Monday, May 30, 2011

जय हो ब्लॉगिंग

आठवणींची गर्दी खूप वाढायला लागली आणि त्या प्रत्यक्षात सांगण्यासारखी माणसं दूर दूर जाऊ लागली तसं या आठवणींची साठवण करण्यासाठी हा ब्लॉग सुरु केला. आपल्याला लिहिता येतं म्हणून नव्हे किंबहुना ते अजुनही लिखाण कॅटेगरीत मोडत नाही पण लिहिलं की मनाला बरं वाटतं..कधीतरी असंच एखादं पान उघडलं की तो दिवस,ती घटना पुन्हा अनुभवली जाते..मग हळुहळु आठवणीतली गाणी, मुलांच्या गप्पा, वाचलेलं पुस्तक, पाहिलेला चित्रपट सारंच ब्लॉगवर येऊ लागलं.आपल्या साध्यासुध्या आयुष्यातही लक्षात ठेवण्यासारखं किती आहे याचा जणू काही साक्षात्कारच झाला.

सुरुवातीला एकटीने सुरु झालेल्या या प्रवासात मग आपसूक सोबती मिळत गेले. काही जणं अगदी प्रत्येक पोस्टवर आवर्जुन प्रतिक्रिया देणारे, नाही लिहिलं तर सगळं ठीक आहे नं म्हणून काळजी करणारे,अगदी प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी असं लिखाण नसलं तरी जमेल तेव्हा कौतुकाचे शब्द घेऊन येणार्‍या देशोदेशीच्या व्यक्ती आणि त्यांचेही तितकेच विविध विषयांवरील मराठी ब्लॉग..

आता आणखी एक सवयही लागली ती म्हणजे इतर ब्लॉग वाचण्याची,जमेल तसं प्रतिक्रिया द्यायची,कामाच्या धबडग्यात नाही जमलं तर घाऊकपणे एक एक ब्लॉग वाचुन ब्लॉगवाचनाचा कोटा पूर्ण करायची. या सर्व ब्लॉग मित्र-मैत्रीणींचा समुह म्हणजे माझ्यासारख्या परदेशात राहणार्‍या व्यक्तीला मायबोलीत व्यक्त होण्यासाठीचा हक्काचा मंचच जणू..

पण हे नातं फ़क्त एकमेकांच्या ब्लॉग ओळखींपुरता मर्यादित न राहता या पलिकडे ब्लॉगविश्वात काही घडावं असं मुंबईत राहणार्‍या माझ्या मित्र-मैत्रीणींनी फ़क्त ठरवलंच नाही तर प्रत्यक्षातही आणलं..योगायोगाने मागच्या मे मध्ये माझाही मुंबई दौरा होता त्यामुळे मुंबईच्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्याला हजेरी लावायचं भाग्य मलाही मिळालं.या मेळाव्यामुळे कित्येक चेहरे आजवर फ़क्त ब्लॉगमुळे माहित होते त्यांच्याशी ओळख झाली. इतरही चर्चा तिथे झाल्या आणि ब्लॉगिंगविषयी जास्त माहिती मिळाली.

कौतुकाची गोष्ट म्हणजे सलग दुसर्‍या वर्षी मुंबईला ब्लॉगर मेळावा भरतोय. येत्या रविवारी ५ जून २०११ रोजी दादर, मुंबई येथे सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात हा मेळावा आयोजित करण्याचे ठरवले आहे.त्या निमित्ताने मराठी ब्लॉगर भेटतील आणि ब्लॉग जगतातल्या समस्या आणि इतर विषयांवर चर्चा होईल. यावर्षी मेळाव्याला जाऊ शकत नसल्याची खंत आहेच पण त्याची कसर मंडळ तत्परतेने अहवाल आणि फ़ोटोंनी भरुन काढील याची खात्री आहेच...

या मेळाव्याला जाणार्‍या सर्व ब्लॉगदोस्तांना मनापासुन शुभेच्छा...जय हो ब्लॉगिंग....

