Monday, September 9, 2013

मी आणि सण, थोडे सैरभैर विचार


आज गणेश चतुर्थी, मला लहानपणापासून आवडणारा सण.त्यावेळी न कळत्या वयात तो आजूबाजूला साजरा केला जाई तसाच आठवतोय. मग मोठं झाल्यावर आपण नक्की आस्तिक की नास्तिक या प्रश्नातही  गणेश चतुर्थी आली की एक वेगळाच उत्साह येतोच. 

आजचीच गोष्ट. करूया, नको, वेळ मिळेल का? असा सगळा विचार करतानाही सोमवारचे दोन तास निवांतपणे हाताशी आले. मागच्या आठवड्यात नारळ किसून फ्रीज करायचं काम करून ठेवलं  होतं म्हणजे बेटर हाफने कामातला आपला हिस्सा आपल्या सवडीने करून ठेवला होता. तसही सण  साजरा करायचा म्हणजे  हे अमकं तमकं अगदी अस्सच झालं पाहिजे इतका अट्टाहास नाही. त्यामुळे असा आधी खवलेला नारळ हाताशी असेल तर आम्हाला चालतं. 

एका बाजूला नारळ परतताना मन लावून गूळ चिरला आणि नारळ गुळाची गट्टी झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड घालून ते मिश्रण एकीकडे निवत ठेवलं. या जानेवारीत निघता निघता आईने आठवणी दिलेलं मोदकाचं घरचं पीठ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढलं आणि उकड काढायची आईची टीप आठवत बसले. हम्म! दुप्पट पाणी की  अर्ध की समान? जामच गोंधळ उडाला तेव्हा अर्ध्याहून थोडं जास्त अस मधलं प्रमाण मोजून तुक्का मारायचं ठरवलं. मग एकदम लक्षात आलं की  हे आता जास्त रसमय होतंय आय मीन इंटरेस्टिंग. म्हणजे बघा मागच्या वीसेक मिनिटात मी माझी आई मोदक कसे करायची हा एक विचार सोडला तर आणखी कशाचाच विचार करत नाहीये. 

तर ती उकड काढताना उकळत्या पाण्यात थोडं  मीठ आणि तूप घालून मोदकाचं पीठ घातलं की  एक वाफ आणायची. आता हे थोडं हाताशी यायला अवकाश आहे तोवर आधीच सुरु केलेला वरण भाताचा कुकर बंद करून दुसरीकडे फ्लॉवरची भाजी निवडून फोडणी-बीडणी करून मंद आचेवर शिजत ठेवायची. 

आता पुन्हा आपलं  सगळं लक्ष मोदक उर्फ स्टार ऑफ द जेवण कडे. अर्थात अंदाजे घेतलेल्या उकडीचं तंत्र चुकल्यामुळे थोडं कोमट पाणी घालून पुन्हा मळून  घ्यायचं आणि मग पारीबाईंच्या मागे लागायचं. आज पारी करताना उकडीच्या भाकऱ्या करणारी मामी आठवली आणि पहिलीच पारी करताना ती तो उंडा हातावर गोल गोल करून मोठा करायची तसं केलं  आणि जी सुरेख पारी झाली की माझी मीच सुखावले, अर्थात तरी कळ्या जमणे ही पुढची एक अवघड पायरी होतीच. अगदी लक्ष देऊन केले त्या त्या मोदकांच्या पाऱ्या अगदी सुबक आल्या आणि काही रुसलेल्या. आमच्याकडे बाई हिचं लक्षच नाही असं म्हणणाऱ्या. 
नेहमी एकावेळी पाचपेक्षा जास्त मोदक केले नव्हते पण आज करायचा सूर चांगला लागल्याने बहुतेक गाडी चक्क अकरावर गेली. आणि मग ते शिजवताना पुन्हा काही गोंधळ होऊ नये म्हणून माझं बेकिंगचं अर्धवट ज्ञान वापरून भांड्याला आधी थोडं तेल लावून घेतलं. मोदक शिजताना नाममात्र फुलके करून घेतले त्यांनी मात्र काही फुलण्याचा चांगुलपणा दाखवला नाही. पण आज लक्ष अर्थात "स्टार ऑफ द" कडे असल्यामुळे ते नेहमीचं फ्रस्टेशन आलं नाही. 

