी बाळ थोड्या वेळाने झोपला..

तो झोपताना किती त्रास देतो याचं परीमाण पण लहानपणी गाण्यावर असायचं. म्हणजे तिसर्‍या गाण्याला झोपला तर चांगला..अख्खी सिडी संपून पुन्हा लावायला लागली की मग बाहेर येऊन तसा रिपोर्ट असं आमचं सुरू असतं..या पार्श्वभूमीवर तो बोलायला लागला की त्याला हे गाणं नक्की माहीत आहे का हे जाणून घ्यायची माझी केव्हाची इच्छा होती. मग एके दिवशी झोपायला नेताना मी सहज त्याला विचारून पाहिल,"ऋषांक, आता आपण कुठली गाणी लावायची??" आणि त्याने चक्क त्याच्या बोब्ल्या बोलात "बा..." असं सांगून झोपण्याची अ‍ॅक्टिंग पण करून दाखवली...मला त्यावेळी इतकं सही वाटलं की पुढच्या वेळी पद्द्मजाताई भेटल्या की त्यांचा आवाज जर त्याने ओळखला तरी मला नवल वाटणार नाही..

आता लवकरच ऋषांक दोन वर्षांचा होईल. त्यामुळे त्याचे बोबडे बोल ऐकायला मजा येतेच आहे पण त्यात जर त्याने अशा प्रकारे सारखं ऐकलेल्या गाण्याची ओळख दाखवली की मस्तच वाटतं. सारखं सारखं ऐकून आरूषने एकदा "हे गगनाआआआ" असा सूर लावला त्यातला "हे"चा थोडा अमेरिकन "हेय..."सारखा उच्चार ऐकून हसायला येत होतं तर त्यापुढल्या वाक्यातल्या "सर्व कहाणी?"चं उत्तर ऋषांकने "थावी(ठावी)" असं दिल्यामुळे माझी चांगलीच करमणूक झाली. मी आरुषच्या वेळेस एक घरगुती गाणं बनवलं होतं म्हणजे कुठल्याही प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं नाव घ्यायचं आणि गाण्यातच हा काय करतो? असा प्रश्न विचारुन तो झोपतो असं म्हणायचं. बेसिकली मुलं काहीवेळा झोपायचं सोडून गाणी आणि गोष्टी ऐकत बसतात त्यावर हा माझा घरगुती उतारा होता. तर कधी कधी ऋषांकला म्हटलं की "मला झोपव", की तो मग त्याच्या बोबड्या बोलात "चिव चिव चिमणी काय कत्ते, काय कत्ते? चिव चिव चिमणी झोपते" असं बोलतो ते ऐकायला खरंच फ़ार गोड वाटतं आणि त्यात मग त्याला आवडणार्‍या इतर प्राण्यांचे अ‍ॅडिशन्सही येतात फ़क्त त्या सगळ्यांचे आवाज आ आ असतात म्हणजे आ आ पिगी काय कत्तो, आ आ नायनो (डायनो) इ.इ. 

आतापुरता सांगायचं तर ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकतील, मोठी होतील..मातृभाषा म्हणून मराठी तर त्यांना यायलाच हवी. अर्थात कलेच्या म्हणजे पुस्तकं, नाटकं, गाणी याच्या अनुषंगाने मराठीची गोडी मी कितपत लावू शकेन माहित नाही. पण अशा गाण्याच्या निमित्ताने त्यांना काही चांगले शब्द,गाणी लक्षात राहिली तर ते मला हवंच आहे. आणि थोडंफ़ार गुणगुणूही शकले तर सोन्याहून पिवळं नाही का? 

फ़ार पुढचा विचार नाही पण त्यांच्या आत्ताच्या वयापासून वेगवेगळी गाणी ऐकवणे हे मात्र मी करत राहणार आहे...त्याचं एक कारण मलाही गाणी ऐकत राहायची असतात आणि दुसरं अर्थातच न कळत मुलांवर होणारे गान संस्कार...जसे माझ्या लहानपणी माझ्या आई-बाबांनी नकळत आमच्यावरही केलेत....

आजच्या बालदिनाच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवाचकांच्या अवतीभवती असणार्‍या मुलांना शुभेच्छा देता देता त्यांच्याकडूनही या विषयावरच्या आणखी काही टिपा/अनुभव ऐकायला नक्की आवडतील. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून गाणी ऐकायला शिकवता का? 

Monday, November 12, 2012

आली दिवाळी....


यंदा नोव्हेंबर लागला, पहिला रविवार आला आणि मायदेशात सगळीकडे चाहुल लागली ती दोन आठवड्यांनी येणार्‍या दिवाळीची. त्याचवेळी म्हणजे याच नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी उन्हाळ्यात एक तास पुढे केलेलं घड्याळ एक तास मागे आणलं गेलं.रविवारी तर अगदी एक तास जास्त झोप, हे आणि बरीच कामं एक तास लवकर झाल्याचा दरवर्षीचा अनुभव आला पण खरी कसोटी सोमवार पासून असते. म्हणजे त्या एका तासाने सगळ्यात मोठा फ़रक पडतो तो संध्याकाळच्या वेळेवर. एकतर मी आधीच बरीच कॅनडाच्या जवळ असल्याने तशीही सूर्यकिरणं तिरकी झालेली असतातच त्यात हा एक तास म्हणजे न उगवणारा सूर्य मळभाच्या रुपाने थोडं फ़ार अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत असतो तो साडेचार पाचच्या सुमारास आकाशाच्या पटलावरून गायब होतो आणि काम संपवून बाहेर येईस्तो डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होतो. दिवसाही फ़ार काही प्रेरक वातावरण वगैरे नसतं. पाऊस नसेल त्या दिवशी धुकं आणि मळभ.

