Thursday, November 12, 2009

मन तळ्यात मळ्यात....

हा विषय तसा जमेल तितका वेळ टाळला. म्हणजे पहिल्यांदा वाटलं तेव्हा फ़क्त मनाचं रडगाणं गायलं...मग पुन्हा वाटलं तेव्हा नदीच्या दुसर्या किनारी जाऊन पाहिलं पण आता घोडा मैदान जवळ आलं आणि राहावलं नाही. ही पोस्ट खरं तर लिहुन पोस्ट न करता ठेवावी असंच वाटतंय पण तरी पोस्ट करतेय. माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणायची मनातलं कधी साचु देऊ नये त्याचा त्रास जास्त होतो. लिहुन काढलं की मग तो सल उरत नाही असाही एक सल्ला होता. कदाचित त्यासाठीही हे लिहिणं.
या घरात राहायला आलो तो पहिला दिवस अगदी लख्ख आठवतो.  इन्व्हेस्टमेन्टच्या दृष्टीने आणि मुंबईत कुठे पुढे-मागे अंगणवालं घर (उर्फ़ बंगला) परवडणार म्हणूनही, एक छोटं तीन बेडरुमचं घर घेतलं आणि एका ऑगस्टमध्ये आम्ही तिथे आलो. आधी अपार्टमेन्टच्या वर्दळीची सवय होती त्यामुळे इथे अगदी टाचणी पडेल इतकी शांतता पाहून खरं तर भयाणच वाटलं होतं आणि विचारही आला कसं होणार आपलं. पण मागचे तीन वर्षांपेक्षा जास्त इथे राहिल्यावर ती शांतताच आमची मैत्रीण झाली की आम्ही त्या शांततेचं रुपांतर किलबिलाटात केलं सांगणं कठीण आहे. पण आताशा खूप आपलं वाटायला लागलं.
घेतल्या घेतल्या जवळजवळ पहिल्याच महिन्यांत माझ्या अगदी जवळच्या तीन मैत्रीणी ज्यातल्या दोघी आता वेगवेगळ्या देशांत आहेत त्यावेळी नेमक्या अमेरिकेत होत्या. माझं त्यातल्या त्यात मध्यवर्ती आणि मोठं ठिकाण असल्याने, त्या सर्वांना एकत्र बोलावुन एक छोटं गेट-टुगेदर झालं. खूप खूप गप्पा मारल्या. दोन रात्री त्या राहिल्या. घर लगेच भरुन गेलं. त्यानंतर माझे आई-बाबा, सासुबाई, नणंद, भाचा असे नातलगही येऊन राहुन गेले. त्यांना थोडफ़ार अमेरिकेचं नॉर्थ-ईस्ट दर्शन करवता आलं. काही जवळचे मित्र-मैत्रीणी यांच्यासाठीही न्युयॉर्क, डी.सी.ला जायचं असलं तर हक्काचं राहायचं ठिकाण म्हणजे हे घर होतं. नंतर बाळराजांचं आगमन, त्याचा पहिला वाढदिवस सगळं एकापाठी एक चालुच होतं.
पहिल्या दिवशी एकटेपणाची जाणीव होती ती कुठे पळाली कळलंच नाही. इथुन जशी इतर महत्त्वाची शहरं जवळ तसं इथली नेहमीच्या खरेदीपासुन, खायला जाण्याची सगळी ठिकाणं जवळ. काही काही दुकानं तर अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. एक वेगळा वेग इथेही आला. शिवाय स्वतःच घर म्हणजे थोडफ़ार बागकामाची आवड असलेल्या मला तर पर्वणीच होती. अगदी स्प्रिंगला येणारी डॅफ़ोडिल्स, ट्युलिप्स. फ़ॉलमधली मम्स आणि मग जवळजवळ थंडी पडेपर्यंत येणारे छोटे गुलाब आणि देवासाठी झेंडु लावणं मला खूप आवडायचं. दरवर्षी उन्हाळ्यात टॉमेटो आणि इतर काही भाजी, फ़ुलझाडं लावणे आणि मग उरला ऋतु त्याची निगराणी करणे हाही एक आवडता उद्योग बनला. अगदी पहिल्यांदी लावलेली मम्स (आपल्याइथल्या शेवंतीसारखी फ़ुलझाडं) अजुनही आता फ़ॉलमध्ये येतात.
या घराच्या मागच्या बाजुला एक सनरुम आहे म्हणजे त्याच्या तीन बाजुला संपुर्ण काचेच्या भिंती त्यामुळे मागच्या लॉनवर य़ेणारे ससे, खारींची पळापळ पाहाणे हाही एक टि.पी. होता. शिवाय ऋतुंप्रमाणे सुंदर पक्षीही दिसत. शिवाय आपण काचेच्या पल्याड असल्याने तेही बिनभोबाट आपल्यासमोर वावरत. मला आवडतो म्हणून इथे झोपाळा ठेवला आहे. प्रसन्न सुर्योदय असण्यार्या सकाळी तिथे बसुन चहा घेणे आणि बाहेरचा निसर्ग पाहाणे यात वेगळंच समाधान असे. त्याचप्रमाणे बाहेर बर्फ़ पडला असताना तिथला जुन्या काळचा स्टोव्ह (किंवा फ़ायर प्लेस) मध्ये लाकडाचा ओंडका टाकुन खूप गरम झालं की तिथं बसून तो पांढरा बर्फ़ आणि बाहेरच्या तारांवर ओघळताना गोठलेले बर्फ़ाचे आकार पाहाणं हाही एक वेगळा छंद बनला. कधी आपण या घराचे झालो कळलंच नाही. हे भाड्याचं घर नाही म्हणून ही ओढ की आतापर्यंत सर्वात जास्त वर्ष निवास केल्यामुळे आलेलं प्रेम सांगणं कठीण आहे. पण पाहता पाहता इथे वेळ पुरेनासा झाला.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या देशात असुन आपुलकीने आमची चौकशी करणारा शेजार मिळाला. ही एक गोष्ट मी इथल्या अपार्टमेन्ट मध्ये नेहमीच मिस केलीय. शेजारी कधीही हायच्या पुढे नाही. एखादा भारतीय असला तर थोडा फ़ार परिचय होण्याची शक्यता. इथे मात्र कधीकधी "आज तुझा नवरा घरी नाही तर मी बाहेरचा बर्फ़ काढुन देऊ का" म्हणणारा शेजारणीचा मुलगा आणि "अगं, आता हा ड्राइववेवर धावतोय" अस म्हणत प्रेमळपणे आरुषला "यु सन ऑफ़ अ गन" म्हणणारी बेट्टी आजी, समोरचं दोन मुलींवालं डिनिसचं कुटुंब, "आय विल किप यु इन माय प्रेअर्स" म्हणणारी मेरी आणि कोपर्यावरची मॉली सगळ्यांनीच इथल्या वास्तव्यात जान आणली.
हे इतकं पारायण सांगायचं कारण म्हणजे आता निर्णय झालाय. गेले बरेच दिवस आम्ही दूरदेशी गेलेल्या बाबाची वाट पाहात होतो जे मी मागच्या एका पोस्टमध्ये लिहिलंय सुद्धा. त्यामुळे हे ठरवणं जवळजवळ अपरिहार्य झालंय..आमचं कुटुंब जिथे एकत्र राहु शकेल त्या नव्या गावी आम्ही जातोय. या इकॉनॉमीमध्ये घर विकुन होणारा तोटा टाळण्यासाठी जमलं तर हे घर भाड्याने देऊन आम्ही स्वतः आता पुन्हा एकदा नव्या गावी भाड्याच्या घरात राहायला जाऊ.
पाखरांचं बरं असतं नाही? काडी-काडी जमवुन बांधलेलं घरटं त्यांची पिलं मोठी झाली की पुन्हा मोकळ्या आकाशात जायला तयार होतात. आपण मात्र वास्तुवरही जिवापाड प्रेम करतो आणि मग ती सोडताना सगळ्या जुन्या आठवणी काढत बसतो. खरं तर राहताना कितींदा त्यातल्या थोड्याफ़ार कमी पडणार्या वस्तुंबद्द्ल किरकिरही केलेली असते पण आता सोडणार म्हटल्यावर सगळं अतोनात आवडू लागतं. आम्हाला आधी वाटायच की आता इथुन निघायचं ते थेट मायदेशी जायलाच अधेमधे कुठे हलुया नको. पण शेवटी सगळं आपण ठरवतो तसं थोडंच होणार असतं?? म्हणजे पुन्हा एकदा इथलं सगळं गुंडाळा आणि दुसरीकडे सोडवा.
गेले काही वर्षात किती सामान वाढवलयं याचा आता अंदाज येतोय. विशेषतः मूल झाल्यानंतर तर अगदी अतोनात वस्तू आल्यात त्या सर्व नेणं शक्य नाही. ते परवडणारही नाही. नवं शहर आमच्या शहरापासुन थोडं थोडकं नाही तर चांगल जवळजवळ ३००० मैल लांब म्हणजे अमेरिकेच्या दुसर्या कोस्टमध्ये..विमानानेही सलग ६ तास तरी लागतील. इथे लांब जागा बदलणं म्हणजे तिथे जाऊन बरचसं नवं घेणं जास्त परवडेल इतकं ते सर्व घेऊन जायचा खर्च आणि व्याप आहे. पण घर रिकामी तर करावं लागणार आहे. प्रत्येक खोली आवरताना तिथल्या सर्व आठवणींचा गुंता.
कितीवेळा वाटतं खरंच हा निर्णय घेऊया की सरळ अजुन काही दिवस इथं राहुन पुन्हा याच भागात नव्या नोकर्या शोधाव्यात. मनाचं सारखं तळ्यात-मळ्यात सुरू असलं तरी खरं सांगायचं तर ते जवळजवळ अशक्यच आहे. सध्या फ़क्त स्वतःला समजावणं चालु आहे की कधीकधी काही बदल काही वेगळ्या कारणांसाठी आवश्यक असतात. असे प्रसंग आपल्याला इथल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी लागणारं बळ देतं. आणि आता नुसतं हे घर सोडताना जर इतका त्रास होतो तर कुणास ठाऊक हा देश सोडताना किती त्रास झाला असता?? आता यातुन निभावलं तर कायमचं परत जाणं जास्त चांगल्या प्रकारे होईल. आणि मुख्य म्हणजे आता एक नवं शहर, तिथली प्रेक्षणीय स्थळं हे सर्व पाहुन जर परतायचं असेल तर का नाही??

