Friday, August 24, 2012

खिडकीपासची चिमुरडी "तोत्तोचान"


पहिलीत शिकणारी एक छोटीशी जपानी मुलगी. तिच्या वयाला साजेशी खोडकर बरं का? शाळेच्या वर्गात तास सुरू असताना तिला मध्येच खिडकीतून दिसणारे बॅंडवाले आणि त्यांना हाक मारायची तिची सवय किंवा मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता?" असं विचारणं. परिणाम शाळेतून काढून टाकलं जाणं. कसं होणार आता असा विचार करता करता आपण तिच्याबरोबर पोहोचतो तिच्या नव्या शाळेत. हिची नवीन शाळा म्हणजे "तोमोई" कशी असेल आणि तिथे ही मुलगी नव्याने आपलं शालेय जीवन सुरू करताना आलेले अनुभव कसे असतील या पार्श्वभूमीवर जपानची एक आगळीवेगळी शाळा एक वेगळं विश्व घेऊन आपल्यासमोर येते. मूळ जपानी लेखिका "तेत्सुको कुरोयानागी" ही ती वर उल्लेखलेली पहिलीतली मुलगी "तोत्तोचान" आणि या सुंदर पुस्तकाचा तितकाच ओघवता अनुवाद आपल्यासाठी केलाय "चेतना सरदेशमुख गोसावी" यांनी. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाने केवळ पन्नास रूपयात उपलब्ध करुन दिलेलं हे पुस्तक मूळ लेखिकेने म्हटल्याप्रमाणे अगदी ५ वर्षांच्या मूलांपासून ते १०३ वर्षांच्या लोकांपर्यंत अगदी सर्वांसाठीच आहे. 


पाच वर्षांच्या आपल्या चिमुरडीला नव्या शाळेत नेताना तिच्या आईबरोबर झालेल्या मजेदार संवादांनी हे पुस्तक सुरू होतं. बरं नव्या शाळेचं प्रयोजन अशासाठी की आधीच्या शाळेतून हिला काढून टाकलंय. त्यामुळे आईच्या जीवाची आपल्या मुलीचं कसं होणार याची घालमेल तर लेक मात्र काल गुप्तहेर व्हायचं ठरवलं होतं आणि आज मात्र तिकिट कलेक्टर व्हावं का या गहन विचारात. मध्येच तिच्या सुपीक डोक्यात तिच्या कल्पनेतली तिकिट विकणारी जी खरी गुप्तहेर असेल असं काहीसं झालं तरची कल्पना आणि शाळा यायच्या आधीपर्यंत हे सगळं डोक्यातून जाऊन त्याची जागा "रस्त्यावरून जाहिरात करत जाणारे बॅंडवाले" यांनी घेतलेली असते. हेच ते आधी उल्लेख केलेले बॅंडवाले. या बॅंडवाल्यामुळे खरं तर आईला तिचं आधीच्या शाळेतलं खिडकीतून बॅंडवाल्यांशी बोलणं न आठवलं तर नवलच. त्या शाळेतून काढलेल्या असंख्य कारणांपैकी हेही एकच. आपण तिच्या आईच्या घालमेलीत अडकलो असतानाच तिच्यासारखंच बाकीची छोटी मुलं कसंकसं डोकं चालवत असतील असा विचार करत खुदकन हसतो. वाचता वाचता हळूहळू आपणच तोत्तोचानच्या वयाचे होतो. म्हणजे काय हरकत आहे नं चित्र काढता काढता झेंडा काढायला जागा पुरली नाही कागदावरून डेस्कवरची जागा व्यापली तर किंवा तास सुरू असताना मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता आहात?" म्हणून विचारणं. अगदी प्रत्यक्षात नसेल पण आपण पहिलीच्या वर्गात असताना हे असं सगळं भरकटायचं कदाचीत आपल्याही बाबतीत झालं असेल.

फ़क्त आपण एका टिपिकल शालेय जीवनाचा भाग होऊन राहिल्याने असं स्वच्छंदी मन नंतर कुठेतरी हरवून आपणही "क ला काना का" गिरवीत जे इतरांनी वर्षानुवर्षे शाळेत जाऊन केलं तेच करून नंतर मग तीच ती दहावी आणि पुढचं शिक्षण, नोकरी या चाकोरीत अडकलो असू. तोत्तोचानचं नशीब इतकं की तिला अशा शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि त्याहीपुढे जाऊन म्हणायचं तर तिच्या देशात अशी एक शाळा होती जिथं पाठ्यपुस्तकमुक्त अभ्यासक्रम ठेऊन मुलांना मुक्त पद्धतीने आणि त्यांचं भावविश्व खुलेल असं वातावरण होतं.

