Friday, February 19, 2010

हिंदोळे मनाचे...

तो दिवस अजुनही तसाच लक्षात आहे जेव्हा कळलं की माझ्या पोटात तू आलायस...आणखी काही आठवड्यांनी तर व्यवस्थित डोकं, हात पाय असं सावलीसारख्या काढलेल्या लहानशा चित्रासारखं तुझं रुप पाहुन विश्वासच बसत नव्हता की अरे हे तर माझ्याच शरीरात वाढतंय...मग एक चाळा सुरू झाला.वाटायचं प्रत्येकवेळी डॉक्टरने तुला दाखवावं. पण ते तसं नसतं मग पाच-सहा महिन्याचा खरं उण्या म्हणजे वजा पाच-सहा महिन्याचा म्हटलं पाहिजे तेव्हा तुला पाहताना तुझं ते अंगठा चोखणं पाहून पुन्हा एकदा मुग्ध झाले. आणि नंतर मात्र जसंजसं तुझं ते उणं वय वाढायला लागलं तशा बसणार्‍या लाथा अम्म्म...लाथा नको फ़ार कठोर शब्द आहे ते...तुझं ते ढोसणं आवडायला लागलं..आणि मग पोटाला हात लावुन तू आहेस का हे तपासणं हाही एक चाळाच..मला वाटतं त्या साडे-आठ महिन्यांत मन फ़क्त तुझ्याच आठवणींच्या झोक्यावर झुलत होतं...छोट्या छोट्या गोष्टी संध्याकाळी बाबांबरोबर, फ़ोनवर आज्जीबरोबर उगाळत होते...मैत्रिणींकडेही तेच...काय खाऊ?? तुला काय आवडेल?? व्यायाम सगळं काही तुझ्यासाठी...रात्रीचे ज्युलीबरोबरचे ते वॉटर योगा म्हणजे तुझं फ़ेवरिट हे मलाही कळलं होतं..म्हणून तर हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत आपण तो क्लास बुडवला नाही...


नंतर मग तू आलास तो क्षण म्हणजे तर काय हर्षवायुच...तिथल्या सगळ्या बाळांपेक्षा वेगळा, सर्व मुलामुलिंत एकटाच छान काळं जावळ असणारा. आणि त्यानंतर तू सगळंच विश्व व्यापलंस..फ़क्त माझंच नाही तर बाबा, आज्जी आणि सगळ्यांचचं...आता तुझं अधिक वय आणि प्रत्येक महिन्यांत होणारं काही ना काहीतरी यापाठी तास, महिने, दिवस कसे जात होते ते कळलंच नाही.. वाढदिवसाच्या आतच अडखळत चालणारा तू पाहुन मीच पडायचे खरं तर..पण तरी तुला सावरण्यासाठी नेहमीच होते...आम्ही दोघंही आणि गेल काही महिने आज्जी पण...

पण आज तुझं डोळ्यात पाणी आणून मलाच टाटा करणं आणि त्याही अवस्थेत पापा देणं फ़ार अस्वस्थ करुन गेलं रे...असं पहिल्यांदाच झालंय की मी एकटं घर माझी वाट पाहातेय..नेहमीच ’अप अप’ करत आपण दोघं आलो की पुन्हा असलेल्या पसार्‍यात भर घालायचा तुझा छंद आणि ओरडायचा माझा...दोन्ही आज खूप शांत आहेत...लवकर झोप रे असं तुला म्हणणारी मी आज जेवणाची वेळ टळून गेली तरी कसला तरी विचार करत तशीच बसलेय...

मला अपराधी वाटतंय का?? कदाचित हो...पण बाळा ज्याठिकाणी आपण राहातोय आणि पुढे ज्या परिस्थितीत तुला जावं लागेल ना, त्यावेळी फ़क्त माझा आश्वासक हात पाठीवर असून फ़ायद्याचा नाही रे...आज तू रडतोस (आणि मी जास्त); पण उद्या तू तिथेच रमशील आणि माझं मन मात्र आपल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झोके घेत तसंच हेलकावत राहिल...