Thursday, May 26, 2011

सवय

अशीच एक कामाची दुपार..थोडी निवांत,थोडी डोकं खाणारी....कॉन्फ़ कॉल सुरु असताना उजवीकडच्या खिडकीतून आपसूक बाहेर पाहिलं जातं. इथुन दिसणारा पार्किंग लॉट खरं तर सकाळीच जवळजवळ रिकामी होतो आणि नंतर वर्दळ सुरु होते ती पुन्हा चारच्या नंतर..या कामाच्या दुपारी कधीतरी दिसणार ते अपार्टमेंटच्या ऑफ़िसमधल्या कुणी त्यांच्या गोल्फ़ कार्टमधुन आलं तर नाहीतर एखादा कुरिअरचा ट्रक क्वचित एखादी कुत्रा घेऊन चालणारी व्यक्ती.

त्यादिवशी अशीच गोल्फ़ कार्ट थांबली आणि आमच्या अपार्टमेन्ट ऑफ़िसमध्ये काम करणारी, सदा हसतमुख असणारी, ठेंगणी ठुसकी आणि नेहमी उंच चपला घालुन(ही) झपाट्याने चालणारी सिंडी दिसली.

आजही नेहमीच्याच घाईत. बहुधा एखाद्या अपार्टमेंटमध्ये नोटीस द्यायला जात असावी. कार्ट पार्क करुन हातात लिफ़ाफ़ा घेऊन झपाझप दोन पावलं टाकली असतील तितक्यात अचानक थांबली. काय झालं बरं असा मी विचार करतेय तोच खाली वाकुन काहीतरी उचलताना दिसली. काहीतरी पडलेलं होतं बहुधा कुणी खट्याळ मुलानं गाडीतून उतरता उतरता टाकलेलं चिप्सचं आवरण. शांतपणे उचलुन ते कार्टमध्ये टाकलं आणि स्वारी पुढे आपल्या कामाला गेली.

खरं तर रोज सकाळी हा सगळा भाग एक कामगार जे काही छोटं मोठं पडलेलं असेल ते उचलुन आणखी चकाचक करुन जातो आणि दुसर्‍या दिवशीही येणार असतो. म्हणजे हा कचरा उचलणं ना तिच्या कामाचा भाग ना तिची जबाबदारी. पण आता दिसला आहे कचरा तर उद्या तो उचलणारा उद्या येईल म्हणून कशाला वाट पहा हा तिचा विचार मला बाकी खूप भावला.

सध्या घरात ’क्लिन-अप टाइम’ इ.इ.ची शिकवण द्यायचा प्रयत्न करतोय आणि खुपदा स्वतःही खूप काम असलं तर शेवटी आवरायचा कंटाळा येतो त्या पार्श्वभुमीवर आपण ज्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्ससाठी काम करतो ते स्वच्छ दिसावं म्हणून कचरा नियमितपणे उचलायची सिंडीची सवय मला मात्र फ़ार लक्षात राहिली.

Wednesday, May 11, 2011

ती गेली तेव्हा.....

२०११ च्या फ़ेब्रुवारीमध्ये मेयरपदाची माळ गळ्यात पडली आणि तेव्हापासुन फ़ुतोशींना उसंतच नव्हती. आपल्या प्रवासाकडे थोडं मागे वळून पाहिलं तर जपानच्या उत्तर किनार्‍यावरचं रिकुझेन्टकटा (Rikuzentakata) हे एक छोटंसं शहर खरं म्हणजे त्यांच्या बाबांचं जन्मगाव. त्यामुळे जन्म आणि वयाची २८ वर्षे राजधानीत काढली तरी बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा त्यांचं संगणक अभियंत्याच्या नोकरीमध्ये भागेना तेव्हा परतीसाठी हेच गाव निश्चित करायला फ़ार अवधी लागला नाही. तिथल्या एका स्थानिक पोल्ट्री प्रोसेसिंग कंपनीत आपली पहिली नोकरी करतानाच त्यांना ’कुमी’ भेटली. त्यांच्यापेक्षा सात वर्षे लहान..."अजुनही ती विशीचीच दिसते", ते म्हणतात.तिला काचसामान जमवायची आणि हस्तकलेची आवड. स्वतः बनवलेल्या अशा काही वस्तू आपल्या काही मित्र-मैत्रिणींच्या दुकानात ती विकतही असे.यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर फ़ुललेली दोन फ़ुलं मोठा मुलगा ’ताइगा’ आणि धाकटा ’कनातो’. फ़ुतोशीनाही या थोड्या लेड बॅक आयुष्यात स्थिर व्हायला फ़ार वेळ लागला नाही. एक कुठलंही साधं चौकोनी जपानी कुटुंब एका छोट्या शहरात जगेल अगदी तसंच.

