Thursday, June 24, 2010

न भूतो न भविष्यती

विश्वास बसतोय का, की ६८-७० ही शेवटच्या सेटमधली गुणसंख्या चक्क लॉन-टेनिस मधली आहे म्हणून? विम्बल्डनच्या नियमाप्रमाणे अंतिम सेटमध्ये टाय-ब्रेकर नसतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूची सर्विस ब्रेक होईस्तोवर खेळलं जातं.त्याच तत्वावर झालेली न भूतो न भविष्यती अशी ही ११ तास ०५ मिनिटे अमेरिकेचा जॉन आइस्नर आणि फ़्रान्सचा निकोलस माहु यांच्यातली गेले तीन दिवसांची झुंज. अखेरीस जॉनने निकोलसची सर्विस ब्रेक केली आणि या सामन्याचा निकाल लागला.


गेले तीन दिवसांत टेनिसच्या पंढरीत कोर्ट क्रमांक १८ मध्ये काय नाही झालं?? दोन योद्धे लढले, त्यांनी त्यांच्या वैयत्किक बरोबर कित्येक जागतिक विक्रम रचले. सामन्याचा कालावधी तर वर म्हटल्याप्रमाणे आतापर्यंतचा सर्वाधिक आहेच. याआधीची सगळ्यात मोठी लढत झाली तेव्हा शेवटच्या सेटमध्ये २०-२२ असा गुणफ़लक होता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त ही दोघं खेळली. विजेत्या जॉनने तब्बल ११२ एसेस आणि ४७८ गूण जिंकले तर हरलेल्या निकोलसचं पारडं याबाबतीत थोडं जड म्हणजे ५०२ जिंकलेले गूण आणि साधारण तोडीस तोड म्हणजे १०३ एसेस. पहिल्या दिवशी खेळ सुरु झाला तेव्हा साधारण तीनेक तासांचा खेळ झाल्यावर वेळेअभावी हा सामना दुसर्‍या दिवसावर गेला तेव्हा उपस्थित लोकं, पंच, कॉमेंट्रेटर कुणालाही दुसरा दिवस ही दोघं फ़क्त पाचवा सेट खेळत राहतील असं वाटलं नव्हतं. दुसर्‍या दिवशी इतर कोर्ट्स्वर जेव्हा एकापाठी एक मॅचेस संपत होत्या त्या वेळी कोर्ट क्रमांक १८ मात्र फ़क्त या दोन खेळाडूंची एकमेकांची जिद्द पाहात होता. या सेटमधल्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही खेळाडूंनी दाखवलेली संयत वृत्ती. कुठेही मुठी आवळणं नाही, एकमेकांकडे रागाने पाहाणं नाही किंवा धुसफ़ुसत बोलणं नाही. मी आणि माझी सर्विस. दोघांनी जणू शांततेचं मोठं ग्लास भरुन सरबत पिऊन ठेवलं होतं. मध्येच याविषयावर बोलताना कॉमेन्ट्रेटरनी म्हटलंही की बहुतेक मुठी आवळण्यातही ताकद घालवायची इच्छा नसावी यांना. सात तासानंतर अंधुक प्रकाश, वेळ आणि खेळाडूंची मागणी यामुळे हा खेळ थांबला त्यावेळी पाचव्या सेटचे गूण ५९-५९ होते. तिसर्‍या दिवशी मात्र ती एक सर्विस राखताना अपयश आल्यामुळे एका तासाच्या खेळानंतर शेवटी सामन्याचा निर्णय लागला आणि पाचव्या सेटमध्ये ६८-७० अशी आघाडी घेऊन अमेरिकेचा जॉन आइस्नर जिंकला; तेव्हा त्यांने अक्षरशः लोटांगण घातलं.

या चिवट लढ्याची इतरवेळी नियम एके नियम करण्याची ब्रिटीश आवड असणार्‍या विम्बल्डनच्या आयोजकांनीही या युद्धाची दखल घेतली आणि सामना संपल्यावर दोन्ही खेळाडूंचा सत्कार आणि एक छोटेखानी मुलाखत मैदानावर झाली. दोघा खेळाडूंना मेमेन्टो द्यायला पुर्वीचा ब्रिटीश टेनिसपटू टिम हेन्मनला बोलावले होते. खरं तर निकोलस या अपयशातून सावरला नव्हता त्यामुळे त्याचं नाव घेतल्यावर उठणं त्याला जड जात होतं, पण आयोजकांनी समयसुचकता दाखवून दोघंही खर्‍या अर्थानं विजेते असल्याने दोघांना एकत्र बोलावले. त्यानंतर लोकाग्रहास्तव त्या ऐतिहासिक गूणफ़लकाकडे दोघांना एकत्र उभं करुन फ़ोटोही काढले गेले. खरं तर वाटत नव्हतं की ही या दोघांची या स्पर्धेतली पहिलीच मॅच आहे म्हणून. पण शेवटी इतिहास घडवलाय या दोन्ही खेळाडूंनी. तेव्हा इतकं कौतुक तर नक्कीच व्हायला हवं.