Friday, November 6, 2009

शुध्द लेखन

खरं तर मी या विषयावर लिहायचं म्हणजे एखाद्या पाचवी फेल चंपुने पी एच डी चा प्रबंध लिहिण्या सारखं आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झालं तरी व्यावसायिक कामात मराठी लिहिणं कमी म्हणण्यापेक्षा अगदी नसल्यामुळे आता माझं मराठी जरी काही फार चांगलं राहिलं नसलं तरीपण या विषयावर लिहिण्याची हिम्मत करतेय. मराठी भाषे मधे बऱ्याच अनुदिनी सुरु झालेल्या आहेत. खूप सुंदर लेख, कविता लिहिले जातात, लोकं आपले अनुभव पण लिहितात. मला तरी सगळ्यांचच लिखाण वाचायला खूप आवडतं.

बऱ्याचशा ब्लॉग्ज वर मी आपल्या प्रतिक्रिया पण देते. बऱ्याच लोकांच्या अनुदिनीवर इतके सुंदर लेख असतात, कविता असतात, गुजगोष्टी असतात, पण  केवळ काही महत्त्चाचे शब्द चुकवल्यामुळे  त्या वाचतांना उगीच अडखळल्यासारखं वाटतं. बरेच लोकं अगदी साधा शब्द आहे ’आणि ’ हा दिर्घ(आणी) लिहिलेला असला की तो वाचतांना अडखळल्या सारखं वाटतं. माझा पण नेहेमीच गोंधळ उडतो ह्र्स्व आणि दिर्घ लिहितांना. तरीपण शक्यतोवर उच्चाराप्रमाणे लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर बरच शुध्द लिहिलं जाऊ शकतं.

