Thursday, July 9, 2009

सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)

हा तर काय सांगत होते पहिल्या दिवसाची सुरूवात तर उशीरा पोहोचल्यामुळे पेढाच जास्त गोड मानुन केली पण समोरुन येणारी अमेरिकेत वाढणार्‍या छोट्या पिढीची मिरवणुक पाहुन मात्र बाकीच्या चिंता विसरले.

ढोल, ताशे आणि अगदी पारंपारिक पद्धतीनं सजलेले बाळगोपाळ अगदी दृष्ट लागण्यासारखे गोड दिसत होते आणि त्यांनी एक छोटं नृत्य सादर केलं त्याने तर अजुनच बहार आली.
आता मला माझी मैत्रीण सुजाता आणि तिचं कुटुंबही भेटलं होतं. त्यामुळे आरुषला हक्काचा एंटरटेनर मिळाला होता. मात्र स्वारी अजुन म्हणावी तशी रमली नव्हती आणि मलाही पैठणीमुळे उगाच दबल्यासारखं होत होतं; त्यामुळे मुख्य सभागृहात जायचं जरा टाळलं. उगाच इथे तिथे पाहुण्यांची रेलचेल पाहात बसलो. भारतातुन आलेली कलाकार मंडळी इथे तिथे बागडत होती. सलील, संदीप (हे म्हणजे जोडीनेच दिसतात हा!), सारेगमप मधले काही कलाकार आणि इतर काही मंडळी होती. मी आपली नवर्‍याची वाट पाहात म्हणजे मुलाबरोबर काही करता येईल का म्हणून उगाच वेळकाढुपणा करत होते.
मध्येच सुजाता आली आणि तिने आतमध्ये काय चालु आहे त्याची माहिती दिली. मी म्हटलं अग कुठलातरी कार्यक्रम पाहिला पाहिजे. पण मुलांच्या व्यापात काही सुचत नव्हतं. शेवटी जादुचा प्रयोग पाहावा असं ठरलं. जादुगार आणि लहान मुलांचे कार्यक्रम इ. एकदम दुसर्‍या टोकाला होते. त्यामुळे मध्ये मी सरळ कॉरिडॉरमध्ये ब्रेक घेऊन मुलाच्या पोटात थोडं काही ढकललं. जादुगार खुपच छान रमवत होता मुलांना पण एक वर्षाच्या मुलांना काय त्याचं कौतुक? शेवटी तिथुनही बाहेर आलो आणि पुन्हा मुख्य सभागृहाच्या भागात गेलो.
इतक्यात एका ठिकाणी रांग लागल्यासारखं वाटलं आणि घड्याळाकडे लक्ष गेलं. अरेच्या! साडे अकरा होतील म्हणजे बरोबर आहे. पेशवाई पंगतीच्या थाटाची तयारी करायला हवी. नशीब की नवरा पण कुठुनतरी एकदाचा उगवला आणि आम्ही त्या न संपणार्‍या रांगेत थांबलो.
त्या पेशवाई थाटाचं वर्णन म्या काय करावं. खादाडी हा आमचा दोघांचा विक पॉइन्ट त्यामुळे नावावरुन जरा हाय एक्सपेक्टेशन ठेवुन होतो आम्ही. म्हणजे आता वांग्याची भाजी, वालाची उसळ, बटाटा भाजी, पुरी, चपाती, मसालेभात, साधा वरण भात, श्रीखंड-पुरी, चपाती इ.इ. होतं पण उगाच पेशव्यांशी संबंध कळला नाही. नंतर कुणीतरी आम्हाला म्हणालं की अगं पेशवे को. ब्रा. होते ना त्यांच्यात हाच थाट... मला आपलं उगाच पु.लंच्या एका लेखातलं "खा लेको मटार उसळ" असं एक वाक्य आठवलं.
सकाळपासुन व्यवस्थित असं पहिलच खाणं असो किंवा काय, मला चवी आवडल्या आणि आयतं कुणी इतर प्लान करुन इतके पदार्थ पानात असताना काय रडायचं. आमच्या पिलुनेही गरम गरम वरण भात तुप खाल्लं. त्यामुळे तर मला जास्तच समाधान वाटलं.
आता एकतरी कार्यक्रम पाहुया असा विचार करत होते. पण मुलाची लक्षणं ठिक दिसत नव्हती. पण कसा काय तो नवरा स्वतःच म्हणाला मी याला हॉटेलवर घेऊन जातो तू बघ काहीतरी. हुश्श. आता जरा कार्यक्रमाची रुपरेषा पाहुया म्हणून बघते तर अगदी जंत्रीच होती. म्हणजे कुठे तरुणाई, कुठे मैतर, कुठे अवघा रंग...काय करावं म्हणजे सर्व एकाच वेळचे होते पण अजुन सुरु काहीच झालं नव्हतं.

