Tuesday, August 30, 2011

एका रेसिपीची गोष्ट

मुदलात ’फ़कस्त एक खादाडी’ इतकं महत्व असलेल्या या गोष्टीचा इतका बाउ (किंवा पोस्ट) करण्याइतकं काय झालं हे कळण्यासाठी मला ही गोष्ट सांगण्याआधी थोडं जरा या पोस्टसाठी कारण असलेल्या काही पात्रांचा परिचय करुन देणं आवश्यक आहे.(जमल्यास असतील तिथे लिंकापण द्यायचा प्रयत्न करेन पण नाहीच दिल्यात तर शिव्या पडू नयेत म्हणून एक कंस आधीच देऊन ठेवतेय...)

१. माझी आई - जिच्या वाढदिवसासाठी म्हणून मी हे खास स्वतः काहीतरी नवीन पदार्थ करण्याचं मनावर घेतलं (नाहीतर आई इथे असताना आमचं डिपार्टमेंट खाणार्‍यांचं)

२. श्रीताई - हो तीच ती सरदेसाईंच्या ब्लॉगवर इमाने इतबारे रेसिप्यांचं गाजर टाकुन लांब राहून आमच्यासारख्यांच्या निषेधाची मजा लुटणारी माझी मैत्रीण आणि त्यातुन अगदी अलिकडेच टाकलेली ही पोस्ट..(खरं म्हणजे पात्र म्हणून तिची पोस्टच देणार होते पण मग तिला निषेध करायची ही पोस्टसंधी वाया गेली असती नं...:D)

३ सुहास - हो तोच तो झेल्यांचा..रात्रपाळीमुळे रात्री आणि नेहमीप्रमाणे दिवसा असं चरत राहुन मग वर त्याच्या ब्लॉगवर ते टाकुन आम्हाला जळवण्याची खोड असलेला कार्टा..आता हा कारणीभूत, कारण काल नेमका एक बझ मी टाकला होता त्यावर याने खादाडी पोस्टेची फ़र्माईश करुन नवी खादाडी करायचा किडा डोक्यात सोडून दिला.

४. ऋषांक - धाकटं पिलु वय ९ महिने फ़क्त. ज्याचं आगमन या ब्लॉगवर जाहिररित्या आधीच झालंय. पण मुदलात वरच्या सर्व कारणांपेक्षा याने मला शनिवारच्या पहाटे साडे-पाच पासून उठवल्यामुळे "वेळ नसतो" ऐवजी ’बापरे साडे सातच वाजलेत काय करु?’ मुळे मी ती रेशिपी फ़ायनली करायला घेतली आणि मग ही पोस्ट लिहायला मला पुराव्या (वाचा: फ़ोटु) सकट कारण मिळालं...

आणि लाश्ट बट नॉट द लिश्ट...

५. फ़ॉलोअर्स उर्फ़ नेहमीचे यशस्वी वाचक - काल एकदम लक्षात आलं की सव्वाशे फ़ॉलोअर्स झाले आहेत.मग त्यांना ब्लॉगवरच एक छोटी ट्रिट देऊन जाहिर आभारप्रदर्शन का करु नयेत..म्हणून हे सगळं ब्लॉगवर मांडायचं कारण म्हणजे योगायोगाचा कहर आणि अर्थात मायबाप वाचकांचे आभार मानायची संधी हे आता वेगळं सांगायला नको.



हां तर कुठे आपण होतो ती रेसिपी...वाचली आणि अर्थातच वेगळी असल्यामुळे आवडली..नेहमीप्रमाणे करायलाच हवी (अशा खरं म्हणजे बर्‍याच खादाड्या आहेत लिस्टवर पण...) अशी मनातल्या मनात नोंद करुन ठेवली. अर्थात आईचा वाढदिवस आज असल्याचं लक्षात आलं आणि त्यातही श्रावणी शनिवार म्हणजे तिच्यासाठी काही करायचं तर ते शुद्ध शाकाहारी (नशीब तरी यंदा सगळे उपास नाही करत आहे ते...नाहीतर वादिलाच उपास...) म्हणून विचारचक्र सुरु होती पण तरी काही फ़िक्स होत नव्हतं. शेवटी केक आणि तोही शाकाहारी म्हणून फ़ायनल केलं आणि लढाईला आपलं ते श्रीताईचं डोकं खायला सुरुवात केली. ती पण बिचारी माझ्या फ़ाल्तुतल्या फ़ाल्तु शंकापण अगदी सविस्तर उत्तरं देत होती...म्हणजे याविषयी मी केलेल्या एक मेलचं तिचं खाली डकवलेलं उत्तर पाहिलं तर कळेल.

एका नॉर्मल साईज वाटीला ( आपली मायदेशातली वाटी घेणारेस की इथला छोटा काचेचा बाऊल? ) फ्राय पॅन मिडियम साईज चा घे. छोटा ऑमलेट पॅन लहान पडेल. माझ्याकडेही कॉईलच आहे ना... सो पाच वर ठेव सुरवातीला ... ( मिडियम हाय वर ) आणि सातआठ मिनिटे झाकण ठेव. नंतर झाकण काढून टाक कारण झाकणाचे पाणी पडत राहील म्हणून. केक कॉईलवर ठेवून इकडे तिकडे जाऊ नकोस. पटकन लागू शकतो. हा केक फार झटकन होतो सो समोरच थांब. कडा सुटू लागलेल्या तुला दिसतील आणि वासही सुटेल मग पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेव म्हणजे मधला भाग पक्का शिजेल. ओलसर ( मॉईस्ट ) राहायला हवा पण पिठाचा ओलेपणा अजिबात नको. जनरली केक साईडने पटकन शिजतो आणि मधे ओला राहतो म्हणून पुन्हा एकदा झाकण ठेव. टुथपिकने टोचून पाहा मधला भाग कोरडी निघाली तर झाला. लगेच कॉईलवरून उतरवून थंड व्हायला ठेव. गार झाल्याशिवाय कापू नकोस. काही अडले तर विचार.
माझा पॅन १० इंच व्यासवाला आहे.