आता माझी पण लिहिण्याची पध्द्त जी आहे ती बोली भाषेप्रमाणेच आहे. म्हणजे असं बघा, की ’लिहिलं’.. हा शब्द जेंव्हा लिहितॊ, तेंव्हा वर असलेल्या अनुस्वारामुळे ते बरोबर वाचलं जातं,जेंव्हा ’लिहिल’ असं लिहितो तेंव्हा ते  बरोबर वाचलं जात नाही. म्हणजे काय, तर बोली भाषेत लिहितांना जर अनुस्वार तरी पण दिला तरच ते बरोबर वाचता येते, नाहीतर लिहिल (लिहिलं) , केल, (केलं)  चा उच्चार चुकीचा केला जातो. ...

प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे.   हल्ली प्रमाण भाषेत ’लिहिलं’ ऐवजी ’लिहिले’, ’केलं’ ऐवजी ’केले’ , ’सारखं’ ऐवजी ’सारखे’, असे लिहिण्याची पध्दत आहे. अर्थात आपण  ( मी सुध्दा) जे  बोली भाषेनुसार लिहितो, ते व्याकरणाच्या दृष्ट्या फारच चुकीचे आहे. पण निदान ते वाचताना अडखळल्यासारखं तरी होत नाही असं मला बुवा वाटतं.

अगदी साधे सोपे नियम जरी पाळले तरीही बरेच लिखण शुध्द होऊ शकतं.जसे "आणि" हा शब्द ह्रस्व लिहिणे. शब्दाच्या सुरुवातीची वेलांटी ह्र्स्व लिहिणे. बहुतेक शब्दांची शेवटच्या अक्षरची वेलांटी ही नेहेमीच दिर्घ असते. अर्थात मी या विषयामधे भाष्य करण्याइतपत मोठी नाही, पण मला जे काही प्रामुख्याने जाणवले, ते इथे लिहिले आहे. या मधे जर कांही चुका असतील तर त्या अवश्य दुरुस्त करा.यात अजुन काही नियम/सुचना घालुन आपल्या सर्वांसाठी एक नियमावली किंवा संदर्भ मिळाला तरी खूप.

जेंव्हा वेलांटी ही शब्दाच्या मधे येते, तेंव्हा मात्र ती बहुतेक वेळेस ह्रस्वंच असते. हे सगळे ठोक ताळे आहेत. आता बघा, आणि जरी ह्रस्व असला तरी पाणी हा दिर्घंच असतो. या सगळ्य़ांची कारणं शोधताना जाणवलं की शेवटी आपण अर्थानुसार तो शब्द किती दिर्घ उच्चारतो त्यानुसार ते ठरत असावे. अर्थात या विषयातल्या एखाद्या माहितगाराने हा लेख अजुन पुढे वाढवला तर झाला तर आपल्या सर्वांचाच फ़ायदा आहे. कारण आधी आपण मायाजालवर मराठीत लिहित नव्हतो ते लिहायला (आणि वाचायला) लागलो. पुढची पायरी मराठी भाषा शुद्ध लिहायचा प्रयत्न करणे असं म्हणायला काही हरकत नाही.

असो. अजुन एक मुद्दा म्हणजे मराठी शब्द, हे मराठी व्याकरणाप्रमाणेच लिहावेत. जसे प्रत्येक शब्द, जॊ इकारान्त, किंवा उकारान्त असेल तर तो नेहेमी दिर्घ लिहावा. फक्त संस्कृत मधुन घेतलेल्या शब्दांना संस्कृत प्रमाणे नियम लावावे. मराठी व्याकरणामधे संस्कृत चे शब्द घेतल्यामुळे जास्त त्रास होतो लिहितांना. इतर भाषांमधे पण संस्कृत शब्द घेतले आहेतच , पण त्यांनी व्याकरण त्या - त्या भाषेचं लावलंय म्हणुन इतर भाषांचं व्याकरण सोपं जातं मराठी पेक्षा.

शाळेत शिकलेले अजुन काही आठवलेल्या नियमात महत्त्वाचा नियम म्हणजे,
१. एकेरी शब्द नेहमी दिर्घ लिहावेत जसे मी, ही, ती.
२. आणि त्याच शब्दाचं रुप जसं ती - तिला इथे तिला मध्ये "ति" ह्र्स्व, तू - "तुला" (हा मी जास्तीत जास्त वेळा चुकीचा लिहिलेला पाहिला आहे म्हणून खास उल्लेख)
३. उच्चारानुसार लिहिले जाणारे काही शब्द उदा.
उगीच
करतील
म्हणून
जीवन
खूप
तरी
करून
देऊन

ऋतु

काही वेळा वेळ असेल तर मी चक्क एखादं मराठी पुस्तक पाहाते आणि नक्की करते माझं शुद्धलेखन बरोबर आहे का?? तुम्ही म्हणाल हा काही पर्याय आहे का? पण चुकवण्यापेक्षा बरं. तरीसुद्धा काही ना काही राहून जातेच म्हणा...

या विषयावरचा गाढा अभ्यासू म्हणून श्री अरुण फडके यांचं नाव घेता येइल.  फडके यांचे बरेच कार्यक्रम होतात व्याकरणावर. त्यांची बरीच पुस्तकं पण आहेत शुध्द लेखनावर. आता इथे माझ्याकडे संदर्भासाठी नाहीयेत पण मिळवुन थोडा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्व मिळुन आपली भाषा शुद्ध लिहिण्यासाठी प्रयत्न जरुर करायला हवा यासाठी हा प्रपंच. कळावे लोभ असावा...

ता.क. या पोस्टसाठी माझे काही ब्लॉग मित्र-मैत्रीणींनी त्यांची नावे न सांगण्याच्या अटीवर मदत केली आहे. एकटीने हे एवढे नियमही लिहीणे अन्यथा जमलंच नसतं. अजुनही ज्या काही त्रुटी असतील त्या भरुन काढण्यासाठी वाचक वर्ग मदत करेल ही अपेक्षा.