दोन झाडांच्या खांबांचं गेट आणि आगगाडीच्या डब्ब्यांचे वर्ग असणारी शाळा कुणाला आवडणार नाही? शिवाय बाकीच्या शाळांपेक्षा वेगळं म्हणजे इथे दिवसाचे तास विषयावार ठरलेले नसत. सकाळी बाई त्या दिवसात काय काय करायचं त्याची यादी करुन मग मुलंच आपलं आपलं काय करायचं ते ठरवत. त्यामुळे एकाच वेळी कुणी निबंध लिहित असे तर कुणी गणित सोडवी. यामुळे शिक्षकांना मुलांचं निरीक्षण करता यायचं आणि त्यांचा विचार करायची पद्धत अधिक जवळून समजून त्यांना मार्गदर्शन करणं सोपं व्हायचं. तर मुलांच्या बाबतीत त्यांना आवडत्या विषयाने सुरूवात करायला आवडे आणि नावडत्या विषयासाठी अख्खा दिवस असे. त्यामुळे कसंबसं का होईना सगळं पूर्ण व्हायचं. सगळा अभ्यास स्वतंत्र करायची सवयही लागे आणि हवं तिथे शिक्षकांची मदतही घेता येई. त्यामुळे विद्यार्थी नुसतंच बसून ऐकताहेत असं नसायचं. 

शाळेच्या पहिल्याच दिवशी तोत्तोचानची ओळख यासुआकी यामामोतो नावाच्या एका मुलाशी झाली. त्याला पायाला आणि हाताला पोलिओ झाला होता. तोत्तोचानसाठी हे नवीन होतं. पण पहिल्याच दिवशी झालेला हा मित्र नंतर तिच्या मदतीमुळे आयुष्यात पहिलं आणि शेवटचं झाडावर चढतो तो प्रसंग पुस्तकात वाचताना आपण नकळत त्या दोन छोट्या मित्रांसाठी हळवं करतो. हाच यासुकीचान जातो तेव्हाचा तोत्तोचानचा भाबडेपणा आपल्याही गालावर अश्रू ओघळतो. 

शाळा म्हटली की आपल्या मनात अभ्यासाव्यतिरिक्त आणखी येतं ते म्हणजे शाळेत एकत्र खाल्ला जाणारा डब्बा. तोमोईचा नियम होता की रोज काहीतरी डोंगरावरचं आणि काहीतरी समुद्रातलं आणायचं. म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर धान्य किंवा भाज्या आणि प्रथिनं. किती सोप्या शब्दात हे कोबायशींनी मुलांना शिकवलं. शिवाय ते स्वतः आपल्या पत्नीबरोबर मुलानी काय आणलंय हे पाहायचे. त्यात एखाद्या मुलाकडे यातला एखादा प्रकार नसेल तर त्यांची पत्नी ती भर घालत असे. त्या कोबायशींबरोबर एक माशांच्या सुरळ्यांचं आणि एक बटाटाच्या कापांचं ताट घेऊन फ़िरत. त्याचप्रमाणे प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खायचं एक गाणंही त्यांनी बनवलं होतं. जे रोज गाऊन मग जपानीत कृतज्ञता व्यक्त करून हसतखेळत जेवणं व्हायची.

अशा या आगळ्यावेगळ्या शाळेतले तोत्तोचानचे अनुभव वाचणं आपल्याला तिच्या बालपणात घेऊन जातो. एकदा तोत्तोचानचा बटवा संडासात पडतो त्यावेळी तिला शांतपणे तो काढायची परवानगी द्यायचा प्रसंग असो किंवा तिला वीस पैसे देऊन एका भोंदूबाबाकडून आणलेल्या सालीचा प्रसंग असो, या शाळेने तिच्यासारख्या एका द्वाड ठरवलेल्या मुलीला तिचं मन सांभाळून घेऊन तिच्यावर केले जाणारे संस्कार आपसूक नजरेत भरतात. एका प्रसंगात मोठं झाल्यावर याच शाळेत शिकवायचं वचनही ती कोबायशींना देते.

