Wednesday, July 20, 2011

दर्द से मेरा..............


असं म्हणतात, नदीचं  मूळ आणि ऋषीचं  कुळ शोधू नये...यामागे काही वेगळा अर्थ असावा का असं कधी कधी उगाच वाटतं आणि मग एखादी प्रचंड हादरा देणारी घटना घडून जाते...कधी आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असतो कधी दुरून..पण तगमग तीच...दूर असलं की जास्त विचार,जास्त काळजी आणि शरम पण...त्यानंतर आणखी एकदा पुन्हा तशीच घटना घडते आणि मग आपण मागे मागे जातो ...प्रत्येक वेळचे संदर्भ शोधायचा  प्रयत्न करतो...घडलेल्या घटनेचे घाव ताजे असतील तर ही मागे जायची तगमग आणखी वाढते...
सुरुवात होते ती आत्ता ताज्या असलेल्या घटनेचे दुरून पाहिलेले रूप..बापरे इतकं सारं घडून गेलं आणि मी काय करत होते...
तो अख्खा दिवस कामात लक्ष लागत नाही, आपले माहितीतले सगळे ठीक आहेत न आणि अशाच चौकश्या...आणि नाहीत ओळखीचे पण म्हणून काय झालं त्यांचंही एक कुटुंब आहे, आयुष्य आहे, इच्छा सगळं सगळं आहे.......चौकटी मोडताहेत...त्याचं दु:ख दाटून येतंय....आठवडा होतोय.......आणि सगळं जवळ जवळ तसच...विस्कळीत....पुन्हा कधीही काहीही होणार हे माहित असलं तरी न थांबलेलं...न बदलेलं....

लताचा दर्दभरा स्वर उगाच या वातावरण दाटून राहिला आहे असं वाटत राहतं...  

                                     दर्द से मेरा दामन भर दे या अल्ला...
                                     फिर चाहे दिवाना कर दे या अल्ला..

मग पुन्हा आधीची वेळ, लख्ख आठवणीतली........मागच्या वेळी तर अगदी समोरच सगळं घडलं....आपण काय करू शकलो??? काहीच नाही....त्याआधी... पुन्हा दूर...जवळचा मित्र ती गाडी चुकल्यामुळे वाचला....आपण काय करू शकणार आहोत??? काहीच नाही...हे विचार आहेत की छळ सुरु आहे मनाचा स्वत:शी....लताचा सूर एक आर्त मागणी करतो आणि हा छळ वाढतो...

                                    मैने तुझसे चांद सितारे कब मांगे 
                                    रोशन दिल बेदार नजर दे या अल्ला...

त्याआधीची वेळ पहिलीच होती अशी स्वत: तिथे नसण्याची....लताच्या सुराची बेचैनी जास्त वाढते.....

                                    सूरजसी एक चीज तो हम सब देख चुके
                                     सचमुच की अब कोई सहर दे या अल्ला...

त्याआधी जायचं तर एक मोठीच मालिका.....एक दोन ठिकाणी स्वत:ही असू शकलो असतो.....नव्हतो म्हणूनचा निश्वास नाही पण हे असं मागे मागे जाणं आता झेपत नाहीये....धाप लागतेय.....गुदमरायला होतंय.....शेवटी कुणाचाही असला तरी जीवच तो ....तो जायची वेळ अशा प्रकारे का यावी त्यांच्यावर....
                                 
नदीचं मूळ, ऋषीचं  कुळ नकोच शोधायला....हे सगळं का सुरु झालं???नकोय काही कारणं....थांबवा हे सगळं...आसमंत भारून ठेवलेला लताचा स्वर आता ठाम वाटतोय...


                                    या धरती के जख्मो पर मरहम रख दे 
                                    या मेरा दिल पथ्थर कर दे या अल्ला.................................................




Friday, July 8, 2011

वाळूच्या नंदनवनी...

फिरायची आवड दोघांनाही....मिळत नाही तो वेळ....सारखं कामं एके कामं करून कुठे जायचं याच प्लान्निंग पण करता येऊ नये असं झालं की खरं तर आणखी खट्टू व्हायला होतं... पण एखादा दिवस असाही यावा, जास्त नाही फक्त राहायची सोय करावी आणि मग ठरवूया काय पहायचं ते....तसच निघालो यावेळच्या उसातल्या स्वातंत्र्यदिनी उसाटायला..बरोबर दोन छोटी मुलं आणि आईला पण गाडी (कधीकधी ) लागते म्हणून फार लांब नाही फार जवळ नाही...pacific कोस्टात...स्पेसीफिकली सांगायचं तर ओरेगावच्या दक्षिण किनारी...(आयला उसात भटकंती केल्यापासून दिशा, मैल एकंदरीत भूगोल आणि इतर बरेच गोल गोल असलेले विषय पण हातासरशी वेगळे व्हायला लागलेत..)