मैतरच्या इथे जरा लवकर सुरु होईलसं वाटलं म्हणून बसले. पण तिथेही छोट्या छोट्या गोष्टी चालुच. पण पुन्हा उठुन दुसरीकडे जायचाही कंटाळा आला होता. शेवटी अडीचच्या दरम्यान कार्यक्रम सुरु झाला पण वेळेत संपवायचा असल्या कारणाने त्यांनी मध्ये मध्ये तो (सांगुन) कापला त्यामुळे उगाच पुर्ण कार्यक्रम बसलो असं झालं. आणि नंतर प्रत्येकवेळी ही टिप वापरली, त्यामुळे थोडे थोडे बरेच कार्यक्रम कव्हर करता आले. म्हणजे इथेही टिकमार्क..:)
असो. चारच्या दरम्यान खाली आले तर तरुणाई बहुतेक वेळ बदलल्यामुळे आताच चालु झाला होता. पण अजुन घरची एक ट्रिप राहिली होती म्हणून सरळ हॉटेलवर जाऊन पुन्हा घरी गेलो आणि दोन दिवसांच्या बॅगा भरुन परत घरी आलो. परत आलो ते जवळ जवळ संध्याकाळच्या जेवणाच्याच वेळेला. कारण जेवण साडे-आठ पर्यंतच होतं. शिवाय आता जेवणाचा कोल्हापुरी थाट असणार होता. म्हणजे तांवडा नाहीतर पांढरा रस्सा असेल म्हणून पोटातले कावळे जरा जास्तच जोराने ओरडत होते. असो. जेवण मात्र खरच छान होतं. कोंवडीचा रस्सा रंग माहित नाही पण एकदम अस्सल होता. अहो म्हणजे गुजराथी केटरर आहे हे ज्यांना माहित आहे तेच हो म्हणतील. बाकी बेतही फ़क्कड होता. चला आता एकतरी कार्यक्रम दोघ (खर तर तिघं) मिळुन पाहुया असं म्हणत होते. म्हणजे मुलगा झोपला तरच.
दुपारी हॉटेलवर जरा जास्तच झोप झाली होती की काय माहित नाही पण पोराची झोपेची लक्षण नव्हती. पण "हास्य पंचमी" सोडवत नव्हती. तिघही आपल्या जागा घेऊन बसलो. तिथे मागच्या लोकांना स्टेजवरचं दिसावं म्हणून दोन-तीन मोठ्या स्र्किन्स होत्या त्यातली एक आमच्या रांगेपासुन तशी जवळ होती आणि त्यावरची माणसं हलताना पाहुन मुलाला गम्मत वाटत होती. म्हणून मुलगाही आनंद घेत होता. कार्यक्रमाची सुरुवात मोठीच दिमाखदार आणि विक्रम गोखले, प्रभावळकरांसारखे दिग्गज कलावंत असल्यामुळे छान चालु होतं. मध्येच आमच्या मुलाने असहकार आंदोलन पुकारल्यामुळे मी शेवटी त्याला घेऊन मागे किंवा बाहेर जायचा विचार केला. नशीवाने मागच्या बाजुच्या जाजमावर माझ्या सारख्या इतर आया आणि त्यांची पोरे होती. त्यामुळे जमेल तेवढं स्क्रिनवर आणि मध्ये मध्ये इथे तिथे बागडणार्‍या बाळाला असा माझा दुहेरी प्रयोग चालु झाला.

हा कार्यक्रम म्हणजे जुन्या विनोदी नाटक, नाटककार अशी थोडी माहिती सांगुन मग त्यातला एखादा भाग सादर होणार असं चाललं होतं. जोपर्यंत पु.लंची आणि इतर लोकपसंतीचे भाग चालु होते तोपर्यंत टाळ्या- हशा यांची रेलचेल होती. पण "पळा पळा कोण पुढे पळेतो" यातलं सादरीकरण चालु झालं तेव्हा मात्र आधी एक-दोन मग अर्धी रांग करता करता अर्ध्याहुन अधिक लोक अक्षरश: पळुन गेले. म्हणजे आम्ही मागच्या बाजुला होतो तर मध्ये मध्ये माझ्या मुलाला ही इतकी लोकं आपल्याशी पकडा पकडी खेळतायत का म्हणून तोही तुरुतुरु पळत होता. मध्ये एक दोन अपिरीचीत माणसांच्या मागेही गेला. बापरे.
खर तर मलाही पळावसं वाटत होतं पण माझा नवरा त्याच्या टिमचा काही प्रॉब्लेम सोडवायला त्याचवेळी बाहेर गेला होता. आणि आयत्या वेळी निर्णय घेतल्यामुळे आम्हाला जवळचं हॉटेल मिळालं नव्हतं म्हणून माझी गोची झाली. असो. यथावकाश नवरा आला आणि तोपर्यंत प्रशांत दामलेंचं ’लग्नाची गोष्ट" आणि संजय नार्वेकर इ. असलेलं "यदाकदाचित" असे दोन छान नाटकांमधले प्रसंग पाहायला मिळाले. पळालेल्या लोकांनी हे मिस केलं बघ. आम्ही एकमेकांना सांगत होतो.
रात्रीचे अकरा साडेअकरानंतर घरी जायचं नव्हतं त्यामुळे इतकं बर वाटत होतं. पळुन पळुन दमलेलं माझं पिलु स्ट्रोलरमध्ये शांत झोपलं होतं. त्याची झोपमोड नको म्हणून आम्ही चालतच रुमवर निघालो. आता दुसर्‍या दिवशी कार्यक्रम पाहण्याची वेगळी व्युहरचना करण्याचे प्लान बोलता बोलता चालु झाले.

No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.