Friday, November 27, 2009

घर पाहावं सोडून

"घर पाहावं बांधून" ह्या म्हणीचा कर्ता करविता नक्कीच बाबा आदमच्या काळातला असणार कारण त्याच्यावर बहुधा फ़क्त एकदा घर बांधुन झाल्यावर सोडण्याची वेळ कधीच आली नसणार.आपल्या इथल्या जवळजवळ सर्व शहरांतले जागांचे वाढते भाव पाहाता घर पाहवं बांधुन म्हणणं या काळात किती बरोबर आहे देव आणि कदाचित बिल्डर्स जाणे पण तसंही असलं तरी मी तर म्हणेन तुम्ही मारे घर कितीही चांगलं घ्याल नाहीतर बांधाल पण बच्चु एकदा का गाशा गुंडाळायची वेळ आली की ते प्रोजेक्ट शंभर टक्के यशस्वी करायचं म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे.


मी मुंबईत असेपर्यंत तरी अशी नोकरीसाठी पटापटा शहरं बदलणारी वृत्ती नव्हती पण इथे अमेरिकेत मला वाटतं काही काही लोकांना तर दर तीनेक वर्षांनी घरं नाही बदलली तर चैन पडत नाही.तरी आता एकंदरित रियल इस्टेट थंड असल्यामुळे मालकीची घरं बदलायचं थोडं कमी झालंय पण भाड्याच्या जागांचं काय?? त्या बदलायचं अजुन तसंच आहे. असो. तर मुद्दा हा नाही आहे. प्रश्न आहे तो एकदा घर मग ते स्वतःचं असो भाड्याचं, बदलायचं ठरवलं तर इथुन गाशा गुंडाळा आणि नव्या जागी परत गाशा सोडा हे एका वाक्यात सोपं वाटणारं प्रकरण आपल्याला कुठल्या दिव्यातुन जावं लागणार आहे ते खरं म्हणजे दिव्य पार पडल्यावरचं कळतं.


घर सोडायच्या व्यापाची मोजणीच करायची असेल तर गणिती भाषेत वर्षांच्या समप्रमाणात करावी. नाही कळलं?? म्हणजे जितकी जास्त वर्षं तुम्ही एका वास्तुत राहिलात त्यावरुन आता किती मोठं खटलं मागं लागणार ते समजुन घ्यावं. मुहुर्ताचा नारळ जर तुम्ही घरातल्या सर्व वस्तुंची एकदा यादी उर्फ़ इन्व्हेंटरी करून करणार असाल तर सावधान! आपण महाभारत युद्ध भाग १ सुरु करतोय याची पूर्ण कल्पना असुद्या. अहो म्हणजे माहित आहे इथे दरवर्षी थॅंक्स-गिव्हिंग आणि त्याची चुलत-मावस-सावत्र इ.इ.भावंडं असणार्या सेलच्या नावाखाली आपण कायच्या काय शॉपिंग करत सुटतो पण आता इन-मीन-तीनच्या कुटुंबात स्वयंपाकघरात असू दे, लागतं, म्हणून प्रत्येक वस्तुंची तीन-चार व्हर्जन्स असतील तर बायकोचं काही खरं नाही. तीन-तीन डिनर सेट घरात आणि त्यातला एक तर स्वयंपाकघरातल्या सगळ्यात उंच जागी ठेवला गेल्यामुळे जवळजवळ कधीच न वापरला गेलेला? ही पास्ता प्लॅटर खरं म्हणजे पीठ मळायला चांगली पडेल असं म्हणून घेतलेली चक्क स्वयंपाकघर सोडून दुसरर्याच खोलीतल्या कपाटात तिच्या ओरिजीनल पॅकिंग सहित?? असा नवर्याच्या हल्ला होणार याची पुर्वकल्पना असेल तर बायकांनो आधीच त्याच्या कपड्याच्या ढिगार्यातुन लेबलं पण न काढलेले कपडे त्याला दाखवायला विसरु नका आणि मुख्य म्हणजे त्याच्या जिमच्या न वापरलेल्या वस्तु दाखवायच्या ऐवजी फ़क्त त्याच्या ढेरीकडे बोट दाखवा न बोलता प्रतिहल्ला यशस्वी होईल. आमच्याकडे तर स्वयंपाकघरातही वस्तु वाढवण्यात नवरोबांनीही सढळ हस्ते मदत केलीयं. कुठेही शेफ़ नाईफ़ दिसले की त्याच्यातला कसाई जागा होतो. मोजले तर कांदा-टॉमेटोपासुन मासे-मटण प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या सुरीने कापता येईल की काय असं मला नेहमी वाटतं आणि कधीही माझं कापताना बोटाला लागलं तर तू चुकीची सुरी घेतलीस असा माझ्यावर नेहमी हल्ला होतो. हां तर सांगायचं म्हणजे घर बदलायला किती अवकाश आहे त्यावर हे हल्ले प्रतिहल्ले किती काळ चालु द्यायचे हे पाहायचं. नाहीतर माझ्यासारखी भडकू असेल तर "जा मग ओत पैसा बाहेर आणि बघ तुझं तुच. मला खूप काम आहेत" असं सांगुन तहाच्या बोलणीचा मार्गपण बंद करुन टाकला की बिचारा नवरा. खरंच बिचारे नवरे, बायकोने असं काही सांगितलं की नक्की काय वाटतं त्यांना देवजाणे पण आता अशा केसमध्ये यांच्या मदतीला आल्यासारखं करून कामं नंतर वाढवणार्या लोकांनाच इथं मुव्हर्स म्हटलं जातं असं मला वाटतं.