आता ही मेल आणि तिची पोस्ट इतकं दोन खिडक्यांमध्ये सुरु करुन मी (वर म्हटल्याप्रमाणे लेकाने लवकर उठल्यामुळे साडे सातलाच) केक करायला बसले खरं तर उभे राहिले म्हणणं जास्त चांगलं ठरेल. म्हणजे आधीच अपार्टमेंटची स्वयंपाकघरं इतकी बेतशीर असतात की त्या मोठ्या स्पार्टेकच्या लाद्या असतात तशा आडव्या तीन आणि उभ्या साडेचार म्हणजे डोक्यावरुन पाणी. त्यात आमच्या किचनमध्ये मुलाला आयत्यावेळी उच्चासनावर बसवलं की आपली कामं होतात म्हणून ठेवलेली हाय चेअर म्हणजे एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली की शेवटपर्यंत उभंच..अगदीच लक्षात आलं तर ती हाय चेअर बसायला घेतली जाते पण अशी नवी निगुतीची रेसिपी असली की कुठं बसायला सुचतंय..असो..



तर नशीबाने लागणारं साहित्य सगळं सोपं आणि नेहमी घरी असतंच पैकी होतं त्यामुळे ते घेतलं. पण तरी तिचं १० इंच म्हणजे नक्की कुठला या प्रश्नाने का कुणास ठाऊक पण डोकं खाल्लं..म्हणजे लहान झाला तर केक उतु जाईल आणि मोठा झाला तर त्याची मारवाडी लोकं करतात तशी रोटली होईल ही भिती म्हणून गुगलुन पाहिलं तर त्यांच्या इमेजेसने इतकं काही कळत नव्हतं..मेले पॅनच्या उलट्या बाजुला दुनियाभरचं काय काय छापलं असतं तसं फ़क्त किती इंच टंकायला काय होतं देव जाणे हा एक जावईशोधही लावला पण तरी पाचेक मिन्टं माथाफ़ोडी करुन माझ्याकडच्या तीन पॅनपैकी मधला निवडला. श्रीताईनेही तस मिडीयम म्हटलं होतं ते पहिल्यांदीच डोळे उघडे ठेऊन वाचुन त्याप्रमाणे का नाही केलं पण माहित नाही बहुतेक सुटीच्या दिवशी खूप लवकर उठावं लागलं की डोकं जरा जास्त चालतं आणि काय?

चला पॅनचा प्रश्न मिटला, रवा,साखर आणि दही भिजवण्यासाठी डोकं कितीही चालवलं तरी काही वेगळं करण्यासारखं नसतं म्हणून नशीब.



त्यानंतर खरं तर चांगला अर्धा तास माझ्याकडे होता. त्यात थोडी ऋषांकची कामं केली आणि आणखी एकदा रेसिपी तिच्या मेलमधल्या सुचना नजरेखालुन घातल्या...म्हणजे आता काय फ़क्त सगळ्या पायर्‍या पाठ व्हायच्या बाकी आहेत इतकं सगळं माहित झालं होतं आणि मी उरलेल्या गोष्टी करायला घेतल्या. इतक्या सकाळी रेसिपी करते म्हणून श्रीताईला अजिबात फ़ोन करायचा नाही हे अगदी पक्कं केलं होतं. झालं एकदा केक पॅनमध्ये गेला आणि गॅस सुरु करुन मी पुन्हा तिच्या पत्रात डोकं घातलं अच्छा समोरच थांब म्हणून घड्याळही पाहिलं आणि पाच मिनिटांनि झाकण ठेवेन म्हणून तेही हातात घेतलं.

झाकण ठेवताना का कुणास ठाऊक थोडा गोंधळ झाल्यासारखा झाला..आणि मी पुन्हा एकदा रेसिपीकडे वळले.बापरे....खतरनाक....लागली वाट....अगदी रन्स काढताना दोघा खेळाडूंना एकाच बाजुला जावं लागतं तेव्हा पुन्हा सुलट बाजुला आउट होण्यासाठी धावणार्‍या खेळाडूला कसं वाटत असेल अगदी तस्संच....म्हणजे झालं असं की रेसिपी म्हणते एक लोखंडी तवा ठेवा आणि त्यावर केकचा पॅन..मी पत्र आणि रेसिपी वाचण्याच्या नादात त्या लोखंडी तव्याला पूर्ण विसरलेच होते..इन फ़ॅक्ट सुरुवातीला जेव्हा मी तिच्या पोस्टवर वाचलं होतं तेव्हा निव्वळ माझ्याकडे असलेल्या लोखंडी तव्याला निदान त्यासाठी तरी वापरता येईल म्हणूनही या रेसिपीला याददाशमध्ये ठेवलं होतं पण तिने मला नेमका त्याचवेळी दगा दिला आणि झालं आता काय म्हणजे उरलेल्या वेळासाठी तवा ठेऊ की या रेसिपीमध्ये डायरेक्ट तवा ठेवला तरी कॉइलचा गॅस असल्याकारणास्तव होते म्हणून नवा शोध लावु या द्विधा मनस्थितीत निव्वळ आईच्या वादिच्या दिवशी प्रयोग नको म्हणून शेवटी रेसिपीच्या मालकिणीलाच विचारण्यासाठी फ़ोन लावला. आणि अक्षरशः दोन मिन्टं पण नाही तिचा जास्त वेळ घेऊन तिची पण झोपमोड नको म्हणून विचारलं, ’मी तवा लावायला विसरले नाहीच लावला तर काय?’ बहुधा उडालीच तिची झोप ’अगं जळून जाईल’ ओके ओके लावते मी आता म्हणून ठेवलाच फ़ोन आणि लगोलग तवा लावला आणि आधी झाकण उघडून केकची सद्यस्थिती पाहिली. तसा फ़ार वाईट दिसत नव्हता म्हणजे तिने तिच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे कडा सुटायला लागल्या होत्या पण रंग जरा करपट दिसायला लागला होता..



आता म्हणजे अक्षरशः आलीया भोगासी वृत्तीने मी पाचेक मिन्टात चेक करेन (किंवा तसंही कुणी उठलं नाही आहे तर परस्पर विल्हेवाट लावेन )असा विचार करुन शेवटी बसले एकदाची...पण रेसिपीच्या मालकिणीला कुठे झोप लागायला..त्यातुन हा केक मी आईला सरप्राईज म्हणून करतेय तर तिला माझी काळजी असणारच..पाचव्या मिन्टाला माझा फ़ोन परत वाजला.

"लावलास का तवा"

"हो गं..पण आता हा झाला कसं कळणार? म्हणजे तुझ्याइतकं केशर नसेल घातलं मी बहुधा..ते मिश्रण होतं तसंच दिसतंय़.."