'फ्लोरेंस" दक्षिण किनारपट्टीतला नितांत सुंदर गाव....तसं पाहायला गेलं तर सगळ्या pacific नॉर्थ वेस्टला निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य आहे...आता पर्यंत ज्या ज्या वेळी इथे भटकलोय प्रत्येकवेळी नवा मोती हाताला लागतो...हा अथांग किनारा आणि त्याच्या प्रत्येक गावी दिसणारं प्रशांत महासागराचं लोभसवाणं रूप..अहाहा....बाकी काही नाही पण इथल्या निसर्गाच्या जाम प्रेमात आहे मी...माझ्या उसातल्या आतापर्यंतच्या वास्तव्यातलं सगळ्यात सुंदर राज्य हेच आहे....निसर्गाने खूप दिलंय आणि तुलनेने नवी वस्ती असल्याने ते बऱ्यापैकी जपलंही गेलं आहे...कुठे जायचं तर कुठेही हे उत्तर जास्त समर्पक ठरेल इतकी विविधता आहे...
यावेळी फ्लोरेंसला यायचं मुख्य कारण शांतपणे घराबाहेर कुठेतरी आराम करणे हे असलं तरी कुठल्याही नव्या जागी गेल्यवर तिथली स्पेशालिटी काय आहे म्हणून थोडा फार शोध होतोच..तसच हॉटेलच्या रूममधल्या माहिती पुस्तिका पाहिल्यावर sand दुनेस च प्रकरण हाताशी लागलं..हॉटेलपासून फार लांबही जायचं नव्हतं म्हणून सकाळी आरामात निघालो आणि पोराटोरांना घेऊन फिरण्याजोगी बगीराईड होती ती करायचं ठरलं...बगी कसली मोठा बगोबाच होता तो आणि त्याचे टायर चक्क विमानाचे होते..आणि तिथे आणखी बरीच ATV मध्ये मोडणारी वाहने दिसत होती...आता उत्कंठा वाढू लागली...

आमच्या चालक कम गाईड बॉबने स्वागताचे दोन शब्द बोलून थोडीफार माहिती दिली..ती ऐकताना समोर गाडीने वळण घेतल आणि हळू हळू वाळू दिसायला लागली...पुढे काय बर असेल....

अबब केवढी ही वाळू....आणि त्यावरून झपाझप जाणारी आमची बगी...

बॉबने सांगितल्याप्रमाणे ही वाळू ग्लेशियर वितळले तेव्हा त्याबरोबर आलीय आणि जगातली (अमरिकेत असं वाचलं तरी चालेल कदाचित...कारण जग या शब्दाची अमेरिकेतली व्याख्या थोडी वेगळी आहे न..) सगळ्यात बारीक वाळू हीच आहे...
त्याच्या मते लाखो वर्षे सूर्य, वारा आणि ओरेगावातला स्पेशल पाऊस यांचा परिणाम म्हणून इतकी बारीक वाळू इतर कुठेही आढळत नाही...
प्रशांत महासागराला समांतर साधारण चाळीसेक मैल पसरलेले हे वाळूचे डोंगर काही काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून  साडे चारशे ते पाचशे फुटापर्यंत उंच आहेत...त्याने आमची गाडी अशा काही डोंगरावरून घसरवली तेव्हा आम्हाला पण ते जाणवलच...आरुषने तर भोकाड पसरून मला शाळेत (वाचा पाळणाघरात ) जायचं म्हणून सांगितल...(भीक नको पण कुत्रा आवर ते हेच का असं त्यावेळी पण माझ्या मनात चमकून गेलं) 


या पूर्ण परिसरात वरच्या फोटोमध्ये दिसतात तशी बरीच तळी आहेत (किती ते आता विसरलेय) आणि समुद्राच्या इतक्या जवळ असूनही यातलं पाणी गोड आहे....(कारण तेच ग्लेशियरच पाणी अशी बॉबची टिपण्णी) 




आता हे असं वाळूचं नंदनवन मिळाल्यावर लोकांनी खेळ मांडला नाही तर नवलच नाही का? वरचा फोटो सरळ आहे ती गाडी वर चढतेय फक्त...




या आणि अशा प्रकारच्या खेळांचा थरार अनुभवायचा असेल तर जायलाच हवे...


आणि जर स्वतः चालवणार नसलं तर ही वरच्या फोटोमधली पिवळी गड्डी आहेच...आमच्या बगोबापेक्षा ही जास्त जोरात जाते त्यामुळे आणखी थरार...
हाच आमचा बगोबा..टायर पाहिलेत किती मोठ्ठाले आहेत ते.....


आणि हा वरचा फोटो म्हणजे ग्रांड फिनाले का काय म्हणता येईल ते..ही बगोबा ट्रीप झाल्यानंतर याच भागच आम्ही विमानातून दर्शन घेतलं...त्यात दिसतंय मैलोन मैल पसरलेलं वाळूचं नंदनवन आणि त्यात धमाल मस्ती करणारी माणसांची बेटं...