छोट्या छोट्या गोष्टीतून या शाळेचे मुख्याध्यापक कोबायशी यांनी लहान मुलांशी कशी नाळ जोडली आहे याचा पदोपदी प्रत्यय येतो. लहान मुलांचं भाबडं जग तसंच ठेऊन त्यांना छोट्या छोट्या शिकवणूकी द्यायची पद्धत मुलांना कडक शिक्षा करणार्‍या इतर पद्धतींपेक्षा ती खूप वेगळी आहे हेही लक्षात येतं. उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्या मुलांना एकत्र पोहायच्या तलावावर कपड्यांचं बंधन न ठेवता पोहायचं स्वातंत्र्य देताना त्यांना एकमेकांच्या शरीरांकडे निकोपपणे पाहायचा दृष्टीकोन देणं हे फ़ारच कौतुकास्पद आहे. जसं यामुळे मुलामुलींच्या शरीरात काही विकृत कुतूहल असायचं टळू शकतं तसंच या शाळेत काही व्यंग असणारी मुलंही होती. त्यांना आपल्या शरीराची लाज वाटून न्यूनगंडही निर्माण होणार नाही हा भाव होता. आजकालच्या काळात एकंदरीत स्त्रियांवरील शारीरिक अत्याचाराच्या बातम्या वाचतो तेव्हा अशा व्यक्तींना जर अशा प्रकारचे संस्कार त्यांच्या लहानपणी झाले असते तर या गोष्टी टळू शकल्या असत्या का असं उगाच मनात येतं.

यातले अनुभव मुख्यतः तोत्तोचानचे असले तरीही तिच्यावरची कोबायशींची छाप आपल्याला दिसते. उन्हाळी सुट्टीमध्ये शाळेतल्याच सभागृहात तंबू उभारून सर्वांनी एकत्र केलेल्या गप्पांबद्दल वाचताना मुलांबरोबर मिसळायचं त्यांचं वेगळं तंत्र आपल्या नजरेत भरतं. संगीत कवायत अर्थात "युरिथमिक्स"चा शाळेच्या अभ्यासक्रमात समावेश करून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत करायची त्यांची कल्पनाही खूप मस्त आहे. क्रीडादिन साजरा करतानाचे त्यांचे काही खेळ म्हणजे "आईला शोधा", "माशांची शर्यत" खेळायला कोणाला मजा येणार नाही? आणि मग बक्षिस म्हणून भाज्या नेताना मूलं कंटाळली तर "तुम्ही स्वतःच्या कष्टाने या भाज्या मिळवल्यात आणि तुमच्याबरोबर घरच्यांसाठीसुद्धा जेवण मिळवलंय" असं सांगणारे कोबायशी आपल्यालाही मुख्याध्यापक म्हणून लाभले असते तर? असं मनात नक्कीच येतं. 

खरं तर या छोटेखानी पुस्तकातला प्रत्येक प्रसंग तुम्हाआम्हाला काही ना काही शिकवून जातो. लिहायचंच झालं तर त्यातल्या प्रत्येक प्रसंगाला साधारण समान स्थान द्यायला हवं. पहिली ते तिसरी या शालेय वर्षांत या मुलीने एवढ्या छोट्या वयात किती आगळेवेगळे अनुभव घेतलेत याचा हे पुस्तक वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. तिचा रॉकी कुत्राही या पुस्तकातले एक महत्वाचे पात्र आहे. 

चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर दुर्दैवी शेवटाचा शाप घेऊन येतात का असं मला बरेचदा वाटतं. तो शेवट लिहून मला हे लिखाण उदासवाणं करायचं नाहीये. हे पुस्तक जेव्हा वाचलं जाईल तेव्हा ओघाने ते कळेलच. 

तूर्तास आपण सगळीजण हे लक्षात ठेऊया की जगाच्या पाठीवर लहान मुलांना त्यांच्या भावविश्वात रममाण करून त्यांना बाहेरच्या जगासाठी तयार करणारी एक शाळा होती. या शाळेचं नाव होतं "तोमोई" आणि तिथले मुख्याध्यापक होते "कोबायशी". हेच ते मुख्याध्यापक ज्यांनी तोत्तोचानच्या पहिल्या दिवशी "हं तुला तुझ्याबद्दल मला हवं ते सांग" असं म्हणून सकाळचे आठ ते दुपारची जेवणाची वेळ होईस्तो म्हणजे तब्बल चार तास तिची बडबड ऐकून मग "आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हं" असं म्हटलं होतं. त्यांच्या या प्रसंगात ही शाळा निव्वळ तोत्तोचानचीच नाही तर वाचकांसाठीही त्यांचीच शाळा होते. अशी एक शाळा जिथे शिकायला मलातरी नक्कीच आवडलं असतं.


तळटीप - हा लेख मीमराठीच्या पुस्तक परिचय स्पर्धा २०१२ च्या निमित्ताने लिहिला आहे. मीमराठीच्या साईटवर येथेही तो उपलब्ध आहे.



Tuesday, August 21, 2012

पाऊस


उन्हाची काहिली वाढून तो अवेळी येतो...वळीव म्हणतात त्याला....त्यावेळी येणार्‍या मृदगंधाने जीव वेडावतो...पण तो लगेच येत नाही...सजणीला भेटायला येणार्‍या साजणाने तिला झुरवावे तसा तो धरित्रीला झुरवतो....त्यानंतर उष्मा आणखी वाढतो..त्याच्या आठवणीने जमीन आणखी कोरडी पडते....त्याची वाट पाहात राहते...आणि मग नगारे वाजवत तो येतो आणि त्याच्या आगमनाची ग्वाही हिरवा शालू लेवून तीही सजते....