आता माझं सगळं वाचन सपाट झालंय हे तिलाही कळलं असेल..

"तू टुथपिक घातलीस का?"

"अरे हो राहिलीच...अगं सगळीकडून नीट बाहेर येतेय...आणि वीसेक मिन्टं झाली ना गं..."

"बापरे वीस मिन्टं...तू पहिले तो गॅस बंद कर"

"पण तसंही लोखंडी तवा नंतर तापला असेल नं...मग?? बंद करुन तसाच ठेवु का?"

"अं...ह्म्म....चालेल तसं..पण तू गॅस बंद कर..आणि आता थंड होईपर्यंत बिल्कुल हात लावु नकोस.."

ही अल्मोस्ट धमकीच असणार...."ह्म्म"

"आणि कळव मला कसा झाला ते"

"ओके बाय"...

असो शेवटी हळुहळू घरातली मंडळी उठली...आईला खरंच सरप्राइज होतं....मध्येच तिने कसलातरी वास येतो म्हणून विचारलं...तेव्हा फ़क्त चांगला की वाईट असं विचारुन मी आपलं थोडं चाचपुन घेतलं...पण तिने चांगला सांगितल्यामुळे हुश्श...आता थंडही झाला होता आणि पॅनमधुन सुळकन बाहेरही आला (क्रेडीट गोज टू सुरुवातीचं दणादण गॅसवरचं शिजवणं असं मला वाटतं..) पण आता ही पोस्ट लिहेपर्यंत केकचा कणही उरला नाहीये...एक वेगळा पदार्थ म्हणून सगळ्यांनी आवडीने खाल्लाय.फ़क्त रव्याचा केक मी कधीच केला नाहीये त्यामुळे तो तसा मैद्यासारखा लुसलुशीत नसतो हे थोडं सांगावं लागलं...पण ओव्हरऑल आजची सकाळ धमाल होती...

तसंही निव्वळ आयतं कोण देणार आपल्याला, म्हणून स्वयंपाकघरात प्रयोग करणारे आम्ही दोघं काहीना काही नवे अनुभव (वाचा:शोध) घेतंच असतो..पण आजची गोष्ट मात्र जरा हटके..शिवाय बॅटिंगला मी एकटीच...त्यामुळे लिहुन ठेवावीशी वाटली...

आज सव्वाशे फ़ॉलोअर्स आणि ही पोस्ट वाचणारे नवे-जुने वाचक यासाठी हे फ़ायनल प्रॉडक्ट...आभार....



तळटीप: ही गोष्ट खरं म्हणजे मी ज्यादिवशी हा बझवर सुसंवाद झाला त्यानंतर लगेच म्हणजे २० ऑगस्टला लिहीली होती. पण नेमकं त्याच्या दुसर्‍या दिवशी आम्ही फ़िरायला जाणार म्हणून कधी नव्हे ते वेळेवर कॅमेरा क्लिन करताना बेटर हाफ़ने फ़ोटो उडवले आणि खादाडीची गोष्ट फ़ोटुविना टाकवेना म्हणून थोडं थांबुन आज टाकली आहे...यंज्व्याय...

Saturday, August 6, 2011

मैत्रीचं नातं....

कॉलेजमध्ये असताना बरं असतं, नातेवाईकांची भूणभूण मागे लागली की मग मैत्री हे कसं सगळ्यात सर्वश्रेष्ठ नातं आहे...we can choose our friends इ. गोंडस वाक्यांनी आपण ते अधिक गोजिरं करतो पण खरंच आहे का तसं हे तपासण्याची वेळ केव्हा नं केव्हातरी याही नात्यात येतेच आणि मग महत्वाचं कुठलं रक्ताचं की मैत्रीचं? हा प्रश्न थोडं खिन्न करुन जातो.

मागे माझी एक मैत्रीण अमेरिकेतल्याच तिच्या कामाच्या जागी थंडी, जास्त माणसं नाहीत या आणि अशा अनेक कारणांनी कंटाळली होती. मग मी तिला म्हटले सुट्टी किंवा घरुन कामाचा पर्याय असेल तर माझ्या घरी ये आठवडाभर. आरुषचा जन्म व्हायच्या आधीचा शेवटचा महिना होता म्हणून मीही घरीच होते. मलाही सोबत आणि तिलाही चेंज..अर्थात अगदी आयत्यावेळी नेमकं तिला कामावरुन सुटता आलं नाही आणि ही भेट शेवटी कायमसाठी राहिली. जरी त्यावेळी त्या प्रोजेक्टचा ताबा तिच्याकडे होता तरी तिला कसं निसटता आलं नाही हा प्रश्न मला पडला होता पण मी माझ्याच मनाला समजावलं की तुला सोबतीपेक्षा तिची नोकरी जास्त महत्वाची आहे.

नंतर पुलाखालून थोडं-फ़ार पाणी वाहून गेलं. कंटाळून ती परत मायदेशीपण गेली आणि आता एक दिवस ती पुन्हा इथे एक महिन्यासाठी येतेय असा संदेश आला. तेही कामासाठी नाही तर भाच्याला पाहण्यासाठी मस्त एक महिन्याची सुट्टी काढून.मला पुन्हा एकदा आनंद झाला.म्हटलं आता यावेळी एखाद-दोन दिवसाची धावती भेट इथेही दे. मी तसंही घरून काम करते. अर्थात हे होणार नाही हे मला चांगलंच माहित होतं आणि त्याचं कारण म्हणजे खरं तर मी तिच्या स्थळापासून बरीच दूर आहे आणि इतक्या अवास्तव अपेक्षा मी ठेवल्याही नसत्या.पण...तरी हा पण आहेच...निदान एक फ़ोन इतकी साधी अपेक्षा मात्र मी ठेवून बसले होते...आणि मग जेव्हा तितकाही वेळ तिला मिळाला नाही असं दिसायला लागलं तेव्हा न राहवून मीच फ़ोन केला. मला वाटतं तोवर तिला परत जायलाही एक-दोन दिवस उरले असावेत. का कुणास ठाऊक न कळत मी माझ्या मनात साचलेलं थोडंफ़ार बोलुन गेले. आम्ही चांगल्या मैत्रीणी आहोत त्यामुळे तिनेही मला फ़ोनवरतरी उलट काही झापलं नाही. आमच्या मैत्रीलाही या संवादामुळे कुठलाही धक्का पोहोचला नाहीये. पण एक मात्र खरं मी पुन्हा त्या सुरुवातीच्या we cannot choose our relatives च्या लुपमध्ये गेलेय.