इतका मोठा लढा देऊन जॉन आता (फ़क्त) दुसर्‍या राउंडमध्ये पोहोचला आहे.मला उगाच वाईट वाटलं की जर इतकी लढाई देऊन यातल्या विजेत्याला अंतिम लढतीपर्यंत पोहोचता नाही आलं तर हेची फ़ळ आले काय मम तपाला म्हणा..असो पण ही खेळीही तितकीच महत्वाची आहे. कारण संपुर्ण जगाच्या टेनिस इतिहासात ही महत्वाची नोंद या (सध्या) दिग्गज नसलेल्या दोन योद्ध्यांच्या नावावर होणार आहे. आणि या मॅचची व्याप्ती पाहिली तर टेनिसचा इतिहास पुन्हा असा क्षण (म्हणण्यापेक्षा तीन-चार दिवस) पाहिल असं वाटत नाही.इतका वेळ खेळण्यासाठीचा स्टॅमिना फ़क्त शारिरीकच नव्हे तर मानसिकही संतुलनही नीट ठेवणे हे काही खायचं काम नव्हे. इतर खेळांचा विचार करता हा एकट्याने ताकदीने खेळून आणि तेही जेव्हा सतत सात तास खेळायचं तेव्हा मोठा ब्रेक, हाफ़ टाइम असले चोचले नाहीत. या सर्वांचा खूप विचार केला तर ही मॅच म्हणजे नक्की खरंच असं कुणा मानवांनी केलं की भास असंच वाटावं. या दोघा योद्धयांना सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Monday, June 21, 2010

गाणी आणि आठवणी ४ - मी एकटीच माझी असते कधीकधी

काही गाणी आठवण्यासाठी ती मुद्दाम ऐकावीही लागत नाहीत.अशा गाण्यांनी मनाचा एकदा ठाव घेतला की यांचे शब्द अकस्मात आठवतात आणि जणु काही आपण ते गाणं त्या क्षणासाठी जगतो. माझ्यासाठी अशाच काही गाण्यांपैकी एक म्हणजे "मी एकटीच माझी असते कधी कधी".

हे गाणं मी प्रथम कधी ऐकलं ते खरंच आठवणार नाही पण शाळेतल्या न कळत्या वयात संध्याकाळी रेडिओवर सांजधारामध्ये हुरहुरत्या संध्याकाळीच ऐकलं असणार हे नक्की.
यातलं "गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी" हे खूप स्पर्शून गेलं होतं ते बारावीच्या निकालाच्यावेळी. माझ्या ग्रुपमधल्या सगळ्या मुली पीसीबीमध्ये सुस्थितीत असल्याने निर्धास्त होत्या आणि काहींना पैसे भरून खाजगी मेडिकल कॉलेजला जाता येईल याची खात्री. मला मात्र या सगळ्यात राहुन इतकं एकटं वाटत होतं की बस..आता पुढे काय पेक्षा जे ठरवलं होतं ते नाही याचं ते दुःख. मजा म्हणजे आता आठवलं तर त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे गेलं त्याचं वाईट वाटतं पण त्यानंतरही फ़ार काही वाईट झालं नाही. दुसरी रांग आणखी काय?? असो..पण तरी असे गर्दीत नसण्याचे प्रसंग येतच राहतात. अशावेळी मनाला एका वेगळ्याच शांत जागी नेऊन सोडण्याची करामत या गीताने माझ्यासाठी बर्‍याचदा केलीय.

मागच्या मायदेश दौर्‍यात मामाच्या घरी गेले होते...लहानपणीच्या मे आणि दिवाळीच्या सुट्टीत चार मावश्या, मामे-मावस भावंडं यांच्या गोतावळ्यात गप्पा मारत वाड्यातल्या चिंचेखाली बसलेलो आम्ही याचे भास त्यावेळी उगाच झाले आणि काय वाटत असेल या आजोबांच्या काळातील चिंचेला? असं एकटीच शांतपणे दुरून येणारा नदीच्या वार्‍याचा इवलुसा आवाज ऐकताना उगाच वाटुन गेलं...मन मागचं काहीबाही आठवत राहिलं आणि "होतात भास मजला नुसते कधी कधी" हे प्रत्यक्षात जगलं गेलं..या आणि अशा अनेक प्रसंगांच्यावेळी हेच गाणं आठवलं...