मध्येच हे मेयर व्हायचं कसं काय डोक्यात आलं असं वाटावं; पण त्याला पार्श्वभूमी होती त्यांच्या वडिलांचं राजकारणात असण्याची.बर्‍याच वर्षांपुर्वी सिटी कॉंन्सिलची निवडणूक होणार होती; त्यासाठी काही ड्राफ़्ट्स बनवण्यासाठी सगळ्यांना संघटित करायचं काम फ़ुतोशींच्या वडिलांनी केलं होतं. त्यामुळे एके दिवशी गावातल्या साधारण दिडेकशे वृद्धांचा समुह त्यांच्याघरी आला तेव्हा त्यांना काय म्हणायचं हेच फ़ुतोशींना कळेना. दशक झालं बाबा गेले त्याला पण ते म्हणाले होते की एक दिवस माझा मुलगा इथेच परत येईल आणि नक्कीच शहरासाठी काम करेल. भानावर येईपर्यंत फ़ुतोशींचे पोस्टर गावात दिसु लागले आणि सिटी कॉन्सिलमध्ये त्यांचं काम सुरुही झालं. जेव्हा आधीचा मेयर आजारपणामुळे पुन्हा निवडणूक लढणार नव्हता तेव्हा फ़ुकोशींचं मेयरपदासाठी प्रयत्न करणं जवळजवळ निश्चित झालं होतं. कुमींनी फ़क्त नवर्‍याला ’मम’ म्हटलं. प्रशांत महासागराचा सुंदर किनारा लाभलेल्या या शहराचं कर्ज कमी करुन पर्यटकांना आकर्षुन घेण्यासाठीच्या त्यांच्या योजना होत्या आणि फ़ेब्रुवारीमध्ये त्यांच्या मेयरपदावर शिक्कामोर्तबही झालं.

तेव्हापासुन कामाची उसंतच नव्हती. आता खरं तर बायकामुलांसाठी वेळच नव्हता पण तो नंतर नक्की येईल हेही त्यांना माहित होतं. ११ मार्च २०११ ची त्यातल्या त्यात शांत दुपार म्हणून दुपारी साधारण २.४० च्या सुमारास आपल्या बायकोला फ़ोन करुन मुलांना एका बार्बेक्युला न्यायला सांगितले आणि तीही त्यांना मेल करुन कळवेन म्हणाली...खरं तर हे संभाषण तसं पाहता अगदीच त्रोटक होतं पण कदाचित नियतीने त्यांच्यासाठी तेच लिहुन ठेवलं होतं.त्यानंतर अगदी सहाच मिनिटांनी म्हणजे २:४६ च्या आसपास ९ रिश्टर स्केलच्या भुकंपाच्या हल्ला झाला आणि गावातली वीज, फ़ोन सारं काही बंद पाडून सुनामीच्या काळलाटा गावात घुसल्या. तिथल्या स्थानिक लोकांबरोबर चार मजली सिटी हॉलच्या छपरावर चढलेल्या फ़ुकोशिंना समुद्रसपाटीपासुन जवळ असलेला आपल्या घराचा भाग दिसत होता. मुलंतर शाळेत होती आणि त्यांची शाळा एका टेकडीवर होती. पण यावेळी घरी असणार होती ती एकच व्यक्ती त्यांची अजुनही विशीत दिसणारी ’कुमी’.इतर कुठल्याही नवर्‍याप्रमाणे त्यांनाही गाडी घेऊन सरळ आपल्या घरी जाऊन तिला शोधायचं होतं.....