मायदेशात गेलं तर हे अनुभव नेहमीचेच असतात. मागे इथे माझ्या नवर्‍याची एक मैत्रीण आली होती. जवळ म्हटलं तरी दीड तासाचं ड्राइव्ह. पण आम्ही अगदी जाऊन तिला आणलं. नेमकं मुलाचा पहिला वाढदिवस त्यामुळे खूप गडबड होती पण तिला वेळ दिला. त्यात फ़क्त परत जाताना स्वतः जायच्या ऐवजी पार्टीतलं कुणी तिच्याच भागात जात होतं त्यांच्याबरोबर पाठवलं तर तिच्या चेहर्‍यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो तेव्हा मात्र बाईसाहेबांना भेटायला यायला मुंबईतल्या मुंबईत आमचा मुक्काम सेंट्रल-वेस्टर्न असा वेगळ्या लाइनीवर होता तर जड गेलं आणि नंतरच्या मायदेश दौर्‍यात तर स्वतःहून फ़ोन करायचंही सौजन्य नाही. काय म्हणायचं या मैत्रीला?

खूप उलट-सुलट विचार केला की वाटतं, कितीही नाही म्हटलं तरी रक्ताचं नातं म्हणून ज्या काही adjustments केल्या जातात त्या सगळया मैत्रीसाठी किती जणं करतील? अगदी मला स्वतःला इथे खूप कंटाळा येतो म्हणून माझ्याकडे मी जर कुणाला राहायला बोलावलं तर तो येईल? की त्यांच्या सख्ख्या भाऊ-बहिणीकडे ही परिस्थिती असेल त्यासाठी सगळ्या कामाच्या आणि घरगुती adjustments करुन जाईल?? उत्तर स्पष्ट आहे. मग का आपण असं उगाच म्हणतो की मैत्रीचं नातं वेगळंच म्हणून? वेगळं म्हणजे जिथे अपेक्षा जरी नाही ठेवल्या तरी त्यांची पूर्ती करण्यासाठीची तशी गरज नसते असं काहीसं आहे का?

अर्थात सगळीकडेच असं नसतं..म्हणजे वर म्हटलेले प्रसंग आहेत तसेच त्याच्याच विरोधी घडलेल्या घटनाही आहेत..तरीही जितकी जास्त लगबग रक्ताच्या नात्यांसाठी केली जाते तितकं लक्ष काहीवेळा मैत्रीकडे दिलं जातं का? किंबहुना हा आपला मित्र/मैत्रीण आहे म्हणजे नातेवाईकांसारखं तो काही आपल्यावर रागावणार नाही असं थोडं taken for granted मत बरेचदा असतं..आपणही मैत्रीमध्ये तेवढं माफ़ करतो आणि विसरुन पुन्हा मैत्री जोडतो कारण मैत्री ही नेहमी हवीहवीशी असते.

नवनवीन मित्र-मैत्रीणी जोडले जातात. माझ्याकडून ते सर्व माझ्या संपर्कात राहतील असे प्रयत्न मी नेहमीच करते..आता तर इमेल, सोशल नेटवर्किंग साइट्स, नेट, चॅट यासर्वांमुळे संपर्क करणेही सुलभ झालंय. पण तरी कुठेतरी जर कम्युनिकेशन गॅप आली की मग अंतर पडू लागलं की मग ते नातं पुन्हा जोडणं कठीण होतं; तसं होऊ न देणं याचा आपण नेहमीच प्रयत्न करावा असं आजच्या या आंतरराष्ट्रीय मैत्री दिनी स्वतःलाच सांगावंस वाटतं..

लहानपणी एकदा शाळा बदल,मग घर बदल आणि त्यानंतर कॉलेजमध्येही बारावीतलं कुणी माझ्याबरोबर असं नव्हतं. त्यामुळे नाही म्हटलं तरी "लंगोटीयार" का काय म्हणतात ते मला नाहीत. पण तरी आतापर्यंतच्या वाटचालीत भेटलेल्या मैत्रीचा मोठा गोतावळा आहे..हा ब्लॉग सुरु केल्यानंतर ब्लॉगमुळेही बरेच नवे मित्र-मैत्रीणी मिळाले...वेगवेगळ्या वेळी भेटलेल्या या सर्वांचं मोल माझ्यासाठी खूप आहे. त्या त्या काळासाठी त्यांचं माझ्याबरोबर असणं महत्त्वाचं आहे.अशा सर्व मित्र-मैत्रीणींना मैत्री-दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

HAPPY FRIENDSHIP DAY !!!

Wednesday, July 20, 2011

दर्द से मेरा..............


असं म्हणतात, नदीचं  मूळ आणि ऋषीचं  कुळ शोधू नये...यामागे काही वेगळा अर्थ असावा का असं कधी कधी उगाच वाटतं आणि मग एखादी प्रचंड हादरा देणारी घटना घडून जाते...कधी आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असतो कधी दुरून..पण तगमग तीच...दूर असलं की जास्त विचार,जास्त काळजी आणि शरम पण...त्यानंतर आणखी एकदा पुन्हा तशीच घटना घडते आणि मग आपण मागे मागे जातो ...प्रत्येक वेळचे संदर्भ शोधायचा  प्रयत्न करतो...घडलेल्या घटनेचे घाव ताजे असतील तर ही मागे जायची तगमग आणखी वाढते...
सुरुवात होते ती आत्ता ताज्या असलेल्या घटनेचे दुरून पाहिलेले रूप..बापरे इतकं सारं घडून गेलं आणि मी काय करत होते...
तो अख्खा दिवस कामात लक्ष लागत नाही, आपले माहितीतले सगळे ठीक आहेत न आणि अशाच चौकश्या...आणि नाहीत ओळखीचे पण म्हणून काय झालं त्यांचंही एक कुटुंब आहे, आयुष्य आहे, इच्छा सगळं सगळं आहे.......चौकटी मोडताहेत...त्याचं दु:ख दाटून येतंय....आठवडा होतोय.......आणि सगळं जवळ जवळ तसच...विस्कळीत....पुन्हा कधीही काहीही होणार हे माहित असलं तरी न थांबलेलं...न बदलेलं....

लताचा दर्दभरा स्वर उगाच या वातावरण दाटून राहिला आहे असं वाटत राहतं...  

