Tuesday, June 1, 2010

जेटलॅगदेवाची व्रतकथा...

ऐका, ऐका, भाविक भक्तहो जेटलॅगची कहाणी...ही कहाणी वाचल्याने, ऐकल्याने काय होते? जर स्वतः जेटलॅगमध्ये असाल तर थोड्या टिपा आणि मानसिक आधार मिळतो; नसाल तर थोडी करमणूक होते...श्री जेटलॅगदेवाची नावे व रुपे अनेक आहेत.सर्व भूतांच्या ठिकाणी तो वेगवेगळ्या तास, दिवसांच्या रुपाने राहतो. भारतात चार-पाच दिवस, अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर एक आठवडा तर पूर्व किनार्‍यावर काही वेळा आठवड्यापेक्षा जास्त अशा विविध रुपांनी तो सगळीकडे वास्तव्य करुन असतो.त्याला नमस्कार असो. अशा या जेटलॅग देवाची ही कहाणी आहे..
उत्तर अमेरिका खंडात अमेरिका देशात असंच एक भारतीय कुटुंब राहात होतं. इतर कॉमन घरांसारखं एक गोंडस (पण तसं लबाड) बाळ त्यांच्याही घरात होतं.एकदा जेटलॅग देवांच्या मनात आलं आपण त्या कुटुंबाच्या घरात जावं त्याने त्या घरातल्या गृहिणीला थोडा आराम मिळेल, त्यांचं बाळ थोडं जास्त झोपेल आणि तिचा नवराही सगळेच झोपलेत या आनंदात आणखी थोडा जास्त आराम करील..म्हणून जेटलॅगदेवाने त्या घरच्या राजा-राणींच्या मनात शिरण्याची युक्ती केली आणि कंटाळ्याचे रुप घेतले. कंटाळाच तो कुणाला नाही लगेच दिसणार??
दरवाजातच त्यांना राजा-राणींचे आत्ताच ओळख झालेले एक मराठी जोडपं भेटलं.कंटाळ्याचे रुप असले तरी जेटलॅग देव तेजस्वी दिसत होता त्यामुळे या जोडप्याने त्याचे क्षेमकुशल विचारले. तेव्हा कंटाळ्यारुपी जेटलॅगदेवाने त्या जोडप्याने राजा-राणींची पूर्वकथा आणि जेटलॅगव्रताचा महिमा सांगितला. ही राजा-राणी काही वर्षांपुर्वी सारखं भटकत. मायदेशाच्या तसंच देशातल्याही मोठमोठ्या वार्‍या करत. हवाई, वेस्ट कोस्ट अशा लांब-लांब ठिकाणी जाऊन आलं की त्यांना जेटलॅग होई आणि मग काही दिवस ते निवांत आराम करत. अशावेळी घरचं ऑम्लेट-पावही त्यांना गोड लागे. जास्त भांड्याचा पसारा नाही की ग्रोसरीची कटकट नाही..त्यांचे दिवस कसे सुखात जात. पण आता युवराजांच्या आगमनाने त्यांना जेटलॅगव्रताचा विसर पडला आहे. सारखं घरकाम आणि ऑफ़िस यातच ते कष्टताहेत..त्यांना व्रताची आठवण करुन देण्यासाठी मी मुद्दाम येथे आलो आहे.
कंटाळ्याचे बोलणे ऐकुन त्या मराठी जोडप्याच्या मनातही खूप कंटाळा उत्पन्न झाला आणि लवकरच त्यांनी मायदेशाचं तिकिट तेही वन वे काढून आपला कंटाळा साजरा केला.त्यांनी जेटलॅगदेवाचं ऐकलं म्हणून त्यांना तिथे गेल्यावर भरपुर जेट्लॅग झाला आणि ते आरामाच्या पाठी लागले...घरच्यांनी आयतं करुन दिलेलं किंवा बाहेर जाऊन खादाडी करणं एवढंच काय त्यांना काम होतं...
इथे कंटाळा रुपात आलेल्या जेटलॅगदेवांना राजा-राणींनी ओळखलंच नाही. त्यामुळे त्यांनी साधी विचारपूसही केली नाही त्यामुळे त्यांनाच कंटाळून कंटाळारुपी जेटलॅगदेव निघून गेले. पण तरी युवराजांना नातलगांशी भेटवायला राजा-राणी मायदेशी गेले. जेटलॅगदेव आधीच रुसल्यामुळे, तिथे त्यांना इतकं उत्साही वाटलं की त्यांना जेटलॅग झालाच नाही. ते सगळीकडे भटकत राहिले.काय वाट्टेल ते, वाट्टेल तिथे खात राहिले आणि मजाच मजा केली. राणीला तर मध्ये अन्नातून विषबाधाही झाली तरी त्यांनी खादाडीचा हेका सोडला नाही..शेवटी त्यांचा परत जायचा दिवस उगवला. आता मात्र त्यांना आपले पुर्वीचे दिवस आठवले आणि त्यांना प्रचंड कंटाळा आला. पण परत येण्याखेरीज पर्याय नव्हता.
पण त्यांचे पुर्वीचे दिवस त्यांना आठवले म्हणून जेटलॅग देव त्यांना प्रसन्न झाले.परत अमेरिकेत आल्यावर आठवडा झाला तरी ते वेळी-अवेळी झोपू लागले. युवराजांनी तर पहाटे उठायचा कहरच लावला पण तरी घरचं ऑम्लेट-पाव गोड वाटु लागलं, थोडक्यात केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीची गोडी अवीट झाली आणि मायदेशाहून फ़्रोजन करुन आणलेल्या आमरसाचे बाउलच्या बाउल रिते होऊ लागले..संध्याकाळी जेवता जेवता युवराज खुर्चीतच झोपू लागले. राणीला आराम मिळाला आणि या कहाणीसारख्या पोश्टा सुचू लागल्या. युवराजांना कधीही भूक लागु लागली आणि त्यांच्या खाण्याचे नखरे आहेत म्हणण्याचेही कमी झाले. राजांनीही तिन्ही-त्रिकाळ आराम करुन घेतला. आणि असे त्यांचे दिवस मोठ्या मजेत जाऊ लागले.
म्हणून म्हणते, उतु नये, मातु नये, दुरची आणि त्यातही मायदेशाची वारी करायला विसरु नये.जेटलॅग देवाचा महिमा पुरवतो भक्तांची कामना. अशी ही साता उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ-संपुर्ण...बोला जेटलॅगदेवांचा विजय असो...कंटाळा महाराज की जय...