मला अगदी पूर्वीपासून म्हणजे स्वयंपाकात खाण्याखेरीज गती नव्हती तेव्हापासून वाढायला फार आवडतं. आज नैवेद्याचं ताट वाढताना घड्याळाकडे लक्ष गेलं  आणि मग एकदम लक्षात आलं की गेले दीड तास आपण बाप्पाचा नैवेद्य, उकडीचे मोदक आणि एकंदरीत ताट पूर्ण असणे याखेरीज कुठलाही विचार केला नाही. 

मग मला जाणवलं की आज या निमित्ताने माझं खूप दिवस फक्त एकटीने थोडा वेळ मनन करणे (ध्यान करणे वगैरे माझ्या बाबतीत फारच उच्च वाटतं मला म्हणून मनन) राहिलं होतं, बहुतेक तसंच काही तरी झालं. हा एक छोटा दोन तासाचा सोहळा म्हणूया हवं तर मला माझ्याकडे थोड्यावेळासाठी का होईना घेऊन आला. 

आज बऱ्याच दिवसांनी एक पक्वान्न घरी मी मन लावून बनवलं आणि शेवटी देवाच्या नावाने ते आम्हीच खाणार. पण तो बनवायची कृती मला माझ्या पाककौशल्याकडे नव्याने पाहायला शिकवून गेली. हे सगळं आई कसं करते ते आठवून करताना मला मज आली आणि तिच्यातलं मल्टीटास्किंग माझ्यातही न कळत कसं मुरलंय हे मला कळून सुखावून गेली. 

मला वाटतं माझ्यासारखे अनेक जण असतील जे या निमिताने थोडी सजावट, एखादं  नवीन पक्वान्न करतील त्यावेळी त्यांच्या मनात दुसरा विचार असणार नाही आणि ती कृती पूर्ण झाल्यावरही मन प्रसन्न असेल. नेहमीच बाहेर जायचे छंद जोपासून मनाला ताजंतवानं करतात, आज घरातच थोडी आराधना आपल्या पद्धतीने करून तसचं ताजतवानं व्हावं. मग त्यासाठी मी आस्तिक आहे की  नास्तिक असा आर या पार प्रश्न पडण्यापेक्षा या अवस्थेला कुठलं नाव न देता आहे त्या स्थितीशी एकरूप व्हावंआणि तिची मजा लुटावी.  

आमच्या घरचं प्रसादाचं ताट कसं दिसतंय ते नक्की कळवा. 

गणपती बाप्पा मोरया.     

