Monday, May 30, 2011

जय हो ब्लॉगिंग

आठवणींची गर्दी खूप वाढायला लागली आणि त्या प्रत्यक्षात सांगण्यासारखी माणसं दूर दूर जाऊ लागली तसं या आठवणींची साठवण करण्यासाठी हा ब्लॉग सुरु केला. आपल्याला लिहिता येतं म्हणून नव्हे किंबहुना ते अजुनही लिखाण कॅटेगरीत मोडत नाही पण लिहिलं की मनाला बरं वाटतं..कधीतरी असंच एखादं पान उघडलं की तो दिवस,ती घटना पुन्हा अनुभवली जाते..मग हळुहळु आठवणीतली गाणी, मुलांच्या गप्पा, वाचलेलं पुस्तक, पाहिलेला चित्रपट सारंच ब्लॉगवर येऊ लागलं.आपल्या साध्यासुध्या आयुष्यातही लक्षात ठेवण्यासारखं किती आहे याचा जणू काही साक्षात्कारच झाला.

सुरुवातीला एकटीने सुरु झालेल्या या प्रवासात मग आपसूक सोबती मिळत गेले. काही जणं अगदी प्रत्येक पोस्टवर आवर्जुन प्रतिक्रिया देणारे, नाही लिहिलं तर सगळं ठीक आहे नं म्हणून काळजी करणारे,अगदी प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी असं लिखाण नसलं तरी जमेल तेव्हा कौतुकाचे शब्द घेऊन येणार्‍या देशोदेशीच्या व्यक्ती आणि त्यांचेही तितकेच विविध विषयांवरील मराठी ब्लॉग..

आता आणखी एक सवयही लागली ती म्हणजे इतर ब्लॉग वाचण्याची,जमेल तसं प्रतिक्रिया द्यायची,कामाच्या धबडग्यात नाही जमलं तर घाऊकपणे एक एक ब्लॉग वाचुन ब्लॉगवाचनाचा कोटा पूर्ण करायची. या सर्व ब्लॉग मित्र-मैत्रीणींचा समुह म्हणजे माझ्यासारख्या परदेशात राहणार्‍या व्यक्तीला मायबोलीत व्यक्त होण्यासाठीचा हक्काचा मंचच जणू..

पण हे नातं फ़क्त एकमेकांच्या ब्लॉग ओळखींपुरता मर्यादित न राहता या पलिकडे ब्लॉगविश्वात काही घडावं असं मुंबईत राहणार्‍या माझ्या मित्र-मैत्रीणींनी फ़क्त ठरवलंच नाही तर प्रत्यक्षातही आणलं..योगायोगाने मागच्या मे मध्ये माझाही मुंबई दौरा होता त्यामुळे मुंबईच्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्याला हजेरी लावायचं भाग्य मलाही मिळालं.या मेळाव्यामुळे कित्येक चेहरे आजवर फ़क्त ब्लॉगमुळे माहित होते त्यांच्याशी ओळख झाली. इतरही चर्चा तिथे झाल्या आणि ब्लॉगिंगविषयी जास्त माहिती मिळाली.

कौतुकाची गोष्ट म्हणजे सलग दुसर्‍या वर्षी मुंबईला ब्लॉगर मेळावा भरतोय. येत्या रविवारी ५ जून २०११ रोजी दादर, मुंबई येथे सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात हा मेळावा आयोजित करण्याचे ठरवले आहे.त्या निमित्ताने मराठी ब्लॉगर भेटतील आणि ब्लॉग जगतातल्या समस्या आणि इतर विषयांवर चर्चा होईल. यावर्षी मेळाव्याला जाऊ शकत नसल्याची खंत आहेच पण त्याची कसर मंडळ तत्परतेने अहवाल आणि फ़ोटोंनी भरुन काढील याची खात्री आहेच...

या मेळाव्याला जाणार्‍या सर्व ब्लॉगदोस्तांना मनापासुन शुभेच्छा...जय हो ब्लॉगिंग....

12 comments:

  1. वि विल मिस यू .......

    ReplyDelete
  2. मागच्या वर्षी आपण भेटलो होतो, खुप छान वाटलं होत. खुप काही दिलंय ह्या ब्लॉगिंग ने.... जय हो ब्लॉगिंग !!
    विल मिस यु ऍप्स... !!

    ReplyDelete
  3. जय हो ब्लॉगिंग :D :D

    वि.सु.: खादाडीचा उल्लेख करायला विसरलीस आहे ;)

    ReplyDelete
  4. एकच नावेतून प्रवास करणारे आपण.. त्यामुळे जास्तच आवडली पोस्ट !

    ReplyDelete
  5. सागर खरं तर सगळं मीच मिसणार आहे...

    ReplyDelete
  6. सुहास यावेळी आयोजकांमध्ये तू आहेस. तेव्हा सर्वात जास्त व्यस्त तुच असशील. तुझ्या या अनुभवबद्दलही कळव...

    ReplyDelete
  7. योगेश, मागच्या वेळी परत आल्यावर खादाडीवर चांगलीच पोस्ट लिहिली होती म्हणून पुन्हा निषेध कशाला घ्या...काय?

    ReplyDelete
  8. हेरंब लाइक माइंड्स...ही पोस्ट लिहिताना तुझीच आठवण झाली होती...

    ReplyDelete
  9. एकच नावेतून प्रवास करणारे आपण.. त्यामुळे जास्तच आवडली पोस्ट ! हेरंब+१००

    जय ब्लॉगिंग!

    ReplyDelete
  10. खरय ग श्रीताई..मी एका मेळाव्याला जाऊन आलीय पण तू आणि हेरंबच राहिलंय...
    हा पण योग जुळून येईल अशी आशा करूया काय...उम्मीद पे दुनिया कायम ...:)

    ReplyDelete
  11. भारतातच असूनही मुंबई-पुण्यापासून दुर असल्यामुळं मलाही हाच अनुभव येतो.. पहिल्या मेळाव्यात तुझ्याशी मस्त गट्टी जमली होतीच.. या मेळाव्याला मीही हजर नव्हतो.. परत एकदा जमवायलाच हवे.... हेरंब आणि श्रीताईसह....

    ReplyDelete
  12. >>पहिल्या मेळाव्यात तुझ्याशी मस्त गट्टी जमली होतीच ...अगदी रे...
    >> परत एकदा जमवायलाच हवे.... हेरंब आणि श्रीताईसह....
    सुन रहे हो न लोगो....

    आनंद तरी मी तुला ओरेगावला मेळावा करण्याबद्दल म्हटलं होतं..विचार करून ठेव म्होरल्या टायमाला.. इथली आम्ही तिघ, तू आणि...येउद्यात अजून एक एक...:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.