थोडे आणखी बिकट प्रसंग येतात, जुन्या जखमांवरची खपली काढली जाते, एखादा परिचय दूर जाताना दिसतो तेव्हा माहित असतं की काही ओळखी जन्मजन्मांतरीच्या नसतात किंवा हे आधीही घडलंय तरी "जखमा बुजुन गेल्या सार्‍या जुन्या तरीही, उसवीत जीवनाला बसते कधी कधी" असं होतंच. त्यावेळी या गाण्याचा आसरा वाटतो.

इथे अमेरिकेत तर अगदी प्रत्यक्षात एकटं असण्याचे प्रसंगच जास्त. त्यामुळे इथे आल्यापासुन तर हे गाणं खरं सांगायचं तर विसरायचे प्रसंग कमी. माझ्याकडे हे गाणं आता नाहीये. अजुनही पुर्वीसारखं जर रेडिओवर वगैरे लागलं तरंच ऐकलं जाणार पण स्वतः स्वतःलाच इतक्यांदा ते ऐकवलं गेलंय की प्रत्यक्ष न ऐकल्याची कमी भासत नाही. आठवणीत येऊन सारखं सारखं रुंजी घालणार माझं हे एक फ़ार लाडकं गीत आहे.

सुरेश भटांची ही गझल, श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केली आहे आणि निर्मला देवींचा स्वर या गाण्याला लाभला आहे.खाली पूर्ण गीत दिलं आहे.

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी
 
येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझ्या एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या सा‍र्‍या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

Saturday, June 12, 2010

त्याचे खादाडी प्रयोग......

आजकाल मुलांना शिंगं फ़ुटण्याचं वय बहुधा वय वर्षे दोनवर आलेलं दिसतंय...एक म्हणजे तेव्हा बाळ आपल्या पायावर उभं असतं....(हा शब्दशः अर्थ...उगाच नाहीतर बाळमजुरीचा आरोप या पोस्टवरुन सिद्ध होऊन मी आणि माझा ब्लॉग तुरुंगात नको जायला...) आमच्याकडे तर बाळ (आता खरं तर बाळ नकोच म्हणायला पण...) उभं राहिल्यानंतर नेक्श्टव्या श्टेपला धावायलाच लागलं...(आणि मग त्याच्यामागे धावुन माझं वजन कमी झालं....इति अर्थातच अर्धांग..) हम्म, तर कुठे होतो आपण??हे धावरं किंवा चालणारं बाळ आपल्या पावलांनी जग जरा जास्तच उघड्या डोळ्यांनी पाहायला सुरु करतं..पायासारखंच थोडं-फ़ार तोंडानेही सहकार्य द्यायला सुरु केलं असतं म्हणजे बोबलं बोबलं पण जास्त शब्द असतात आणि नसले तरी अडत नाही कारण नवे जमतील ते शब्द तयार करुन आई-बाबांना "समानार्थी शब्द शोधा"चं कोडं घालुन नाही कळलं तर शेवटचं रडायचं अस्त्र उगारायचं कळलेलं असतंच..
आता शब्दांवरुन विषय निघालाच आहे तर सांगुनच टाकते "चीची" सगळ्यांना आठवत असेलच त्यानंतर नेमकी आवडली ती चपाती (आणि त्याच्या आईला ती येत नाही हे कर्म असो..त्यावर रडण्याची जाहिर पोस्ट झाली आहेच....पण दुखरी नस आहे ती..) आणि नशिबाने जगप्रसिद्ध "पापा" म्हणजे चपाती आणि "ममं" म्हणजे वरण-भात/खिचडी असल्याने आम्हालाही शिकवणं, कळणं कठिण गेली नाही पण दोन शब्द एकदम बोलायची सुरुवात जेव्हा "चीची पापा" ने झाली तेव्हा मात्र हा योगायोग नव्हे असं मला उगाच वाटलं...आता निदान काय हवं हा प्रश्न नव्हता..आणि चीची पापा हे कॉंबिनेशन काही वाईटही नाही...
चीची असताना आमच्या घरी माझी आई होती आणि आईला काचेच्या पेल्यात पाणी प्यायला आवडत नाही म्हणून खास स्टीलचा पेला देते. तो नेहमी दिसला की आजी आजी म्हणताना आजी जेव्हा परत तिच्या घरी गेली तेव्हा लेकाने पाण्यालाच सरळ आजी म्हणायला सुरुवात केली..फ़क्त नुस्तं आजी न म्हणता तो "आ आजी" असं म्हणतो आणि आजीचा फ़ोटो दाखवला की "आजी"..सुरुवातीला मला कळलं नव्हतं ’ये आ आजी क्या है?’ पण ते मला कळेल याची सोय अर्थातच पठ्ठ्याने केली..