वळीव आणि नंतर मग आलेला हा पाऊस नेहमीचा झाला की आपणही सुखावतो....त्याच्याबरोबर भटकायला बाहेर पडतो....मान्सुनमधला पाऊस हा असाच असतो नाही???....हवाहवासा? त्याच्याबरोबर दूर हरवून जावं असाच..

मग तो कधीतरी दूरदेशी अचानक कुठेही भेटतो. त्याच्या आगमनाला इथे ऋतुचा संकेत नसतो. स्प्रिंग येणार म्हणून पाऊस, समर जास्त होतोय म्हणून पाऊस, रंगवलेल्या झाडांची नक्षी उतरवायला फ़ॉलमध्ये येणारा पाऊस आणि तापमान शून्याच्या खाली नाहीये म्हणून बर्फ़ाऐवजी येणारा विंटरमधलाही पाऊसच...त्याला खरं तर पाऊसही म्हणवत नाही...त्याची बोळवण, "आजचा दिवस धुपलाय" किंवा "फ़ारच रेनी आहे" अशी होते...तेव्हाही तो आवडत नाहीच असं नाही. पण त्याचा त्रास मात्र जास्त जाणवतो...कदाचित देशातल्या मान्सुनची सवय आणि काय?

एखादा संपूर्ण आठवडा पावसाळी असणार हे बातम्यांमध्ये वाचून माहित झालेलं असतं......तरी सोमवारच्या सकाळपासून मळभ पाहून फ़ार विचित्र व्हायला होतं...त्याची दिवसभरची पिरपिर अस्वस्थ करते...अशावेळी माझी जुनी दुखणी "पाठ" नावाच्या अवयवाची सेकंदा सेकंदाला जाणीव करून देतं...पण ही अस्वस्थता या दुखण्याची नाहीये असं सारखं वाटतं...मन संध्याकाळच्या मुलांबरोबरच्या रूटिनमध्ये गुंतायला पाहातं आणि एका वाईट बातमीची मेल येते....

ती बातमी मनात सलत असताना मी माझी मुलांसोबतची नित्यकर्म आवरते आणि दमून बसणार तोच बाहेरचा दिवसभर रिपरिप पडणारा पाऊस थैमान घालायला लागतो..खरं तर इथे त्याचं जोरदार कोसळणं असं नित्याचं नाही..इथला आणि विशेषत: या मोसमातला त्याचा नेहमीचा बाज शांतपणे बरसण्याचा..पण आज जसं मनात विचारांनी कल्लोळ करायला सुरूवात केली तसाच पावसाचा आवाज वाढत जातो...त्याने मनातला गोंधळ शांत होईल का? माहित नाही..

दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत खरं तर पाऊस थांबून लख्ख सूर्यप्रकाश येतो...पण मनात मात्र कालचा ढगाळ दिवस तसाच असतो.....

अपर्णा,
५ जून २०१२

Sunday, August 5, 2012

मैत्रीच्या धूसर सीमारेषा


कुठल्या तरी सुट्टीत "मैने प्यार किया" पाहिला होता..वरळीच्या सत्यम, शिवम, सुंदरमला..हे इतकं आठवतंय कारण ती सुट्टी बरेच दिवस परळला राहिले होते आणि मुंबई अंगात भिनली होती..त्यानंतर मग बारावीचं वर्ष चर्नीरोड त्यामुळे ती आणखीच भिनली...राणीच्या नेकलेसला रोज रात्री पाहायची सवय खरं तर चांगली (आणि परवडणारी) नाही...आता जेव्हा जगातल्या आणखी फ़ेमस शहरांना भेटी दिल्या जातात तेव्हाही आठवते ती मुंबईच....अरेच्च्या कुठे हरवले मी?? असं होतं हे मुंबईची आठवण आली की.....:)

