Saturday, July 18, 2009

सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग ३)

४ जुलैच्या कार्यक्रमातलं मुख्य आकर्षण म्हणजे "मी आशा" हा कार्यक्रम. शिवाय मी आमच्या माहितीकेंद्रावर दहा ते बारा असं बसायचंही ठरलं होतं. पण आज हॉटेलवरुन यायचं असल्यामुळे तशी जास्त घाई नव्हती. खरं तर लग्नाचा शालु असा ड्रेस कोड होता पण आता माझ्या पिढीत फ़ार कुणी लग्नाचा शालु बिलु घेत असेल असं मला वाटत नाही मग मी ती हौस आपलं खास मराठी म्हणजे नाराय़ण पेठेने भागवुन घेतली.
आज ब्रेकफ़ास्ट अजिबात सोडायचा नाही असा कालपास्नंचा ’पण’ होता त्यामुळे आम्ही अगदी वेळेत म्हणजे साधारण सव्वा आठच्या दरम्यान पोहोचलो. रांग होतीच. गरम गरम उपमा आणि मोतीचुराचा लाडु असा बेत होता. बाजुला बारीक शेव आणि इतर प्रकार म्हणजे अंडं,पाव,लोणी,सिरियल, दुध इ.इ. होतेच. यार हे तीन दिवस संपल्यावर अज्जिबात वजन करायचं नाही. असं मनातल्या मनात सांगत गोडाचाही माझा वाटा मी घेतला.
आज सकाळी मला एकटीने थोडा वेळतरी मुलाला घेऊन राहावं लागणार होतं कारण यालाही हॉटेल शटलचं थोडं देखरेखीचं काम होतं. नाहीतरी नऊ वाजले होते आणि दहानंतर माझं स्वतःचं काम. एक तास काय करावं बरं असा विचार करत होते पण ओळखीच्या लोकांशी हाय हॅलो, "अगं! किती मोठा झाला हा?", "चालतो पण?", "ए, साडीत तुला नेहमी नाही पाहिलं गं.", "संध्याकाळी आशाच्या कार्यक्रमाला आहेस ना?" या आणि अनेक छोट्या छोट्या संभाषणात कसा वेळ गेला कळलं नाही.
मला खरं तर आरुषला ’अग्गोबाई, ढग्गोबाई’ दाखवायाचा होता कारण ती गाणी घरी नेहमी वाजत असतात पण तेवढा वेळ मिळेलसं वाटलं नाही. मग एक्स्पोकडे उगाच चक्कर टाकली. कारण कुठले कार्यक्रम जरी थोडे वेळेला हलले तरी एक्स्पो काय तिथेच ठाण मांडुन बसलेला असतो ना?

सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंचं गड किल्ल्यांच्या छायाचित्रांच प्रदर्शन होतं. छान होते फ़ोटो आणि सर्वांचं हवाईदर्शन घेऊन काढलेले मग काय..बघताना आमची मात्र गोची झाली होती. कारण तिथे सगळीकडे पडदेच पडदे होते आणि चिरंजीवांनी त्यातुन आरपार जाण्याचा खेळ चालु केला होता. मग एकदा मी आणि एकदा नवर्याने असं मिळुन प्रदर्शन पाहिलं. बाकीचे स्टॉल्स नंतर पाहुया असं म्हणुन आम्ही तिथुन बाहेर आलो. कामंही होती ना?
बाळाला स्ट्रोलरमध्ये ठेवुन उर्फ़ डांबुन ही माहितीकेंद्रांची कामं करणं म्हणजे काय आहे ते मला विचारा. एकतर आजुबाजुला इतर लोकं, मुलं फ़िरताहेत आणि आपल्याला चालता येत असुन आपण बांधलेले म्हणजे काय?? पण कुठूनतरी सुजाता आणि तिचा मुलगा अश्विन उगवले आणि आम्हाला पुन्हा एकदा आमचा एंटरटेनर मिळाला. सम्मेलनाचा तसा दुसरा दिवस असल्याने लोकं बरीच सरावली होती पण काही एक दिवसासाठी येणारे लोकं बरेच प्रश्न घेऊन येत होते आणि शिवाय कार्यक्रमांच्या वेळेत थोडा बदल झाल्याने त्यासाठीच्या शंका-समाधानासाठीही लोकांना या माहितीकेंद्राचाच आधार होता. थोडक्यात काय दुकान सतत चालु होतं. माझ्याबरोबर मदतीला देवकी होती आणि ती खूपच धावपळ करत होती. कार्यक्रमाच्या नव्या श्येडुयलच्या प्रती काढण्यासाठी स्वतः गेली. मलाही सर्व माहिती दिली. शिवाय माझ्या बाजुलाच एक दिवसाचा पास विकण्याचा काउंटर होता त्या व्यक्तीचं मी नाव विसरले ते पण खूप कौतुक करत होते. पण मजा येत होती. एक दोन कार्यक्रम चुकले पण मला वाटतं कुणीतरी केलं नाही तर सर्वांना मजा कशी येणार? शेवटी परक्या देशात आपलं काही करायचं म्हणजे बरचसं श्रमदानावरच होतं. माझा तर अगदी खारीचा वाटा. बरेच असे लोक मला माहित आहेत ज्यांनी इथे फ़क्त कामच केलं अगदी घरचं लग्न-कार्य असल्यावर कसं आपलेपणाने करतो तसं. असो. मला या बुथवरही खूप मजा आली. मध्ये कुणी नव्हतं तेव्हा मुलाला एकीकडे थोडं भरवुनही झालं.
जेवायच्या आधी विशेष काही पाहाणं झालं नाही. एका ठिकाणी एकांकिका स्पर्धा पाहायला बसले पण बराच वेळ त्यांचं आवाजाचं तंत्र जुळत नव्हतं म्हणून उठले. "स्वरबंध" म्हणुन इथल्या कलावंतांचा विशेष म्हणजे इथे वाढलेली मुलंही सहभागी असणारा कार्यक्रम पाहायचा होता. पण तो चक्क हाऊसफ़ुल्ल होता. आणि मला वाटतं कदाचित असं पहिल्यांदाच झालं असेल की संपुर्ण कार्यक्रमाला वस्न मोअर मिळाला होता. म्हणजे पुन्हा चारला हाच कार्यक्रम असणार होता. आता जेवणाची रांग लावणे हाच उत्तम मार्ग होता. आणि कधी न ट्राय केलेलं नागपुरी जेवण असणार होतं.
जेवणाचा बेत छान होता. कोंबडीची चव जरा वेगळी. ही वडा-भात भानगड मात्र कळली नाही. आमच्या रांगमैत्रीण म्हणाली की तिथे हा वडा आणि भात तेल घालुन खातात. खात असावेत. पण मला त्या भातावर वरण, कढी काहीतरी घेतल्याशिवाय गिळता येईल असे वाटत नव्हते. आणि वडा आपल्या मेदुवड्यासारखा आणि थोडा कोंबडी-वडे स्टाइलवाला पण तुकडे तुकडे करुन भातात घातलेला. जेवायला मजा आली कारण इथे घरी कुठे आपण रोज साग्रसंगीत जेवणावळीसारखं बनवतो. आज आम्ही सुजाताच्या कुटुंबाबरोबर एकत्र जेवलो त्यामुळे जेवणाबरोबरच गप्पाही रंगल्या. मग जेवणानंतर कुठले कार्यक्रम पाहायचे याचीही चर्चा झाली. त्यामुळे काही कार्यक्रम मी आणि सुजाता एकत्र पाहु शकु असे होते. रांगेत थकुन आमच्या बाळानेही एक डुलकी काढुन झाली होती. आता त्याचंही जेवण आटोपुन त्याच्या बाबाने त्याचा ताबा घेतला आणि मी उंडारायला मोकळी झाले.

अजुन कार्यक्रम सुरु व्हायला वेळ होता त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा एक्स्पोकडे मुक्काम वळवला. थोडी छोटी मोठी खरेदी केली. एक्स्पोमध्ये माझ्यासाठी खास गम्मत होती ती म्हणजे भातुकलीचा संसार. एप्रिलमध्ये मी याबद्दल लिहीले होते इथे तर चक्क करंदीकरकाका आपल्या संसारातील थोडी भातुकली इथे घेऊन आले होते. आमच्या बाळाला खेळायला त्यांनी वेगळी ठेवलेली भातुकली दिली. मला तर पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटत होतं. फ़क्त पाहुन समाधान केलं आणि चिक्कार फ़ोटो काढले. बाकी इतर एक दोन स्टॉलवर चक्कर मारता मारता दोन वाजायला आले.
आता कालचा अनुभव गाठीशी होता. पण आमची एक मैत्रीण वाद्यवृंदला निवेदन करणार होती म्हणुन प्रथम तिथे आम्ही एकत्र गेलो. कार्यक्रम सुरेख होता. मराठी गाणी फ़क्त वादकांनी बासरी,सतार, जलतरंग आणि तबला याच्या साथीने वाजवलेली. थोडा वेळ हा कार्यक्रम पाहुन उठलो कारण वरच्या माळ्यावर राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी आणि श्री. पणशीकर यांचा कार्यक्रम होता. आता आम्ही दोघीच फ़क्त वर गेलो. आणि आमचे पुरुषगण यात आम्हा दोघींना मुलगेच असल्याने तेही त्यांच्या आवडीचे कार्यक्रम पाहायला. हा कार्यक्रम वेगळ्या कारणासाठी लक्षात राहिला. पण ती आठवण वेगळी लिहेन. हाही कार्यक्रम खूप रंगला. थोड्या वेळात स्वरबंधसाठी पुन्हा रांग मोठी आहे असा फ़ोन आला मग इथुन उठलो. स्वरबंधचा कार्यक्रमही छान होता. पण मुख्य सभागृहात नाना पाटेकरची मुलाखत होती. मी इतका वेळ सारखेच गाण्याचे कार्यक्रम पाहातेय आणि रात्री आशा म्हणजे पुन्हा तेच म्हणून मी आणि माझा नवरा मुलाला घेऊन तिथे पळालो.


