Thursday, May 8, 2014

गाणी आणि आठवणी १६ - ऋतू हिरवा

हे गाणं माहित नाही असा मराठी गानप्रेमी विरळा. वेगवेगळ्या वेळी हे गाणं ऐकलं आणि प्रत्येक वेळी तितकंच भावलं. त्यामुळे या गाण्याची सलग आठवण नाही पण म्हणून त्याला गाणी आणि आठवणीमध्ये स्थान द्यायचं नाही हेही रूचत नाही. 
सगळ्यात पहिले जेव्हा ही कसेट बाजारात आली आणि ऐकली तेव्हाचा आशाताईचा स्वर आणि सुमधुर संगीताचा बाज भावला. यातला कोरसही तितकाच खास. श्रीधरजींचे आभार मानावे तितकेच कमी आणि शांता शेळके यांचेही. तेव्हा आम्ही वसईला राहत असताना वसई गावात एक होतकरू तरुणांचा गाण्याचा ग्रुप होता. मी त्या ग्रुपचं नाव विसरले आहे आणि आता त्यापैकी कुणी माझ्या संपर्कात नाही. पण त्यांनी एक स्थानिक गायकांना घेऊन एक गाण्याचा कार्यक्रम केला होता. त्यात बसवलेल्या अनेक गाण्यात हे गाणं सगळ्यात छान बसलं होतं. सहगायकांनी मूळ गाण्याच्या तोडीचा कोरस गायला होता. मला वाटतं त्या कार्यक्रमाची सांगता या गाण्यानी झाली होती. त्या रात्री तिथून निघताना मन हिरवं झालं होतं. त्यानंतर कधीही त्यातले कलावंत कुठे दिसले की त्यांनी गायलेलं ऋतू हिरवा आठवे. 

मग अमेरीकेत आल्यावर ताईने आठवणीने कसेट पाठवली आणि तो मोसम नेमका वसंत ऋतुचा होता. इस्ट कोस्टचा वसंत म्हणजे हिवाळ्यानंतरचा पाऊस पडून आलेल्या हिरवाईचा महोत्सव. त्यावेळी केलेल्या सगळ्या लॉंग ड्राईवला एकदा तरी हे गाणं ऐकून तल्लीन झालो नाही असं झालं नाही. 

आता आई बाबा आशाताईंचा नवीन अल्बम "साकार गांधार हा" घेऊन आलेत. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहेन पण त्यानिमित्ताने आशाताईंचा या वयातही तरुण असणारा आवाज याचा आईबाबांबरोबर विषय झाला आणि पुन्हा एकदा आधीचा अल्बम म्हणून "ऋतू हिरवा"ची पुन्हा आठवण झाली. त्यांच्या जुन्या आवाजाची तुलना म्हणून नाही पण ऐकावसं वाटलं म्हणून. 
योगायोग म्हणजे आताच वसंत सुरु झाला आहे. तसा सदाहरित सुचीपर्णी वनाचा प्रदेश असला तरी हिवाळ्यात ती झाडं सोडली की बाजूला काड्या आणि रखरखाटच असतो. यंदा इतर वर्षांच्या तुलनेने इथे काय म्हणतात ते "स्प्रिंग चांगला आहे". आजूबाजूला हिरवाई पसरते आहे आणि नेमकं कानात ऋतू हिरवा वाजतंय. या सगळ्या भावना शब्दात पकडणं कठीण आहे. पण आईबाबांबरोबर कुठचा लांबचा प्रवास करून येताना हे गाणं त्याना तल्लीन होऊन ऐकताना पाहणं हीदेखील माझ्यासाठी सुखद आठवण आहे. या प्रवासात फक्त शांता शेळके यांचे शब्द असतात आणि आशाताईंचे आलाप. या गाण्याचा कोरस म्हणजे गाण्याचा प्राण आहे. जर मन कुठच्या कारणाने बेचैन झालं असेल तर मनाला शांत करायचा उपाय म्हणजे हे गाणं आहे. 

मला वाटतं हे गाणं माझ्यासाठी या आणि अशा बऱ्याच आठवणी निर्माण करत राहील. तरीही अधुऱ्या आठवणींची ही पोस्ट माझ्यासाठी खासच. 

2 comments:

  1. सध्या उन्हाळा प्रचंड आहे त्यामुळे ऋतू हिरवा होण्याची आतुरतेने वाट पहात आहोत. आत्ता तरी हे गाणे ऐकून कान गार केले...

    ReplyDelete
    Replies
    1. मे मध्ये (आंबे खात) ऋतू हिरवा व्हायची वाट पाहतोस होय :) होईल होईल. मग पुन्हा गाणं ऐक

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.