But I really could not do that....I was thinking the whole time: 'I hope she was able to get away'.

आपल्या गावाला सुंदर पर्यटनस्थळ बनवायचा मेयरचा अजेंडातर सुनामीने पार धुतलाच होता. पण आता जबाबदारी होती ती पुन्हा उठून उभं राहण्याची आणि तेही सार्‍या गावासकट.....आता नवा अजेंडा ’help survivors'...आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी शक्य असेल त्यांना शिजवलेल्या भाताचे गोळे वाटायला सुरुवात केली. लष्कराला रस्ते मोकळे करायला लावले जेणे करुन आणखी कुमक आतपर्यंत आणता येईल. साधारण एका आठवड्यात बाहेरुन अन्न आणि पाणी जरा नियमितपणे गावात यायला लागलं. पण तरी आणखी काही आवश्यक गोष्टी जसं ब्रश, डायपर अजुनही मिळत नव्हत्या. इंधन, वृद्धांसाठी औषधं या वस्तुंचीही मारामारच होती. फ़ुतोशींनी तोकियोमधल्या काही कायदेपंडितांना एक दिवस गावातल्या आपत्कालीन रहिवासात राहायला बोलावलं जेणेकरुन सरकारवरही जादा मदत पाठवण्यासाठीचा दबाव येईल. दिवस जात होते तसं नव्याने मेयर झालेल्या फ़ुतोशींचा एक नवा दिनक्रम सुरु झाला होता. रोज दुपारी पत्रकारांना आतापर्यंतचा मृतांचा आकडा आणि यादी द्यायची आणि त्यांच्याबरोबरीच्या सहकार्‍यांबरोबर पुनर्वसनाची कामं करायची.लोकांना राहण्यासाठी तात्पुरती घर बांधायच्या ऐवजी काही लोकांना जिथे भुकंपाने झालेलं नुकसान कमी आहे अशा ठिकाणी पाठवायचा खुद्द पंतप्रधानांचा सल्लाही धुडकावुन आमची लोकं एकत्रच राहतील हे ठामपणे सांगताना शेवटी २६ मार्चला बांधकामांची सुरुवात झाली. आतमध्ये प्लंबिंग आणि हिटर असेल अशी ३६ अपार्टमेंट्सची लगोलग बांधणी सुरु झाली.

साधारण हजारेक लोकांनी भरलेल्या प्रवेशिकांमधुन लॉटरी काढुन ती ताब्यात द्यायचं ठरलं. आणखीही छोटे छोटे विजय होतेच. एक स्थानिक कापडाची कंपनीला स्त्रियांसाठीचे कपडे बनवण्यासाठी डोनेशन मिळवुन दिलं.हळुहळु तातडीच्या गोष्टी कमी झाल्या तरी आभाळंच फ़ाटलं होतं. सगळे रस्ते, पुल, रेलरोड यांची वाट लागली होती.जागोजागची वीजेची कनेक्शन्स तुटली होती. एक पाणी निचरा करायचा जवजवळ २०० मिलियन डॉलरचा प्लान्ट गायब झाला होता. शहराशी संबधीत सगळी कागदपत्र लाटांनी धुऊन नेली होती.सगळ्या महत्वाच्या इमारती जसं सिटी हॉल, अग्निशमक दल, स्पोर्ट सेंटर पाडुन नव्याने बांधायच्या होत्या. सगळीकडे मेयर म्हणून फ़ुतोशींना या सगळ्या कामांना लागणारा पैसा उभा करायचा होता. देवाने काम करायला आपल्याला दोन हात जास्त द्यावे असंच वाटण्याचा हा प्रसंग होता.

