Tuesday, December 31, 2013

आणखी एक आढावा....


ब्लॉग लिहायचे काही फायदे असतात म्हणजे जुन्या नोंदी वाचताना त्यावेळी आपल्याला काय वाटलं होतं किंवा अच्छा तेव्हा असं  असं  झालं होतं हे सगळं आठवतं. चांगले प्रसंग असतील तर पुन्हा छान वाटत आणि वाईट असतील तर त्यातून काही शिकता येईल का किंवा आता काही बदललं  आहे का याचा आढावा घेत येतो. मी तस प्रत्येक वर्षी नियमित ब्लॉग  लिहिणं किंवा निदान वर्षाच्या शेवटी छोटा आढावा घेणं असं केलं नाही पण केलं तर पुढच्या वर्षी वाचायला मजा येते असं  एकदम वाटलं. मागच्या वर्षी एवढ्याला आमचं विमान मुंबईत पोचून आम्ही जुने व्ह्यायच्या तयारीत होतो. काश! यावर्षी पण तेच करू शकलो असतो. असो मुद्दा तो नाही. निदान यंदाचं काय ते तरी थोडक्यात पाहायला हवं. पुढच्या किंवा त्यापुढच्या काही वर्षी हे सगळं वाचताना कस वाटेल?
 
तर वर्ष सुरु झालं आमच्या मुंबईत. मी खरं तर साल बदलतं, म्हणून जे काही महत्व दिलं जातं तेवढी एक गोष्ट सोडली तर कधीच या दिवसाच्या निमित्ताने शक्यतो वेगळं काही करत नाही.  एकदा शिकागोच्या नेवीपियरला हाडं गोठवणाऱ्या थंडीत फायरवर्कसाठी गेलो होतो; मी गाडीतून उतरलेपण नाही. उगाच दातखीळ बसवायची माझी तरी इच्छा नव्हती. पूर्वी थोडे फार बरे कार्यक्रम असायचे म्हणून टीव्ही पहिला जायचा तेही नवद्दीच्या दशकात. वर्षे सरली तसं या दिवसाबद्दल काही वाटेनासं झालं हे कळलंही नाही. मागच्या वर्षी देशात असताना देखील. तेव्हा तर मी अमळ लवकर झोपले कारण अजून जेट lag गेला नव्हता.
 
बरोबर तीन दिवसांनी बाबांबरोबर त्यांच्या हृदयविकाराचा त्यांच्याबरोबर सामना करण्यासाठी ताईबरोबर रहेजाला होतो. आजारांची आता मला तशी भीती वाटत नाही. मागची काही वर्षे स्वतःचे विकार स्वबळावर झेलतोय म्हणून आल्या परिस्थितीला तोंड द्यावं इतकं नियतीने शिकवलं बहुतेक. बाबा घरी येउन त्याचं रुटीन जुळवण्यासाठी आईला मदत करताना कोण आपलं आणि कोण तोंडदेखलं आपलं  हेही कळलं. चालायचंच. फक्त  यावेळी हे आई-बाबांना पण कळलं असं वाटतंय.
 
मग उरलासुराला वेळ काही खूप जवळच्या आणि काही तोंडदेखलं जवळच्या लोकांना भेटण्यात गेला आणि मग परत आलो ते खर तर इतरवेळची शांतता वगैरे काही न जाणवता. त्याचं मुख्य कारण आम्ही नव्या घरात सामान नुसतं सोडून गेलो होतो, ते सगळं लावायचं ठेवलं होतं. देशात वेळ नसल्यामुळे तशी काही विशेष खरेदी वगैरे झाली नव्हती पण आहे हेच इतकं पसरलं गेलं की मग एक एक खोली लावणे करता करता वसंत ऋतू कसा आला कळलंदेखील नाही. काही फ्रेम्स अजून बासनात पडून आहेत हे ही पोस्ट लिहिताना उगीच खुपतंय.
 
काही वेळा बदल सुखावतात, काही वेळा ते आपल्या असण्याची जाणीव तीव्र करून जातात. मागच्या गाडीच्या ब्रेक लावण्याच्या क्षणाची उसंत माझ्या गाडीला आणि मला जायबंदी करून गेली आणि उन्हाळ्याच्या प्लानिंगमध्ये फक्त फ़िसिओथेरीपी आणि व्यायाम याची भर पडली. ते उरकतेय आणि मुलाचा शालेय प्रवेश त्याच्या गमती जमतीची वाट पाहताना तो एक दिवस कोपर मोडून आला आणि मग फॉल-कलर मध्ये ही भर पडली. मध्ये मध्ये छोट्याच्या तक्रारी, नवऱ्याच्या  तब्येतीच्या कुरबुरी हे सगळं मीठ-मिरी सारखं पेरणीला होतच, पण आता आम्ही निर्ढावलो होतो.
 