Tuesday, August 27, 2013

राम आणि शामची गोष्ट

ही गोष्ट आहे दोन मित्रांची. सोयीसाठी आपण त्यांना राम आणि शाम म्हणुया. राम आणि शाम एकत्र कॉलेजमध्ये शिकले. पैकी शाम एका छोट्या गावातून आला होता. त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम असली तरी मुलाखतीसाठी इंग्रजीतून बोलायला सुरवात केली की त्याचे उच्चार, भाषा इत्यादीचा फरक लक्षात येई. त्यामुळे शेवटच्या वर्षात इतर मुलांची प्लेसमेंट झाली तरी याच्या पदरी मात्र निराशा. रामलादेखील कॅम्पस जॉब मिळाला आणि राम-शामची मैत्री तिथेच थिजल्यासारखी राहिली.
रामने सुरुवातीला काही काळ नोकरी करून मग उच्च शिक्षणासाठी परदेश गाठला. तिथे चांगल्या दोन डिग्र्या मिळवून आता हा उत्तम पदावर काम करतोय. परदेशी राहताना जितकं चांगलं राहता येईल, मोठा बंगला, त्याला स्विमिंग पूल, मोठी गाडी, सारखे सारखे इतर देशात कामासाठी प्रवास सगळं काही जोरदार सुरु. शिवाय देशात देखील स्वतःच्या गावी मोठा बंगला आणि तिकडेही नेमाने भेटी वगैरे. 
मागे फेसबुकच्या निमित्ताने त्याच्या batch चे जवळजवळ सर्वच परदेशी गेलेले मित्र भेटले पण शाम कुठे आहे याची  काहीच कल्पना नाही. मग एका भारत दौऱ्यात घराच्या काही कामाने जिल्ह्याच्या एका सरकारी कचेरीमध्ये जायचा योग आला. तिकडे आपला क्रमांक यायच्या आधीचा वेळ काढताना सहज म्हणून तिथली अधिकाऱ्यांची यादी वाचताना त्यातलं सगळ्यात वरचं नाव ओळखीचं वाटलं आणि पुन्हा वाचल्यावर खात्री पटली म्हणून बाहेरच्या शिपायाला या साहेबांना भेटता येईल का म्हणून विचारलं. अर्थात appointment नसल्यामुळे शिपाई नाहीच म्हणाला पण तरी एक प्रयत्न म्हणून आपलं कार्ड देऊन यांना तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप पाठवला. 
ते कार्ड घेऊन शिपाई वर जाताच त्याच क्षणात साहेब स्वतःच खाली आले. गेले कित्येक वर्षे न भेटलेले शाम आणि आपला राम एकमेकांना गळाभरून भेटले. आता तू जायचं नाही. माझ्याच बरोबर राहायचं , मला पण बंगला आहे शामचा आग्रह. कॉलेजमध्ये खर सारेच मध्यमवर्गीय पण रामने बरेचदा शामला मदत केली होती त्या दोघांची तेव्हा खूप छान मैत्री होती आणि आता इतक्या वर्षाने भेटल्यावर साहजिकच ही प्रतिक्रिया असणार.
मग रामला कळलं  की शामने कॅम्पस जॉब मिळाला नाही म्हणून खचून न जाता शासकीय परीक्षा आपल्या गुणांवर आणि काही विषय मराठीमध्ये घेऊन आता उच्चस्थानी नोकरी करून त्याच्यासारख्या लोकांसाठी काम करतोय. आता त्याच्याकडे सरकारी बंगला, दोन गाड्या आणि त्याच्यासाठी सिक्युरिटी वगैरे सर्व काही होतं.
दोन दिवसांनी शामला काही दिवसाच्या दौऱ्यावर जायचं होतं. रामला हे निमंत्रण मोडवेना शिवाय आपल्या देशातली सरकारी कामे कशी  चालतात हेही पाहायला मिळणार होतं. या काही दिवसांत रामने काही गावं, तिथले खेडूत आणि त्यांची परिस्थिती जवळून पहिली. सरकारी मदत तळागाळात पोहोचावी म्हणून शामने स्वतः काही महिन्यापूर्वी पाहणी करून ती मिळेल अशी सोय केली होती. त्याला पाहिल्यावर ही  लोकं अक्षरश: त्याच्या पायावर लोटांगण घालत होते. त्याला मनोमन दुवा देत होती. मोठ्या वयाच्या बायकादेखील, "मुलासारखा तू धावून आलास", वगैरे म्हणत होत्या. आपल्या आयुष्यात प्रथमच असं  काही पाहणारा राम त्यावेळी कॅम्पस जॉब मिळवून उर्वरित आयुष्यात आपण काय कमवलं याचा मनात विचार करत होता. 
 
त्या रात्री शामशी बोलताना तो म्हणाला माझं सगळं कमावलेलं घेऊन टाक आणि तुझी नोकरी मला दे.   शाम शांत होता. तो म्हणाला, हे बघ तू माझ्या बंगल्यावर आला नाहीस कारण तुला वेळ नव्हता पण आला असतास तरी फक्त मीच भेटलो असतो. कारण मी जिथे जिथे काम करतो तिथे एकही पैसा न खाता लोकांना मदत करतो शिवाय बरेच मंत्री-संत्री इत्यादीचं काही तरी वाकडं सुरु असतो ते बाहेर काढतो म्हणून सहा महिन्यापेक्षा जास्त एका जागी कुणी मला ठेवत नाही. लगेच बदली होते. माझी बायको कंटाळली आणि यंदा मुलीचं महत्वाचं वर्ष म्हणून दुसऱ्या शहरात राहते. त्यांच्यासाठी इथे शासकीय इतमामाने वापरायला गाडी आहे पण तीत बसायला कुणी नाही. बर हे जाउदे ही  सगळी मेहनत करायची महिन्याची कमाई बघ. त्याच्याकडचा  फक्त पन्नास हजाराचा पे चेक पाहून बराच वेळ त्या खोलीत कुणीच काही बोललं नाही. शेवटी शामनेच उतारा दिला, "हे बघ राम, तुला जर खरच मदत करायची आहे तर तू एक गाव दत्तक घे आणि तिथे सोई होतील हे मला पाहता येत का त्याचा मी प्रयत्न करेन."
 