                                     दर्द से मेरा दामन भर दे या अल्ला...
                                     फिर चाहे दिवाना कर दे या अल्ला..

मग पुन्हा आधीची वेळ, लख्ख आठवणीतली........मागच्या वेळी तर अगदी समोरच सगळं घडलं....आपण काय करू शकलो??? काहीच नाही....त्याआधी... पुन्हा दूर...जवळचा मित्र ती गाडी चुकल्यामुळे वाचला....आपण काय करू शकणार आहोत??? काहीच नाही...हे विचार आहेत की छळ सुरु आहे मनाचा स्वत:शी....लताचा सूर एक आर्त मागणी करतो आणि हा छळ वाढतो...

                                    मैने तुझसे चांद सितारे कब मांगे 
                                    रोशन दिल बेदार नजर दे या अल्ला...

त्याआधीची वेळ पहिलीच होती अशी स्वत: तिथे नसण्याची....लताच्या सुराची बेचैनी जास्त वाढते.....

                                    सूरजसी एक चीज तो हम सब देख चुके
                                     सचमुच की अब कोई सहर दे या अल्ला...

त्याआधी जायचं तर एक मोठीच मालिका.....एक दोन ठिकाणी स्वत:ही असू शकलो असतो.....नव्हतो म्हणूनचा निश्वास नाही पण हे असं मागे मागे जाणं आता झेपत नाहीये....धाप लागतेय.....गुदमरायला होतंय.....शेवटी कुणाचाही असला तरी जीवच तो ....तो जायची वेळ अशा प्रकारे का यावी त्यांच्यावर....
                                 
नदीचं मूळ, ऋषीचं  कुळ नकोच शोधायला....हे सगळं का सुरु झालं???नकोय काही कारणं....थांबवा हे सगळं...आसमंत भारून ठेवलेला लताचा स्वर आता ठाम वाटतोय...


                                    या धरती के जख्मो पर मरहम रख दे 
                                    या मेरा दिल पथ्थर कर दे या अल्ला.................................................




Friday, July 8, 2011

वाळूच्या नंदनवनी...

फिरायची आवड दोघांनाही....मिळत नाही तो वेळ....सारखं कामं एके कामं करून कुठे जायचं याच प्लान्निंग पण करता येऊ नये असं झालं की खरं तर आणखी खट्टू व्हायला होतं... पण एखादा दिवस असाही यावा, जास्त नाही फक्त राहायची सोय करावी आणि मग ठरवूया काय पहायचं ते....तसच निघालो यावेळच्या उसातल्या स्वातंत्र्यदिनी उसाटायला..बरोबर दोन छोटी मुलं आणि आईला पण गाडी (कधीकधी ) लागते म्हणून फार लांब नाही फार जवळ नाही...pacific कोस्टात...स्पेसीफिकली सांगायचं तर ओरेगावच्या दक्षिण किनारी...(आयला उसात भटकंती केल्यापासून दिशा, मैल एकंदरीत भूगोल आणि इतर बरेच गोल गोल असलेले विषय पण हातासरशी वेगळे व्हायला लागलेत..)

'फ्लोरेंस" दक्षिण किनारपट्टीतला नितांत सुंदर गाव....तसं पाहायला गेलं तर सगळ्या pacific नॉर्थ वेस्टला निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य आहे...आता पर्यंत ज्या ज्या वेळी इथे भटकलोय प्रत्येकवेळी नवा मोती हाताला लागतो...हा अथांग किनारा आणि त्याच्या प्रत्येक गावी दिसणारं प्रशांत महासागराचं लोभसवाणं रूप..अहाहा....बाकी काही नाही पण इथल्या निसर्गाच्या जाम प्रेमात आहे मी...माझ्या उसातल्या आतापर्यंतच्या वास्तव्यातलं सगळ्यात सुंदर राज्य हेच आहे....निसर्गाने खूप दिलंय आणि तुलनेने नवी वस्ती असल्याने ते बऱ्यापैकी जपलंही गेलं आहे...कुठे जायचं तर कुठेही हे उत्तर जास्त समर्पक ठरेल इतकी विविधता आहे...
यावेळी फ्लोरेंसला यायचं मुख्य कारण शांतपणे घराबाहेर कुठेतरी आराम करणे हे असलं तरी कुठल्याही नव्या जागी गेल्यवर तिथली स्पेशालिटी काय आहे म्हणून थोडा फार शोध होतोच..तसच हॉटेलच्या रूममधल्या माहिती पुस्तिका पाहिल्यावर sand दुनेस च प्रकरण हाताशी लागलं..हॉटेलपासून फार लांबही जायचं नव्हतं म्हणून सकाळी आरामात निघालो आणि पोराटोरांना घेऊन फिरण्याजोगी बगीराईड होती ती करायचं ठरलं...बगी कसली मोठा बगोबाच होता तो आणि त्याचे टायर चक्क विमानाचे होते..आणि तिथे आणखी बरीच ATV मध्ये मोडणारी वाहने दिसत होती...आता उत्कंठा वाढू लागली...

आमच्या चालक कम गाईड बॉबने स्वागताचे दोन शब्द बोलून थोडीफार माहिती दिली..ती ऐकताना समोर गाडीने वळण घेतल आणि हळू हळू वाळू दिसायला लागली...पुढे काय बर असेल....

अबब केवढी ही वाळू....आणि त्यावरून झपाझप जाणारी आमची बगी...

बॉबने सांगितल्याप्रमाणे ही वाळू ग्लेशियर वितळले तेव्हा त्याबरोबर आलीय आणि जगातली (अमरिकेत असं वाचलं तरी चालेल कदाचित...कारण जग या शब्दाची अमेरिकेतली व्याख्या थोडी वेगळी आहे न..) सगळ्यात बारीक वाळू हीच आहे...
त्याच्या मते लाखो वर्षे सूर्य, वारा आणि ओरेगावातला स्पेशल पाऊस यांचा परिणाम म्हणून इतकी बारीक वाळू इतर कुठेही आढळत नाही...
प्रशांत महासागराला समांतर साधारण चाळीसेक मैल पसरलेले हे वाळूचे डोंगर काही काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून  साडे चारशे ते पाचशे फुटापर्यंत उंच आहेत...त्याने आमची गाडी अशा काही डोंगरावरून घसरवली तेव्हा आम्हाला पण ते जाणवलच...आरुषने तर भोकाड पसरून मला शाळेत (वाचा पाळणाघरात ) जायचं म्हणून सांगितल...(भीक नको पण कुत्रा आवर ते हेच का असं त्यावेळी पण माझ्या मनात चमकून गेलं) 


या पूर्ण परिसरात वरच्या फोटोमध्ये दिसतात तशी बरीच तळी आहेत (किती ते आता विसरलेय) आणि समुद्राच्या इतक्या जवळ असूनही यातलं पाणी गोड आहे....(कारण तेच ग्लेशियरच पाणी अशी बॉबची टिपण्णी) 




आता हे असं वाळूचं नंदनवन मिळाल्यावर लोकांनी खेळ मांडला नाही तर नवलच नाही का? वरचा फोटो सरळ आहे ती गाडी वर चढतेय फक्त...




