Monday, February 24, 2020

गाणी आणि आठवणी २२ - कोई ये कैसे बतायें

आजकाल जेव्हापासून गाणी ऍपवर उपलब्ध व्हायला लागली तेव्हापासून आपण आपल्याला हवी ती शोधून ऐकायचं सोडलं का? असं काहीवेळा वाटतं. अशावेळी आपण आपल्या त्या आवडीच्या कालखंडात जाऊन कुठलं गाणं स्वतःहून ऐकावं अशी आठवण स्वतःला करून देण्याचा एक दिवस येतो. अशावेळी मी बरीच गाणी ऐकते. त्यातलं माझं अतिशय आवडतं गाणं म्हणजे "अर्थ" चित्रपटात जगजीतने गायलेलं कैफी आझमींचं हे गाणं. 




जगजीतच्या किंवा इतरही मी ऐकलेल्या गझलांपेक्षा ही वेगळी वाटते कारण ही संपूर्ण प्रश्नात्मक गझल आहे. हिची सुरुवात आणि शेवटही प्रश्नार्थक आहे.  

                   कोई ये कैसे बताए के, वो तन्हा क्यूँ है?
                वो जो अपना था वो ही, और किसी का क्यूँ है?
                यही दुनिया है तो फिर, ऐसी ये दुनिया क्यूँ है?
                यही होता है तो आख़िर, यही होता क्यूँ है?

सुरुवातीचे हे चार प्रश्न आपण ऐकतो तेव्हा किंवा खरं तर तुम्ही चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं ऐकत नसाल तर खरं तर आपल्या मनाची तयारीही झालेली नसते की नायकाची किंवा ज्याचे हे प्रश्न तो मांडतोय त्याचा नक्की काय किस्सा आहे. 

पण तरी शब्दशः अर्थ घेतला तरी आपण म्हणू शकतो की गाणं कुठेतरी मनाला भिडतंय. म्हणजे वरवर तनहा म्हणजेएकटा पडलाय हा अर्थ असला तरी ती "तनहाई" प्रेमभंगाचीच असावी असा काही कुठे नियम नाही ना? हा "वो जो अपना" होता तो आणखी कुणाचा होतो म्हणजेही प्रेमभंगच हवा असंही जरुरी नाही. आणि मग जर तुम्हाला हा एकटेपणा कुणीतरी ज्याला तुम्ही जास्त जवळचं मानता तो दुसऱ्या कुणापाठी गेला मग पुढचे दोन सवाल तुम्ही केलेत तर काय चुकीचं आहे? 

मला वाटतं कॉलेजजीवनात अगदी मित्र-मैत्रिणीमध्येही असा "मैत्रीभंग" झाला तरी त्या अडनिड्या वयात आपण निदान पहिल्या कडव्याला आपलं म्हणू शकतो. जगजीत हे इतकं मुलायम आवाजात मांडतो की मला वाटतं "प्रेमभंग" असो "मैत्रीभंग" असो की अगदी आई-मुलाची अनबन झालेली असो. त्याच्या त्या मुलायम आवाजातूनही शब्दांची आर्तता कुणालाही एखादा जुळणारा प्रसंग आठवून हळवं व्हायला होणारच. एकदा का त्याच्या पहिल्या चार प्रश्नांशी तुम्ही सहमत झालात की उरलेली गझल आतुरतेने ऐकली जाते. कदाचीत त्याच्या सगळ्या "क्यो"ची उत्तरं मिळतील म्हणूनही आपण कां टवकारतो. 

पण पुढे तो उत्तरात न जात थोडे संदर्भ देऊन त्याचा आणखी एक प्रश्न पुढे ठेवतो. 

                       इक ज़रा हाथ बढ़ा दे तो, पकड़ लें दामन
                    उसके सीने में समा जाए, हमारी धड़कन
                    इतनी क़ुर्बत है तो फिर, फासला इतना क्यूँ है?


इथे मात्र "बात" वेगळी आहे याची झलक मिळते. हा दुरावा वेगळा आहे हेही लक्षात येतं. पण तरीही "फासला" आहेच आणि त्याचं कारण तो समोरच्याला विचारतो आहे हेही पक्क होतं. आपण आपल्या परिस्थितीला आणि तेही ती या नायकाच्या परिस्थितीशी जुळत नसेल तर बाजूला काढून त्याच्या प्रश्नाचं पुढे काय उत्तर मिळतं का म्हणून त्या गिटारच्या तारा आपल्या मनात वाजवत पुढे ऐकतो. 

                          दिल-ए-बरबाद से निकला नहीं, अब तक कोई
                      इक लुटे घर पे दिया करता है, दस्तक कोई
                      आस जो टूट गई फिर से, बंधाता क्यूँ है?

त्याचं उत्तर मिळतंच असं नाही हे इथे स्पष्ट व्हायला सुरुवात होते. खरं तर शायर इथे नक्की काय म्हणू पाहतोय हे आपलं आपण शोधायचं. "लुटे हुए घर पे दस्तक" म्हणजे जो कोणी होता तो गेला आणि आपण ठोठावतोय आणि पुन्हा त्याच गोष्टी/व्यक्तीची आस लावू पाहातोय. आता मी तरी जास्त संदिग्ध होते आणि पुढे हा काय शेवट करेल त्याची वाट पाहते. 

                           तुम मसर्रत का कहो या, इसे ग़म का रिश्ता
                       कहते हैं प्यार का रिश्ता है, जनम का
                       रिश्ता है जनम का जो ये रिश्ता तो, बदलता क्यूँ है?

इथे निदान त्याचं चित्र स्पष्ट होतंय. म्हणजे नातं आनंदामुळे आहे की दुःखामुळे हे समोरच्याने ठरवायचं पण शेवटी ते प्रेमाचं आजन्म टिकणारं नातं का बरं बदललं. हा अंतिम प्रश्न आहे. 
गाणं आपल्याला प्रश्नात ठेऊन फॅट चटकन संपलं अशी भावना येते. 

जर तुम्ही खरंच एखादं नातं गमावल्याच्या काळात हे गाणं ऐकलं तर ते तुम्हाला अंतर्मुख करेल. त्या नात्याची वीण कशी उसवली गेली असावी या प्रश्नाने तुमच्या रात्री जाग्या राहतील आणि त्या तशाही अवस्थेत तुम्हाला साथ करायला फक्त आणि फक्त जगजीतचाच मुलायम आवाज लागेल. मला वाटतं कुठचेच संदर्भ न देताही एखाद्या जेनेरीक औषधाचं काम गाणं करतंय. 

माझा एक मित्र जो मी बऱ्याच वर्षांपूर्वी गमावला आहे, त्याने हे गाणं आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदी ऐकवलं होतं. त्याला एकंदरीत मध्येच गाण्याच्या लकेरी छेडायची सवय होती आणि या गाण्यातला सुरुवातीचा प्रश्न "यहीं होता है तो आखिर, यही होता क्यूँ है?" हे तो गायचा. मला वाटतं आता माझ्या वयातल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या आयुष्यात माणसं गमवायला सुरुवात केली आहेत. कधी ती असून नसल्यासारखी असली तरीही गमावलीच म्हणायची. तर या आमच्या मित्राने आम्हा सर्वांच्या आठवणीत तोच प्रश्न विचारला असेल का? 

#AparnA #FollowMe


No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.