राम त्याचा भारतदौरा पूर्ण करून पुन्हा परदेशी आला. पण यावेळी त्याच्या मनात पूर्वीसारखं आपल्याकडे हे नाही ते नाही असं काही नव्हतं, तर आपल्याला आता काय करता येईल याची दिशा त्याच्या मनाला मिळाली होती.
 
हा राम मला कामानिमिताने थोड्या काळासाठी भेटला आणि वर उल्लेखलेलं त्याने मला एकदा बोलताबोलता सांगितलं. या संपूर्ण खऱ्या कथेची नावं मात्र मी जाहीर करू शकत नाही. विशेष करून शामचं. आपल्याला असे अनेक शाम हवे आहेत पण म्हणून शामकडे बघून शिकणाऱ्या रामचं मुल्यही कमी होत नाही हे सांगायचा हा एक छोटा प्रयत्न.

Sunday, August 25, 2013

सुन्न

सात महिन्यांपूर्वी जेव्हा निर्भयाची बातमी चर्चेत आली,तेव्हा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया म्हणजे स्वतःच्या अगतिक शरीराची लाज वाटणं. तरी एक वेडी आशा म्हणजे निदान आरोपींना जबरी शिक्षा होईल असं वाटलं होतं पण तसंही झालं नाही. रोज़ "तशा" ताज्या बातम्या येताहेतच. ही मुंबईतली बातमी वाचून पहिल्यांदाच स्वतःच्या भारतीय असण्याची शरम वाटतेय. 
आज इतक्या तत्परतेने आरोपींना पकडल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन करावं तितकंच पुढे अंत बघू पाहणार्या न्याय-व्यवस्थेचं काय करायचं हाही प्रश्न आहेच. शिवाय मधल्यामध्ये इथून पुढे या घटनेशी संबंधीत शिंकलेल्या माशीलाही "ब्रेकिंग न्यूज़" म्हणून लोकांच्या समोर सारखं झळकवत आपापल्या चॅनलच्या तुंबड्या भरणार्यांनाही विसरून चालणार नाही. 
मागच्या महिन्यात कामाच्या जागी भेटलेला एक चेक नागरिक आणि त्याच्याशी झालेला सं(की नुसताच)वाद आठवतोय. 
"So what are you really proud of in current India? Is it because it has a rapist Capitol?"
याचं काही महिन्यांपूर्वीच एका दाक्षिणात्याशी विवाह झाला आहे आणि महाशय दिडेक आठवडा भारतात जाऊन आलेत यांचा ईथे उल्लेख व्हायला हवा.

त्याचा तो rapist Capitol चा उल्लेख झोंबून मी त्याच्याशी "it happens in all countries and may be the media highlights it only when a major case is solved by the cops. India is culturally so different I am not sure about Delhi but in Mumbai in my last visit, I travelled by public transport at night time and reached safely from one part of the town to other" हे आणि असं बरंच काही सांगून बाजू सावरायचा प्रयत्न केला होता.

कदाचीत माझ्या मुंबईबद्दल मला जरा जास्त विश्वास होता. कदाचीत मी बॅलाॅर्ड पिअरला ज्या गर्दुल्ल्यांच्या आजुबाजूनेे जावं लागे तो भाग तरीही "सेफ़ झोन" असावा किंवा त्यावेळी रस्त्यावर चालणारे इतर लोक फारच काळजीवाहू असावेत   किंवा तेव्हा सातला निघायची वेळ आता चार किंवा पाचवर आली असेल किंवा काय?
खरं सांगायचं तर इथून पुढे कुठल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली किंवा नाही तरी हे असं आमच्या मुंबईत दिवसाढवळ्या घडू शकतं हा एकच धक्का मला सुन्न करायला पुरेसा आहे. आज या देशाची नागरिक असण्याची शरम वाटतेय.