तर तात्पर्य, जर मोठं घर आणि जास्त वर्ष हे कॉंबिनेशन असेल तर मात्र प्रोफ़ेशनल मुव्हर्स हेच तुमचं महाभारतापेक्षा मोठं होऊ शकेल असं युद्ध थांबवु शकतील. म्हणजे थोडक्यात काय तर तुमची इज्जत तुम्ही काढण्यापेक्षा त्यांना वर भरमसाट पैसे देऊन त्यांनी नको त्या वस्तु नेऊन, हव्या त्या ठेवुन गेले की आपण महाभारत युद्ध भाग २ करायला मोकळे..आणि फ़ार लांब जात असाल तर गाडीलाही विसरू नका. तिलाही शिपच केलेलं बरं पडतं. त्यामुळे त्याची तजवीज आधी करायला हवी. हे काम त्यामानानं कमी वेळखाऊ आहे कारण गाडीचे डिटेल्स आपल्याला इंटरनेट वर देऊन मग तुलनेने परवडणार्याबरोबर एक दिवस पक्क करता येतो. आणि मुख्य म्हणजे तो बदलणंही जास्त खटपटीचं नाही. पण घरातल्या सामानाचं तसं नाही. मुव्हिंग करणार्या कंपन्या शक्यतो आपला माणूस पाठवुन आपलं सामान पाहुन त्याचं साधारण वजन किती होईल त्याप्रमाणे किती खर्च येईल याचा अंदाज देतात. काही काही कंपन्या तेही इंटरनेटवर करतात पण त्यात फ़सवणूकीचा संभव जास्त. म्हणून असे अनेक अंदाज घेऊन त्यातल्या एकाबरोबर आपलं मुव्हिंग पक्कं करणे या गोष्टीसाठीसुद्धा आपला बराच वेळ जाणार आहे हे खूपदा लक्षात येत नाही त्यामुळे जायचा दिवस दोनेक आठवड्यावर आला तरी हे झालं नाही तर भाग दोन युद्धाला आधीच तोंड फ़ुटतं हेही लक्षात असूद्या.

युद्ध भाग दोन आधी सुरू झाल्यामुळे आता खूप गोष्टी नवरा-बायको कुठल्या मुद्यावरून गुद्यावर य़ेणार नाही त्यावर अवलंबुन असतात. मग पॅकिंग त्यांना द्यायचं, आपण करायचं की थोडं त्यांनी थोडं आपण हा यक्षप्रश्न उभा राहतो. नेहमीप्रमाणे नवरोबांना तू कशाला त्रास करतेस (किंवा मग त्याला मदत करायला लागणार त्याने आपण कशाला त्रास घ्या हा खरा अर्थ) आपण त्यांनाच सांगु की, असं म्हटलं की आपण काही करण्यात तसाही अर्थ नसतो. त्यातून घरात लहान मूल असेल तर मग वेळही मिळणं कठीण. आता वाट पाहाणं फ़क्त त्या दिवसाची.


ही इथली मुव्हर्स लोकं तशी खरंच प्रोफ़ेशनल असतात. पण दिलेल्या सुचनांच तंतोतंत पालन करणारी. एकदम संगणकाला मागे टाकतील. किचनमधलं सर्व असं जर तुम्ही म्हटलं तर तिथे तुम्ही स्वतःसाठी ठेवलेला ब्रेड, त्याच्या बाजुला दुसरं कसलं वेश्टन टाकायचं राहिलंय, पडलं असेल ते सगळं सगळं घेतील. त्यामुळे त्यांच्या पाठी गृहमंत्रीण उभी तर कारभारी बेडरुममधल्या सुचना देऊन खाली इतर राहिलेली जुजबी कामं जसं हौसेने घेतलेल्या मोठ्या स्र्किनवाल्या टि.व्ही.ची पिलावळ साउन्ड सिस्टिम, डिव्हीडि प्लेअर, रेकॉर्डर हे सर्व मोकळं करणे याच्या मागे. मध्येच आठवतं अरे आपली अमुक-तमुक बॅग काही महत्वाची कागदपत्र असल्याने आपल्याबरोबर ठेवलीच पाहिजेत. ती शोधायला वर जावं तर त्यांनी तिथे डोनेट करायला काढलेल्या कपडे इ. च्या बॅगेलाही मुव्हिंगच्या सामानात कोंबलंय. नशिब पाहिलं असं म्हणत आता त्यांनी बिघडवलेलं काम मुकाट्याने आपणचं करतो. त्याने निदान नसत्या गोष्टींच्या वजनाचा भुर्दंडतरी पडणार नाही. दोष खरं तर मुव्हर्सचा नसतोच. कारभार्यांनी काय सांगितलंय त्यावर पण असतं. आणि या कामगारांना फ़क्त होयबा नायबा कळणार. आपण आपल्या न आवरलेल्या पसार्यांतून त्यांना हे हवं आणि ते नको सांगायचं आणि त्यांनी ते लक्षात ठेवायचं म्हणजे जरा अतिच..असो.