साधारण महिन्याभरानंतर फ़ुतोशींनी केलेल्या मेहनतीची फ़ळं दिसु लागली. आता शहरात एक पोलिस स्टेशन, एका बॅंकेची शाखा, चेंबर ऑफ़ कॉमर्स दिसू लागलंय. ती बांधायला घेतलेली घरंही ताब्यात दिली गेलीत. लोकांचा इतर कुठे न पळता याच शहरात राहायचा आत्मविश्वास वाढतोय.

काम,काम आणि फ़क्त काम करणार्‍या फ़ुतोशींना एका मंगळवारी एक फ़ोन आला...निदान आतातरी सगळं बाजुला करुन जायलाच हवं असा....त्यांच्या घरापास्नं साधारण २००० फ़ुट उंचीच्या एका टेकडीवर कुमींशी साधर्म्य असणारं एक प्रेत मिळालं होतं.आता निघायला हवं म्हणतानाही कार्यालयातुन निघताना फ़ुतोशींना काही तासांचा अवधी द्यावा लागलाच. गेले काही महिने जेव्हा इतर लोकं आपापल्या घरच्यांना शोधत होते तेव्हा मुलांना त्यांच्या काकाकडे ठेऊन हा मेयर आपलं कर्तव्य बजावत होता.प्रेत ओळखण्याच्या पलिकडे गेलेलं असलं तरी ती त्यांची कुमीच होती.मेयर म्हणून आपले कर्तव्य बजावताना नवरा म्हणून आपल्या पत्नीला शोधायला आपण जाऊ शकलो नाही ही खंत तिला श्रद्धांजली वाहताना त्यांनी तिला मनोमन व्यक्त केली.आपल्या बारा आणि दहा वर्षांच्या मुलांनी तिला असं पाहु नये असं वाटताना त्यांना ही बातमी कशी द्यावी याची चिंताही आहेच...

She was like a friend to them. Since I was always so busy, they always ran to their mother.

एक नवरा,बाप म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव असली तरी या अफ़ाट आपत्तीपुढे आपलं काम करत राहाणंच त्यांना सुरुवातीच्या दिवसांत योग्य वाटलं. आपल्या पत्नीचा शोध घ्यायची इच्छा कर्तव्यापुढे गौण ठरली...

When I think about that, it really makes me question what kind of human being I am..........

 सुनामीच्या या आपत्तीचा सामना करणारे फ़ुतोशींसारख्या जपानमधल्या राजकारण्यांबद्द्ल वर्तमानपत्रात वाचताना एकीकडे आपल्या देशातल्या खबरींमध्ये लाचखोरीचे नवे नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित करण्याची स्पर्धा लावलेले भारताचे राजकारणी पाहिले की मान खरंच शरमेने खाली जाते. आज जपानवर आलेल्या या संकटाला दोन महिने पूर्ण होताहेत.

हिरोशिमा-नागासाकीच्यावेळी राखेतून वर आलेला हा देश, भुंकपासाठी सतत तयार असणारा.. पण फ़क्त ती तयारी वरवरची नाही तर असे अनेक फ़ुतोशी या देशात आहेत म्हणून पुढे वाटचाल करणारा एक चिमुकला देश.या आपत्तीत आपले प्राण गमावणार्‍या नागरिकांना या ब्लॉगवाचकांतर्फ़े ही श्रद्धांजली आणि केवळ देशासाठी आपले घरचे दुःख विसरून कर्तव्यपरायणतेचं स्तंभित करणारं रुप दाखवणार्‍या अनेक फ़ुतोशींना मनापासुन सलाम.


वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये वाचलेल्या एका लेखावर आधारित


Thursday, May 5, 2011

संदेश

प्रिय अपर्णास,

आत्ताच तुझा ऋषांक पालथा पडतोय हा बझ पाहिला आणि "यार मला यावेळीतरी मुलगी हवी होती रे" वाला आपला फ़ोन आठवला. हे पत्र लिहिताना आता किती वर्षे झाली आपल्या मैत्रीला हा प्रश्न अर्थातच आपण मुदलात आणत नाही कारण ते मोजायचं नाही हे आपलं कधीच ठरलंय...(आता इथे माझा पहिला वन-वे ब्रेक-अप आणि नंतर सारख्याच वेगवेगळ्या मुली आवडल्यामुळे सारखे-सारखे झालेले वन-वे ब्रेकअप याचा हिशेब काय करतेस?? माहितेय त्यात माझ्या लग्नाला झालेली वर्षे मिळवली की तितक्या वर्षांची आपली मैत्री....जाऊदे नं पण याची चर्चा तुझ्या ब्लॉगवर कशाला गं?? शेवटी प्रत्येकवेळी माझ्या पैशाने ते आपण कॅफ़े अल्फ़ातल्या पाव-भाजी आणि फ़ालुद्यात बुडवले त्याचा हिशेब कुठे मी करतोय... असो,तुझ्या ब्लॉगसाठी पत्र लिहायला बसलो म्हणून हे तेल च्यायला मध्येच ओततोय झालं) हा तर मूळ मुद्दा, तुझा जुना मित्र म्हणूनच नव्हे तर एका मुलीचा बाप या नात्याने दुसरा मुलगा झाल्याबद्द्ल तुझं अभिनंदन करायची ही संधी मी घेतोय(म्हणजे जाहिररित्या गं... ट्युबलाइट).

हे बघ सर्वप्रथम हे लक्षात ठेव की मला चांगलं ठाऊक आहे की तुला मुली (किंवा तुझ्याच शब्दात मुली"") आवडतात. या पार्श्वभूमीवर आता दुसरा(ही) मुलगा झाल्याचे काही फ़ायदे मला स्वतःला एक मुलगी आहे या अनुभवाधारे सांगावे म्हणतो.

हे बघ तुला मुलीला सजवायला आवडेल असा तुझा जो गैरसमज आहे तो ती मुलगी चुटूचुटू बोलायला लागली की लगेचच दूर होईल. कारण मग तुला तिला फ़क्त कपाटातच नव्हे तर दुकानातही कपडे, दागिने, टिकल्या, पर्स आणि जे काही तयारी या प्रकारात मोडतं ते तिच्याच मर्जीने घ्यावे लागेल. त्यात निव्वळ तुझी ती मुलगी सजवायची इच्छाच कमी होईल असंही नाही पण हे सर्व आताशा खूप वेळखाऊही होतंय ही नवी तक्रार तू करशील याची तुझा जवळचा मित्र म्हणून माझी खात्री आहे. कॉलेजमध्ये तुच तर आमच्या ग्रुपमधली टॉम बॉय होतीस नं जिला आम्ही आतापर्यंत आमची सगळी सिक्रेट्स सांगितली. ती काय तू तशी टिपिकल मुलगी होतीस म्हणून नव्हे तर तू आमच्याच पक्षातली जास्त होतीस..असो..या विषयावर नंतर जमेल तसं विषयांतर करेनच.

बघ आता सजवायची हौस अशी दोनेक वर्षांतच भागल्यामुळे पुढची वर्षे किती हालात जातील याची जरा कल्पना कर. त्यातुन काही अज्ञात कारणांमुळे तुझा परदेशातला मुक्काम पंचवार्षिक दराने वाढतोय. तो असाच वाढला आणि ही मुलगी तिथेच वाढली तर विचार कर ती लवकरच डेटिंग, प्रायव्हसी अशा मागण्या करील तेव्हा काय होईल? अर्थात मुलगे असं करणार नाहीत असं मी अजिबात म्हणत नाही. पण तरी आठव तुच मागे म्हणाली होतीस तुझ्या तिथल्या एका ओळखीच्या कुटूंबातील चार-पाच वर्षांच्या मुलीने आईकडे उन्हाळ्यात बिकीनीशिवाय पुलवर कसं जायचं विचारलं होतं आणि त्यांच्यापेक्षा तुलाच टेंशन आलं होतं ते.... मुलगे असल्यामुळे ही पंचवार्षिक योजना वाढवायची झाल्यास तुला थोडी तरी उसंत मिळेल.