Friday, August 16, 2013

पि पि पि

नावात काय आहे हे कुणीतरी म्हणून ठेवलं  आणि आपण पुढे सुरु ठेवलंय. पण कितीतरी प्रसंग असे येतात की  नावात बरचं काही आहे हे आपण आपलं मान्य करतो. 

नावांचे गोंधळ घालायला पश्चिमेच्या कुठच्याही देशात आपण पूर्वेकडच्यानी जायचं. त्यांनी गोंधळ घालायचे आणि मग आपणच ते निस्तरायचे हे आताशा अंगवळणी पडलंय. दुपारच्या जेवणाला कुठे जावं तर ऑर्डर घेणारा "How do you spell your first name" म्हणून अभ्यासाला बसणार, आपण त्याला शुद्धलेखन घालणार आणि तपासायची, आपलं  पिक अपची वेळ आली की त्याने केलेला उच्चाराचा गोंधळ आपला आपण निस्तरून "किती छान बोलतो आमचा बाळ", करून पुन्हा येरे माझ्या मागल्या करायला त्याच दुकानात जाणार.
 
यावर उपाय म्हणून माझ्या एका मैत्रिणीने एका ठिकाणी स्वतःच्या नावाचं आद्याक्षर वापरायचं ठरवलं म्हणजे एक तर शुद्धलेखनाचा वेळ वाचवा आणि पुन्हा याने काय उच्चारलं म्हणून रडायला नको. तर आम्ही दोघी गेलो आणि ऑर्डर झाल्यावर नाव म्हणून P अर्थात पि  लिहायला सांगितलं आणि आम्ही बाजूला झालो. तिकडे लंच टाइमचा नेहमीचा गोंधळ होता त्यात आमच्या गप्पा रंगात. 
 
कधी तरी तिथे पि चा धोशा सुरु झाला पण आमच्या दोघींच्या गावी ते कुठलं? नशिबाने ही एकाक्षरीवाली आमची युनिक केस असावी की काय पण ऑर्डर घेणाऱ्याच्या आम्ही लक्षात होतो (कदाचित रंगामुळे पण असेल) पण बिचारा वाट काढत आला आणि "your order is ready maa'm" म्हणून आवताण देऊन गेला. आता या "पि"ने गप्पपणे जेवण घ्यावं की नाही पण तरी तिने मताची पिंक टाकलीच "Everytime when people mess my name I feel bad about it. This time for change hope you got the taste of home medicine" 
 
आम्ही दुकानातून बाहेर गेल्यावर मला वाटतंय आमच्या (नसलेल्या) नावाची पिपाणी तिथे नक्की वाजवली असणार. 

Sunday, August 4, 2013

मैत्री


तो गेला. जवळजवळ वर्ष होईल त्याच्या शेवटच्या ई मेलला. पण त्याच्या शब्दाला जागला, कारण त्यानंतर त्याने कधीच स्वतःहून संपर्क साधला नाही. 


त्याच्या माझ्या मैत्रीची वर्षे मोजायची नाहीत आस  माझं मीच ठरवलं होतं आणि नाहीच मोजली. इतर वर्गमित्रमैत्रिणीबरोबर झाली तशीच आमची मैत्री पण बेस्ट फ्रेंडच्या यादीत फार लवकर आला तो. माझ्या त्या वर्षी कॉलेजमध्ये घडलेल्या काही अप्रिय घटनांमधून मी सावरताना त्याला मैत्रीचा आधार द्यावासा वाटला आणि मला वाटतं तिथेच आमचे मैत्रीचे सूर जुळले. 

सुरांवरून आठवलं, हो  "गाणी" देखील आमच्या मैत्रीचं एक  अविभाज्य अंग होतं. मला गझल ऐकायला शिकवायचं सगळं श्रेय त्याला. म्हणजे मला त्या माहित नव्हत्या असं नाही पण कुठच्या वेळी कुठली गझल आठवावी यासाठी तोच हवा. मग ऐकण्यातली खुमारी वाढते हे अनुभवावं. 