दोनेक तासांत आम्ही करू सांगणार्यांना आपली पसरलेली घर आवरून बंद करून ठेवायला पाच-सहा तास पुरतात आणि आपण हुश्श करून जमिनीवर (अहो फ़र्निचर नेलं ना त्यांनी) टेकतो आणि म्हणतो झालं बाबा. पण हे दोन मिनिटांचं हुश्श असतं. आता उरलेलं घर आवरायला उठलं की अरे हा आरसा का नेला त्यांनी?? हा तर इथेच ठेवायचा होता. अरे बाथरुममधलं काहीच नेलं नाही वाटतं. अशा सु(?)संवादांनी घर भरून जातं. युध्द भाग दोन पुढे न्यायचे त्राण खरं संपले असतात केवळ म्हणून आपण झालं गेलं गंगेला मिळालं म्हणतो आणि काही जास्त महत्वाच्या गोष्टी नव्या पत्यावर सरळ पोस्ट करतो. उरलेल्या काही वस्तु चांगल्या असल्याने मग जवळ राहणा-या मित्र-मैत्रीणींना पटवून त्यांना देऊन टाकतो.



इतकं सामान त्यांनी नेलं तरी घर अजुन पुरतं रिकामं झालेलं नसतंच त्यामुळे आता कचरा टाकण्याचा एक जंगी कार्यक्रम पुढच्या एखाद्या दिवसासाठी जाहिर करावाच लागतो आणि आपली उरली-सुरली कुलंगडी बाहेर येतात. आता यापुढे असं अनावश्यक सामान कधी घेणार नाही असं आपण आपल्याला म्हणत राहतो. आणि मोठमोठे बॉक्सेस रिसायकलींग, डोनेशन भरून घराबाहेर त्यांचीच रांग लागते. घर मोठं असेल तर चकाचक करायचं काम फ़क्त कामवालीच करू शकते यावर माझा एकशे एक टक्के विश्वास आहे. तिथे पाच-पंधरा डॉलर्स जास्त घेतले तरी मला अजिबात वाईट वाटत नाही.


असो हा फ़क्त ट्रेलर आहे. आता जेव्हा ही लोकं तुमचं सामान पोचतं करतील त्यावेळची कामं तुमची तुम्हालाच करायची आहेत. मुव्हिंगच्या कंपन्या जशा पैशापासरी दिसतात तशा अनपॅकिंग असिस्टन्स नावाने काहीही दिसत नाही. यात काय ते समजायचं. तेव्हा खरी लढाई तो आगे है...सामान यायची वाट पाहातानाच नव्या रिकामी घरात बसून ही पोस्ट लिहितेय आणि मनातल्या मनात म्हणते "घर पाहावं सोडून"....


ता. क. यातले सर्व फोटो नवीन रिकाम्या घराचे आहेत.

Saturday, November 21, 2009

दादर

त्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी असतात की आपण तिथे राहणारे नसतो पण इतकं जिव्हाळ्याचं का वाटाव असं वाटत राहात तसं माझ्या मनात "दादर".

अगदी लहानपणी जेव्हा दिवाळी किंवा कुणा नातेवाइकाच्या लग्नाची खरेदी म्हटलं की हमखास आठवणार ते म्हणजे दादरच. माझी मावशी एलफ़िन्स्टनला राहायची त्यामुळे तसंही तिच्याकडे जायला जलद गाडीतून दादरलाच गाडी बदलायचीही असायची. खरेदीच्या वेळीही सगळं झालं की मग मावशीकडे असंच न सांगता ठरलेलं असायचं. तेव्हाचं दादर म्हणजे सुविधाच्या गल्लीतून सुरु करायचं आणि फ़्रॉक पसंत पडेपर्यंत एकामागुन एक दुकानांच्या पायर्या चढायच्या. त्या भागातले सगळे कायम गर्दीचे रस्ते पालथे घालायचे हा एक वार्षिक कार्यक्रमच होता.तेव्हा वर्षाला साधारण एक नवा फ़्रॉक इतकी चैन होती म्हणून मग तो एकच घरी गेल्यावरही आवडेल असा घ्यायचा त्यामुळे कधी कधी माझी आई कंटाळुन जायची. मग प्लाझाच्या समोर एक गु-हाळ आहे त्याच्याकडे ऊसाचा रस ठरलेला. कपड्यांच्या बाबतीत माझं एक नेहमीचं रडगाणं म्हणजे ९९% वेळा दुकानात घेतलेलं घरी लेऊन पाहिलं की नाक मुरडलंच पाहिजे. केवळ तेवढ्यासाठी मला इथे अमेरिकेतली रिटर्न पॉलिसी प्रकार फ़ार आवडतो. असो..भरकटतेय. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच की दादरचा लळा लागला तो त्या दिवसांत.

मग शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी झाल्यावर रूपारेलला गेल्यामुळे आता दादर जरा जास्त जवळ आलं. कधीतरी मैत्रीणींबरोबर शिवाजी पार्कच्या कट्यावर बसुन गप्पा मारणं आवडायचं.बारावीच्या देसाई क्लासला शहाडे-आठवल्यांच्या गल्लीत जायचं तेव्हाचं दादरला जाणं अजुन थोडं वेगळं. बारावीचं टेंशन पण तरी क्लासच्या ग्रुपबरोबर मंजुच्या वड्याची चव जिभेला लागली ती अजुनपर्यंत मुंबईत गेलं आणि उभा वडा खाल्ला नाही तर देवळात गेलो पण प्रसाद घेतला नाही असं काहीसं वाटतं.