तुझी आई...१९ फ़ेब्रु. २०१०

33 comments:

  1. अप्रतिम.................... !!!
    नि:शब्द !!!!

    ReplyDelete
  2. काय बोलू..? शब्दच संपले.

    ReplyDelete
  3. काय लिहू गं!!!!!!!!

    समजतय तुला नक्की काय म्हणायचयं ते!! बरं तुला असे म्हणू की”हे असे दिवस निघुन जातात आणि मुलं रमतात तर’ त्याठिकाणी माझेच मन कमकुवत आहे..... असो पण गौराच्या अनुभवावरून एक सांगते, मुलं खरचं रमतात गं आणि ही त्यांच्या वाढीसाठी गरजेची असणारी एक महत्त्वाची पायरी आहे.....

    अजुन काही लिहीत नाही, घरी आला ना पिल्लू की त्याला त्याच्या आवडीचे काहितरी मस्त खायला दे....आणि खूप खूप गप्पा मार.....

    ReplyDelete
  4. शब्दात छान व्यक्त केलेस हे हिंदोळे मनाचे. खरच नि:शब्द केलस...

    ReplyDelete
  5. फार मुलायमपणे लिहिलय...
    कुठे तरी वाचलेलं आठवलं... A mother can hold childs hand for a while... but heart forever...

    ReplyDelete
  6. सगळं आधीच्या लोकांनी लिहूनी ठेवले आहे..
    घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी.. नाही का?

    या सर्व अवस्था आपल्याला जगायच्या आहेत..
    मुलाच्या मुलाने, आईच्या आईने, वडिलांच्या वडिलांनी..प्रत्येकाच्या प्रत्येकांनी
    तरीही प्रत्येकाचे अनुभव तेवढेच हृदय स्पर्शी... आणि अनोखे असतात..
    अगदी प्रत्येक व्यक्ती एकसारखे दिसत नाही तसेच.. हि सुद्धा एक किमयाच नाही का?
    मग सुख मागून कुणाला मिळत नाही., दुख सांगून कधी येत नाही.
    जोपर्यंत सुखाचे क्षण आहेत तोपर्यंत सुखाला असाच बिलगायचे..
    सुखाला भिडायचं.. दुखत रडायचं..
    आयुष्यात असाच या धाग्यांभोवती धडपडायच..

    ReplyDelete
  7. प्रतिक्रियांबद्द्ल सगळ्यांचेच आभार..माझ्याकडे आता काही बोलायलाच नाहिये...या क्षणाचं ओझं इथुन पुढे नेहमीच असेल.....

    ReplyDelete
  8. अपर्णा,आईच्या भावना आणि मुलाच्याही भावना कधीच बदलत नाहीत हे माझ्या स्वत:वरून सांगू शकते मी. दिड वर्षाच्या शोमूला पाळणाघरात सोडताना जेवढा तो घट्ट बिलगत असे तेवढाच आजही कॉलेजला जाताना...आरूष आत्ताच थोडा थोडा रमतो आहे हे पाहते आहेस ना...:)अग,शाळेत जाईल तेव्हांचे रडे आत्ता थोडेसे होतेय असे समज.
    खूप हळवे क्षण तितक्याच हळव्या शब्दात मांडलेस.

    ReplyDelete
  9. भाग्यश्रीताई, अगदी खरंय तुझं आणि सगळं कळतंय...पण काही काही क्षणच असे अवघड असतात गं...नंतर कदाचित आपली मन निबर होतील किंवा ज्याला आपण सवय म्हणतो तसं काहीसं...

    ReplyDelete
  10. kharach chan vyakta kelya ahet tumhi Aaichya bhavana
    Balachya pratyek chotya mothya goshtiche aaichya jivanat phar mahatva asate. Aaryan jevha pahilyanda padala tevha tyachya peksha malach jast radu ale hote :)

    ReplyDelete
  11. धन्यवाद आर्यनची आई आणि ब्लॉगवर स्वागत...