त्या मैत्रीला आमचं  कॉलेज संपलं म्हणून खंड पडण वगैरे झालं नाही. तो अंधेरीचा आणि माझी कामाची जागा अंधेरी, त्यामुळे येताजाता platform वर ओझरत्या भेटी होत. मोबाईल, इ-मेल च सुकाळ व्हायच्या आधीच्या मैत्री अशाच जपल्या. कधीतरी आमचा जुना ग्रुप एकत्र खादाडी करायला जमायचा तेव्हा पुन्हा जुनाच धांगडधिंगा. 

"तू मोठी कधी होणार आहेस का" हा न विचारता विचारलेला प्रश्न मला दुसरं मुल झालं तरी तसाच. 
आताशा अगदी मेल पण कमी झाले होते पण  स्काईपवर वर्षातून एक दोनदा पोटभर बोलणी केली की  खर तर बरच कव्हर व्हायचं. त्यात पुन्हा कुठे गायब होतो वगैरे प्रश्न आलेच नाहीत. 

मग माशी शिंकली कुठे हा विचार मी करतेय तोच त्याच्या काही वैयक्तिक अडचणींचा  पाढा वाचणार एक मोठं पत्र आल. मी हतबल. काही प्रसंग असे येतात जेव्हा आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात. तसाच विचार करून सोडून दिली. त्याने मागितली म्हणूनच इतक्या वर्षांची न मोजलेली पण जीवापाड जपलेली आमची मैत्री सोडून दिली. 

अशी ती सोडता येते का याचा विचार करत हेही वर्ष सरेल. त्याचं ठाम उत्तर मिळणार नाहीच आहे. फक्त पुन्हा अशी गाढ मैत्री नव्याने करायला आवडेल का याच उत्तर मात्र ठाम नाही आहे. हा हट्ट नाही आहे. स्वतःला पुन्हा त्या मैत्रीतून बाहेर पडतानाचा होणारा त्रास पुन्हा होऊ नये इतकचं वाटतंय. 

खर तर मागच्या आठवड्यात वीस वर्षांनी मी माझ्या एका खूप जुन्या मैत्रिणीला भेटले अगदी पहाटे एक वाजेपर्यंत तेही वीकडेला गप्पा मारल्या आणि मैत्रीचा आनंद पुन्हा अनुभवला आणि हा इकडे लिहिलेला अनुभवही मनात आहेच. दोन्ही वेगळ्या व्यक्ती असल्या तरी आजच्या जागतिक मैत्रीदिनी मला मात्र माझीच मैत्रीची ओंजळ अर्धी रिकामी, अर्धी भरलेली वाटतेय. 


जाता जाता या विषयावरच मला आवडणारं एक गाणं. 






Friday, July 26, 2013

संदिग्ध

मागच्या आठवड्यात अमेरीकेत मोठ्या प्रमाणावर चर्चिल्या गेलेल्या मार्टिन खून खटल्याचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा कृष्णवर्णीय आणि  गौरवर्णीय समाजातले मतभेद समोर आले. या पार्श्वभूमीवर याच देशाच्या कृष्णवर्णीय राष्ट्रपतीची जाहीर प्रतिक्रिया मला फार महत्वाची वाटते

याबद्दलची बातमी या लिंकवर आहे. थोडक्यात भाषांतर करायचे तर ओबामा म्हणतात, " मोठ्या दुकानांमध्ये खरेदी करताना कुणी आपल्यावर लक्ष ठेऊन नाही असे फार कमी काळे या देशात असतील. एलेवेटरमध्ये शेजारी उभ्या असलेल्या बाईने आपली पर्स आणि श्वास घट्टरोखून धरण्याचे अनुभव आलेले कृष्णवर्णीयही विरळाचआणि  यात मी ही आलोच. माझ्या तरुणपणी रस्त्याच्या कडेने चालताना गाड्यांची कुलुपे खटखट बंद होतानाही मी ऐकलीत. काळ पुढे जातोय तसे आपण अधिकाधिक चांगला समुह होऊ पाहतोय. याचा अर्थ आपण परफेक्ट झालोय असा नाहीये. समाजातला काळा-गोरा भेद अजूनही गेला नाही. मार्टिनबद्दल आपण स्वतःलाच विचारावं की त्या दिवशी त्या रस्त्यावर जर असा एखादा शस्त्रधारी मार्टिन उभा असता, तो आपल्याला मरेल या भीतीने त्याच्याच मागे गाडी घेऊन  कुणी झिमरमन धावला असता, तर त्याची हत्या झाल्याबद्दल त्या मार्टिनला कुठली शिक्षा झाली असती? तोही या प्रकारे सुटला असता का? या प्रश्नाच्या  उत्तराने  जर आपल्याला संदिग्ध होत असू तर मग असे निकाल देणारे कायदे आपण नक्कीच तपासले पाहिजेत."
आता ज्या ठिकाणी हा राष्ट्रपती उभा आहे त्या घडीला अशी बाजू मांडायची तर खरच धैर्य हवे