पण तरी त्याहीपेक्षा दादरच्या जास्त जवळ आले ते नंतर मी भगुभईला डिप्लोमा इंजिनियरिंगला गेल्यावर. माझी जिवलग मैत्रीण दुर्गेशा शिवाजी पार्कच्या जवळ म्हणजे संतुरच्या गल्लीत राहायची. आता तिथे इमारत झाली पण तेव्हा त्यांचं तिथे छोटंसं घर होतं. अभ्यासासाठी त्यांच्याकडे राहाणं अगदी नियमाचं झालं आणि दादरची ओढ अजुनच वाढली. तिच्याबरोबर आम्ही आसपासच्या भागात खादाडीचे इतके कार्यक्रम केलेत की त्यावर एक वेगळी पोस्ट होईल. तिची आजीपण जवळ म्हणजे सिंधुदुर्गच्या बाजुच्या इमारतीत राहायची. आजी एकटीच असल्याने आम्ही दोघी खूपदा तिच्याकडेच राहायचो. इंजिनियरिंगच्या अवेळी मिळणार्या सुट्ट्यांमध्येही मी अधुनमधुन त्यांच्या कडे जायचे. मग ठरवुन गेलं की सिटिलाइटच्या त्यांच्या लाडक्या कोळीणीकडून आणलेले सुरमई नाहीतर पापलेट तिची आजी टिपिकल सारस्वत पद्धतीने इतके झकास करायची की त्याच्यावर शिवाजी पार्कच्या पानपट्टीवाल्याकडचं थंड थंड पेटी पान खाणं म्हणजे काय आहे हे कळायला ते सर्व त्याच क्रमाने खायला पाहिजे. सिंधुदुर्गचं किचन त्यांच्या खिडकीतून दिसतं त्यामुळे ताजा बाजार आला असला की आजी आम्हाला आग्रह करून रात्री जेवायला तिथेही पाठवायची. माझ्या घरी माझ्या आईला तसं बाहेर खाणं हा प्रकार फ़ारसा आवडत नाही त्यामुळे त्यांच्या आग्रहाचं मला इतकं कौतुक वाटायचं ना की बास. मग रात्री परतताना शिवाजी पार्कला एखादी चक्कर मारुन आजीसाठी आठवणीने पानात मिळणारी कुल्फ़ी घेऊन जाणं आणि उरलेल्या गप्पा तिघींनी एकत्र मारणं या सर्वांत खरंच खूप आनंद होता. या अशा दिवसांनी मग दादरबद्दल वाटणारं प्रेम जरा जास्तच वाढलं. त्यानंतर मग पुढच्या शिक्षणाची आमची कॉलेजं वेगळी झाली तसा तिचा माझा संपर्क कमी झाला आणि मग आम्ही एकमेकांशी फ़क्त इ-मेल चॅटवर आलो तसं वाटलं की गेलं दादर आता. त्यानंतर तर ती नोकरीसाठी बंगलोरला गेल्यामुळे मग दादरला हक्काचं कोण असा प्रश्नच पडला.


तेवढ्यातच निसर्ग भ्रमणाचा नवा छंद लागला होता त्यातुन ओळख झालेली माझ्यापेक्षा वयाने मोठी असली तरी खूप समजुन घेणारी नवी मैत्रीण संगिता मला मिळाली आणि दादर पुन्हा एकदा आयुष्यात आलं. खरं तर ती टेक्निकली माटुंग्याला राहायची पण दोन रस्ते ओलांडले की शिवाजी पार्क म्हणजे जवळजवळ दादरमध्येच. आणि रूपारेलच्या मागे म्हणजे दादर असं माझं ढोबळ कॅलक्युलेशन आहे त्यात तिचं घर बसतय...मग जेव्हा केव्हा रात्रीची कर्जत लोकल पकडायची असली की माझा मुक्काम पोस्ट संगिताच्या घरी असं ठरलेलं. तेव्हाही रात्री शिवाजी पार्कला चक्कर किंवा नेब्युला नाहीतर जिप्सीमध्ये कधी जाणं हेही. आणि तेव्हा तर मी नोकरीपण करत होते त्यामुळे मग तसं खर्चाचाही प्रश्न नव्हता. त्यानंतर एकदा एका आजारपणानंतर ऑफ़िसचा प्रवास थोडा त्रासदायक होत होता म्हणून एक आठवडा मी त्यांच्याकडून नोकरीही केली होती. आणि तात्पुरतं तिथेच एका ठिकाणी महिनाभर पेइंग गेस्ट म्हणूनही राहिले होते. आता दादरची जरा जास्तच चटक लागली होती असं वाटत होतं.
पण मग त्यानंतर लग्नानंतर मायदेश सोडल्यामुळे पुन्हा दादर टप्प्याबाहेर गेलं पण आठवणीतुन अर्थातच नाही. पहिल्यांदा आले तेव्हा आम्ही जुना चारेक जणांचा ग्रुप पुन्हा शिवाजी पार्कवर भेळ खात गप्पा मारत बसलो. अरे हो तिथल्या कॅंटिनचा वडाही छान आहे हे सांगायचं राहिलं. त्यानंतर अचानक एक दिवस आमच्या एका कॉमन मित्राची इ-मेल आली की एका आजारपणामुळे आमची जिवलग मैत्रीण गेली. ती तिच्याबरोबर माझं दादर घेऊन गेली असं का कोण जाणे मला इथे वाटत होतं. त्यानंतर भारतात गेले तेव्हा तिच्या घरच्यांना भेटायला गेले त्यावेळचं दादर खूप वेगळं, गर्दीतही एकटं का वाटलं माहित नाही. पण आता सर्व पुर्वीसारखं आहे असं नाही. शिवाय मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे शिवाजी पार्काचं मराठीपण खूप कमी झाल्यासारखंही वाटलं. आधी राउंड मारताना येणारे मराठी आवाज आता कमी झाल्यासारखे वाटले.चालायचं दादरला घर घेणं हे जर म्हणायचं असेल तर मला पु.ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे मुंबईकर व्हायला तुम्हाला मुंबईत कुणी दत्तक वगैरे घेतयं का पाहा तसं वाटतं. मग आता तिथले मराठी कमी झालेच असणार.