Tuesday, November 3, 2009

दिव्यांची आरास





मोठी माणसं घरात असली की सगळे सण कसे नीट आठवण करुन दिले जातात. आता जी पौर्णिमा गेली ती "त्रिपुरी" यावर्षी आई घरात असल्यामुळे तिने आठवण करुन दिली. मग या दिवशीही एक दिव्यांची माळ घरात लावली. ती लावता लावता मला मागची त्रिपुरी आठवली.
मुंबईत बोरिवली पश्चिमेला मंडपेश्वर भागात ज्या गुंफ़ा आहेत तिथे प्रथमच त्रिपुरी पौर्णिमेला जायचा योग आला आणि प्रत्येक जणांनी केलेली दिव्यांची आरास पाहुन डोळे आणि मन तृप्त झाले. मुंबईजवळच राहुनही कधीच जाणं का झालं नाही माहित नाही आणि आता मायदेश सोडुन काही वर्ष झाल्यानंतर का होईना जाणं झालं हेही नसे थोडके. शक्य असेल तर या दिवशी मुंबईकरांनी (आणि इतरांनीही)  तिथे नक्की जायलाच हवं.
इथे एक छोटी टेकडी आहे, जिच्या आत या गुंफ़ांमधलं महादेवाचं मंदिर आहे. आसपास जो काही परिसर आहे तिथे या दिवशीच्या संध्याकाळी तिथे मोठमोठ्या रांगोळ्या काढुन त्याभोवती दिवे, पणत्या, समया ठेवुन दिव्यांची आरास केली जाते. सगळी जणं आपापले दिवे किंवा काही नुसतं तेल घेऊन मग ते सगळीकडे लावतात. कुठला दिवा विझला की तो मागुन येणारा कधी लावतो कळणारही नाही. काळोख व्हायला लागला तसा तो परिसर या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आणि कानावर तिथे लावलेले शांत सुरातले अभंग. दिवाळीचं हे वेगळं रुप प्रत्येक मुंबईकराने डोळ्यात साठवायलाच हवे आणि या गुंफ़ा जतन करण्यासाठीही पाठिंबा. जास्त लिहिण्यापेक्षा फ़ोटो लावते. पुढच्या वर्षी नक्की जाल..






























Saturday, October 31, 2009

एवढा मोठा भोपळा...






सध्या सगळीकडे घरांपुढे कोरलेले भोपळे आणि त्यात लावलेल्या मेणबत्या दिसतात. काही ठिकाणी वेगवेगळे रंग आणि आकाराचे भोपळे सुबकरित्या रचुन ठेवलेत..सरता उन्हाळा आणि कापणीचा हंगाम संपल्याच्या आठवणी आहेत. आता भले सगळीच जण शेती करत नाहीत. पण हे ऋतुप्रमाणे घरसजावटीची अमेरिकन पद्धत माझ्या आईलाही खूप आवडते..


त्यानिमित्ताने आपली भोपळयातल्या म्हातारीची गोष्ट आठवली. तसंही लेकाला गाणी म्हणून झोपवायचं जवळ जवळ बंद आहे गेले दोन महिने (आजी आहे ना आता इथे हक्काची) म्हटलं जरा गोष्टतरी सांगुया. लहान मुलांच्या बर्याच गोष्टी ऐकताना पडलेले काही प्रश्न कायमच आहेत मला. जसं म्हातारी एवढ्याशा भोपळ्यात मावुच कशी शकते?? पण काही आठवडे आधी एका फ़ार्ममध्ये गेलो होतो निमित्त होतं सफ़रचंद खुडणी करायचं..(apple picking) तिथे लगे हातो भोपळे, द्राक्ष आणि अर्थातच सफ़रचंद असं सर्व काही वेगवेगळ्या विभागात लावलं होतं आणि ते पाहायला जायला आपल्या बैलगाड्यांसारख्या पण बैलाऐवजी यंत्र अशा गाड्या होत्या. इथे सगळ्यात मोठ्ठा पाचशे  पौंडाचा एवढा मोठा भोपळा पाहुन मात्र आता पुन्हा तो म्हातारी त्यात बसली कशी हा प्रश्न पडणार नाहीये...तुमच्यापैकी कुणाची मुलं लहान असतील किंवा माझ्यासारखे काही अजुन तो प्रश्न मनात ठेऊन असतील तर नक्की यातले फ़ोटो दाखवा. त्यांच शंकानिरसन होऊन जाईल..अरे आणि फ़क्त भोपळेच किती प्रकारचे आणि रंगाचे असावेत??


मान गये..बरेच दिवस ठरवत होते त्यावर लिहिन आज सुदिन उगवलाच आहे तर लगे हातो तेही फ़ोटो टाकुन देते.





भोपळ्याची आठवण आजच यायचं कारण आज इथे अमेरिकतला एक सण "हॅलोविन" साजरा होतोय. त्यानिमित्ताने सगळीकडे कोरलेले भोपळे आणि त्यात ठेवलेल्या मेणबत्या इ. दिसतयं. कधी नव्हे ते आम्हीही मुलाच्या निमित्ताने "ट्रिक ऑर ट्रीट" साठी जाऊन आलो. अरे आपण हे आधीच का नाही केलं असं ती आलेली वेगवेगळ्या चवीची चॉकोलेट्स खाताना वाटतंय.
या सणामागचं नक्की शास्त्र माहित नाही आहे पण जे काही ऐकलंय त्यावरुन मला वाटतं या दिवसात रात्री मोठ्या होत्यात तसं भुताच्या आठवणी जाग्या होत असाव्यात. तर अशा वाईट मृतात्म्यांना पळवुन लावायचं म्हणजे स्वतःच वेगवेगळे शक्यतो भीतीदायक कपडे घालुन संध्याकाळ झाली की फ़िरायचं आणि घरोघरी जाऊन म्हणायचं "ट्रीक ऑर ट्रीट?" म्हणजे आता घाबरवु की तुम्ही मला काही देताय?? मग समोरचा निमुटपणे ट्रीट म्हणजे चॉकोलेट देतो. गावात एखादा भूतबंगलाही उभारला असतो. त्यात जायचं म्हणजे पण मजाच असते.