मनातल्या मनात या काळ्या सत्याला नमून मी पुन्हा माझ्या देशातलं काही वाचावं म्हणून त्याच आठवड्याचा लोकप्रभा उघडते आणि एका आईचा संघर्ष माझ्या मनाचा ठाव घेतो. या बातमीबद्दल मी काही लिहिणे उचित नाहि. अजून हे पुस्तक माझ्या हातात केव्हा येईल तेदेखील मी सांगू शकत नहि. पण या लेखातला एक उल्लेख मात्र नक्कीच बोचतो
तो लेख या लिंकवरआहे. हा एक परिच्छेद कुणाची परवानगी घेत इथे चिकटवत आहे
"मंत्र्यांच्या भेटीगाठी...
शरद पवार त्यावेळी संरक्षणमंत्री होते. अमरच्या मृत्यूविषयीचा लेख त्यांनी वर्तमानपत्रात वाचला होता. माजी मंत्री स्व. नकुल पाटील यांच्या सहकार्याने आमची शरद पवार यांच्याशी नवी दिल्लीत भेट झाली. अमरचा उल्लेख आम्ही करताच तो लेख वाचल्याचे पवार यांनी सांगितले. अमरच्या मृत्यूविषयीचा चौकशी समिती अहवाल मिळावा, अशी मागणी केली. पवार यांनी नौदल मुख्यालयात अ‍ॅडमिरल विष्णू भागवत यांना दूरध्वनी करून पळधे कुटुंबीयांना तुमच्याकडे पाठवितो. त्यांना सहकार्य करा असे सांगितले. तातडीने आम्ही नौदल मुख्यालयात गेलो. अ‍ॅडमिरल भागवतांनी अहवालातील महत्त्वाची माहिती देण्याचे कबूल केले. आम्हाला नंतर जे संक्षिप्त निष्कर्ष दिले त्यामध्ये अपेक्षित असे काही नव्हते. भागवत यांच्याकडूनही आमचा हिरमोड झाला होता. शरद पवार एकदा डोंबिवलीत माजी मंत्री नकुल पाटील यांच्याकडे आले होते. त्यावेळी आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला ओळखले. पण, आम्ही नौदलाविरुद्ध न्यायालयात गेल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते पूर्वीसारखे सहकार्य करण्याच्या मन:स्थितीत दिसले नाहीत. 
नंतर जॉर्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री होते. त्यांना डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ओळखीने नवी दिल्लीत भेटलो. सप्तर्षीची कोणतीही ओळख नसताना एका शब्दाने ते पुण्याहून नवी दिल्लीत आले होते. सप्तर्षीचा मान राखण्यासाठी काही सेकंदांसाठी फर्नाडिस यांनी 'सवड मिळाली की फाइल मागवितो व तुम्हाला कळवितो' असे आश्वासन दिले. ती सवड त्यांना कधीच मिळाली नाही आणि त्यांनी कधी काही कळविलेही नाही. आता स्त्री जागृतीविषयी विविध कार्यक्रम घेणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना अमित नानीवडेकर या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भेटले. आपले दु:ख त्यांनी समजून घ्यावे त्यासाठी सहकार्य करावे ही अपेक्षा ठेवून आम्ही त्यांना भेटलो. एका आईचे दु:ख दुसरी आई समजून घेईल असे वाटले होते. आम्हाला पैशाची मदत नको होती. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी मदतीचा हात हवा होता. मी अमरच्या मृत्यूची कहाणी सुप्रिया सुळे यांना सांगत होते. पण त्यांचे माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. त्या फक्त ऐकल्यासारखे करत होत्या. त्यांच्याकडे आपल्यासाठी वेळ नाही असे माझ्या लक्षात आले. त्यांच्या दालनातून बाहेर पडले. त्यानंतर मंत्री, नेते, राजकीय पुढाऱ्यांना भेटून आपला मनस्ताप वाढून घ्यायचा नाही. नाहक पैशाची उधळपट्टी करायची नाही. आपला लढा आपणच लढायचा असे मनाने पक्के केले".