आधी आवडलेल्या पापा नंतर ’पा’ या शब्दाचा उपयोग अगदी सढळपणे दिसायला लागला...एकदा मी पापड तळले होते आणि नवर्‍याला पापड देताना अर्थातच करर्म-कुरर्मचा(र चा पाय कसा मोडतात??? बरहा वालो जागो मेरे लिए) लळा त्यालाही लागणं साहजिकच होतं..मग दोन दिवसांनी स्वतःच फ़र्माइश केली ’पाप्र’ असं काहीतरी बरळून...खरं म्हणजे मला कळलं होतं की पाप"ड" मागतोय पण मी कसली ताकास तूर लागु देते???
पाप्रं झाल्यानंतर दुसरं फ़ेवरिट फ़ुड म्हणजे इथे ज्या त्या बाळांना दिले जाणारे चिरिओज..गोल गोल आकार आणि हातातही पकडता येतात म्हणून सगळ्याच मुलांना आवडतात..(त्यातला अगोड प्रकार दिलेला चांगला कारण ते फ़क्त ओट्सचे असतात..) आणि याचं पाकिट असतं फ़्रिजच्या वरती म्हणून बोलता येत नव्हतं तोवर फ़्रिजकडे नेऊन बोट दाखवता दाखवता एक दिवस त्याच त्या वरच्या ’पा’ चा आधार घेऊन चक्क एक नवाच शब्द ऐकु आला "पापुपा". अरे म्हणजे चिरिओज आणि पापुपा, काही संबंध पण काही नाही आता पापुपा म्हटलं की आम्ही मुकाट्याने चिरिओज देतो नव्हे एकमेकांना सांगतानाही त्याला पापुपा दे असंही म्हणतो...आणि त्यानंतर अर्थातच "चीची पापुपा" हे कॉम्बो मागितलं हे ही गोष्ट चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आली असेलच..

तसंच एक दिवस कधीतरी "पावो" आला..म्हणजे पाव हे माझ्याच काय चा.वा.च्या धेन्यातबी आलं असलच...मला ते पावो ऐकायला इतकं गोड वाटतं नं की त्याला खरं म्हणजे पावो द्यायला आवडत नसला तरी ऐकायला मात्र नेहमीच आवडतं....मग द्यायची वेळ आलीच की पावोला थोडा जॅम लावुन देते..नशीबाने त्यासाठी अजुन नवा शब्द शोधला नाहीये..सरळ फ़्रीज उघडून दारातल्या बाटलीकडे बोट दाखवलं की न बोलता काम होतं...
आज असंच पावो-जॅम दिला आणि त्याचं माझ्याकडे लक्ष नाही म्हणून थोडी इतर कामं केली..

त्याआधी पापुपा पण मागुन घेतले होते म्हणजे खादीच्या चळवळीत बराच वेळ जाणार म्हणून निवांत होते तर साहेब माझ्याकडे ते सॅंडविच घेऊन आले आणि पापुपा पापुपाचा गजर सुरू..खरं तर ताटात पापुपा होते पण नंतर नीट पाहिलं तर साहेबांनी आधीच सॅंडविच उघडून त्यात पापुपा घालुन स्वतःचीच एक नवी डिश बनवुन मला दाखवायला आणली होती..इतके दिवस जेवताना पाण्यात चपाती घाल, दुधात पापुपा किंवा ममं घाल अशा प्रकारचे उद्योग पाहात होते पण आज मात्र त्याचं स्वतःचच कॉम्बो पाहुन मला मात्र कुठेतरी वाटायला लागलंय थोडं मोठं झाल्यावर हे पोरगं माझं स्वयंपाकघरातलं ओझं हलकं करणार बहुधा...

Wednesday, June 9, 2010

मार्गे हायवे गोमांतक...

