Wednesday, January 22, 2014

गाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे

उदय आणि मी कॉलेजमध्ये असताना तो माझा मित्र वगैरे नव्हता. म्हणजे असायचं काही काम नव्हतं. पण त्याचा एक मित्र माझा अतिशय चांगला मित्र आहे, त्यामुळे ते कॉमन मैत्री वगैरे का काय म्हणतात तसं असावं. मग यथावकाश कामाला लागल्यावर त्या कॉमन मित्रामुळे आमचे निदान मुंबईत असेपर्यंत contacts राहिले. आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात स्वतःची गाडी असण्याचा मान उदयकडे. म्हणजे तशी सगळी जण सेटल होतहोती पण गाडी घ्यावी हे बहुतेक फक्त उदयच्याच डोक्यात पहिले आलं असावं. कदाचित त्याचा भाऊ actor आहे त्याची थोडी बॉलीवूड पार्श्वभूमी त्याला कारण असू शकेल. मला आठवतं कॉलेजमध्ये हा त्याने घातलेल्या कुठल्या कुठल्या कपड्यांचे ब्रान्ड सांगत असे. आणि प्रत्येकवेळी त्याचं  एक पालुपद असे की "एकदम ओरिजिनल है" म्हणून. आम्हाला काय कळतंय ओरिजिनल काय आणि फेक काय. खरं तर आता आठवलं की मज्जा वाटते. आता खरं काही प्रसिद्ध brand बरोबर काम वगैरे पण करून झालं तरी त्या दिवसातली गम्मत वेगळीच. बालपणीचा काळ सुखाचा टाईप. 

हम्म तर काय सांगत होते? आमची मैत्री. तर मग कामाला लागल्यावर आमच्या त्या कॉमन मित्रामुळे पुन्हा उदयबरोबर पुन्हा कधीकधी भेट होत असे. ही दोघं आणि आमचा एक कामावर भेटलेला आणखी एक मित्र अशी एक त्रयी होती. ही लोकं प्रत्येक शनिवारी दुपारी त्या आठवड्यात लागलेल्या सिनेमाला जात आणि नाही आवडला की सरळ बाहेर येत. आता कुठला चित्रपट आठवत नाही पण त्यातून ते पाच मिनिटात बाहेर आले होते. आणि तो त्यांचा रेकॉर्ड होता. त्यादिवशी नेमकी मी माझं ऑफिस सुटल्यावर त्यांना अंधेरीला भेटून मग आम्ही जेवायला गेलो असताना यांचे असे चित्रपट पाहताना बाहेर यायचे रेकॉर्ड याविषयीच्या परिसंवादाची मी मूक (किंवा खर नुसती हा हा करून मोठ्याने हसणारी) श्रोती होते. यातून दुर्बुद्धी सुचून मी पुढच्यावेळी नाटकाला जाऊया म्हणून या त्रयीला सांगून पायावर धोंडा मारून घेतला होता. 

नाटकाची पहिल्या रांगेची तिकिटं काढली आणि याचं दहाव्या मिनिटापासून "चला", "उठुया", "बोअरिंग होतंय", सुरु झालं. नाटक सोसोच होतं पण तरी असं पहिल्या रांगेतून उठून कलावंतांच्या मेहनतीचा जाहीर अपमान करणं मला पटत नव्हतं त्यामुळे मी एकटीच बसणार म्हणून सगळे कसेबसे थांबले मग मध्यंतरात उठलो तोपर्यंत "मी तुला आज ट्रेनने जायच्या त्रासाऐवजी घरी सोडतो" म्हणून त्याने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊन झालं होतं. आणि तेव्हा मी वसईला राहत होते. मग शेवटी ही लोकं मला सोडायला आणि मला विसरून माझ्याच बाबांशीच खूप वेळ गप्पा मारून परत गेली. 