आजकाल काही काही लोकं चॉकोलेट ऐवजी मुलांच्या खेळायच्या वस्तुही जसं प्ले डो इ. देतात. समजणारी मुले ती इतकी गोळा केलेली चॉकोलेट्स हट्टाने खातात म्हणून असेल. आम्हाला काय ते टेंशन नव्हतं. म्हणजे सुरुवातीला आमच्या बाळाला कळत नव्हतं की हे काय चालु आहे म्हणुन तो असं लोकांकडून काय घ्यायचं म्हणून नुसताच पाहात होता. मग एक-दोन घरं झाल्यावर आम्ही त्याला एक चॉकोलेट खायला दिलं मग मात्र अंदाज आला त्यालाही या ट्रीटचा. त्याच्यापुढच्या घरात तो आपला स्वतःहुन अजुन हात पुढे करतोय. मजा आहे..

आम्ही त्याला एक डायनॉसोरसारखा कपडा आणला होता. तो घालुन आमच्या आसपासच्या काही ओळखीच्या आणि काही अनोळखी घरांमध्ये फ़िरलो. थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर मात्र घरात आल्यावर त्याचं चॉकोलेटचं मडकं आम्ही लपवुन ठेवलंय. तो झोपला की आम्ही ती हळूहळू खाऊ...किती दुष्ट आई-बाप आहोत ना?? अहो पण याच वर्षी. पुढच्या वर्षी त्याची चॉकोलेट्स ढापायची काही नवीन ट्रीक आम्हालाच शोधावी लागेल.

Thursday, October 29, 2009

असाही एक निरोप

आज कॅथीची  निरोपाची मेल आली. उद्या तिचा या कंपनीतला शेवटचा दिवस. २७ वर्ष तिथे तिने इमाने-इतबारे काम केलं ती कंपनी दुसर्या कंपनीने विकत घेतल्यामुळे झालेल्या उलथापालथीत नोकरी गमावणार्यांपैकी ती एक. या शेवटच्या निरोपाच्या मेलमध्ये तिला माझी आठवण यावी हे मी माझंच भाग्य समजाव. कारण खरं तर मी या प्रोजेक्टवरुन निघाल्याला आता जवळजवळ दिड वर्ष होईल. मधल्या काळात किती गोष्टी होऊन गेल्या, मी जे काम तिच्याबरोबर करायचे त्यासाठी किती अजुन जण येऊन गेले असतील पण तरी तिला या निरोपात मलाही सामावुन घ्यावसं वाटलं हे खरंच खूप आहे. मी तिथुन गेल्यानंतर आम्ही कधी बोललोच नाही असंही नाही पण तरी तिच्या ऑफ़िसच्या कामाचा मी आता भाग नव्हते हेही तितकंच खरंय.
खरं तर कॅथी या कंपनीत २७ म्हणजे तशी खूप वर्ष आहे आणि इथल्या मोठ्या कंपन्यांचे रिटायरमेन्ट बेनेफ़िट्स पाहात ही नोकरी गेल्यावर जिचं फ़ारसं नुकसान होणार नाही अशातली ही एक अशी बर्याच जणांची समजुत. पण तिचा धाकटा मुलगा अजुन कॉलेजला आहे आणि मुख्य म्हणजे याच कंपनीत असणार्या तिच्या नवर्याची नोकरीही एक दोन महिन्यांपुर्वीच संपली आहे हे लक्षात घेतले तर हे जाणं तिच्या दृष्टीनेही सुखकर नसणार. शेवटी महिन्याचा पगार हातात पडणे आणि पेंशनचा पैसा यात फ़रक तर आहेच ना?? पण तिची ही मेल वाचताना तिने इतकं समजुतीने सगळं लिहिलंय की खरंच अशा माणसांचं कौतुक वाटावं. आपल्याला काढलं गेल्याची कुठेही कटुता नाही. नेहमीसारखं टाइम टु से गुड-बाय किंवा अशाच अर्थाचं काही म्हणण्यापेक्षा ती म्हणते "धिस वॉज अ गुड रन". जेवणाच्या सुट्टीत रोज काही मैल पळण्यासाठी ती तशीही संपुर्ण इमारतीत प्रसिद्ध होतीच. आणि आपल्यालाही लोकं धावण्यासाठी ओळखतात हे बहुधा माहित असणार त्यामुळे हे शब्द खूप काही सांगुन जातात. 
आपल्या मेलमध्ये चार मुख्य प्रश्नांची चर्चा ती करते 
१. या कंपनीमधला माझा वेळ इतका छान का होता? 
२. मी इथे काय शिकले 
३. मी इथलं काय लक्षात ठेवेन? 
४. हा मेल वाचणार्यांसाठी मी काय सांगु इच्छिते? 
उत्तरांमध्ये अत्यंत मोकळेपणाने तिने काही इतरांना न माहित असलेल्या गोष्टींचे उल्लेख केलेत जसं तिचं पदवी आणि त्यानंतरचं शिक्षण कंपनीच्या खर्चाने झालंय. आणि त्यामुळे ती कशी पुढे जाऊ शकली. शिवाय तिचा नवरा तिला इथेच भेटला आणि मुख्य तिने इथेच असताना धावायची सुरुवात केली. तिच्या डेस्कपाशी तिचे अनेक ठिकाणच्या मॅरेथॉनचे फ़ोटो मी पाहिलेत.मलाही एकदा तिने तिच्याबरोबर लंच टाइममध्ये धावायचं तर ये असं म्हटलं होतं पण मी आपलं फ़क्त चालायचीच. बोलता बोलता एकदा धावल्यामुळे तिचा घरगुती आणि कामाचा स्ट्रेस कमी होतो असंही म्हणाली होती. तिने लिहिलेलं सगळं तिच्याच शब्दात देण्याचा मोह जास्त होतो पण तरी अशा प्रकारे तिचं तिने ठरवलेल्या माणसांना लिहिलेलं पत्र असं उघड करणंही प्रशस्त वाटत नाही म्हणून तिनं लिहिलेली काही वाक्यं जशीच्या तशी देतेय.
What have I learned ?  
Most important - I learned that people matter more than things or jobs or tasks. 
What will I remember?   
I'll remember that  the relationships I developed along the way are what enriched my life.
What can I leave you with now?   
1)  Don't worry - Be Happy  !  (My middle name is Anxiety). 
2)  Count your blessings !  What really matters at the end of the day is that you know you are loved and you are the most important person to somebody in this world. Try to love others.  The rewards are immeasurable. 
When feeling frustrated with yourself or others, remind yourself that you are doing the *very best*  job you can - and most times, so are others.  