हा तर तो "एमपीके", त्यातलं एक वाक्य चांगलं लक्षात आहे कारण मी त्याच्याशी कधीच सहमत नसते..मला वाटतं त्या सिनेमात बहुतेक सलमानचे पिक्चरमधले बाबा (चुभुद्याघ्या) म्हणतात "एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते". मला माहित नाही का ते पण मला ते अतिरेक टोकाचं विधान वाटलं होतं...
म्हणजे खरं तर तोवर माझे मित्र म्हणजे माझी मावसभावंडंच होती आणि कॉलेजमध्ये पण अकरावी बारावीला दोस्ती होण्याइतपत मुलांशी संबंध आलाही नाही.पण त्यानंतर मात्र व्यावसायिक शिक्षणक्रमाच्या निमित्ताने डिप्लोमा आणि डिग्रीला मैत्रीणी मिळाल्या तसेच मित्रही मिळाले...अगदी जीवाभावाचे.....त्यांच्याशी ओळख करून घेतानाही कधी काही दुसरे विचार मनात आले नाही...याचा अर्थ मुलं आवडलीच नाहीत असा नाही पण जसं मित्र हा एक वर्ग असतो तसा क्रश हा एक वेगळा वर्ग असतो...नोकरी करतानाही टीममधल्या एखाद्या मुलाबरोबर मैत्री व्हायचे प्रसंगही येतात...या सगळ्या मैत्रींना त्या वर उल्लेखलेल्या वाक्यात टाकलं तर मग काही खरं नाही न?

मैत्री ही कुठल्याही वयात आपल्या आयुष्यात येऊ शकते आणि ती येतानाच तिचं भविष्य घेऊन येते..काही ओळखी होता होता राहतात..म्हणजे आपल्याला ती व्यक्ती आवडत नसते असं नसतं पण ती ओळख मर्यादित स्वरूपात राहणार असेल तर ती तशीच राहते आणि धूसरही होऊन जाते...याउलट एखादी ओळख मग तो मित्र असो वा मैत्रीण जेव्हा पहिल्या भेटीदरम्यान न संपता येणार्‍या गप्पांनी सुरू होते ती काळाच्या ओघात नक्की टिकणार याची खात्री असते...अशा मैत्रीला वय/लिंगाच्या मर्यादा नसतात... 

मला जितकं सहज एखाद्या माझ्या वयाच्या व्यक्तीशी बोलता येतं, त्याच सहजतेने मी माझ्यापेक्षा दशकाने लहान असलेल्या व्यक्तीशीही सूर जुळवू शकते....माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला मात्र तसे संस्कार घेऊन आपण लहानपणापासून वाढतो म्हणून मान हा दिलाच जातो. पण एकदा सुरुवातीचे ते एकमेकांचा अंदाज घ्यायचे दिवस संपले की मग मात्र अशा मैत्रीचाही निखळ आनंद उपभोगता येतो...
वेगवेगळ्या वयांशी मैत्री असल्याचा फ़ायदा हा की आपल्याला आपल्यापेक्षा मोठ्या मित्र-मैत्रीणींच्या अनुभवाचा सल्ला उपयोगी पडू शकतो, त्यांच्याकडून आपण काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो तर आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे मित्र-मैत्रीणी आपलं लहानपण टिकवून ठेवतात. 

माझ्या भाच्यांना कदाचित म्हणूनच मी नावाने हाक मारायला शिकवलं..आमच्यातल्या मैत्रीमुळे मला अजून माझ्या भाचीबरोबर भातुकली खेळताना लहान होता येतं..माझ्या मुलांबरोबर तर मला उशांनी भांडताही येतं...

तसंच काहीसं मित्रांचं...म्हणजे मी मुलगी आहे त्यामुळे मित्रांशी बोलतानाची एक विशिष्ट मर्यादा आपसूक राखली जाते किंवा अगदी खरं सांगायचं तर ती मित्राकडूनही राखली जाते..कुणी कुणाशी किती मोकळं व्हावं याचे काही अलिखित नियम असतात आणि ते अशा ठिकाणी आपसूक पाळले जातात. फ़क्त तरीही समाजात अशा मैत्रीकडे निकोप दृष्टीने पाहिलं जात नाही...एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र (आणि तेही जास्त वेळा एकत्र) दिसले, त्यातही ते एकत्र बाहेर खायला, फ़िरायला जाताना दिसले की यांचं जुळलंय अशाच भावनेने सर्वसाधारणपणे पाहिलं जातं.

प्रत्यक्षात ते तसं असायलाच हवं असं नाही. मग कधीतरी त्यापैकी कुणाला तसं सरळ विचारलंही जातं. एखादा बेधडक असेल तर तो अशा प्रश्नांना उडवून लावील पण एखादी साधी अशावेळी अति कॉशस होऊन आपली मैत्रीही कमी करायला सुरुवात करील..आणि मग समाज म्हणून मैत्रीवर संशय घेणारी व्यक्ती कदाचित त्यावेळी नक्कीच खजील होईल..