या आणि अशा प्रकारच्या खेळांचा थरार अनुभवायचा असेल तर जायलाच हवे...


आणि जर स्वतः चालवणार नसलं तर ही वरच्या फोटोमधली पिवळी गड्डी आहेच...आमच्या बगोबापेक्षा ही जास्त जोरात जाते त्यामुळे आणखी थरार...
हाच आमचा बगोबा..टायर पाहिलेत किती मोठ्ठाले आहेत ते.....


आणि हा वरचा फोटो म्हणजे ग्रांड फिनाले का काय म्हणता येईल ते..ही बगोबा ट्रीप झाल्यानंतर याच भागच आम्ही विमानातून दर्शन घेतलं...त्यात दिसतंय मैलोन मैल पसरलेलं वाळूचं नंदनवन आणि त्यात धमाल मस्ती करणारी माणसांची बेटं...

Thursday, June 23, 2011

नॉट विदाउट माय डॉटरच्या निमित्ताने

बरेच दिवसांनी वाचनालयात जायला मिळालं आणि कित्येक महिन्यांपासुन यादीवर असलेलं ’नॉट विदाउट माय डॉटर’ घेता आलं..मागे इराणबद्दल वाचलेलं ’माय होम, माय प्रिझन’च्या बाजुलाच हे असावं हा योगायोगच म्हणायचा. हे पुस्तक इतक्या उशीराने वाचणारी कदाचित मी एकटीच असेन..त्यामुळे खरं तर वेगळं काय लिहिणार मी?

८४-८६ काळात घडलेली ही घटना. एका अमेरिकन बाईने आपल्या इराणी नवर्‍याबरोबर दोन आठवड्यासाठी इराणमध्ये जाणं आणि आपल्या पाच वर्षांच्य मुलीसोबत तिला तिच्या इच्छेविरुद्ध अडकावं लागणं...तिच्या वाट्याला धर्म या नावाखाली लादलेले जाचक नियम..अगदी सरळ शब्दात सांगायचं तर कैदच...या कैदेतून लेकीसकट पळु जायचं धाडस करुन ते यशस्वी करण हा साराच प्रवास एक स्त्री म्हणून वाचताना मनावर अनेक आघात करुन जातो....अशा प्रकारे स्रियांना वागवलं जातं आणि कितीतरी जणी अद्यापही अशाच जगत असतील हे कटु सत्य आणखीच विषण्ण करायला लावतं... या घटनेवर लगेचच म्हणजे ८७ साली लिहिलेलं हे पुस्तक मुळात वाचलंच पाहिजे..वेदनेलाही भाषा असते आणि ती वेदना आपल्यापर्यंत पोहोचु शकते हे मागचे काही दिवस मी या वाचनाद्वारे मागचे काही दिवस अनुभवलंय...

खरं तर माय होम माय प्रिझननंतर इराणबद्दलची पार्श्वभूमी आधीच मनात तयार झाली होती. ही घटना तर त्याच्या आधीच्या दशकातली. फ़रक इतकाच ती तिथे इराणमधली राजकीय पार्श्वभूमी होती तर इथे तिथली सांस्कृतिक. हे पुस्तक मी सुरु केलं आणि शेवट त्या माय-लेकींच्या सुटकेत आहे हे माहित होतं तरी सारखं त्या दडपणात आपणच जगतोय असं झालं होतं. म्हणजे मध्येमध्ये त्या दडपणाने होणारी चिडचिड घरात येऊ लागली आणि मग बेट्टी आणि तिची पाच वर्षांची मुलगी मोहताब यांनी हे कसं सहन केलं असेल असं सारखं मनात येऊ लागलं...

शेवटी ती खदखद मनात राहु नये म्हणून मग रोज थोडं वाचलं की त्यात काय झालं हे आईला सांगायला सुरुवात केली. तिने स्वतः आत्ताच मी मागे आणलेलं ’सोन्याच्या धुराचे ठसके" वाचुन तसंही आखाती देश आणि त्यांची संस्कृती याविषयीच्या आमच्या चर्चा कम आपलं किती बरंय हे बोलुन झालंही होतं...त्यामुळे तशाच प्रकारच्या या संस्कृतीचं कंटिन्युएशन असलेलं हे पुस्तक तिने माझ्यातर्फ़े वाचलंच...रोज मी थोडं वाचुन झालं आणि चिंतातुर चेहर्‍याने बसले की "काय झालं गं तिचं?" आणि मग आमची चर्चा..आता हा आमच्या घरातलाच प्रश्न असल्याप्रमाणे काही दिवसांनी नवराही सामिल झाला. त्याला तसंही वाचन करायचा कंटाळाच आहे..पण ती या सर्वातून कसा मार्ग काढते हे त्यालाही डिटेलमध्ये हवं होतं...मी दुपारच्या चहाला आईबरोबर आणि रात्री मुलं झोपली की नवर्‍याबरोबर असं तीनदा हे सगळं जगतेय...तिच्यासाठी प्रचंड सहानुभुती आणि "त्या" सो कॉल्ड रुढींबद्दलचा तिटकारा पुन्हा पुन्हा अनुभवतेय...

जशी मला वाचनाची तशी त्याला चित्रपटांची आवड त्यामुळे माझं पुस्तक अर्धं वाचुन होईस्तो आमच्या इन्स्टंट क्यु मध्ये "नॉट विदाउट माय डॉटर" आला. पण माझं पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय त्याला तो पाहायचा नव्हता..तिचं दुःख,वेदना,तडफ़ड सारं काही सहन करायची माझीही सहनशक्ती संपली होती..त्यामुळे शेवटी ती निर्धाराने मुलीसह घर सोडून अमाल (Amahl) कडे येते, त्यानंतरचं ते पुढे अमेरिकेतल्या तिच्या खडतर प्रवासांचं वर्णन मात्र थांबुन वाचायला मला धीर नव्हता..त्या रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत जागुन मी सुटकेचा निश्वास टाकला...हे सगळं दुसर्‍या दिवशी आईला जमेल तितक्या थोडक्यात सांगितलं आणि मग नवर्‍याला मात्र चित्रपटच पाहायला म्हटलं..