    ReplyDelete
  12. स्वामी तिन्हि जगाचा आईविना भिकारी उगाचच म्हट्लेले नाही. आई ही आईच असते व तिच्या ह्या भावना तिच समजु शकते. अपर्णाजी आपण निर्भिड पणे आपल्या मन मोकळे केले आहे छान वाटले. माझ्या मते हे लिहितांना अश्रु आवरता आले नसावेत. बर त्याचे नाव का? त्याला हे जरुर वाचायला सांगा

    ReplyDelete
  13. khare tar kay lihave hech kalata nahiye me tar roj ch hya prakriye tun jate ..........tula aani tyala haluhalu savay hoil .... at least asha prakare manachi samjut kadhu shaktes aatta tari .....-Ashwini

    ReplyDelete
  14. आर्यनची आई म्हणलेलं आवडेल मला तरी पण सांगते माझं नाव सोनाली आहे. काल comment च्या खाली लिहायला विसरले - सोनाली

    ReplyDelete
  15. खरच अप्रतिम...
    तुम्ही तुमच्या मनातील भावनांना योग्य शब्दात इथे उतरवल आहे...

    ReplyDelete
  16. धन्यवाद सोनाली..तुम्ही नाव लिहायला विसरलात आणि मी शोधायचा कंटाळा केला...:)
    अश्विनी, देवेंद्र आणि सिद्धार्थ आभारी...

    ReplyDelete
  17. रविंद्रजी, तुमची कॉमेन्ट पाहिली गेली नव्हती म्हणून आता रिप्लाय करते...
    आरूष माझ्या मुलाचं नाव..तो मोठा होईल तेव्हा वाचेल अशी अपेक्षा..
    आभार...

    ReplyDelete
  18. खरच ग अपर्णा, माझी पण अशीच अवस्था झाली होती मुलीला पाळणाघरात सोडताना :(

    आणि आता ती मला रोज हसून टाटा करते :)

    ReplyDelete
  19. @प्राजक्ताची फ़ुले,ब्लॉगवर स्वागत...
    hmmm काही दिवसांनी मुलं हसुन टाटा करतात..

    ReplyDelete
  20. ही पोस्ट वाचायची राहून गेली होती. . .आजच वाचली. . . खूप छान लिहलय!!! एकदम भावस्पर्शी!!!

    ReplyDelete
  21. परत वाचली ही पोस्ट खुपच हळवी पोस्ट आहे. मला डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.आर्यनला सोडून येताना तो पण असेच करेल आणि माझीही अवस्था तुझ्यासरखीच होईल.

    ReplyDelete
  22. सोनाली, परत पोस्ट वाचुन परत प्रतिक्रियाही दिलीत त्याबद्द्ल खरंच कौतुक..अगं आतापासुन विचार करु नकोस..मी आताही ही पोस्ट परत वाचली आणि तशीच हळवी झाले...आई होणं हे फ़ार कठिण काम आहे गं....बाकीची नाती त्यामानाने फ़ार सहज सांभाळतो गं आपण....असो...धन्यवाद म्हणून या सगळ्याचं महत्व कमी करत नाही....

    ReplyDelete
  23. Aai tee aai ch...baki kahi lihit nahi. Tumhi already lihilay.

    ReplyDelete
  24. नचिकेत, आवर्जुन लिहिल्याबद्दल धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत....

    ReplyDelete
  25. छान. मनाला स्पर्शून जाणारी पोस्ट. :-)

    ReplyDelete
  26. आभारी संकेत....जास्त काय लिहू?? ही पोस्ट वाचली की त्या अपराधीपणाची जाणीव पुन्हा एकदा होते....

    ReplyDelete
  27. :) मला त्या दिवसांत पुन्हा नेऊन पोचवलस! खूप छान.

    ReplyDelete
  28. अनघा, ब्लॉगवर स्वागत आणि बर वाटलं आवर्जून लिहिलंस त्याबद्दल...
    तुझ्या मुलीचं वय मला माहित नाही पण बघ काळ पुढे गेला तरी मनातल्या भावना तशाच नाही का??

    ReplyDelete
  29. सध्या तुझ्या ह्या पोस्टचा पहिला परिच्छेद म्हणजे आमच्या मनाचे हिंदोळे...

    ReplyDelete
  30. सिध, भेलकम टु द क्लब.....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.