मी अमेरिकेला जेव्हा आले तेव्हा माझ्या नवर्याला म्हटलं होतं की आपण दोघं इथे खूप मेहनत करू म्हणजे आपल्याला दादरला निदान एक वन बीएचके तरी घेता येईल. आतापर्यंत कधीही कसाही गुणाकार भागाकार केला तरी ते स्वप्न स्वप्नच राहाणार हे आता कळतंय पण तरी दादरची ओढ काही जात नाही. फ़क्त काहीतरी संकेत असल्यासारखं नेमकं दादरच्या आसपास राहणार्या मित्र मैत्रीणी कसे काय भेटतात ठाऊक नाही पण जेव्हा जेव्हा दादर सुटतंय असं वाटतंय तेव्हाच कुणीतरी म्हणतं मी दादरचा/ची आणि मग मन मागे मागे जात पुन्हा दादर स्टेशनवर येऊन थांबतं.

Thursday, November 12, 2009

मन तळ्यात मळ्यात....

हा विषय तसा जमेल तितका वेळ टाळला. म्हणजे पहिल्यांदा वाटलं तेव्हा फ़क्त मनाचं रडगाणं गायलं...मग पुन्हा वाटलं तेव्हा नदीच्या दुसर्या किनारी जाऊन पाहिलं पण आता घोडा मैदान जवळ आलं आणि राहावलं नाही. ही पोस्ट खरं तर लिहुन पोस्ट न करता ठेवावी असंच वाटतंय पण तरी पोस्ट करतेय. माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणायची मनातलं कधी साचु देऊ नये त्याचा त्रास जास्त होतो. लिहुन काढलं की मग तो सल उरत नाही असाही एक सल्ला होता. कदाचित त्यासाठीही हे लिहिणं.
या घरात राहायला आलो तो पहिला दिवस अगदी लख्ख आठवतो.  इन्व्हेस्टमेन्टच्या दृष्टीने आणि मुंबईत कुठे पुढे-मागे अंगणवालं घर (उर्फ़ बंगला) परवडणार म्हणूनही, एक छोटं तीन बेडरुमचं घर घेतलं आणि एका ऑगस्टमध्ये आम्ही तिथे आलो. आधी अपार्टमेन्टच्या वर्दळीची सवय होती त्यामुळे इथे अगदी टाचणी पडेल इतकी शांतता पाहून खरं तर भयाणच वाटलं होतं आणि विचारही आला कसं होणार आपलं. पण मागचे तीन वर्षांपेक्षा जास्त इथे राहिल्यावर ती शांतताच आमची मैत्रीण झाली की आम्ही त्या शांततेचं रुपांतर किलबिलाटात केलं सांगणं कठीण आहे. पण आताशा खूप आपलं वाटायला लागलं.
घेतल्या घेतल्या जवळजवळ पहिल्याच महिन्यांत माझ्या अगदी जवळच्या तीन मैत्रीणी ज्यातल्या दोघी आता वेगवेगळ्या देशांत आहेत त्यावेळी नेमक्या अमेरिकेत होत्या. माझं त्यातल्या त्यात मध्यवर्ती आणि मोठं ठिकाण असल्याने, त्या सर्वांना एकत्र बोलावुन एक छोटं गेट-टुगेदर झालं. खूप खूप गप्पा मारल्या. दोन रात्री त्या राहिल्या. घर लगेच भरुन गेलं. त्यानंतर माझे आई-बाबा, सासुबाई, नणंद, भाचा असे नातलगही येऊन राहुन गेले. त्यांना थोडफ़ार अमेरिकेचं नॉर्थ-ईस्ट दर्शन करवता आलं. काही जवळचे मित्र-मैत्रीणी यांच्यासाठीही न्युयॉर्क, डी.सी.ला जायचं असलं तर हक्काचं राहायचं ठिकाण म्हणजे हे घर होतं. नंतर बाळराजांचं आगमन, त्याचा पहिला वाढदिवस सगळं एकापाठी एक चालुच होतं.
पहिल्या दिवशी एकटेपणाची जाणीव होती ती कुठे पळाली कळलंच नाही. इथुन जशी इतर महत्त्वाची शहरं जवळ तसं इथली नेहमीच्या खरेदीपासुन, खायला जाण्याची सगळी ठिकाणं जवळ. काही काही दुकानं तर अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. एक वेगळा वेग इथेही आला. शिवाय स्वतःच घर म्हणजे थोडफ़ार बागकामाची आवड असलेल्या मला तर पर्वणीच होती. अगदी स्प्रिंगला येणारी डॅफ़ोडिल्स, ट्युलिप्स. फ़ॉलमधली मम्स आणि मग जवळजवळ थंडी पडेपर्यंत येणारे छोटे गुलाब आणि देवासाठी झेंडु लावणं मला खूप आवडायचं. दरवर्षी उन्हाळ्यात टॉमेटो आणि इतर काही भाजी, फ़ुलझाडं लावणे आणि मग उरला ऋतु त्याची निगराणी करणे हाही एक आवडता उद्योग बनला. अगदी पहिल्यांदी लावलेली मम्स (आपल्याइथल्या शेवंतीसारखी फ़ुलझाडं) अजुनही आता फ़ॉलमध्ये येतात.