खरं तर हे सगळं पुन्हा उकरुन उद्विग्न व्हायची इच्छा नव्हती पण तरी हा चित्रपटही मी पाहिला. निव्वळ यासाठी की या पुस्तकातलं कितपत त्यात उतरलंय ते तपासायला..ज्यांना या सत्यकथेत खरंच रस आहे त्यांच्यासाठी चित्रपट म्हणजे हिमनगाच्या वरच्या टोकापेक्षा कमी भाग आणि वेदना पोहोचणं वगैरे फ़ार कमी दृश्यात झालंय असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. चित्रपटातली बेट्टी फ़क्त सारखी संभ्रमात असल्याचा चेहरा असलेली वाटते तर खर्‍या आणि पुस्तकातल्या बेट्टीच्या स्वभावाला बरेच कंगोरे आहेत. ती नवर्‍याशी प्रसंगी खोटं नाटक करुन स्वतःला सुटकेचे प्रयत्न करण्यासाठीचा वेळ देते. आपण मुलीला फ़ार लवकर मोठं व्हायला लावतोय का किंवा नाहीच जमलं परत जायला तर कशाला तिला वेडी आशा दाखवा म्हणून आईचं तिचं वेगळं रुप...नंतर नंतर तिची परमेश्वरावर बसणारी तिची श्रद्धा आणि तिच्या प्रार्थनांना आलेलं फ़ळ किंवा तसा योगायोग हे सारं चित्रपटात कळणं कठीणच.....हे सगळं खूप लवकर होतंय आणि काही ठिकाणी काही प्रसंगात ती हे असं का वागते याचं थोडं स्पष्टीकरण जे पुस्तकात मिळतं, चित्रपटात मिळत नाही. चित्रपटाच्य तळटीपेत लिहिण्याप्रमाणे पुस्तकाबर हुकुम चित्रपट नाही हे पुस्तक ताजं वाचलेलं असल्याने जाणवतंच....

एक स्त्री म्हणून हे सारं वाचलं की आपल्याला त्या मानाने बरंच काही मिळतंय असं सारखं वाटत राहातं ...म्हणजे जिथे कमी लेखलं गेलंय आणि जातंय ते नेहमीच जाणवणार पण या 'अशा' देशांमधली भरडली जाणारी स्त्री पाहिली की आपण फ़ारंच बरे आहोत हे लक्षात येतं...म्हणजे पेला अर्धा भरल्यासारखं वगैरे....

माझ्यासारखं कुणी एखादं हे पुस्तक वाचायचं राहिलं असेल आणि त्यांच्यासाठी ९१ मध्ये आलेला चित्रपट हा पर्याय असेल तर त्यांनी पुस्तकच वाचावं फ़क्त हे सांगण्यासाठीचा हा पोस्टप्रपंच....

Monday, June 13, 2011

भागलेला चांदोबा......

मागे कधीतरी मी चांदोबाचं गाणं फ़ुलोरामध्ये टाकलं होतं..त्यानंतर त्या इवलुश्या आयुष्यात अनेकविध गोष्टी,गाणी, प्राणी, वस्तू येत गेले...पण चांदोबा बहुधा जास्त लक्षात राहिला असं वाटतंय...अगदी आजचीच गोष्ट...

रोज झोपताना सर्वात प्रथम "आजीबलोबल झ्योपायच्यं"चं पालुपद सुरु होतं. जास्त करुन तिलाही दोन्ही नातवांना वेळ द्यायचा असतो आणि मला तिला शारिरिक कष्ट जास्त पडू नये म्हणून धडपडायचं असतं..त्यात चांदोबाचं गाणं जास्त लाडकं..आमच्या घरात मला आणि माझ्या आईला असं मध्येच एखादी गाण्याची लकेर घ्यायची सवय आहे...आरुष आसपास असताना चांदोबाच्या गाण्यातलं एखादं वाक्य सुरु करुन सोडलं तर हमखास त्याच्या बोबड्या आणि मोठ्या आवाजात पुढे नेतो...(घरात दोन-दोन लहान मुलं असताना आम्ही तोंड उघडलं की चांदोबा,इंजिनदादा आणि तत्समच पहिल्यांदी नंबर लावतात हे आता कंसात सांगायला हरकत नाही) त्यात नेमकी त्याच्या खेळण्यात एक प्लास्टिकची माशी मिळाल्यामुळे तर काय सोनेपे सुहागा सारखं प्रात्यक्षिक दाखवायचं असतं...मग सुट्टीच्या दिवसांत किंवा पाळणाघरातून परत आल्यावर ती माशी त्याच्या तावडीत सापडलेल्या खाण्यात पडल्यामुळे राहिलेला एक उपाशी चांदोबा आमच्या घरात कायम फ़िरत असतो. आणि आजीच्या आरुषची पापा खाशील का या ऍडिशनला आपला ऋषांकची पापा खाशील का म्हणून एक एक्स्ट्रॉ डब्बा पण जोडला जातो...’हा गाणार’ म्हणता म्हणता कविता करणारच्या कंक्लुजनला यावं लागतं मला इतकं इंस्टंट काय काय सुरु असतं...या तेलात तळलेलं कंल्कुजन म्हणजे चांदोबा ऑल टाइम फ़ेवरिट...

अरे हो ब्याक टु आजचीच गोष्ट.........

आज मात्र पाळणाघरातली दुपारची झोप न घेतल्यामुळे अर्ध जागेपणी, अर्ध झोपेत आमच्या भाषेत सांगायचं तर रुटीन सुरु होतं...शेवटी आंघोळीनंतर ’जय जय बाप्पा’लाच भोकाड पसरल्यामुळे मीच पुढे झाले आणि बाबाकडून ताब्यात घेऊन स्वारीचं आणखी डोकं चालायच्या आत ’चल झोपायला जाऊया’ म्हणून आत नेलं..