पहिला एका बलाढ्य देशाच्या राष्ट्रपतीचा एका नागरिकाची बाजू घ्यायचा मुक्तपणा आणि दुसऱ्या प्रसंगातले  कुठे एका ढळढळीत सत्याला थोडाही आधार न देणारे वर उल्लेखलेले काही सो कॉल्ड नेते.


माझ्या बुरख्यातल्या झाडावरच्या पोस्टला एक मार्मिक प्रतिकिया आली आहे ती म्हणजे "भारतात अस काही होईल? ". तिच्यावर विचार करताना पहिल्या प्रसंगात म्हटलंय तसचं म्हणावस वाटतंय ते म्हणजे हाच अमर त्याला दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांपैकी कुणाचाही मुलगा असता आणि हीच घटना घडली असती तर कायदा २१ वर्षे थांबला असता का? आणि याचं उत्तर जर संदिग्ध असेल तर आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे हे निश्चित. 

Wednesday, July 17, 2013

गाणी आणि आठवणी १४ - तू न जाने आसपास है खुदा


खरंय  न कधी डोळ्यापुढे आसवांच धुकं दाटलं की  थोडा वेळ मान खाली घालून विचार केला की  सगळ्यात पहिले काय जाणवतं? आहे ही  परिस्थिती बदलायची तर आपलं आपल्यालाच सज्ज व्हायला हवं. आपण फक्त हिम्मत धरून मार्गक्रमण करावं बाकी सगळं कर्ता करवित्याकडे सोडावं. तो असेलच कुठेतरी त्या एका forwarded मेलमधल्या गोष्टीत म्हटलंय तस I was carrying you म्हणणारा. 

असाच काही विचार करत असताना एक सुफिया सूर आणि त्याच्या साथीला एक मधाळ आणि प्रेमळ सूर कानावर पडतो 


धुंदला जाए जो मन कही इक पण को तू नजर झुका 
झुक जाए सर जहान वही मिलता है रब का रास्ता 


खर तर कुठल्याच प्रकारच्या गाण्याची मला अलर्जी वगैरे नाहीये पण राहत फ़तेह अलीबद्दलचा माझा अभ्यास अंमळ कमीच आहे. हे गाणं तर सुरुवातीला मला कैलाश खेरचं वाटलं होतं. कदाचीत त्याच्या आवाजात पण ऐकायला भावलं असतं म्हणूनही असेल. 

खुद पे डाल तू नजर, हालातों से हार कर कहां चल रे ? 

म्हटलं  तर रोखठोक सवाल. है कोई जवाब?

पण मग पुढचं, 

तो  खुद तेरे ख्वाबोंके रंग मे, तू अपने जहान को भी रंग दे 
के चलता हू मै तेरे संग मै 
हो शाम भी तो क्या जब होगा अंधेरा तब पायेगा दर मेरा 
उस दर पे फिर होगी तेरी सुबह 

हे अगदी हवंहवंसं स्वप्न किंवा आशा. 

हे आणि पुढचं 

मीट जाते है सबके निशान बस एक वो मिटता नही …. तू न जाने आसपास है खुदा 

शेवटची ओळ मला तृप्तीच्या क्षणाला नेते आणि एक ड्युएट ऐकणं सार्थकी लागतं. हे पूर्ण गाणं  ऐकून झाल्यावर आपण सुरात न्हाऊन निघालो असतोच पण आपलं मनही बरंच हलकं झालेलं असतं. 

मूळ गाणं इकडे आहे