तर अगदी घट्ट नाही पण तेव्हा आमची चांगली मैत्री होती. एकमेकांचे घरगुती प्रश्न सांगण्याइतपत. आमच्या आणखी एका मित्राचा मी थोडा सिरीयसली विचार करावा वगैरे सांगण्याइतपत. आम्ही मध्ये काही महिने एकाचवेळी मुंबईत सिप्झमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं त्यावेळी संध्याकाळी वेळेवर निघणार असू तर त्याच्या गाडीने तो मला बोरिवलीला सोडत असे. कंपनीच्या बसपेक्षा थोडा वेळ वाचत असे पण त्याच्याबरोबर फुल टाईमपास गप्पा होत. एकदा समोरच्या माणसाने काहीतरी चूक केली तर हा पुढच्या सिग्नलला गाड्या थांबल्या तेव्हा  हा तरातरा आपल्या गाडीतून उतरून समोरच्याला चांगला झापून आला होता. आणि वरून त्याची "भा"राखडी मी ऐकली की काय म्हणून मला, "अशावेळी कान बंद करत जा" हा सल्ला देऊनही पार.   

एकदा मी खूप वाईट मूडमध्ये होते. काय झालं होतं मला आठवत नाही, कॉर्पोरेट जगतातला एखादा पोलिटिकली वाईट दिवस असावा. बहुतेक मी नीट बोलत किंवा ऐकत नसेन त्यामुळे त्याला ते जाणवलं असावं. अचानक तो म्हणाला तू सुनिधीचं हे गाणं ऐकलंय का? आणि त्यादिवशी बोरीवली येईपर्यंत आम्ही ते गाणं ऐकून एकंदरीत सुनिधी या विषयावर गप्पा मारल्या होत्या. 

हे गाणं ज्या लयीत स्वरबद्ध केलयं त्यात गाण्यात म्हट्ल्याप्रमाणेच एक जादू आहे. कधीही ऐकलं तरी डोलायला लावणारंतसं पाहिलं तर त्याच्या त्या "ओरिजिनल"च्या आवडीत त्याच्याकडे नेहमी चांगल्या सीडी असत. गप्पा मारत असलो तरी त्याचं गाण्याकडे (अर्थात driving कडे) लक्ष असे. यान्नी आणि मला त्याकाळी माहित नसलेले विशेष करून बाहेरच्या देशातले काही कलाकार त्याच्याबरोबर बरेचदा ऐकले तरीही सुनिधीचं "दिले में जागी" ऐकलं की मला उदय आठवतो. 

आता आमच्या वाटा खुपच वेगळ्या झाल्यात. जसं मी वर म्हटलं की त्याने गाडी लवकर घेतली तसचं आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात लग्न, मुल हेही बहुतेक त्याचंच लवकर झालंय. मागे तो इस्टकोस्टला आल्याचं कुणीतरी कळवलं आणि नेमकं आमचं packing सुरु झालं होतं. पण मला खात्री आहे की आम्ही पुन्हा कधीही भेटलो तर नक्की तासभर तरी गप्पा मारू आणि तेच या अशा मैत्रीकडून अपेक्षित असतं. 



सुनिधीचा स्वर, निदा फाजली यांचे शब्द आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम. एम. क्रीम (खरं ते Keervani आहे)  या संगीतकाराची कामगिरी, या त्रयीची कमाल या गाण्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवते. यातील एकाने जरी थोडं डावंउजवं केलं असतं तर हे गाणं कोलमडू शकलं असतं. पण तसं ते झालं नाही. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर,शब्दाच्या लयीत आपण पाच मिनिटं झुलत राहतो आणि हे दोन तीन वेळा ऐकलं की त्यादिवशीचा आपला जर खराब झालेला मूड असेल तर तेही विसरून जातो. मला हा अनुभव जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा तेव्हा येतो आणि मग आपसूक उदय आणि त्यादिवशीची संध्याकाळ आठवते. पुन्हा मी सिप्झच्या घामेजल्या ट्राफिकमध्ये त्याच्या गाडीतला एसी, गाणी आणि गप्पांमध्ये हरवते. ही पोस्ट  या साऱ्या आठवणी जागवण्यासाठी.
 

2 comments:

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.