वि.सु.....कुठल्याही व्रतकथेचा आधार हा निव्वळ योगायोग समजावा...किंवा अवेळी उठण्याचे परिणाम या कॅटेगरीत टाकुन मोकळे व्हावे..

33 comments:

  1. >> नसाल तर थोडी करमणूक होते..<

    थोडी? हा हा .. ही तर जबरा करमणूक होती..

    आणि युवराज अजूनही पहाटे उठतात की काय? बापरे..

    बाकी कंटाळापुराणात वीट, वैताग, बोर बरोबर जेटलॅग देवतेचंही नाव टाकायला हवं होतं तर. नेव्हर माईंड, चतुर्थोध्यायात बघू ;-)

    ReplyDelete
  2. हेरंबमहाराज, आपण गुरु आहात कंटाळाअध्यायाचे...ते आपला संगणकदेव बंद पडल्यामुळे माझ्याकडे थोडं कंत्राट आलं आपसूक असं वाटतंय....एक छोटासा प्रयत्न म्हणायचं का?? पण पुन्हा नाही..ही धुरा आपल्याच खांद्यावर बरी....:)
    युवराजांची आजची पहाट जरा उशीरा म्हणजे साडे-पाच होती..आता येईल एक-दोन दिवसांत स्वारी साडे-सातवर अशी आशा....तू जाशील तेव्हा कळेलच तुला....:)

    ReplyDelete
  3. मस्तच... हाहाहा... हेच जेटलॅग देव मागच्या आठवड्यात माझ्यावर अति प्रसन्न होते, पण मी व्रत मोडल एक दिवस सकाळी ६ ला उठून...
    मग रुष्ट झाले आणि निघून गेले, जाता जाता शाप देऊन गेलेत कि भारतात परत गेलीस कि मी अजिबात प्रसन्न होणार नाही, दुसऱ्या दिवशी office ला जाशील लवकर उठून..............:(

    ReplyDelete
  4. हा हा हा...ऑनसाईटवाल्यांचं मला माहित आहे...तिथे गेल्यावर (आणि इथे आले की पण) लगेच घाण्याला जुंपतात...ब्लॉगवर मनापासून स्वागत अमृता....

    ReplyDelete
  5. साठा उत्तरा कहाणी संपूर्ण...जेटलॅग महाराज की जय..
    :) :) :) :)

    ReplyDelete
  6. hehe bhari !! mi yedyasarkhi zople hote vichitr velela, pahilyanda US la ale teva.. atta india trip la dupari assali saNkun peng yaychi.. maja ali ekdam ! :)

    ReplyDelete
  7. हाहाहा! जेटलॅगदेव! अवघड आहे....:)
    मला तेव्हढासा झाला नाही...कारण मी दिवसभर झोप आवरून डायरेक्ट नॉर्मल वेळी झोपलो पहिल्याच दिवशी...पण अर्थात..देवाला रुष्ट करण्याएव्हढा करंटा मी नाही...;)

    ReplyDelete
  8. हेरंबचा इफेक्ट दिसतोय पोस्टवर.. मस्त एकदम.. दिलखुलास!!