काही जागा अशा असतात की तिथे आपल्याला जायचं असतं; अगदी मनापासुन पण तरी प्रत्यक्ष जायचा मुहुर्त उजाडण्यासाठी कुणीतरी तिथे न्यावं लागतं...माझं आणि हायवे गोमांतकचं तसंच झालं. तसं ते माझ्या लिस्टवर जवळजवळ १९९५ पासुन आहे असं मी म्हटलं तर कुणीही हसेल पण तेव्हा मी आणि माझी शिवाजी पार्कमधली मैत्रीण खादाडी करायला जायचो तेव्हा तेव्हा एकदा हायवे गोमांतकला जाऊया म्हणायचो आणि तिची दुचाकी नेहमी एस.व्ही.रोड वगैरे अशी वेस्टात असल्याने नेहमीच नंतर जाऊया करुन राहिलं...पण शेवटी मुंबईच्या ब्लॉगर मेळाव्यानंतर बहुधा नशीबात तिथे जाणं(किंवा रोहनने तिथे घेऊन जाणं) लिहिलंच होतं त्याप्रमाणे गेलो...

झालं असं की मराठी ब्लॉगर्सचा मेळावा पार पाडल्यानंतर रोहन,शमिका,महेंद्रकाका आणि मी एकत्रच जाणार होतो आणि निघेनिघेस्तोवर रात्रीचे नऊ वाजले असावेत. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी सगळी तयार होतो आणि नाहीतरी शिवाजी पार्कच्या इथे रोहनने गाडी ठेवली असल्याने तिथपर्यंत जायचे तर रस्त्यात गोमांतकमध्येच काही हादडुया असा विचार होता पण (नेहमीप्रमाणे) गोमांतकच्या बाहेरची रांग पाहुन तो विचार सोडला मग वाटलं की पार्काच्या इथे फ़्रॅंकी घ्यावी आणि गाडीतच जाता जाता खावी पण प्यायला पाणी,सरबतं घेतल्यावर फ़्रॅंकीही न घेता निघालो..रोहनच्या मनात अर्थातच हुकलेलं गोमांतक असावं त्यामुळे "जाऊया नं खायला" एवढं बोलुन शिताफ़ीने त्याने बांद्र्याच्या हायवे गोमांतकला गाडी लावली तेव्हा मानलं त्याला. एक म्हणजे इतकं पर्फ़ेक्ट लोकेशनसाठी आणि दुसरं त्या हायवेवरुन क्रॉस करण्याच्या सिग्नलला ज्या प्रकारे त्याने गाडी उजवीकडून मग मध्यभागी आणि मोठं डावं वळण घेऊन मागच्या गल्लीत घुसवली त्यासाठी...
अर्थातही इथेही रांग होती पण चार माणसांत वीस मिन्टं कशीही जातात. आमचा नंबर आल्यावर एक डीश अगदी मस्ट होती ती म्हणजे बोंबिल फ़्राय. शमिकाला कित्येक दिवस खायचे होते त्यामुळे पहिले आले ते खरपुस तळलेले चविष्ट ओले बोंबिल...त्यातलं तेल पाहायचं नाही...आमच्या थाळ्या यायच्या आत ते फ़स्तही झाले होते..त्यानंतर मग प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे मत्स्याहाराचेच प्रकार मागवले. मला खरं सुरमईवर जीव आला होता पण ती ड्राय चांगली लागते म्हणून मग पापलेटचं कालवण मागवलं. मालवणी रेस्तरॉंमधली कालवणं तिरफ़ळ आणि नारळाच्या दुधाचं लेणं लेवुनच येतात हे वेगळं सांगायला नकोच. इथली चव आणि दादरच्या गोमांतकची चव मला साधारण सारखीच लागली. तांदळाची भाकरी, भात आणि सोलकढी आणखी काय हवं ताटात?? मला आठवतं एकदा जेवण आलं आणि सगळे इतके बिझी झाले की सगळ्या ताटांचे फ़ोटोपण काढले नाहीत.

