Thursday, June 12, 2014

उन्हाळ्याचं वर्तुळ

अजगरासारख्या सुस्तावलेल्या दुपारी चिंचेच्या झाडाखाली खाट सरकवून नदीवरून येणारा वारा खात पाय लांब करणे ही उन्हाळ्यातली माझी अत्युच्च आठवण आहे. खाटेवर जागा पकडणे ही एकमेव महत्वाची बाब. त्यासाठी जेवतानाच आधी विचार करून वेळेत किंवा खरं म्हणजे सगळी एकत्र जेवत असताना आपलं लवकर आटपणे आणि परसदारी भसाभस चूळ भरून मागच्या वाड्यात झपाझप जाऊन एकदा बूड टेकलं की मग आजूबाजूला हळूहळू जमणाऱ्या मोठ्या मंडळींच्या गप्पा ऐकत उन्ह सरायची वाट पहायची. 

त्या गप्पांमध्ये कळणारे आणि न कळणारे कितीतरी विषय चघळले जात. आईचे बाबा, म्हणजे माझे मी न पाहिलेले आजोबा, ही त्यांची सर्व मुले एकत्र जमली की गप्पांमध्ये येणारी हमखास व्यक्ती. त्यांना आई, मावश्या, मामाच काय पण  अख्खा गाव "दादा" म्हणे. मामांच्या ओटीवर त्यांचा तरुणपणातला फोटो आहे. दिसायला राजबिंडे आणि देश स्वतंत्र व्हायच्या आधीच्या काळापासून तेव्हाच्या काँग्रेसमध्ये. तेव्हा जयंतीबेन म्हणून काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या त्यांच्या कार्यालयात काम केलेले. दादा गेले त्याच वर्षी नेहरू वारले असा दाखला आई नेहमी देते. तुरुंगवासही भोगला; पण त्याचा पुरावा घेऊन सरकारी सोयी उपटल्या नाहीत. फक्त एका मुलीचं लग्न पाहून संपलेल्या आयुष्याने या मुलांच्या आयुष्यात कष्टाची वर्तुळं वाढली हे काही वेगळं सांगायला नको. 

"त्या दुपारी" या म्हणजे दादा गेल्यानंतरच्या काळातल्या आणखी काही आठवणी ऐकून न कळत्या वयातही मनाला यातना व्ह्यायच्या. तेव्हा खरं सांगायचं तर आमची तेव्हाची परिस्थिती म्हणजे त्याकाळचे मध्यमवर्गीयच किंवा कदाचीत त्याहून एक पायरी खाली. चाळीतलं दोन खोल्यांचं घर, वर्षाला एक पावसाळी आणि एक उन्हाळी चप्पल, दिवाळीलाच काय ते नवीन कपडे (मध्ये कधीतरी कुणी कापड भेट म्हणून दिलं असलं तर एक  जादा फ्रॉक), शाळेत आणि बारावीपर्यंत जुनी पुस्तकं (आणि इंजिनीयरींगला रेंटवर मिळणारी) असे आमचेही दिवस. पण तरी त्या उन्हाळ्यात आमच्या आई-बाबा आणि नातेवाईक यांच्या होणाऱ्या गप्पा ऐकल्या की  आम्हाला आमची ती परिस्थिती खूप म्हणजे खूपच चांगली वाटायची. 

अखेर आमचीही ती परिस्थितीदेखील नाही म्हणता सुधरली. आमची तिघांची शिक्षणं होऊन थोडे कमवते झालो. मुंबईत चांगल्या ठिकाणी घर वगैरे तेव्हाही स्वप्नच होतं. चाकरमान्यासारखं उपनगरातून चर्चगेटपर्यंत आणि नंतर सिप्झ असे दोन्ही महात्रासदायक प्रवास सुरु झाले. माझ्या वयाच्या आसपासचीच असणारी आम्ही सगळीच भांवडं नोकरीच्या रामरगाड्यात अडकलो आणि मग "त्या दुपारी" फारसा गाजावाजा न करता  कुठेतरी गायब झाल्या. 

ऊन आता इकडेही तापायला लागलं आहे, आई-बाबा त्यांच्या नातवंडाना भेटायच्या निमित्ताने, फार दिवसांनी ,"त्या दुपारी" शनिवारी किंवा रविवारी येऊ पाहताहेत. पुन्हा जुने विषय रंगतात. फक्त आई आता दादांबद्दल बोलायच्या ऐवजी आम्ही आमच्या लहानपणी कसा दोन खोल्यात अभ्यास केला, त्याबद्दल बोलते. बाजुला खेळता खेळता मुलाने एका कानाने हे टिपलेलं असतं आणि तो निरागसपणे विचारतो,"आई, खरच?" त्याचा बदललेला चेहरा मला काही सांगू पाहतो. त्याला माझ्या तेव्हाच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटत आहे, हे मला स्पष्ट दिसतं. त्याच्या डोळ्यात माझी मी पाहताना माझं "उन्हाळ्याचं वर्तुळ" नकळत पूर्ण होतं. 

2 comments:

  1. जून्या आठवणी नुसत्या म्हणायला जून्या गो. त्या दिवसांची इतक्या वेळा आठवण काढली जाते की आयुष्यभर त्या कधीच जून्या होत नाहीत. घर, गाव, शाळा, कॉलेज, मित्र मैत्रिणी, सुरुवातीच्या नोकर्‍या, बदललेली ठिकाण... एक ना अनेक... अश्या कित्येक वर्तुळांनी सगळं आयुष्य व्यापून टाकलंय.

    ReplyDelete
    Replies
    1. हो रे आठवणींच्या आठवणी सारख्याच येत असतात. त्यातल्या त्यात आपल्या पिढीच्या लोकांच्या बदललेल्या जागा याबद्दल तर पुस्तकं निघतील इतक्या आठवणी. पुढची पिढी कदाचित मंगळ आणि पृथ्वी अशा आठवणी सांगेल. थोडक्यात काय वर्तुळं आहेतच :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.