या घराच्या मागच्या बाजुला एक सनरुम आहे म्हणजे त्याच्या तीन बाजुला संपुर्ण काचेच्या भिंती त्यामुळे मागच्या लॉनवर य़ेणारे ससे, खारींची पळापळ पाहाणे हाही एक टि.पी. होता. शिवाय ऋतुंप्रमाणे सुंदर पक्षीही दिसत. शिवाय आपण काचेच्या पल्याड असल्याने तेही बिनभोबाट आपल्यासमोर वावरत. मला आवडतो म्हणून इथे झोपाळा ठेवला आहे. प्रसन्न सुर्योदय असण्यार्या सकाळी तिथे बसुन चहा घेणे आणि बाहेरचा निसर्ग पाहाणे यात वेगळंच समाधान असे. त्याचप्रमाणे बाहेर बर्फ़ पडला असताना तिथला जुन्या काळचा स्टोव्ह (किंवा फ़ायर प्लेस) मध्ये लाकडाचा ओंडका टाकुन खूप गरम झालं की तिथं बसून तो पांढरा बर्फ़ आणि बाहेरच्या तारांवर ओघळताना गोठलेले बर्फ़ाचे आकार पाहाणं हाही एक वेगळा छंद बनला. कधी आपण या घराचे झालो कळलंच नाही. हे भाड्याचं घर नाही म्हणून ही ओढ की आतापर्यंत सर्वात जास्त वर्ष निवास केल्यामुळे आलेलं प्रेम सांगणं कठीण आहे. पण पाहता पाहता इथे वेळ पुरेनासा झाला.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या देशात असुन आपुलकीने आमची चौकशी करणारा शेजार मिळाला. ही एक गोष्ट मी इथल्या अपार्टमेन्ट मध्ये नेहमीच मिस केलीय. शेजारी कधीही हायच्या पुढे नाही. एखादा भारतीय असला तर थोडा फ़ार परिचय होण्याची शक्यता. इथे मात्र कधीकधी "आज तुझा नवरा घरी नाही तर मी बाहेरचा बर्फ़ काढुन देऊ का" म्हणणारा शेजारणीचा मुलगा आणि "अगं, आता हा ड्राइववेवर धावतोय" अस म्हणत प्रेमळपणे आरुषला "यु सन ऑफ़ अ गन" म्हणणारी बेट्टी आजी, समोरचं दोन मुलींवालं डिनिसचं कुटुंब, "आय विल किप यु इन माय प्रेअर्स" म्हणणारी मेरी आणि कोपर्यावरची मॉली सगळ्यांनीच इथल्या वास्तव्यात जान आणली.
हे इतकं पारायण सांगायचं कारण म्हणजे आता निर्णय झालाय. गेले बरेच दिवस आम्ही दूरदेशी गेलेल्या बाबाची वाट पाहात होतो जे मी मागच्या एका पोस्टमध्ये लिहिलंय सुद्धा. त्यामुळे हे ठरवणं जवळजवळ अपरिहार्य झालंय..आमचं कुटुंब जिथे एकत्र राहु शकेल त्या नव्या गावी आम्ही जातोय. या इकॉनॉमीमध्ये घर विकुन होणारा तोटा टाळण्यासाठी जमलं तर हे घर भाड्याने देऊन आम्ही स्वतः आता पुन्हा एकदा नव्या गावी भाड्याच्या घरात राहायला जाऊ.
पाखरांचं बरं असतं नाही? काडी-काडी जमवुन बांधलेलं घरटं त्यांची पिलं मोठी झाली की पुन्हा मोकळ्या आकाशात जायला तयार होतात. आपण मात्र वास्तुवरही जिवापाड प्रेम करतो आणि मग ती सोडताना सगळ्या जुन्या आठवणी काढत बसतो. खरं तर राहताना कितींदा त्यातल्या थोड्याफ़ार कमी पडणार्या वस्तुंबद्द्ल किरकिरही केलेली असते पण आता सोडणार म्हटल्यावर सगळं अतोनात आवडू लागतं. आम्हाला आधी वाटायच की आता इथुन निघायचं ते थेट मायदेशी जायलाच अधेमधे कुठे हलुया नको. पण शेवटी सगळं आपण ठरवतो तसं थोडंच होणार असतं?? म्हणजे पुन्हा एकदा इथलं सगळं गुंडाळा आणि दुसरीकडे सोडवा.
गेले काही वर्षात किती सामान वाढवलयं याचा आता अंदाज येतोय. विशेषतः मूल झाल्यानंतर तर अगदी अतोनात वस्तू आल्यात त्या सर्व नेणं शक्य नाही. ते परवडणारही नाही. नवं शहर आमच्या शहरापासुन थोडं थोडकं नाही तर चांगल जवळजवळ ३००० मैल लांब म्हणजे अमेरिकेच्या दुसर्या कोस्टमध्ये..विमानानेही सलग ६ तास तरी लागतील. इथे लांब जागा बदलणं म्हणजे तिथे जाऊन बरचसं नवं घेणं जास्त परवडेल इतकं ते सर्व घेऊन जायचा खर्च आणि व्याप आहे. पण घर रिकामी तर करावं लागणार आहे. प्रत्येक खोली आवरताना तिथल्या सर्व आठवणींचा गुंता.
कितीवेळा वाटतं खरंच हा निर्णय घेऊया की सरळ अजुन काही दिवस इथं राहुन पुन्हा याच भागात नव्या नोकर्या शोधाव्यात. मनाचं सारखं तळ्यात-मळ्यात सुरू असलं तरी खरं सांगायचं तर ते जवळजवळ अशक्यच आहे. सध्या फ़क्त स्वतःला समजावणं चालु आहे की कधीकधी काही बदल काही वेगळ्या कारणांसाठी आवश्यक असतात. असे प्रसंग आपल्याला इथल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी लागणारं बळ देतं. आणि आता नुसतं हे घर सोडताना जर इतका त्रास होतो तर कुणास ठाऊक हा देश सोडताना किती त्रास झाला असता?? आता यातुन निभावलं तर कायमचं परत जाणं जास्त चांगल्या प्रकारे होईल. आणि मुख्य म्हणजे आता एक नवं शहर, तिथली प्रेक्षणीय स्थळं हे सर्व पाहुन जर परतायचं असेल तर का नाही??