मग मुलाचं प्लास्टर निघालं आणि अक्षरश: चार दिवसात प्लान करून वेगसला चार दिवसांसाठी जाऊन आलो. अजिबात गरम नाही आणि रात्री खूप जास्त थंडही  नाही, मागच्या आणि या ऑक्टोबरमधल्या वेगसच्या ट्रीप मला दोन्हीवेळा आवडल्या. काही तक्रार नाही. आताही एकंदरीत इकडच्या सणासुदीच्या दिवसाच्या निमिताने होणार्या काही मित्रमंडळीच्या भेटी. थोडं जवळपास बदल म्हणून जाउन येणं सुरु आहे. थंडीचा कडाका अगदी thanksgiving पासूनच जाणवतोय. दुसऱ्या  राज्यात भाची राहते; तीही मध्ये एकदा नवीन घर पाहायला आली. तिच्यानिमित्ताने pacific कोस्टला धावती भेट देऊन आलो. त्यानंतर पुन्हा एकदा वेळ काढून गेलो त्यावेळी लाटांचा जोर जरा जास्त होता. ती गाज कॅमेराच्या फोनमध्ये बंदिस्त आहे. कधी पुन्हा हे ऐकत बसलं  की  समुद्राचा आवाज मला अगदी पार देवगड आणि मालवणला घेऊन जातो. निसर्ग आपल्याला अंतर्मुख करतो हे खरेच. तो आपले आपल्याशी असलेले नाते स्पष्ट करतो. कधी तरी नुसतं हा आवाज ऐकत समुद्रकिनार्यावर जावं. खूप शांत वाटतं.
 
उद्या हेही साल बदलेल आणि कदाचित आणखी काही बदल आमच्यासाठी घेऊन येईल. बरेचदा अगदी एखादा कटू प्रसंगही  मी चांगल्या मनाने स्वीकारते; कारण त्यामुळे असे प्रसंग हाताळण्याची आपली ताकद तर आपल्याला कळतेच पण समोरच्याच्या मनात माझ्याबद्दल काय भलं किंवा बुरं आहे हेही स्पष्ट होतं. काही वेळा निंदकाचं  घर अगदी शेजारीच असतं मग ते लवकर कळलं म्हणून नियतीचे आभार मानणे  आणि अशांसाठी आपली दारं  बंद करणे हे करायचं देखील कळतं. या वर्षात वर म्हटलेल्या काही प्रसंगी ते शिकणं झालं आणि तीच या बाकीच्या थोड्याफार कठीण प्रसंगातली जमेची बाजू  म्हणायची.

थोडक्यात सांगायचं तर आपली लढाई सुरु असतेच, प्रसंग बदलत असतात, बदलत नसतात ती आपल्याला साथ देणारी आपली जवळची माणसं. माझ्याकडे अशी माझी म्हटलेली माणसं माझ्यासाठी आहेत हे या वर्षाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलं. हाच या लढाईमधला "माझिया मनाचा" विजय आहे आणि कदाचित हा आढावा म्हणूनच यावर्षी घेतला गेलाय. 

२०१४ साठी आपणा सर्वाना अनेक शुभेच्छा.
 


Friday, December 27, 2013

विंटर वंडरलँड

हिवाळा आला की  थंडी आणि सोबतीला लवकर काळोख पडणारे दिवस येणार हे  नेहमीचंच. यावर्षी त्याला जोड मिळाली जरा लवकर पडलेल्या बर्फाची. आणि अशा थंडीत येणाऱ्या नाताळच्या पार्श्वभूमीवर बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी डाऊनटाऊनच्या जवळ असणाऱ्या विंटर वंडरलँडला जायचा प्लान ठरला. 

खर म्हणजे मागची दोन वर्षे जायचं होतं, पण प्रत्येक वर्षी काही न काही निमित्त होऊन आमची तयारी होईपर्यंत वंडरलँड पुन्हा नॉर्थ पोलला गेलेली असे. यावेळी मात्र आम्ही अगदी रिमांइडर वगैरे लावून वेळेत गेलो. स्वागताला मिट्ट काळोखातून चमकणारा "विंटर वंडरलँड" लिहिलेला दिव्यांचा फलक आणि प्रत्येकाला कॅन्डी केन देणारा स्वयंसेवक.   


त्यानंतर जसं जसं पुढे गेलो तसं एक वेगळंच विश्व दिव्यांच्या माळांनी आमच्यापुढे उभं राहिलं. काळोखात धावणारी सांताची गाडी काय आणि दुधाचे हंडे  ओतणाऱ्या बायका काय. 
आमच्या या छोट्या सफरीमधली काही क्षणचित्रे