मी तिच्याबरोबर काम करताना जेव्हा माझ्या जाण्याची वेळ आली तेव्हा मला खासगीत मग मी तुला इथेच ठेवण्यासाठी तुझ्या मॅनेजरशी बोलु का? किंवा बाळ झाल्यानंतर कामावर यायचं पाहायचं का? असं आपुलकीने विचारणारी, दोनेक वर्षांपुर्वी माझे आई-बाबा इथे आले होते त्यांच्या भारतात परत जायच्या दिवसाबद्द्ल लक्षात ठेऊन मला समजावणुकीचं बोलुन, कधी तिचेही घरगुती काही प्रश्न सांगणारी, कामाच्या वेळी तिला काही अडलं तर अगदी स्वतः क्युब मध्ये येऊन चर्चा करणारी आणि मुख्य म्हणजे केलेल्या कामाचं दिलखुलास कौतुक करणारी, माझ्या शेवटच्या दिवशी कार्ड आणि होणार्या बाळासाठी मायेने भेटवस्तु घेऊन घेणारी अशी कॅथी ही बरीच रुपं या पत्राने मला आठवली. आता पुन्हा कधी चुकुन-माकुन त्याच ऑफ़िसमध्ये जाणं झालं तर अजुन एक ओळखीचा आणि भेटल्याबरोबर गळामिठी मारणारा एक चेहरा तिथे नसेल याचं मनापसुन वाइट वाटतंय. पण हे पत्र पुन्हा पुन्हा वाचलं की निरोपाची वेगळी भाषा खूप काही शिकवुन जाते. 

Saturday, October 24, 2009

पाच का चौदह

नाही नाही मला तशी कल्पना आहे की आता मल्टिप्लेक्सचा जमाना आल्यामुळे ब्लॅकवाल्यांचा धंदा बसलाय पण ही जी मी आता एक छोटीशी गोष्ट मोठी करुन सांगणार आहे तिचा आणि ब्लॅकच्या तिकिटांचा अजाबात संबंध नाय... ते ब्लॅकने तिकिट घेऊन पिक्चर पाहायचे दिवस वेगळेच होते नाही??  मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघींनी असा ब्लॅकने पाहिलेला पिक्चर म्हणजे "हैदराबाद ब्लुज". त्यात इतकं हसायचं आहे आणि आम्ही दोघी एक-दोन रांगा अलिकडे-पलिकडे. पण काय करणार ऍडव्हान्स बुकिंग फ़ुल्ल झालं होतं आणि मला तर तिकिट घेतानाच धाकधुक. एखाद्या मुलाला बरोबर घेतलं असतं निदान त्या ब्लॅकवाल्याबरोबर डिल करायला तरी बरं झालं असतं असं नंतर वाटलं. असो इतकं विषयांतर पुरे...
तर आज काही कामानिमित्ताने software development estimates या विषयाची जरा अधिक छाननी करत होते तर एक मस्तच template हातात पडलयं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये छोटा बदल करण्याचं काम करताय आणि त्याला मुळात ५ मिनिटं लागणार आहेत तर त्याला खरा किती वेळ लागेल?  म्हणजे थोडक्यात "काय रे, तुम्ही software वाले इतका वेळ काय काम करता?" असं कुणी विचारलं आणि त्याला तुम्हाला समजावायचं असेल तर हे template नक्कीच चांगलं आहे.
म्हणजे पहा पाच मिनिटात तुम्ही कोड बदलला आणि २ मिनिटांत तो कंपाइल केला. मग तुम्हाला काही अभावित आणि अनभावित कंपायलेशन मधल्या चुका मिळतील त्या दुरुस्त करण्यासाठी साधारण १५, १५ अशी ३० मिनिटे पकडा.पण तरी का बर डम्प येतोय हे जरा जास्त डोकं लढवुन करायला हवं मग त्यासाठी अजुन एक तासभर लागेल. आणि हे काम अर्थातच तुम्हाला एकट्याने झेपेलच असं नाही मग तुमच्या आजुबाजुच्या लोकांची डोकी साधारण अर्धा तास खपवा. जाउदे शेवटी सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित लिहुन काढा जास्त नाही आठेक मिनिटांत आता पुन्हा थोड्या पुर्वीसारख्याच कंपायलेशन चुका आणि इतर डम्प इ. भानगडी. पण आता जरा अनुभव गाठीशी आहे त्यामुळे त्याला ४ आणि १० मिनिटं. हुश्श.आता मात्र जरा एकदा स्वतः थोडं एक-एक करुन टेस्ट करा लावा जरा आणखी दहा मिनिटं. चला आता खरा प्रश्न मिळाला त्यामुळे पाचेक मिनिटांत त्यावर उतारा आणि आता मात्र थोडं आधी विचार न केलेले चेक्स इ. टाका विसेक मिनिटं, थोडे नवे फ़िचर्स ३० मिनिटं आणि पुन्हा एकदा कंपायलेशन २ मिनिटं.पुन्हा एकदा टेस्टिंग, प्रोग्राम आणि युजर डॉक्युमेंटेशन प्रत्येकी दहा मिनिटे. मध्येच तुमचे संगणकाचे काही प्रॉब्लेम्स आले असतील आणि पुन्हा काही टाइप करायचं तर त्यालाही असुदेत ना एक पंधरा मिनिटे. चला बदल तर झाले आता एकदा पुर्ण सॉफ़्टवेअर इन्स्टॉल करुन त्याचं टेस्टिंग एक दहा मिनिटं. आता हे काही पहिल्या फ़टक्यात नीट चालणार नाही मग काय लढवा डोकं एक तासभर.आणि मग आलं ना पुन्हा बर्यापैकी नवं चक्र....विश्वास बसतोय ना?? शेवटी हे बस्तान नीट बसवुन आणि पुन्हा एकदा कागदोपत्री (म्हणजे आपलं डॉक्युमेंटेशन इ. हो) करुन जर सगळी गोळाबेरीज केलीत तर किती वेळ लागु शकतो माहितेय? १४ तास आणि ४० मिनिटे. म्हणजे झाले ना पाच का चौदह. नाही विश्वास बसत?? ही लिंक पाहा.