हे सगळं अशा प्रकारे घडण्यापेक्षा मैत्री दिनाच्या निमित्ताने आपणही निकोप मैत्री जोपासायला शिकुया...."तुमची फ़क्त मैत्री आहे नं? मग तुम्ही कशाला समाजाला घाबरता?" असं बोलणं खूप सोपं आहे पण एक स्त्री म्हणून याकडे पाहताना यातलेही धोके मला जाणवताहेत...आणि केवळ तेवढ्यासाठी अनेक द्राविडी प्राणायाम करून मैत्रीच्या धूसर सीमारेषांची जाणीव करून देण्याच्या समेवर आणण्याचा प्रयत्न करणारी ही एक छोटी पोस्ट...

मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा... :) 

Wednesday, August 1, 2012

वातावरण...फ़ोडणीतला एक आवश्यक घटक....


मी मुंबईत नोकरी करत असताना कॉन्फ़रन्स कॉलवर माझा अमेरीकेतला क्लायन्ट नेहमी विचारायचा..."हौज द वेदर?"...त्याच्या एका प्रश्नापुढे माझ्या मनात तीन चार प्रश्नचिन्ह ...????...काय वेदर?? "कालच्या पेक्षा आज थोडं कमी गरम होतंय का हे (जास्त कामाने) गरम झालेल्या डोक्याला विचारते", असं म्हणू की "नाही रे..रोज रोज पांढरे कपडे काय घालायचे? उगाच कशाला "चांदनी ओ मेरी चांदनी" वाल्यांशी स्पर्धा? म्हणून आज थोडा लाइट क्रिम निवडलाय उन्हाशी मुकाबला करायला" असं सांगायचं? होता होता एक मुहुर्त काढून तोच आमच्या ऑफ़िसमध्ये येऊन गेला आणि मग पुन्हा कधीच त्याने मला हौज वेदर बिदर काही विचारलं नाही....म्हणजे हा विषय इतक्या सहजतेने संपेल असं मला निदान तेव्हातरी वाटलं होतं...पण नाही...

त्यानंतर अस्मादिकांचे चरणकमल पार उत्तर अमेरिकेच्या पश्चिमाध्य़ (हे मिडवेस्टचं माझं अतिप्रचंड मराठीकरण) भागात शिकागो नामे शहरी लागले आणि मे महिन्यातच मिशिगन लेकवरून येणार्‍या वार्‍यांनी डोक्यापासून पायापर्यंत एक शिरशिरी गेली...(बहुदा) तिथुनच सुरू झालं हे....उठसूठ वातावरण वातावरण या विषयावर बोलणं...

आईला पहिले फ़ोन केला तेव्हा खरं तर तिला काही हे माहित नव्हतं..तिने आपलं एक मोघम "कशी आहे अमेरीका?" असं काहीसं विचारलं आणि मी निदान पंधरा मिनिटं तरी इथलं (म्हणजे शिकागोमधलं) वातावरण या विषयावर तिचं डोकं पिकवलं.....त्यानंतर ती माझ्याकडे काही वर्षांनी माझ्याकडे आली तेव्हा तिच्या डोक्यावरचे केस इतके का पिकले(म्हणजे मी पिकवले...आतापर्यंत लोकं धान्य पिकवतात असं काहीसं माहीत होतं पण आमच्यात केस पण पिकवतात बरं?)  हे खरं तर माझ्या ध्यानात यायला हवं होतं नाही ...शिवाय परत जाताना पिकलेल्या केसांची संख्याही वाढली असणार....असो...

तर सांगायचं काय सुपातले जात्यात आलो आणि मग जात्यातल्यांनी जे केलं तेच मीही गेली कित्येक वर्षे मीही करतेय..

म्हणजे इतकी वर्षे मी म्हणायचे हे पाश्चात्य रोज रोज फ़क्त वेदर या एकाच विषयावर किती बोलतात नाही....म्हणजे क्लायन्ट वेगळा असला, तिथे कुणी नवीन टिम मेंबर आला की पहिले एक वेदर पुराण सांगितल्याशिवाय गाडी काही मूळ विषयाकडे येत नाही...नाही म्हणजे "टीम बिल्डींग" वगैरे ठीक आहे पण तरी मुंबईत राहून ते ऐकताना नेहमीच आश्चर्य वाटे की काय आहे काय बाबा हे वेदर प्रकरण.....म्हणजे आपल्या मराठीत वातावरण.....वरण या शब्दात फ़ोडणीचा भास आहे का माहीत नाही (कदाचित इतक्यात फ़ोडणीच्या वरणाची चटक लागलेला माझा लहान मुलगा कदाचीत या प्रश्नाचं उत्तर चांगलं देऊ शकेल पण असो आतापासून त्याला या वरणात नको...तो तिथे वरण-भातातल्या वरणातच बरा आहे) हां तर वरण या शब्दात फ़ोडणीचा भास आहे का माहित नाही, पण वातावरणाच्या गप्पा इतक्या चटकदार असू शकतात हे मला अमेरीकेतल्या काही महिन्यांतच कळलं...विशेष करून उन्हाळ्यातले मिशिगनवरून येणारे वारे नंतर फ़ॉल आणि विंटरमध्ये आपले आणखी बोचरे रंग दाखवून गेले तेव्हा तर वातावरणाची फ़ोडणी आणखीच गहिरी (की थंड) झाली....