आधीच भरपेट वडे-कटलेट (संदर्भ: ब्लॉगर मेळावा) खाऊन पोटं काही रिकामी नव्हती त्यामुळे कुठलंही गोड मागवायच्या भानगडीत पडलो नाही पण इतरवेळी खरवस मागवायला हरकत नाही...माझं आणि मालवणी जागांचं काहीतरी गमक आहे त्यामुळे इथे नेहमी मासेच खाल्ले जातात त्यामुळे इथल्या शाकाहारी मेन्युकडे फ़ार लक्ष जात नाही पण तरी अगदी मराठमोळे शाकाहारी पदार्थ जसं कोथिंबीर वडी, डाळींबी उसळ वगैरे इथेही असते त्यामुळे मालवणी खायचं तर हायवे गोमांतकलाही एकदा नक्की जायला हवं...आणि इतर महागड्या जागांपेक्षा इथले दर नक्कीच रिझनेबल असतात असा माझा अनुभव आहे.
जितका आनंद मेळाव्यात सगळ्यांना भेटून झाला त्यापेक्षा थोडा जास्त रात्रीच्या जेवणाने झाला असं त्यादिवशी वाटल...शेवटी खरंय की माणसाला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातुन जातो...आणि त्यातही माझ्या पोटातुन मासे गेले की मी जरा कांकणभर जास्तच खुश होते....मग केव्हा जाताय खुश व्हायला हायवे गोमांतकला???

Saturday, June 5, 2010

जागतिक पर्यावरण दिवस

आज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाचा इतक्या वर्षांत झालेला र्‍हास पाहुन खरं तर शंका येते हे असे वेगवेगळे दिवस साजरे करुन आपण नक्की काय करतो....कदाचीत असं असेल की नाहीतर यापेक्षा अपरिमीत हानी झाली असती...(just to look at it positively)
या वर्षीची थीम आहे, "Many Species: One Planet, One Future" म्हणजे बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण हिरवी इकॉनामी कशी आणावी असं काही किंवा सगळ्या इतर सजीव,वनस्पती इ.ना जगवुन कसं एक हरित ग्रह किंवा एक भविष्य बनवायचं असं काहीसं...थोडं डोक्यावरुन जातंय माझ्या पण मोठे देश काहीतरी करत असतील असा एक भाबडा विचार करते...
मोठी लोकं काही करो न करो, आपण एक सर्वसामान्य नागरिक आणि या पर्यावरणाचे इतके वर्षांचे हानीकारक म्हणून निदान आता तरी जागं व्हावं हे मात्र सर्वांना पटेल..या वर्षी माझ्या मुलाच्या पाळणाघरात संपुर्ण आठवडा Reduce, Reuse and Recycle असा पाळला गेला...खरं एक कशाला सगळेच आठवडे का नाही असे पाळत असं मला आपलं वाटलं पण चला निदान सुरुवात तर आहे...
मुळात जितकं आपण कमी वापरु तितकं त्याचा कचरा कमी..जमेल तिथे हे तत्व पाळणं सोप्पं आहे...खोलीत गरज असतानाच दिवे,पंखे, एसी (एसी शक्य तितका टाळावा हेच उत्तम) आणि बाहेर पडताना वीजेची उपकरणी आठवणीने बंद करणे यात आपण कमी वापरण्याचं तत्व अमलात आणू शकतो. पाण्याचंही तेच. नळाची धार थोडी कमी करावी आणि पिण्यासाठीही पाण्यासारखा धर्म नाही असं असलं तरी पुर्वीचं तांब्या-भांडं तत्व जास्त चांगलं म्हणजे जेवढं हवं तेवढंच पाणी प्यालं जात आणि बाकी उष्टं नं झाल्यामुळे वाया जात नाही...