या पार्श्वभूमीवर दिवाळीचं माझ्या इथल्या घरात येणं मला सुखदच नाही तर आवश्यकही असतं. घरातली थोडी फ़ार रोषणाई, कंदिल, दिवे आणि यावर्षी घरून आलेला फ़राळ अजून मिळाला नसल्याने वाट पाहून केलेले (आणि थोडेफ़ार फ़सलेले) माझ्याच हातचे फ़राळाचे पदार्थ. आपल्या पद्धतीचे कपडे इकडे मिळत नाहीत म्हणून ती खरेदी नाही आणि खरं तर मुलांना ती वाढतात तसे आणि सिझनच्या हिशेबाने कपडे घेतले गेल्याने आणखी काही नवीन खरेदी अशी नाहीच. जी काही थोडीफ़ार नवी मित्रमैत्रीणी आहेत त्यांना बोलावणं आणि एखाद्या घरचं नंतरच्या शनिवारी होणारं पॉटलक बास हीच काय ती आत्ताची दिवाळी. 

पण तरी याने रोजच्या रुटिन जीवनात जो काही थोडाफ़ार बदल असतो तो या थंडी आणि अंधाराने आलेली मरगळ सारायला मदत करतोच. मला वाटतं माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर यावर्षी उदास व्हायच्या प्रसंगांचा सल असल्यामुळे असेल बहुतेक, निदान यंदातरी दिवाळीचं माझ्या घरी येणं फ़ारच गरजेचं होऊन बसलंय. म्हणजे जणू काही ती माझी कुणी खूप जुनी, गुणाची मैत्रीणच आहे जिला माझिया मनात काय चाललंय ते कळतंय आणि मग ती मला बदल म्हणून हा प्रकाश घेऊन मनातला अंधार दूर करू पाहतेय. सकारात्मक विचारांची सुरूवात म्हणून दिवाळीची आपली वर्षोनुवर्षे असणारी मैत्री वृद्धिंगत करुया असं मीही मग मलाच सांगते.

आवर्जून लवकर उठून केलेली उटण्याची आंघोळ आणि मग लावलेला दिवा. अगरबत्तीचा प्रसन्न वास वातावरण मंगलमय करतोच करतो. मुलं सारखी "दिवाळी म्हणजे काय?" असं चिवचिवत राहतात. त्यानिमित्ताने केले आणि आले गेलेले फ़ोन, शुभेच्छा, फ़राळ आणि खास जेवण. चार दिवस खरंच हवेसे. त्यानंतर लगेच इथे येणारी थँक्सगिव्हिंगची सुट्टी पण मोहवतेय. आह! काही करू नये फ़क्त आपल्या कुटुंबीयांना वेळ देता यावा आणि थोडा विरंगुळा, बास! बाहेर कधी अंधार पडलाय त्याची निदान यादिवसांत तरी खंत नसावी. आणि हे लिहिता दोन्ही देशातले मोठे सण अंधाराच्या पार्श्वभूमीवरच येतात याचं प्रत्येक वर्षी वाटलेलं विशेष. 

माझ्या आठवणीतल्या दिवाळी जिथे साजरी करायचे त्या घरातल्या माझ्या अतिशय प्रिय मैत्रीणीने काढलेला एका फ़ोटो शुभेच्छांसाठी, माझिया मनाच्या वाचकांसाठी खास. काय म्हणता दिसत नाही?  अरे हो सांगायचं राहिलंच की माझ्या पिकासामधली जागा भरायला काहीच अंश शिल्लक असल्याने निदान फ़ोटोसाठी एक जागा शोधत होते. भाडं कमी, डिपॉझिट नको वगैरे अशी म्हणजे आखुडशिंगी, बहुगूणी वगैरा वगैरा तर एकदम लक्षात आलं आपलं फ़ेसबुक आहे की. तर काही दिवसांपूर्वी माझिया मनाचं फ़ेसबुक पेज निर्माण केलंय.ज्या ब्लॉगवाचक मित्र-मैत्रीणींचे कॉंटॅंक्स आहेत त्यांना आग्रहाचं निमंत्रण पाठवलंय ते स्विकारायचं राहिलं असेल तर या ब्लॉगसाठीची तीच दिवाळी गिफ़्ट समजावी आणि ज्यांना ते पाठवायचं राहिलंय त्यांनी अर्थातच संपर्क साधावा हेच आग्रहाचं निमंत्रण. मग तिथले अपडेट्स तुम्हाला आपोआप व्हाया सर्वांचं (सध्याचं) लाडकं फ़ेबु दिसत राहतील. या पेजच्या वापर वगैरे कसा करायचा ते शिकणंच सुरु आहे त्यामुळे तूर्तास एवढंच. इकडे ब्लॉगच्या उजव्या बाजुलाही त्या पेजची फ़्रेम दिली आहे ते खरं तर फ़ोटोवालं विजेट मला लावायचं होतं पण अभ्यास कमी पडला. त्यावर पुन्हा केव्हातरी...

सध्या मात्र दिवाळीच्या रोषणाई आणि फ़राळाचा आनंद लुटूया. तुम्हा सर्वांना ही दिवाळी सूख-समाधानाची, आनंदाची आणि येणारं वर्ष आरोग्यमयी जावो हीच इच्छा.