अशाच वातावरणरूपी फ़ोडणी दिलेले काही मोजके अनुभव सांगायचे तर एक पोस्ट अपुरीच पडेल पण आता हा विषय आलाच आहे (म्हणजे तो येतोच...त्याला काही पर्याय नाही) तर मग थोडी फ़ोडणी आपणही दिली तर हाय काय आणि नाय काय??

हां तर ते शिकागो, तिथे तर अर्थातच वेदरमध्ये "विंडी इफ़ेक्ट" ह्म्म..तेच ते मिशिगन लेकची हवा-बिवा अशी फ़ोडणीतल्या जिर्‍यासारखी नेहमीच घुसते आणि मग आजचं तपमान पेक्षा "आजचं फ़िल्स लाइक"ला जास्त महत्व प्राप्त होतं...म्हणजे थोडं हिंगासारखं....टाकलंय का हे नक्की कळत नाही पण नाहीच टाकलं तर त्याचा इफ़ेक्ट नंतर कळेलच तसं काहीसं....हा प्रसंग कदाचीत अतिरेक वाटू शकेल पण एका अशाच बाहेर टक्क ऊन असणार्‍या दिवशी वेदर-बिदर न बघता मी पार्किंग लॉट ते एका हॉटेलची लॉबी हे अंतर हातमोजे न घालता पटकन जाऊया म्हणून गेले आणि हात अक्षरशः कडक होताहेत का असं वाटून लगेच लॉबीतल्या रिसेप्शनीस्टला सहज विचारलं कसं आहे वेदर आणि मग तिने ते फ़िल्स लाइक वगैरे फ़ोडणी देऊन जेव्हा मला "उणे वीस सेल्सियस"चा आकडा सांगितला तेव्हा मला तर आकडीच आली....अर्थात हे उणे मी लगेच कन्व्हर्ट केलंय अर्थात नाहीतर फ़ॅरनहीटमुळे आरामात ३२ म्हणजे खरं आपलं शून्य हा जागतिक गोंधळ आहेच. पण त्यानंतर पुन्हा कधीच थंडीत हातमोजे न घालायची चूक मी केली नाही.

मध्य भागात बर्‍याच फ़ोडण्या देऊन (की खाऊन) झाल्यावर आमचं इमान आम्ही जरा पूर्वेस आणलं म्हणजे हो तेच ते फ़िलीच्या आसपास...तिकडे आमचं आगमन झालं तेच एका प्रचंड स्नो स्टॉर्मच्या दिवशी...घ्या शिकागोच्या थंडीच्या जाचातून सुटणार वाटत असतानाच फ़ोर सिझन्स मध्ये अडकलो.. इथे म्हणजे चार ठळक ॠतू..जे तसे सगळीकडेच आहेत म्हणा. पण  म्हणजे ते येणार, यायच्या आधी, आल्यावर, जाताना आणि मध्येच नीट न आल्यामुळे याला चारने गुणून जे काही उत्तर येईल तितक्यांदा आम्ही वेदरच्या फ़ोडण्या देणार...आल्या आल्या शिकागोहून आल्याबद्दल कामावर आमचं हबिनंदन झाल्यावर लगोलग इथल्या(ही) विंटरचं कौतुक करण्यात माझा कामावरचा पहिला दिवस गेला होता..त्यानंतर "वेट अनटिल समर" म्हणून मग मध्ये एप्रिलचा पाऊस झाल्यावर उगवलेल्या ट्युलिप्स, डॅफ़ोडिल्सने स्प्रिंग आणि अर्थात स्प्रिंग अ‍ॅलर्जी (हो तोवर शरीरानेही इथल्या वातावरणाची फ़ोडणी जरा अम्मळ मनावरच घेतली होती) अशाप्रकारे फ़ोडणीत धने, मेथीदाणे झालंच तर तमालपत्र आणि तत्सम खडा मसालाही आणायला सुरूवात केली. 