कागदाचा कमी वापर हेही महत्वाचं..मोठ्या रेस्टॉरन्ट्समध्ये रुमाल असतात तिथे पुन्हा पेपर टिश्यु वापरायचं हमखास टाळता येईल. घरीही शक्यतो ओटा पुसायला इ. फ़डकी वापरलीत तर ती धुता येतात किंवा वाटल्यास टाकता येतात. त्यासाठी खास रोज पाच-सहा बाउन्टी कशाला वापरा? शाळेतल्या वह्यांमधल्या उरलेल्या पानांची रफ़ वही बनवणं हेही एक प्रकारे वापरातली एक वही कमी करण्यासाठी मदतच करतं...आता या कमी वापरात आपण फ़क्त वाचवतोय उगाच कंजुषी नाही तर वायफ़ळपणा टाळतोय..असे अनेक उपाय आहे Reduce साठीचे...
Reuse म्हणजे पुन्हा वापरणंही नेहमीच चांगलं. उदा. लहान मुलांना घरी चित्रकला इ. उद्योग करायला पाठकोरे कागद दिले तरी काम होतं. मुळात प्लास्टिकपिशव्या टाळाव्या पण आल्याच तर शक्य असल्यास मग एक-दोनदा त्याच वापराव्यात म्हणजे निदान थोडं गिल्टी फ़िलिंग कमी. माझी आई भाज्या धुतलेलं पाणी नेहमी कुंड्यांमध्ये झाडांना घालते. माझ्या लहानपणापासुन पाहिलेलं पुनर्वापराचं हे सगळ्यात सुंदर आणि सोपं तत्व आहे. तसंच सांडपाण्यावर बागा फ़ुलवणारी एक सोसायटीही मला माहित आहे. मोठ्या लेव्हलवर जमत असेल तर तोही प्रयोग करायला हरकत नाही.
Recycle करणं केव्हाही चांगलं पण त्यासाठीसुद्धा एनर्जी लागते म्हणून वरची दोन तत्व पाळून जे उरेल आणि शक्य असेल त्याचं रिसायकलिंग करणं हे उत्तम.म्हणजे ते वर म्हटलेले पाठकोरे कागद दोन्ही बाजुनी भरले की मग सुक्या कचर्‍यात टाकावे. नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगळा करणं चांगलं. आता सगळीकडे तो वेगवेगळा उचलण्याची सोयही आहे. शिवाय एखाद्याचं मोठं घर, पाठी अंगण इ. असेल तर मग ओल्या कचर्‍याचं कंपोस्ट बनवुन त्याचं खत झाडांना वापरणं हेही खूप किफ़ायतशीर ठरु शकेल. अमेरिकेतील काही गावांत एखाद्या मोकळ्या ठिकाणी आपण स्वतः आपला असा कचरा नेऊन कंपोस्ट खताच्या खड्यात नेऊन टाकु शकतो आणि नंतर गरज पडेल तेव्हा तेच खत स्वतःच्या बागेसाठी फ़ुकट घेऊनही येऊ शकतो..खूपच अभिनव कल्पना आहे ही. त्याने रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण शुद्धीकरणासाठी मदतच होते...
खरं तर या विषयावर जेवढं मांडावं तेवढं कमी आहे..आणि असे एक दिवस साजरे करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनाला हे वळण लावणं जास्त आवश्यक आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून याचं भान आपण ठेऊया आणि आजच्या पर्यावरण दिवसापासून जमेल तितकं environmental freindly वागायचं ठरवुया.