Friday, November 6, 2009

शुध्द लेखन

खरं तर मी या विषयावर लिहायचं म्हणजे एखाद्या पाचवी फेल चंपुने पी एच डी चा प्रबंध लिहिण्या सारखं आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झालं तरी व्यावसायिक कामात मराठी लिहिणं कमी म्हणण्यापेक्षा अगदी नसल्यामुळे आता माझं मराठी जरी काही फार चांगलं राहिलं नसलं तरीपण या विषयावर लिहिण्याची हिम्मत करतेय. मराठी भाषे मधे बऱ्याच अनुदिनी सुरु झालेल्या आहेत. खूप सुंदर लेख, कविता लिहिले जातात, लोकं आपले अनुभव पण लिहितात. मला तरी सगळ्यांचच लिखाण वाचायला खूप आवडतं.

बऱ्याचशा ब्लॉग्ज वर मी आपल्या प्रतिक्रिया पण देते. बऱ्याच लोकांच्या अनुदिनीवर इतके सुंदर लेख असतात, कविता असतात, गुजगोष्टी असतात, पण  केवळ काही महत्त्चाचे शब्द चुकवल्यामुळे  त्या वाचतांना उगीच अडखळल्यासारखं वाटतं. बरेच लोकं अगदी साधा शब्द आहे ’आणि ’ हा दिर्घ(आणी) लिहिलेला असला की तो वाचतांना अडखळल्या सारखं वाटतं. माझा पण नेहेमीच गोंधळ उडतो ह्र्स्व आणि दिर्घ लिहितांना. तरीपण शक्यतोवर उच्चाराप्रमाणे लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर बरच शुध्द लिहिलं जाऊ शकतं.

आता माझी पण लिहिण्याची पध्द्त जी आहे ती बोली भाषेप्रमाणेच आहे. म्हणजे असं बघा, की ’लिहिलं’.. हा शब्द जेंव्हा लिहितॊ, तेंव्हा वर असलेल्या अनुस्वारामुळे ते बरोबर वाचलं जातं,जेंव्हा ’लिहिल’ असं लिहितो तेंव्हा ते  बरोबर वाचलं जात नाही. म्हणजे काय, तर बोली भाषेत लिहितांना जर अनुस्वार तरी पण दिला तरच ते बरोबर वाचता येते, नाहीतर लिहिल (लिहिलं) , केल, (केलं)  चा उच्चार चुकीचा केला जातो. ...

प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे.   हल्ली प्रमाण भाषेत ’लिहिलं’ ऐवजी ’लिहिले’, ’केलं’ ऐवजी ’केले’ , ’सारखं’ ऐवजी ’सारखे’, असे लिहिण्याची पध्दत आहे. अर्थात आपण  ( मी सुध्दा) जे  बोली भाषेनुसार लिहितो, ते व्याकरणाच्या दृष्ट्या फारच चुकीचे आहे. पण निदान ते वाचताना अडखळल्यासारखं तरी होत नाही असं मला बुवा वाटतं.

अगदी साधे सोपे नियम जरी पाळले तरीही बरेच लिखण शुध्द होऊ शकतं.जसे "आणि" हा शब्द ह्रस्व लिहिणे. शब्दाच्या सुरुवातीची वेलांटी ह्र्स्व लिहिणे. बहुतेक शब्दांची शेवटच्या अक्षरची वेलांटी ही नेहेमीच दिर्घ असते. अर्थात मी या विषयामधे भाष्य करण्याइतपत मोठी नाही, पण मला जे काही प्रामुख्याने जाणवले, ते इथे लिहिले आहे. या मधे जर कांही चुका असतील तर त्या अवश्य दुरुस्त करा.यात अजुन काही नियम/सुचना घालुन आपल्या सर्वांसाठी एक नियमावली किंवा संदर्भ मिळाला तरी खूप.

जेंव्हा वेलांटी ही शब्दाच्या मधे येते, तेंव्हा मात्र ती बहुतेक वेळेस ह्रस्वंच असते. हे सगळे ठोक ताळे आहेत. आता बघा, आणि जरी ह्रस्व असला तरी पाणी हा दिर्घंच असतो. या सगळ्य़ांची कारणं शोधताना जाणवलं की शेवटी आपण अर्थानुसार तो शब्द किती दिर्घ उच्चारतो त्यानुसार ते ठरत असावे. अर्थात या विषयातल्या एखाद्या माहितगाराने हा लेख अजुन पुढे वाढवला तर झाला तर आपल्या सर्वांचाच फ़ायदा आहे. कारण आधी आपण मायाजालवर मराठीत लिहित नव्हतो ते लिहायला (आणि वाचायला) लागलो. पुढची पायरी मराठी भाषा शुद्ध लिहायचा प्रयत्न करणे असं म्हणायला काही हरकत नाही.