तू जरी आमच्या सर्वांची खूप छान मैत्रीण असलीस तरी असं नॉर्मली (म्हणजे नॉर्मल मुलगी) आणि मुलगा यांच्यात सुरुवातीला भांडणं जास्तच होतात हा एक मुद्दा लक्षात घेतलास तर आता आरुषला त्याच्या खेळात सहभागी व्हायला एक मुलगाच मिळतोय याचा फ़ायदाही लक्षात घे. त्याची जुनी मुलांची खेळणी उपयोगात तर येतीलच (माहितेय मला तुला संपुर्ण भातुकली, बाहुलीचं घर इ.इ. घ्यायचं होतं...पण ते दुसर्‍या कुठल्याही मुलीला घेऊन दे गं(मी घेतलंय कधीच नाहीतर उगाच माझ्याकडचा पसारा वाढवशील)..नाहीतर असंच आणून ठेव) पण तू आरुषला थोडंस चढवलंस तर तो आपल्या लहान भावाला त्याच खेळण्यांबरोबर खेळायला मदतही करील. शिवाय बघ आपण याच्यासाठी नवीन नाही आणत आहोत असं सांगुन तू त्याला आणखी चढवू शकशील.मुलांना चढवायला वेळ लागत नाही (तिथेही मुलीच जास्त वेळखाऊ असतात) हा मुद्दा तुझ्यासारख्या सुज्ञीस सांगणे न लगे काय??

दोन दोन मुलगे असण्याचे काही तोटेही आहेत आणि एक मित्र म्हणून त्यांचीही जाणीव तुला करुन द्यावी म्हणतो.मुलांची भूक मोठी असते आणि तुझं स्वयंपाकघरातलं कौशल्य आणि आवडही (म्हणजे खायची गं) मला चांगली माहितेय. तर तुला करता येत नाहीत म्हणजे तुझ्या मुलांना पोळ्याच आवडणार हे लक्षात ठेव आणि त्याची सोय आधीच करुन ठेव. किंवा तुझ्या पंचवार्षिक योजना संपवुन परत यायचं अशा दरम्यान प्लान कर की त्यांची वाढती भूक आणि आपल्या देशात मिळणारी पोळीवाली बाई (ती आधीच तुझ्या रोज स्वप्नात येत असेलच) यांच्या वेळेचा योग्य ताळमेळ घालता येईल. शिवाय दुसरा मुलगा आल्यामुळे तुझ्या घरात आता तू फ़ॉर गुड मायनॉरिटीमध्ये आहेस हे लक्षात ठेव. पण फ़ंद-फ़ितुरीचा योग्यवेळी लाभ घेता आल्यास हा तोटा थोडाफ़ार कमी करता येईल. शिवाय समज तुला अगदी मुलीच जातात अशा कार्यक्रमाला जायचं असेल तर तुला प्रायव्हसी मिळण्याचा (आणि एक दिवस हक्काने पोरांना बाबाकडेच द्यायचा)आपोआपच फ़ायदा होईल.