Tuesday, June 1, 2010

जेटलॅगदेवाची व्रतकथा...

ऐका, ऐका, भाविक भक्तहो जेटलॅगची कहाणी...ही कहाणी वाचल्याने, ऐकल्याने काय होते? जर स्वतः जेटलॅगमध्ये असाल तर थोड्या टिपा आणि मानसिक आधार मिळतो; नसाल तर थोडी करमणूक होते...श्री जेटलॅगदेवाची नावे व रुपे अनेक आहेत.सर्व भूतांच्या ठिकाणी तो वेगवेगळ्या तास, दिवसांच्या रुपाने राहतो. भारतात चार-पाच दिवस, अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर एक आठवडा तर पूर्व किनार्‍यावर काही वेळा आठवड्यापेक्षा जास्त अशा विविध रुपांनी तो सगळीकडे वास्तव्य करुन असतो.त्याला नमस्कार असो. अशा या जेटलॅग देवाची ही कहाणी आहे..
उत्तर अमेरिका खंडात अमेरिका देशात असंच एक भारतीय कुटुंब राहात होतं. इतर कॉमन घरांसारखं एक गोंडस (पण तसं लबाड) बाळ त्यांच्याही घरात होतं.एकदा जेटलॅग देवांच्या मनात आलं आपण त्या कुटुंबाच्या घरात जावं त्याने त्या घरातल्या गृहिणीला थोडा आराम मिळेल, त्यांचं बाळ थोडं जास्त झोपेल आणि तिचा नवराही सगळेच झोपलेत या आनंदात आणखी थोडा जास्त आराम करील..म्हणून जेटलॅगदेवाने त्या घरच्या राजा-राणींच्या मनात शिरण्याची युक्ती केली आणि कंटाळ्याचे रुप घेतले. कंटाळाच तो कुणाला नाही लगेच दिसणार??
दरवाजातच त्यांना राजा-राणींचे आत्ताच ओळख झालेले एक मराठी जोडपं भेटलं.कंटाळ्याचे रुप असले तरी जेटलॅग देव तेजस्वी दिसत होता त्यामुळे या जोडप्याने त्याचे क्षेमकुशल विचारले. तेव्हा कंटाळ्यारुपी जेटलॅगदेवाने त्या जोडप्याने राजा-राणींची पूर्वकथा आणि जेटलॅगव्रताचा महिमा सांगितला. ही राजा-राणी काही वर्षांपुर्वी सारखं भटकत. मायदेशाच्या तसंच देशातल्याही मोठमोठ्या वार्‍या करत. हवाई, वेस्ट कोस्ट अशा लांब-लांब ठिकाणी जाऊन आलं की त्यांना जेटलॅग होई आणि मग काही दिवस ते निवांत आराम करत. अशावेळी घरचं ऑम्लेट-पावही त्यांना गोड लागे. जास्त भांड्याचा पसारा नाही की ग्रोसरीची कटकट नाही..त्यांचे दिवस कसे सुखात जात. पण आता युवराजांच्या आगमनाने त्यांना जेटलॅगव्रताचा विसर पडला आहे. सारखं घरकाम आणि ऑफ़िस यातच ते कष्टताहेत..त्यांना व्रताची आठवण करुन देण्यासाठी मी मुद्दाम येथे आलो आहे.
कंटाळ्याचे बोलणे ऐकुन त्या मराठी जोडप्याच्या मनातही खूप कंटाळा उत्पन्न झाला आणि लवकरच त्यांनी मायदेशाचं तिकिट तेही वन वे काढून आपला कंटाळा साजरा केला.त्यांनी जेटलॅगदेवाचं ऐकलं म्हणून त्यांना तिथे गेल्यावर भरपुर जेट्लॅग झाला आणि ते आरामाच्या पाठी लागले...घरच्यांनी आयतं करुन दिलेलं किंवा बाहेर जाऊन खादाडी करणं एवढंच काय त्यांना काम होतं...
इथे कंटाळा रुपात आलेल्या जेटलॅगदेवांना राजा-राणींनी ओळखलंच नाही. त्यामुळे त्यांनी साधी विचारपूसही केली नाही त्यामुळे त्यांनाच कंटाळून कंटाळारुपी जेटलॅगदेव निघून गेले. पण तरी युवराजांना नातलगांशी भेटवायला राजा-राणी मायदेशी गेले. जेटलॅगदेव आधीच रुसल्यामुळे, तिथे त्यांना इतकं उत्साही वाटलं की त्यांना जेटलॅग झालाच नाही. ते सगळीकडे भटकत राहिले.काय वाट्टेल ते, वाट्टेल तिथे खात राहिले आणि मजाच मजा केली. राणीला तर मध्ये अन्नातून विषबाधाही झाली तरी त्यांनी खादाडीचा हेका सोडला नाही..शेवटी त्यांचा परत जायचा दिवस उगवला. आता मात्र त्यांना आपले पुर्वीचे दिवस आठवले आणि त्यांना प्रचंड कंटाळा आला. पण परत येण्याखेरीज पर्याय नव्हता.
पण त्यांचे पुर्वीचे दिवस त्यांना आठवले म्हणून जेटलॅग देव त्यांना प्रसन्न झाले.परत अमेरिकेत आल्यावर आठवडा झाला तरी ते वेळी-अवेळी झोपू लागले. युवराजांनी तर पहाटे उठायचा कहरच लावला पण तरी घरचं ऑम्लेट-पाव गोड वाटु लागलं, थोडक्यात केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीची गोडी अवीट झाली आणि मायदेशाहून फ़्रोजन करुन आणलेल्या आमरसाचे बाउलच्या बाउल रिते होऊ लागले..संध्याकाळी जेवता जेवता युवराज खुर्चीतच झोपू लागले. राणीला आराम मिळाला आणि या कहाणीसारख्या पोश्टा सुचू लागल्या. युवराजांना कधीही भूक लागु लागली आणि त्यांच्या खाण्याचे नखरे आहेत म्हणण्याचेही कमी झाले. राजांनीही तिन्ही-त्रिकाळ आराम करुन घेतला. आणि असे त्यांचे दिवस मोठ्या मजेत जाऊ लागले.
म्हणून म्हणते, उतु नये, मातु नये, दुरची आणि त्यातही मायदेशाची वारी करायला विसरु नये.जेटलॅग देवाचा महिमा पुरवतो भक्तांची कामना. अशी ही साता उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ-संपुर्ण...बोला जेटलॅगदेवांचा विजय असो...कंटाळा महाराज की जय...

वि.सु.....कुठल्याही व्रतकथेचा आधार हा निव्वळ योगायोग समजावा...किंवा अवेळी उठण्याचे परिणाम या कॅटेगरीत टाकुन मोकळे व्हावे..