मुलाखत इतकी छान रंगली की मजा आली. मी तसं नाना पाटेकरचं एकही मराठी नाटक पाहिलं नाही पण मुलाखतीमधुन बरीच माहिती कळली.
आता मात्र मुलाला थोडं हॉटेलवर नेऊन कपडे बिपडे बदलुन आणुया असा विचार करुन दुसरे कार्यक्रम पाहायचा विचार रद्द करुन सरळ हॉटेलवर आलो. जरा ताजंतवानं होऊन जेवायला निघाल्यावर बरं वाटलं.
रात्री जेवणाचा मालवणी थाट होता. कोंबडी होती वडे का ठेवले नव्हते माहित नाही. कदाचित सकाळी पण वडा-भात होता म्हणून असेल. कोलंबीचा रस्सा मस्त झाला होता. पण वाढताना थोडं रेशनिंग होतं. जेवताना आम्ही ज्या टेबलला बसलो होतो तिथेच सारेगमप मराठीचे सई, सायली आणि मंगेश हे कलाकारही भेटले. पैकी सईबरोबर आधीही गप्पा मारल्या होत्या. आता ती आमच्या कडे अमेरिकेत कसं असतं याबद्दल बोलत होती. त्यांना एकंदरित इथे आवडलं पण त्यांच्या विसामुळे त्यांना दुसर्याच दिवशी निघावं लागणार होतं त्यामुळे त्यांचं कुठे फ़िरणं झालं नव्हतं. मंगेशला बरेच प्रश्न होते आणि आम्हाला त्यांच्याकडुन कळलं की आशाच्या कार्यक्रमासाठी त्यांना कोरसला गायला आयत्यावेळी बोलावलं होतं.
जेवुन खाउन बाहेर आलो तर कार्यक्रम एक तास उशीरा असल्याचा बोर्ड लावला होता. आता आली का कंबख्ती?? साड्या नेसुन हे असं ताटकळायचं आणि ते पण लहान मुलाला घेऊन म्हणजे जरा बाका प्रसंग होता पण आम्ही मग आरुषला खूप दमवलं. म्हणजे आमची ती कार्यक्रम पाहायला मिळावा यासाठी केलेली खास व्युहरचनाच म्हटली तरी चालेल. कार्यक्रम सुरु झाला आणि स्ट्रोलरमध्ये थोडावेळ इथे तिथे फ़िरवल्यावर स्वारी जी झोपली ती दुसर्या दिवशीच उठली.

जवळ जवळ साडे नवाच्या सुमारास सुरू झालेल्या कार्यक्रमाबद्दल बोलायचे तर खरंच शब्द कमी पडतील. पहिल्याच गाण्याला जो सुर लागला त्याला पंच्याहत्तरीतील बाई गातेय असं म्हणणं कठीणच गेलं असतं आवाजातला गोडवा वयोपरत्वे कमी होणं साहजिक आहे पण सुरांचा साज अप्रतिम. सुधीर गाडगीळांचे प्रश्न आणि आशाताईंची एकामागुन एक येणारी सुमधुर गाणी अहाहा! मध्ये त्यांना ब्रेक म्हणुन सुदेश भोसले आणि सारेगमप वाल्यांनी काही गाणी म्हटली. तीही छान होती. मग आशाजी आणि सुदेश यांनी गोमु संगतीनं चालु केलं आशाजी मस्त नथ आणि कोळणीसारखा हिरवा पदर लावुन नाचल्या. शिवाय त्यांनी थोडी फ़ार मिमिक्री केली. त्यातली गुलाम अलींची स्टाईल तर एकदम सही होती. आणि लता मंगेशकरांची तर नक्कल फ़ारच मजेदार फ़िल देते. साडेबारा वाजता मात्र आम्ही निघालो कारण आम्हाला आता चालत हॉटेलवर जायचे होते आणि शनिवारची रात्र सिटिमध्ये उगाच रिस्क नको. मला वाटतं त्यानंतर तीन-चार अजुन गाणी होऊन तो कार्यक्रम संपला.
आता उद्या संपणार अशी रुखरूख वाटत पावलं हॉटेलच्या दिशेने चालत होती. काही कलाकार इतक्या रात्री हॉटेलबाहेर जेट लॅग मुळे किंवा बहुतेक फ़ुकायला जमले असावेत सचिन खेडेकर आणि इतर काही मंडळी...आज काम, कार्यक्रम, खाणं, खरेदी सगळं कसं अन्डर वन रुफ़ छान झालं होतं. आता मात्र डोळ्य़ावर झोपेचा अंमल चढु लागला. मनात आशाचा आवाज ..."चांदण्यात फ़िरताना....."

No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.