असो. अजुन एक मुद्दा म्हणजे मराठी शब्द, हे मराठी व्याकरणाप्रमाणेच लिहावेत. जसे प्रत्येक शब्द, जॊ इकारान्त, किंवा उकारान्त असेल तर तो नेहेमी दिर्घ लिहावा. फक्त संस्कृत मधुन घेतलेल्या शब्दांना संस्कृत प्रमाणे नियम लावावे. मराठी व्याकरणामधे संस्कृत चे शब्द घेतल्यामुळे जास्त त्रास होतो लिहितांना. इतर भाषांमधे पण संस्कृत शब्द घेतले आहेतच , पण त्यांनी व्याकरण त्या - त्या भाषेचं लावलंय म्हणुन इतर भाषांचं व्याकरण सोपं जातं मराठी पेक्षा.

शाळेत शिकलेले अजुन काही आठवलेल्या नियमात महत्त्वाचा नियम म्हणजे,
१. एकेरी शब्द नेहमी दिर्घ लिहावेत जसे मी, ही, ती.
२. आणि त्याच शब्दाचं रुप जसं ती - तिला इथे तिला मध्ये "ति" ह्र्स्व, तू - "तुला" (हा मी जास्तीत जास्त वेळा चुकीचा लिहिलेला पाहिला आहे म्हणून खास उल्लेख)
३. उच्चारानुसार लिहिले जाणारे काही शब्द उदा.
उगीच
करतील
म्हणून
जीवन
खूप
तरी
करून
देऊन

ऋतु

काही वेळा वेळ असेल तर मी चक्क एखादं मराठी पुस्तक पाहाते आणि नक्की करते माझं शुद्धलेखन बरोबर आहे का?? तुम्ही म्हणाल हा काही पर्याय आहे का? पण चुकवण्यापेक्षा बरं. तरीसुद्धा काही ना काही राहून जातेच म्हणा...

या विषयावरचा गाढा अभ्यासू म्हणून श्री अरुण फडके यांचं नाव घेता येइल.  फडके यांचे बरेच कार्यक्रम होतात व्याकरणावर. त्यांची बरीच पुस्तकं पण आहेत शुध्द लेखनावर. आता इथे माझ्याकडे संदर्भासाठी नाहीयेत पण मिळवुन थोडा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्व मिळुन आपली भाषा शुद्ध लिहिण्यासाठी प्रयत्न जरुर करायला हवा यासाठी हा प्रपंच. कळावे लोभ असावा...

ता.क. या पोस्टसाठी माझे काही ब्लॉग मित्र-मैत्रीणींनी त्यांची नावे न सांगण्याच्या अटीवर मदत केली आहे. एकटीने हे एवढे नियमही लिहीणे अन्यथा जमलंच नसतं. अजुनही ज्या काही त्रुटी असतील त्या भरुन काढण्यासाठी वाचक वर्ग मदत करेल ही अपेक्षा.

Tuesday, November 3, 2009

दिव्यांची आरास





मोठी माणसं घरात असली की सगळे सण कसे नीट आठवण करुन दिले जातात. आता जी पौर्णिमा गेली ती "त्रिपुरी" यावर्षी आई घरात असल्यामुळे तिने आठवण करुन दिली. मग या दिवशीही एक दिव्यांची माळ घरात लावली. ती लावता लावता मला मागची त्रिपुरी आठवली.
मुंबईत बोरिवली पश्चिमेला मंडपेश्वर भागात ज्या गुंफ़ा आहेत तिथे प्रथमच त्रिपुरी पौर्णिमेला जायचा योग आला आणि प्रत्येक जणांनी केलेली दिव्यांची आरास पाहुन डोळे आणि मन तृप्त झाले. मुंबईजवळच राहुनही कधीच जाणं का झालं नाही माहित नाही आणि आता मायदेश सोडुन काही वर्ष झाल्यानंतर का होईना जाणं झालं हेही नसे थोडके. शक्य असेल तर या दिवशी मुंबईकरांनी (आणि इतरांनीही)  तिथे नक्की जायलाच हवं.
इथे एक छोटी टेकडी आहे, जिच्या आत या गुंफ़ांमधलं महादेवाचं मंदिर आहे. आसपास जो काही परिसर आहे तिथे या दिवशीच्या संध्याकाळी तिथे मोठमोठ्या रांगोळ्या काढुन त्याभोवती दिवे, पणत्या, समया ठेवुन दिव्यांची आरास केली जाते. सगळी जणं आपापले दिवे किंवा काही नुसतं तेल घेऊन मग ते सगळीकडे लावतात. कुठला दिवा विझला की तो मागुन येणारा कधी लावतो कळणारही नाही. काळोख व्हायला लागला तसा तो परिसर या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आणि कानावर तिथे लावलेले शांत सुरातले अभंग. दिवाळीचं हे वेगळं रुप प्रत्येक मुंबईकराने डोळ्यात साठवायलाच हवे आणि या गुंफ़ा जतन करण्यासाठीही पाठिंबा. जास्त लिहिण्यापेक्षा फ़ोटो लावते. पुढच्या वर्षी नक्की जाल..