    ReplyDelete
  9. मस्त वाटले !
    अलिकडे श्रावणात (तसा वर्षभरात केव्हाच) घरी आईपाशी नसतो..
    त्यामुळे अशा कहाण्या कानावर येणं कमी झालं आहे.

    बायदवे, आताशा तुमची पोस्ट गूगल रीडर मध्ये सगळीच्या सगळी
    न दिसता कणभर चवीपुरती दिसते..
    मुद्दाम केले आहे का ते सेटिंग ?

    ReplyDelete
  10. धन्यवाद बालाजी आणि ब्लॉगवर आपलं स्वागत....

    ReplyDelete
  11. बाबा, हा जेटलॅगवर उतारा आहे खरा पण कशाला उगाच रुष्ट करा उगाच देवाला...:)

    ReplyDelete
  12. @मुंबई, ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जुन लिहिल्याबद्दल धन्यवाद....

    ReplyDelete
  13. महेंद्रकाका, हेरंबचा लॅपटॉप बंद होता नेमकं त्यादिवशी सुचलंय...बहुतेक तिथली ’भटकती आत्मा’ या ब्लॉगवर आली असावी..नाहीतर मी फ़क्त दुसर्‍यांच्या ब्लॉगवर जाऊन हसते आणि गंभीर होऊन माझ्या ब्लॉगवर लिहिते....:)

    ReplyDelete
  14. धन्यु मैथिली...

    ReplyDelete
  15. शार्दुल, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार..
    मीही खूप वर्षे या कहाण्या ऐकल्या नाहीत...

    फ़ीडचं सेटिंग छोटं केलंय म्हणजे मग अशी आपल्यासारखी सुजाण वाचक प्रतिक्रिया पण देतात नं :) शेवटी एका ब्लॉगरला वाचक सरळ ब्लॉगवर आले तर ते हवंच असतं ....:)

    ReplyDelete
  16. हा हा... धमाल झालीये पोस्ट.जेटलॅगच्या एक एक धमाल होत्तातच. आणि काय गं तू आम्लेट आयते खाल्लेस नं? दिनेश प्रसन्न...:) गंमत म्हणजे इथून जेव्हां मायदेशात जातो तेव्हां इतका जेटलॅग होतच नाही. पण तिथून इथे आलो की फारच त्रास. बहुतेक आपले मन मायदेशातून निघायला तयार नसतेच. त्यामुळे ते रुसून-हटून बसते.देहाने इथे आलो तरी जीव तिथेच अडकून राहतो आणि मग परिणाम हा जेटलॅग.:(

    ReplyDelete
  17. ultimate :)), svatahla jetlag nasel(yogya upay yojlyas) ani yuvarajanna jar lagla asel tar ajunch bikat avastha hote, svanubhav! tyamule jetlag devala sharan gelelech bare :)

    ReplyDelete
  18. भाग्यश्री, ब्लॉगवर स्वागत....(आधी जरा गडबड झाली होती म्हणून पुन्हा कमेन्टतेय...) भारतात गेल्यावर दुपारी मात्र छान झोप लागते हे खरंच...(आणि मुख्य मी इतर वेळी कधीही दुपारी झोपत नाही...)

    ReplyDelete
  19. श्रीताई, अगं पहाटेच्या ब्रेकफ़ास्टचं सगळं श्रेय अर्धांगालाच गं....आणि तू म्हणतेस तेच खरंय आपलं मन मायदेशातच अडकलं असतं नं म्हणून इथे आल्यावरच जेटलॅग होतो...बाय द वे, लवकरच तू जेटलॅगदेवाच्या जाळ्यात सापडशील अशी आशा आहे....

    ReplyDelete
  20. मृणाल ब्लॉगवर स्वागत..युवराजवाले राजा-राणी सरळ जेटलॅगदेवाला शरण जातात हेच खरं.....:)

    ReplyDelete
  21. मजा आली वाचताना, आरूष पहाटे उठून बसल्यावर तुमची काय हालत झाली असेल याची मी कल्पना करू शकते.
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  22. सोनाली आभार...अगं नशीब कालपासुन गाडी रुळावर आली आहे.....

    ReplyDelete
  23. धन्यवाद आनंद...आहेस कुठे सध्या??

    ReplyDelete
  24. हा..हा..हा...बोला जेटलॅग महाराज की जय!!

    ReplyDelete
  25. स्पष्ट मत: मला नाही आवडली ही पोस्ट तितकीशी.

    ReplyDelete
  26. संकेत नाही आवडली तरी वाचलीस...:) अरे कधी जमल तर गुरुवारची कहाणी वाच आणि मग ही पोस्ट....कदाचित मत बदलेल....तसंही ही TP पोस्ट होती...

    ReplyDelete
  27. अरे ठीक आहे...म्हणजे अगदी प्रत्येक पोस्ट आवडली पाहिजेच असं नाही...फक्त मी reference दिला...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.