तो तर भानावर नव्हताच पण बहुधा मी पण जे काही काम अर्धवट टाकून आले होते त्याच्याच विचारात असावी, म्हणून कुठलं तरी सुचेल ते गाणं आमच्या आतापर्यंतच्या टिपिकल झोपेसाठी हिट टोनमध्ये सुरु केलं..(या टोनला शब्दात पकडायचं मी सोडतेय...घरोघरी याची आपापल्या पिलांसाठी क्लिक होणारी व्हर्जन्स असणार त्यामुळे भावना नक्की पोचतील...)

’मला नीत पकल’ अर्धवट झोपेतली सुचना क्र.१

’बरं बाबा’..रॉकिंग चेअरमध्ये दोघांची बैठक नीट करुन मी पुन्हा आधीचा टोन सुरु केला...

’चांदोबाचं म्हण" झोपाळलेली सुचना क्र.२

’चांदोबा चांदोबा कुठे रे गेला...." पोराने लगेच गुडुप झोपावं म्हणून किंवा स्वतःच्याच तंद्रीत असल्याने डायरेक्ट शेवटच्या कडव्याने सुरु झालेली आई.

"नाई, आधी भागायचं...." झोपाळलेली (???) सुचना क्र. शेवटची...

आईचा मोठा ऑ.......................एक छोटा पॉज आणि अगदी हापिसातल्या बॉसचं पण कधी इतक्या वेळेवर ऐकलं नसेल त्या तत्परतेने "चांदोबा चांदोबा भागलास का................

आई-बाबांवर रुसलास का"ला येईस्तो ऐकु येतो तो संथ लयीतला श्वास..

दिवसभर खेळून दमलेला एक छोटुसा थकला-भागला जीव त्याच्यासाठी आता पुर्वीसारखा वेळ देऊ न शकणार्‍या आईच्या खांद्यावर अजीबात न रुसता झोपुन गेलाय..किती छोट्या असतात काही काही वेळा त्यांच्या अपेक्षा नाही??
 
निदान आज झोपतानाची तरी......:)

Tuesday, June 7, 2011

गाणी आणि आठवणी ९ - रिमझिम रिमझिम...रुमझूम रूमझूम

नवीन गाणी रेडिओवर ऐकायची आणि चित्रहारमध्ये पाहायची..मग आवडली की स्वतःच गुणगुणायला शिकायचं..केबलवाल्याची (आणि त्या रात्री जागरणासाठी घरच्यांची) मर्जी झाली की मग पुसटसा चित्रपट पाहिला तर पाहिला...'१९४२ ए लव्ह स्टोरी' मी पाहिला असावा पण नीट आठवत नाही (आता कुठला चित्रपट मला नीट आठवतो या विषयावर पुना कवातरी)पण गाणी...अहाहा...पंचम पुन्हा एकदा बहरणार अशी आशा असलेली सगळीच एकापेक्षा एक भारी गाणी...

आता इथे डकवलाय तो फ़ोटी त्यादिवशी उन्नतीच्या फ़ेबुला पाहिला आणि एकदम वरळी सी-फ़ेसलाच जाऊन पोहोचले...

आमची इंजिनियरिंगची सुट्टी आणि पावसाळ्याची सुरुवात अशा कॉम्बोमधल्या दिवसांत माझ्या मैत्रिणीने (माझं गुणगुणणं असह्य होऊन बहुधा..:)) ही कॅसेट मला दिली होती..तेव्हा दादाने नुकताच एक वॉकमन मला घरी गाणी ऐकायला घेतला होता...त्यात सारखं लावून ऐकायचे...

त्या पावसाळ्यात मी त्याच मैत्रिणीच्या घरी दादरला चिक्कारवेळा राहिलेय..मग आधी तिच्या काकीच्या स्कुटीवरुन आणि काही दिवसांनी तिच्या बाबांनी तिला घेतलेल्या एम-एटीवरुन भगुभईवरुन दादरकडे सुसाट सुटलेलो आम्ही..मध्ये बांद्रयाला सुरेश वाडकरचं घर लागायचं तिथे तो दिसतो का म्हणून तिला थांबायला सांगायचे ते दिवस....(आता एकेरी बोलते कारण कॉलेजमध्ये आवडीचे कलाकार तो,ती च्या भाषेतच उल्लेखले जायचे) पार्कात थांबता यायचं नाही पण तरी जाता जाता एखादा जिमखान्याचा वडा टाकायला हरकत नसायचे ते दिवस...

पावसांत भिजून घरी गेलो की त्यांच्याकडे कामासाठी तिच्या लहानपणापासुन असणार्‍या बाईंना मस्का न मारता मिळालेला गरम चहा आणि त्याबरोबर काही...नाहीतर त्यांच्याकडे दुपारच्या जेवणावर होणारा एक हमखास पदार्थ म्हणजे कोथिंबिरीचा भगरा (कोथिंबिरीत बेसन घालून त्या करायच्या) आणि संध्याकाळी तिच्या आजीकडे सामिष जेवण...बटर चिकन करणारी आजी मिळाली म्हणून मी तिचा हेवा करायचे...:)

राहायचा बेत असेल त्या दुपारी हमखास वरळी सी-फ़ेसला जाणं व्हायचं.मी स्वतः एम-एटी चालवायला तिथेच शिकले...तिनंच शिकवलं....माझं लर्निंग लायसंस नसताना...मामा लोकांना कधीही आमचा संशय आला नाही..मग घरी आलो की पुन्हा बाहेर पाऊस आणि आत 'रिमझिम रिमझिम' ऐकत बाहेर पाऊस पडताना पाहायचे ते दिवस...तिच्या घरचा मुक्काम संपला की कधीकधी तिला पुन्हा माझ्या घरी राहायला (किंवा सोडायला) घेऊन जायचे...पण एकटं परत जायची वेळ आली की ट्रेनमध्ये गर्दीतही फ़ार एकटं वाटायचे...मग परत घरी पोहोचलं की पुन्हा बाहेरचा पाऊस बघताना "आर डी आता बघ कसा वर येतो" म्हणणारा दादा आणि तीच मैत्रीणीने दिलेली कॅसेट....

आताही गेले काही महिने सतत पाऊस पाहातेय..पण तो 'बादल की चादरे ओढे है वादिया' फ़िल इतके दिवस येत नव्हता तो या एका फ़ोटोने आला त्याबद्दलची ही छोटी आठवण....



फ़ोटो...मायाजालावरु साभार