बाबाचं नाव निघालंच आहे तर परत एकदा फ़ायद्यांकडेच वळावंसं वाटतं..अगं आता तुला बाहेर गेल्यावर मुलांना शी-शुला न्यायला (पुन्हा एकदा) हक्काने बाबाकडे पाहता येईल. आरुषमुळे तशीही त्याला सवय झालीच आहे त्यामुळे तोही काही नाही म्हणणार नाही. खरेदीच्या वेळीही तुला त्यांचे तेच तेच कपडे पाहायचा कंटाळा आल्यास बाबाला तुला मुलांच्या खरेदीतलं कळतं मग तू निवांत तुमच्या मुलींच्या सेक्शनकडे टाइमपास करुन आलीस तरी चालेल. अगं तसंही तू त्यांची खरेदी केलीस तरी तुझ्याच शब्दात सांगायचं तर कपडे काय घेणार शर्टच्या ऐवजी टी-शर्ट, हात सिझनप्रमाणे मोठे किंवा छोटे, रंग तेच मुख्य निळ्याच्या शेड्स नाहीतर एखादा पिवळा,हिरवा किंवा गेला बाजार भगवा, पट्ट्या उभ्या आडव्या किंवा चौकडी आणि पॅंट या प्रकाराबद्दल तर चर्चाच नको. हाफ़ की फ़ुल ते ठरवलं की फ़क्त काळा, निळा की उजळमध्ये फ़ेंट चॉकलेटी नाहीतर जीन्स...बास....त्यावर दागिने,पर्स, टिकल्या काहीही नको...इन फ़ॅक्ट हेच बजेट तू तुझ्यावर खर्च करु शकतेस. आहे की नाही फ़ायदा.

आणि हे बघ मुलगा झाला तरी शेवटी तो आपल्या आईचा लाडका असतो आणि मुख्य आईच्या तेवढ्याच जवळ असतो. पुढे मागे बायकोमुळे त्याला आईला वेळ देता नाही आला तरी आईसाठीचं प्रेम हे असतंच ते आतापास्नं त्याच्या मनात कसं जोपासायचं ते तू बघ. मुली आपल्या जागी असल्यातरी मुलगाही खंबीरपणे आई-बाबांच्या पाठी उभा राहू शकतो.

आईवरुन आठवलं.. आता आई आहे नं तुझ्याकडे आणि ती जे करु शकते ते मी तिच्या वयात (जर पोहोचले तर अर्थात) करू शकेन की नाही असं नेहमी म्हणतेस नं? मग फ़ायदा आहे नं तुझा..अगं जेव्हा (मी "जेव्हा" म्हणतोस नाहीतर वस्सकन अंगावर येशील) तू आजी होशील तेव्हा ती जबाबदारी कदाचित आपसूकपणे परस्पर तुझी विहीण उचलेल नं....आई गं...जास्तच आगाऊपणा करतोय का मी??

असो. सांगायचा मुद्दा म्हणजे आता मुलगी हा शब्द फ़क्त स्वतःकरता ठेव आणि आपल्या ग्रुपमध्ये जसा दंगा व्हायचा तोच घरात पण करायला तयार रहा..आम्ही मुलीवाले आहोतच तुझ्या घरगुती गमती-जमती ऐकायला. तसंही आरुष तुला "आई तू काय कत्तो?" म्हणताना ऐकलंय मी. खरं सांगतो कॉलेजमधले दिवस आठवले...

असो नमनाला आणि सगळे मुद्दे संपले तरी न संपलेलं तेल खपवायला माझ्याकडे इतका वेळ नाहीए गं..शेवटी एका मुलीचा बाप आहे मी..त्यामुळे सध्या घरातला वेळ हा फ़क्त तिनं डोकं खायला राखुन ठेवला आहे....

हा तर आता वरच्या पत्रातलं फ़क्त मुद्द्याचं (हो तेच ते कंस आणि तेल सोडून बाकीचं) वाचलंस तर तुला कळेल की एक काय दोन काय मुलगा व्हायचे बरेच फ़ायदेही आहेत तेव्हा त्याचा विचार कर आणि शांतपणे आज आरुष लवकर झोपलायस म्हटलं तर निवांत झोप...तुझ्याकडे तुझी काळजी करायला थ्री इडियट्स समर्थ आहेत आणि त्या वासरात एकटीच शहाणी गाय व्हायच्या संधीचा फ़ायदा घे....



प्रत्येक मुलीकडून पोळल्यावर (अगदी स्वतःच्या पण) तुझी मदत घेणारा,

तुझाच मित्र.....