समर म्हणजे तर हीट वेव्ह वगैरे आली की समरांगणच ते आणि तिकडे फ़्लोरिडातला हरिकेन सिझन आल्यामुळे इकडे येणारा वादळी पाऊस म्हणजे वातावरणाला फ़ोडणीच फ़ोडणी. हे असे तावून सुलाखून बाहेर पडलं की मग पानांवर रंगाची लाली आणणारा फ़ॉल...अहाहा! पण इथेही वातावरणाचं विशिष्ट गणित जुळलं नाही तर ते रंग नीट येत नाहीत किंवा लवकर गळून जातात इ.इ. बोलताना पुन्हा आहेच का आपलं ते वेदर...आणि मगची थंडी तर काय? तिथेच तर सगळे संवाद सुरू झाले होते नं? म्हणजे मागच्या वर्षी केले तरी पुन्हा करायचे नाहीत असं कुठे आहे? पुन्हा आहेच आपलं शेजारी, कामावर कुणी भेटला की पहिले हे पंधरा-वीस मिनिटं आजचं, कालचं, विकेंडचं आणि या सध्याच्या सिझनचं बोलणं (की बोलणंच बोलण). मूळ विषयाला बाजूला सारेल अशा मैफ़िली फ़क्त वेदर या विषयावरून होणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरजच नाही. 

हे फ़ोर सिझनच्या फ़ोडण्यांनी पोट भरलं नव्हतं म्हणून आम्ही वेस्टाला आपलं ते नॉर्थ वेस्टालाही संधी दिलीच. इथे खूप पाऊस पडतो अशा फ़ोडणीने सुरू झालेला माझा प्रवास इथे चारही सिझन्स पण आहेत गं..फ़क्त प्रत्येक वर्षी ते थोडे वेगळे असतात....या आणि अशा वाक्याने ज्याच्या त्याच्याशी बोलताना फ़ोडणीत येतातच. नुसताच पाऊस असं असेल असं उगा सुरूवातीला वाटलं होतं. पण ते वर उल्लेखलेल्यातलं फ़क्त तमालपत्र म्हणजे आपलं ते चरचरीत ऊन सोडलं तर फ़ोडणीचे सगळे घटक कुठे न कुठे तरी लागताच. 

ही फ़ोडणी कधी सकाळ थंड, रात्री अति थंड आणि दुपार निम थंड अशी मोहरी, जिरं, धने घेऊन येते तर कधी नुस्तंच मोहरी किंवा कधी त्यात थोडा खडा मसाला छोटं स्नो स्टॉर्म घेऊन हजर असतो. सध्या मला धन्याची प्रचंड गरज आहे(हे फ़ोडणीतलं उगाच श्लेष वगैरे नको हं) खरं तर तमालपत्रही चालेल पण यंदा ते आलंच तर एखादा विकेंडपुरता येईल असं चिन्ह दिसतंय....बरं हा सगळा संवाद ज्यांना कळलाय त्यांना मी कुठल्याही खादाडीवर बोलत नसून ही एक वेगळीच फ़ोडणी आहे याची कल्पना आलीच आहे..आणि वेदरबद्दल बोलायचं तर हे हवंच नं? 

ओरेगावातली मी न्युयॉर्कमधल्या माझ्या एका क्लायन्टकडे जाते तेव्हा ओरेगावचा पाऊस या विषयावर मी पंधरा मिनिटं आणि न्युयॉर्कमधलं कधीही बदलणारं आणि हडसनमुळे अम्मळ थंड असणारं वातावरण याबद्दल तो कितीही मिनिटं आत्मीयतेने बोलत राहतो....बरं तो आणि मी निदान कामानिमित्ताने याआधी आणि नंतर बोलणार आहोतच पण त्याच्या दोन क्युब पलिकडे बसलेला जॉन नंतर मला लंच टाइममध्ये कॅफ़ेटेरियाच्या लाइनमध्ये भेटतो तेव्हा आधी आमची तोंडओळख असल्याच्या अधिकाराने पुन्हा एकदा यावर्षी (न पडलेली) थंडी आणि मी आमच्याकडे मार्चपर्यंत पडलेला बर्फ़ या विषयावर कॅफ़ेच्या लाइनमध्ये बोलत राहतो..हे आटपून मी परत माझ्या ओरेगावात आले की मी इथे नसल्याने ताण पडलेली पाळणाघरातली मंडळी "हौ वॉज द वेदर? डीड यु मिस द रेन?" म्हणून माझं तिकडचं आणि मी तिथे असताना इथलं असं अपडेट देत राहतो..पुन्हा हीच टकळी शेजारणीकडे, जमलंच तर त्याचवेळी कुणीही फ़ोन केला तर तिकडे आणि सगळीकडे वाजत राहते...

म्हणजे आताच पहा नं? मुंबईतला पाऊस सुरू झाला असेल असा विचार करून काही वेगळं लिहायला बसले होते तोच वातावरणाच्या फ़ोडणीचा विचार मनात आला...

विचार कसला मोठी फ़ोडणीच बसलीय या पोस्टरूपाने वाचकांना..नाही का??