आणि आता कुणा सॉफ़्टवेअर मधल्या माणसाला तुम्ही दिवसभर (किंवा कधी कधी महिनोन महिने) काय करता असं विचारायच्या आधी याचा नक्की विचार करा. आणि तरी हे फ़क्त पाच मिनिटाचं उदाहरण आहे मग मोठमोठी प्रोजेक्टस यशस्वी करायला काय मेहनत घ्यावी लागत असेल याचा अंदाज आला की नाही?? मी मागे एकदा तीन महिन्यांसाठी प्लान केलेल्या प्रोजेक्टवर जवळजवळ सहा महिने खपले त्याचं गणित आता सांगायलाच नको. खरं तर मला वाटतं फ़क्त सॉफ़्टवेअर कशाला घरातलं एखादं पाच मिनिटांचं कामही कधी कधी पाच तास घेतं तेही मला वाटतं याच पद्धतीनं शोधता येईल. सगळीकडे आपलं पाच का चौदह, पाच का चौदह केलं की झालं...

Wednesday, October 21, 2009

वीज जाते तेव्हा....

परवाचीच गोष्ट, दिवाळीनंतरचा हा पहिलाच दिवस. सक्काळ सक्काळची माझी एक सवय आहे. उठल्या उठल्या आय पॉड (टच) वर पहिल्यांदा इ-मेल पाहुन घेणं. कधी कधी प्रत्यक्ष लॅपटॉप चालु करुन सविस्तर पाहायला वेळ लागतो पण साधारण पहिल्या डाकेने काय आलंय याची एक माहिती करण्याचं जवळ जवळ व्यसनच म्हणा ना. आता ब्लॉगींग सुरु झाल्यानंतर तर बरं वाटतं प्रतिक्रियांचे मेल्स वाचायला. फ़क्त त्यात एकच प्रश्न म्हणजे आय-पॉडवर देवनागरी वाचता येत नाही त्यामुळे मग काय बरं लिहिलं असेल ते अगदी प्रत्यक्ष वाचेपर्यंत घोळत राहातं. आज सकाळी तसंच इंग्रजीतले प्रतिक्रिया मेल वाचुन त्यांना उत्तर द्यायचा खूप मोह झाला होता पण त्यासाठी अर्थातच मला बराहावर जायचं होतं. ब्लॉगवर शक्यतो देवनागरीतच लिहायचा प्रयत्न असतो ना म्हणून. त्यामुळे लेकाला पटापटा दुध देऊन लॅपटॉप चालु केला. मेल उघडुन वाचत होते तोवर अचानक लॅपटॉपचा बॅटरीचा आयकॉन दिसला. मला वाटलं पाठुन पॉवर निघाली असेल. म्हणून एकदा तपासलं. लेकही सारखा पाठीपाठी करत होता तेव्हा त्याच्या पायात आलं का ते पाहिलं तरी काही नाही. आणि अचानक जाणवलं. मी आजकाल जिथे लॅपटॉप ठेवते तिथेच माझा एक कि-बोर्ड आहे आणि आजकाल मुलाला त्याचं चालु-बंद करायचं तंत्र जमतं (किंवा मीच शिकवुन ठेवलयं काही म्हणा) तर तो ते चालु बंद करुन कि-बोर्ड बडवत असतो. यात फ़ायदा आमचा दोघांचा होतो. त्याला थोडा विरंगुळा आणि मोठ्यांच्या गोष्टींशी खेळायला मिळतं आणि तो जितका वेळ त्यात गुंतेल तितका वेळ मी संगणकावर काम करु शकते. असो. तर आज सकाळीही तो ते बडवत होता त्याचाही आवाज बंद झाल्यामुळे तो माझ्याकडे आला होता. त्याला ते कदाचित चालु करता आलं नसेल असं वाटुन मी त्याला आधी ते चालु करुन द्याव म्हणून पाहिलं आणि झटकन माझ्या डोक्यात प्रकाश पडला अरे वीज गेली वाटतं??
या भागात आम्ही २००४ पासुन आलो तेव्हापासुन ही पहिलीच वेळ तशी वीज जायची त्यामुळे खरं तर आपल्याच घरचं काही बिघडलयं असं वाटुन मी दिवाळीच्या निमित्ताने घरी असणार्या नवर्याला लवकर उठवण्याची संधी सोडली नाही. तो बिचारा डोळे चोळत खाली आला आणि त्याने पेको (आमचे वीजमंडळ) चा फ़ोन फ़िरवला. त्यांच्या संदेशामध्ये त्यांनी आमच्या भागात काही तांत्रीक बिघाडावर काम चालु असल्याचं अगदी लगेच अपडेट केलं होतं...हम्म्म्म...आता काय करायचं?? एकतर बाहेर तापमान एक आकडी आणि घरातला हिटर बंद. नशीब की आज सुर्यदेवांनी थोडी कृपा केली होती त्यामुळे थोड्याच वेळात निदान सनरुममध्ये तरी बसु शकणार होतो. आणि आमच्याकडे इतरांसारखं कॉइल नाही आपला नेहमीसारखा गॅस आहे त्यामुळे चहा-पाणी तरी होणार होतं. फ़क्त लायटर इलेक्र्टीक असल्यामुळे काडेपेटीने गॅस पेटवायचा होता. मात्र बाकी सर्व बंद. इंटरनेट नसल्यामुळे तर एक अंग गळुन पडलंय असंच वाटत होतं. पाचेक मिनिटांतच माझ्या शेजारणीची सासु आज तिच्या मुलीला सांभाळायला आली होती तीही येऊन चौकशी करुन गेली की आमच्याकडेही तिच्यासारखंच सर्व बंद आहे म्हणून.
पण काही का असेना आज बाकी कसला विचार न करता बाहेरच्या खोलीत सुर्यप्रकाशाची मजा चाखत झोपाळयावर बसल्या बसल्या मला सहजच लहानपणीचे भारतातले वीज जाण्याचे दिवस आणि मुख्य म्हणजे रात्री आठवल्या. आम्ही राहायचो त्या गावात काही ना काही कारणामुळे नेहमीच वीज जायची. कधी खूप पावसामुळे तारेवर झाड पडलंय, कधी कुठला ट्रान्सफ़ॉर्मर जळालाय कधीकधी नुसतंच लोडशेडिंग म्हणून. सुटीच्या दुपारच्या वेळी ती गेली की फ़ारच कंटाळा येई कारण मग खूप गरम होत असे. रात्री विशेषकरुन जेवणं झाल्यावर वीज गेली की मात्र मला खूप बरं वाटे. एक म्हणजे रात्रीचा काही अभ्यास करायला नको आणि दुसरं म्हणजे अशावेळी मग शेजारी पाजारी मिळून कधी अंताक्षरी नाहीतर भूता-खेतांच्या गप्पा असं काही चालु होई. आणि मग एकदम सगळ्यांचे दिवे चालु झाले की सर्व मुलं एकदम ओरडत त्याचीही एक वेगळीच मजा होती. "कॅंडल लाईट डिनर" या भानगडीला नक्की इतकं काय महत्त्व आहे हे मला कधी कळलं नाही कारणं मेणबत्तीच्या उजेडात जेवणं बर्यापैकी नेहमीची. माशांचे काटे नीट दिसतील का हा मला त्यावेळी पडलेला एक गहन प्रश्न असे. आणि कधी कधी आई मला खास काटे काढलेले पिसेस देई ही त्यातल्या त्यात मिळालेली सवलत. हे वीज प्रकरण पुढे माझे भाऊ-बहिण दहावीला वगैरे गेल्यावर महाग पडायला नको म्हणून माझ्या बाबांनी घरी चक्क पेट्रोमॅक़्स घेतली होती. त्याचं तेलपाणी करायला ते बसले की त्यांना पाहायला मला फ़ार मजा येत असे. मात्र एखाद्या "ये जो है जिंदगी" सारख्या लाडक्या सिरियलच्या वेळी जर वीज गेली की मात्र सगळे जण लाईटवाल्यांच्या नावाने शिमगा करत.
सगळीकडे चांगला मिट्ट काळोख असताना खेळल्या जाणा-या आंधळी- कोशिंबीरीची सर मात्र कुठच्याही खेळाला नाही. त्यात आपल्यावर राज्य आलं की संपलंच. मग मात्र कधी एकदा उजेडाचं राज्य परत येतय असं होई. आमच्या चाळीतील मुलं खिडक्यांच्या वर वगैरे चढुन बसत आणि वरुन टपली मारुन कंन्फ़्युज करत.
माझ्या आजोळी सुट्टीत नेहमीच रात्रीचीच वीज नसे. आणि त्या पालघर मधल्या आडगावात गेलेली वीज परत लगेच यायची शक्यताही नसे. त्यावेळच्या मोठ्या ओट्यावर बसुन सगळी मोठी मंडळी बराच वेळ त्यांच्या लहानणीच्या आठवणी काढत त्या अशा ऐकावं ते नवलचवाल्या असत. आणि मग घरात खूप गरम होतंय म्हणून मागच्या सारवलेल्या खळ्यात मस्त खाटा टाकुन चांदण्या रात्रीचं आकाश पाहात झोप कशी येई कळतच नसे. तिथे दुस-या दिवशी कधीतरी वीज परत येई. इतक्या सा-या मावस-मामे भावंडांच्या गराड्यात कळतही नसे की आपली काही गैरसोय होतेय. आमची नाती त्या काळोख्या रात्रींनी खरंतर जास्त घट्ट केलीत. आताच्या अस्तित्त्व टिकवण्याच्या शर्यतीत सगळे कसे पांगलेत आणि पुर्वी काहीच सोयी नसताना आपण कशी मजा केली याची आठवण कधी काळी काढली की नाही म्हटलं तरी थोडं वाइटच वाटतंय.
आता इथे मात्र खरं तर दोनच तास झालेत पण नवरोबांना नेट हवंच आहे असं काहीसं दिसतंय म्हणून पुन्हा एकदा तोच फ़ोन फ़िरवला तर त्यांनी चक्क ५३ घरांमध्ये वीजेच्या प्रश्न आहे आणि १२:२० पर्यंत तो सुटेल असा रेकॉर्डेड मेसेज ठेवला होता. मला नाही म्हटलं तरी थोडं कौतुकच वाटलं. अर्थात प्रगत देश आहे हा म्हणजे इतकं तर नक्कीच असेल. थोड्या वेळाने आमच्या बॅकयार्डमध्ये एक वीजेचा खांब आहे तिथे एक काळा-कभिन्न माणुस येऊन पाहुन गेला. त्याची गाडी गेली आणि पाचेक मिनिटांत वीज परत आली. साधारण पावणे-बारा झाले असावेत. आहेत बाबा वेळेचे पक्के. नेटसाठी लायब्ररीत गेलेल्या नवर्याला मी फ़ोन करुन परत घरी बोलावुन दिवसाच्या सुरुवातीला लागले.